पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आज दुपारी एक वाजता मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. या बंदराला 76 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे दोन लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, या बंदरामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे तसेच मासेमारी धोक्यात येणार असल्याचा आरोप करीत मच्छीमारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मच्छीमार नाराज
वाढवण बंदराच्या निषेधार्थ राज्यातील मच्छीमार संघटना आज कडाडून विरोध करणार आहेत. उत्तन, भाईंदर येथे झालेल्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घएतला आहे. युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी याबाबतची माहिती दिली. वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 60 पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. “मच्छीमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही, पण विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल, तर ते कदापी सहन केलं जाणार नाही. अशा विध्वंसक प्रकल्पांना शेवटपर्यंत कडाडून विरोध करणार,” असं समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितलं.
वसई तहसील कार्यालयावर मोर्चा
या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छीमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी इथले मासेमारी व्यवसाय सुद्धा बाधित होणार आहे. समुद्रातील एकूण 30 हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार, असं भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध केला जात आहे, असं समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी सांगितलं.
वाढवण किनाऱ्यावर सरकारची प्रेत यात्रा आंदोलन आयोजित केलं आहे. तर वसईमध्ये या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलं आहे.
1 Comment
AwjrIu aIzo vebA