आपली सगळी नाती ही रक्ताने जोडलेली आहेत. लग्नाचचं नातं हे असं आहे जे प्रेम आणि विश्वासाच्या भावनेने जोडलं जातं. यामध्ये प्रेम ही केवळ एक भावना नसते; तर तो एक निर्णय असतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिवर प्रेम करतो, तेव्हाच आपण त्याच्याशी किंवा तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे आपण आपल्या साथीदारासोबत एकजीव होऊन हे नातं निभावणं ही आपली जबाबदारी असते.
लग्न म्हणजे तडजोड आणि त्याग
हो, हे खरं आहे. पण लग्नाचं नातं म्हणजे केवळ तडजोड, त्याग नसतो. त्यात आनंद ही आहे. आपल्या हक्काची आणि आपुलकीची अशी एक व्यक्ति आपल्यासोबत आहे, याचा आनंद देणारं हे नातं आहे.
तडजोड, त्याग हे कोणत्या नात्यात नसते? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मग आपल्या आई-वडिलांसोबतच्या नात्यात असो वा आपल्या कामाच्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी तडजोड ही आपल्याला करावीच लागते. त्यामुळे केवळ लग्न या एकमेव नात्यातच तडजोड करावी लागते असं गृहीत धरणं चुकीचं आहे.
लग्नापूर्वी आई-वडिलांच्या घरातही आपल्या सख्या भावा-बहिणींसोबत सगळ्याच गोष्टींवरुन आपलं एकमत होत नाही. दोन व्यक्ती आमने-सामने आल्यावर मतभेद होणं हे सामान्य आहे. त्यावेळी कोणा एका व्यक्तिला साहजिकच माघार घ्यावी लागते. त्यामुळे अशी ही तडजोड लग्नाच्या नात्यातही करावी लागते यात काही गैर नाही.
पण तडजोडीची परिसीमा काय?
पण तडजोड कोणत्या गोष्टीत करतो हे महत्त्वाचं आहे. आपला साथीदार हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरतो का? आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल, एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आवश्यक नसताना वारंवार नकार दिला जातो का? आणि हे सगळं आपला साथीदार स्वतः हून करतो की कोणाच्या सांगण्यानुसार करतो? हे पाहणं गरजेचं आहे.
सोशली डिसकनेक्ट
ऋषभ नावाचा 26 वर्षाचा तरुण. लग्न होईपर्यंत त्याच्या मित्र-मैत्रिणींमध्ये इव्हेंट मॅनेजर म्हणून विशेष ओळख मिळवलेला हा तरुण. ग्रुपमध्ये बर्थ-डे पार्ट्याचं नियोजन असो की दोन दिवसाच्या सहलीचं प्लॅनिंग असो सगळ्यामध्ये ऋषभचा पुढाकार. लग्न ठरल्यावर त्याच्या या जिगरी ग्रुपमध्ये त्याने त्याच्या होणाऱ्या साथीदारालाही सामावून घेतलं. त्याची होणारी बायको ही या ग्रुपमध्ये चांगली मिसळून गेली. पण हे चित्र फार काही काळ टिकलं नाही. लग्नानंतर दोन-तीन वेळा ऋषभ त्याच्या पत्नीसोबत या ग्रुपसोबत आऊटिंगला गेला. मात्र, नंतर नंतर त्याच्या बायकोने त्याला या ग्रुपसोबत कमी संबंध ठेवायला सांगितले.. हळूहळू ऋषभ या ग्रुपमधुन कधी बाहेर पडला हे त्याचं त्यालाही कळलं नाही.
हे असं मुलगा असो वा मुलगी कोणासोबतही घडतं. लग्नापूर्वी आपण सोशली म्हणजे सोशल मिडियावर नव्हे; तर समाजामध्ये आपल्या एका मित्र-मैत्रणींच्या वर्तुळामध्ये खूप अॅक्टिव्ह असतो. पण लग्नानंतर याचं प्रमाण कमी होतं. कधी वेळ मिळत नाही तर अनेकदा साथीदारांच्या सांगण्यावरुन मित्र-मैत्रणिंसोबत मैत्री ठेवण्यावर निर्बंध येतात.
इथं जायचं नाही, तिथं जायचं नाही, हे नको करुस, ते नको करुस, यांच्याशी बोलू नकोस, असंच कर असे अनेक नियम घालण्याचा प्रयत्न साथीदारांकडून केला जातो. अनेकदा तर जवळच्या नातेवाईकांशीही बोलण्यावर बंदी घातली जाते. आपल्या साथिदाराला आवडत नाही म्हणून मग आपण ही त्या गोष्टी टाळत जातो आणि हळूहळू आपण सोशली डिसकनेक्ट होत जातो.
त्यामुळे लग्नापूर्वीच आपण आपली जगण्याची पद्धत, आवड-निवड आपल्या साथीदारासोबत शेअर करावी. त्यामुळे आधी सांगितल्यानुसार साथीदार निवडण्यापूर्वीच आपला स्वभाव आपल्या आवडीनिवडी आपल्याला ठावूक असल्या पाहिजेत. मग आपला होणारा साथीदार हाही कसा आहे, त्याच्या आवडी-निवडी आणि स्वभाव माहीत असावा. याने आपल्याला आपली लग्नापूर्वीची जीवनपद्धत तशीच सुरू ठेवता येणार आहे की नाही याची कल्पना येते.
डॉमिनेटिंग पार्टनर
लग्न केलं म्हणजे सगळं सहनच करायचं असं नसतं. लग्न करणं ही त्या मुलाची आणि मुलींची दोघांचीही गरज असते. आणि दोघांच्या समंतीने ते झालेलं असतं. त्या नात्यामध्ये आणि नातं निभावण्याची जबाबदारी ही त्या दोघांची असते.
वंदना एक उच्चशिक्षित महिला. एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका पदावर काम करणारी. नवरा शैलेश हा व्यवसाय करणारा. आर्थिक स्थिती चांगली. दोन मुलं. ते ही उच्चशिक्षण घेतं आहेत. वरकरणी अशा संसारामध्ये आपल्याला काहिही नकारात्मक चित्र दिसणार नाही. मात्र घराच्या आतलं चित्र फार वेगळं. लग्नाच्या या बेडीत फसल्याची वंदनाची भावना. कारण नवऱ्याचं पदोपदी घालून पाडून बोलणं आणि तुच्छतेची वागणूक.
या नात्यामध्ये शैलेशचा सगळ्यांसमोर दिसणारा चेहरा आणि घरातल्या वागण्यात जमीन-आसमानाचा फरक होता. घरात कोणी आलं तर घरकाम करणार, बायको-मुलांशी अत्यंत प्रेमळ वागणार. त्याउलट एकट्यात मात्र घरात अस्थिरता, अशांतता निर्माण करणारा असं शैलेशचं व्यक्तिमत्व होतं. त्याचा हा स्वभाव बाहेर कुणाला माहित नसल्यामुळे वंदना ही काहिच करु शकत नव्हती. सगळं मुकाट्याने सहन करत होती.
हे असं नातं हे केवळ समाजा पुढे दाखवण्यासाठी तग धरून ठेवलेलं नातं होतं. हे असं अपेक्षित नाही.
या नात्यामध्ये जिवंतपणा टिकून राहण्यासाठी दोघांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. दोघांच्या आवडी-निवडी जोपासल्या पाहिजेत. एकमेकांच्या मतांना किंमत दिली पाहिजे. तरच लग्नाचं हे नातं प्रेम, विश्वास, तडजोड, त्यागाचं आणि आदरांचं ठरू शकतं.