मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर थेट राजधानी दिल्लीत साहित्य संमेलन साजरं होत आहे. देशभरातील मराठी भाषिक या संमेलनाला भेट देत आहेत. अनेक साहित्यप्रेमी मराठमोळ्या वेशभूषेत संमेलनामध्ये सहभाग घेत आहेत. त्यातच महाराष्ट्राची संस्कृती प्रतिबिंबित करणारी दर्शनस्थळं सुद्धा या संमेलनात उभी केली आहेत. त्याला 100 हलगी वाद्यांची साथ दिली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत मराठी भूमी अवतरल्याचा भास होत आहे.
ताल कटोरा स्टेडियम असलेल्या जागेला ऐतिहासिक संदर्भ
98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील ताल कटोरा या स्टेडियमवर आयोजित केलं आहे. या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्यावेळी महादजी शिंदे हे दिल्ली जिंकायला आले होते, तेव्हा त्यांनी याच ठिकाणी आपली छावणी उभारली होती. महादजी शिंदे यांच्या नंतर अनेक मराठी योध्यांनी याच ठिकाणी छावणी लावल्याचा संदर्भ देखील सांगितला जातो.
ग्रंथनगरीत अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे स्टॉल
या संमेलनामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नावाने ग्रंथनगरी उभी केली आहे. या ग्रंथ नगरीमध्ये अनेक साहित्यप्रेमी मोठ्या उत्साहाने भेट देत विविध साहित्याची माहिती घेत आहेत.
या ग्रंथ नगरीत अनेक मोठ्या लेखकांचे आणि साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये शिवचरित्र, महात्मा फुले यांचे चरित्र शंभू, चरित्र गौतम,बुद्ध चरित्र, युद्धखोर अमेरिका, भारत चीन संबंधाचे प्रदीर्घ खेळी, शिष्टायचे इंद्रधनु, जुगलबंदी, मोदीपूर्वीचा भाजप अशा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऐतिहासिक कादंबऱ्या आणि नव्या लेखकांची ही दर्जेदार पुस्तकं या ग्रंथनगरीत उपलब्ध आहेत. तसंच बाल साहित्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिलं आहे.
मराठी कविता, चारोळ्यांचे टी-शर्ट
भूषण तुळपुळे या हरहुन्नरी कलाकाराच्या स्टॉलवर मराठीतील चारोळ्या आणि कविता प्रिंट केलेल्या टी-शर्टची विक्री करत आहे. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी भाषेचं जतन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी या मराठी कविता, चारोळ्या प्रिंट केलेल्या टी-शर्टच्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी प्रतिक्रिया भूषण तुळपुळे यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
कवितेला अनुरुप असं काव्य शिल्प
विविध कलाकृतीवरील लक्षवेधक मराठी ओळी आपण नेहमीच पाहत असतो. आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू आपण ठेवत असतो. मात्र, नाशिकच्या जाधव दाम्त्यांनी मराठी भाषा घराघरात पोहोचवण्यासाठी आगळीवेगळी कलाकृती सादर केली आहे. या कलाकृतींमध्ये मराठी भाषेतील कवितांना अनुरुप, एखाद्या कवितेच्या अर्थाशी साधर्म्य असेल असं शिल्प तयार केलं जात आहे. दिपाली जाधव यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’ला सांगितलं की, “अलिकडे काव्य शिल्प मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत. त्यामुळे मराठी साहित्यातील ही अर्थपूर्ण कलाकृतींना शिल्पांची साथ देऊन ते घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्रसिद्ध लेखक साहित्यिकांची संमेलनाला भेट
या संमेलनाला प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांनी भेट दिली. शरद तांदळे यांनी पुण्यातून महादजी शिंदे एक्सप्रेस ट्रेनमध्ये सर्व साहित्यिकांसोबत छोटसं साहित्य संमेलन घेतलं होतं. त्यांनी संमेलन स्थळावर ‘श्रेष्ठ महाराष्ट्रशी’ संवाद साधला. ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. हे मराठी भाषेचं मोठं यश असून येणाऱ्या काळामध्ये याचा नक्कीच मराठीसाठी फायदा होईल. तसेच युवकांनी आता मराठी साहित्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
संमेलनात कवी संमेलन आणि परिसंवादाला मिळाला मोठा प्रतिसाद
मराठी साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी अनेक कवी कवयित्री यांनी कवी संमेलनात सहभाग घेतला. यावेळी अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या. संमेलन ठिकाणीच परिसंवाद देखील घेण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमांना अनेक साहित्यप्रेमींची चांगली उपस्थिती होती.