लग्न… म्हणजे शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी सामाजिक मंजूरी देणारा संस्कार अशीही एक व्याख्या लग्नाची केली जाते. लग्नानंतर साथीदारासोबत ठेवलेल्या शारिरीक संबंधानंतर पूर्ण मिलन होत असतं. म्हणजे एकजीवाने, एकदिलाने एकत्र येणं.
संमतीपूर्ण शारीरिक संबंध
लग्न झालं म्हणजे त्या मुलीवर – त्या मुलावर माझा पूर्ण हक्क आहे, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे लग्न झाल्यावर लगेच शारिरीक संबंध ठेवलेच पाहिजेत, असा आग्रह असतो. साथीदाराकडून नकार आला तर अहंकार दुखावला जातो. आणि नवीन नात्याची सुरुवातच काहिशी नकारात्मकतेतून होते.
काही वेळेला साथीदारांची इच्छा नसतानाही जबरदस्तीने केवळ लग्न झालं आहे तर हे केलंच पाहिजे, या आविर्भावनेतून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं जातं. अशावेळी मनात राग, भीतीची भावना निर्माण होते.
शारिरीक संबंध ही काही आपसुक घडण्यासारखी गोष्ट नाही. जरी लग्न झालं असलं तरी आपल्या शरीराला कोणा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करु देण्यासाठी काही मुली वा मुलं तयार असू शकत नसतात. त्यासाठी मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर लग्नानंतर पहिल्यांदा आपला साथीदार यासाठी मागेपुढे करत असेल तर त्यांना समजून घेतलं पाहिजे. नात्यामध्ये थोडी मोकळीक, मैत्रीचं आणि विश्वासाचं नातं निर्माण झाल्यावर शारिरीक संबंध सहजपणे आणि आपुलकीने प्रस्थापित होऊ शकतात.
बाळाला जन्म देण्याचा निर्णय
कुटुंब विस्ताराचा एक मार्ग म्हणून लग्न व्यवस्थेकडे पाहिलं जातं. त्यामुळे लग्नानंतर बाळांना जन्म देणं आणि नवीन कुटुंबांची निर्मिती करणं हे आपलं नैसर्गिक कर्तव्य आहे. तरी अलीकडच्या काळामध्ये बाळांना जन्म देण्यासाठी नकार दिला जातो. ‘आम्हाला बाळं नकोय’ असं अनेक दाम्पत्य सांगतात.
हा नवरा – बायको यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण बाळाला जन्म कधी द्यायचा, किती बाळांना जन्म द्यायचा, पती-पत्नी दोघं नोकरी करत असतील, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी यावरही चर्चा करणं आज गरजेचं झालं आहे. कारण अलीकडची पिढी ही करिअर ओरिएंटेड असल्यामुळे प्रेगन्सी आणि बाळंतपणाच्या काळात मुलींच्या करिअरला ब्रेक लागतो. यासाठी काही मुलींची तयारी नसते. अशावेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं या विषयावर चर्चा करावी.
जर बाळ नको असेल तर त्याबद्दल लग्नाआधी स्पष्ट करावं. जेणेकरुन दुसऱ्या पार्टनरला त्याची कल्पना असेल आणि ते मान्य असेल तर त्या व्यक्तीशी लग्न करायचं की नाही याबद्दल निर्णय घेता येईल.
जर लग्नानंतर आपल्या साथीदाराला बाळ नको असल्याचं समजलं तर साथीदाराच्या विरोधात न जाता, साथीदाराला समजून घेऊन, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा. पण पालकत्व घेण्यासाठी जबरदस्तीने करु नये. थोडक्यात नात्यांमध्ये तडा पडेल असा निर्णय घेऊ नये.
दबावाखाली येऊ नये
अनेकदा नवदाम्पत्य हे लग्न झाल्यानंतर एक – दोन वर्षाचं अंतर ठेवून प्रेगन्सी घेतात. जर असा निर्णय नवदाम्पत्यांनी घेतला असेल तर ते आपल्या दोन्ही कुटुंबांना सांगावं. कारण अनेकदा लग्नाला वर्ष झालं की, कुटुंबाकडून बाळ कधी हा प्रश्न विचारत राहतात. कुटुंबच नाहीतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी गोतावळ्यातील सगळेच हा प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना याबद्दल कल्पना दिलेली बरी.
त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, जर नवरा-बायको यांनी लग्नानंतर दोन वर्षांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला असेल तर कुटुंबातील अन्य सदस्यांच्या दबावाखाली येऊन आपला निर्णय बदलू नये. हा दोघांची समंती असेल तर जरूर पुढे व्हावं. पण दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या दबावाखाली येऊन प्रेगन्सी घेण्यासाठी साथीदारावर दबाव टाकू नये.