सिंधुदुर्गा शेजारील जंजिरे राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट आणि जलदुर्ग साडे तीनशे वर्षांनंतरही शाबूत असताना, महाराजांचा पुतळा उभारण्यातली सरकारची हलगर्जी लाजीरवाणी आहे. आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बसवलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला पुतळा अवघ्या एका वर्षाच्या आतच कोसळला.

सहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होतं 35 फुटी पुतळ्याचे उद्धाटन
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखल जातं आणि भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्यात आला होता.
खरंतर, नौदलासारख्या संस्थेने केलेले काम हे चिरंतन टिकण्याएवढे मजबूत असते, अशी खात्री असते. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील आणि त्या गोष्टीची आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही?
शिवछत्रपतींचे हे स्मारक इतक्या घाई गडबडीत का तयार करण्यात आलं?
शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर त्यांना निवडणुकीसाठी करायचा होता का? पण हे करत असताना या पुतळ्याच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष झालं. किल्याचा एक एक दगड हा शिवाजी महाराजांच्यासोबतच स्वराज्याशी असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडून कित्येक गोष्टीत आपण प्रेरणा आणि स्फूर्ती घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे भले उंच पुतळे तयार करणे आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण उभी करावीत का? याचाही विचार आपण केला पाहिजे.