तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे विवाहाचे मुहूर्त सुरू होतात. ख्रिस्ती समुदायातही नोव्हेंबरपासून लग्नाचे दिवस ठरवले जातात. थोडक्यात पाऊस सरल्यानंतर सर्वच समुदायांकरता नोव्हेंबर ते मे हा काळ लग्नाच्या धामधूमीचा असतो. अनेक घरांमध्ये आता लगीनघाई सुरु असणार. लग्नांच्या या सोहळ्याची तयारी कमीतकमी सहा महिने आधीपासून करावी लागते. पण, सोहळ्याची जेवढी तयारी केली जाते, तितकी आयुष्यभरासाठी निभवावं लागणाऱ्या या नात्याकरताही काही विशेष तयारी करायला हवी ना? कारण ‘लग्नाचा सोहळा’ हा काही तासांपुरता असला तरी ‘लग्न’ हे आयुष्यभरासाठी असतं.
अनेकदा, आपण आपला साथीदार कसा असावा हे ठरवतो. मनाजोगा साथीदार मिळाल्यावर लग्न कसं असेल, आपण काय परिधान करणार आहोत, लग्नांचे विधी, ते कुठे कसे होणार अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो. मात्र, आपण लग्न का करतोय? लग्न करणाचा निर्णय घेतल्यावर ते निभवण्यासाठी काय करायला हवं? याची आपल्याला अनेकदा कल्पना नसते. लग्न हे एक नवीन नातं निर्माण करताना ते नातं निभावण्यासाठी काही विशेष तयारी करायला हवी, याचीच मुळात आपल्याला माहिती नसते.
लग्न या संकल्पनेमागचा खरा अर्थच माहीत नसल्याने अनेकदा हे नातं तुटतं. आज घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लग्न झाल्यावर अगदी वर्षभरातही घटस्फोट घेतला जातो. पती-पत्नीचे स्वभाव जुळत नाही, आई-वडिलांचा हस्तक्षेप, नवरा-बायकोपैकी कोणा एकाकडून फसवणूक, घरातल्याच्या दबावापोटी केलेलं लग्न अशी अनेक कारणं असतात.
जागतिक पातळीवर अन्य देशाच्या तुलनेत भारतात घटस्फोट घेण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र, तरिही गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशातही पाश्चिमात्या देशांप्रमाणे घटकेत घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ होताना दिसत आहे. शहरी भागामध्ये जसं की, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण 30 टक्के आहे. तर ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रामध्ये घटस्फोटाचं प्रमाण 18.7 टक्के आहे. पॉप्युलेशन असोसिएशनच्या माहिती नुसार, दरवर्षी मुंबईत जवळपास 2 ते 3 हजार अर्ज घटस्फोटासाठी दाखल केले जातात.
कायदेशीर घटस्फोट न घेता विभक्त राहणारे पती-पत्नी किंवा नात्यामध्ये फूट असणारे अनेक संसार आपल्या आजूबाजुला असतात. या सगळ्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे विवाह संस्थेकडे आजची पिढी संशयाच्या नजरेतून पाहते. त्यामुळेच ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ नंतर ‘अविवाहित’ राहण्याचा ट्रेंडही अलीकडे मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.
यासाठीच ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ आपल्यासाठी ‘शुभमंगल’ हे सदर घेऊन आलो आहोत.
यामध्ये आपण लग्नाची पूर्वतयारी, आपल्या साथीदारांची खरी ओळख पटविणे, सोयरिक ते लग्न या कालावधीमध्ये आपल्या साथीदारासोबत कोणत्या गोष्टीची चर्चा करायला हवी, लग्नानंतर दोघांच्या जबाबदाऱ्या, आर्थिक नियोजन, दोन्ही कुटुंबांसोबतचे नातेसंबंध, कुटुंब नियोजन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत.
3 Comments
छान संकल्पना आहे. पुढील लेखांची वाट पाहतोय.
चांगली कल्पना आहे ,
कधी आहे, वेळ काय आहे,कुठे आहे