भारतीय आपल्या विविधांगी खाद्यसंस्कृतीप्रमाणेच खाण्याच्या पद्धतीतही वेगळेपण जपतात. आपण हाताच्या पाचही बोटांमध्ये अन्नपदार्थ धरून मुखात तो घास सोडतो. या मागचं कारण काय असेल, असा विचार तुम्ही कधी केला आहात का?
आपल्याकडे हाताने जेवण जेवण्याची पद्धत खूप आधीपासून आहे. यातही प्रांतानुसार काही नियम, परंपरा आहेत. म्हणजे बोटांच्या दुसऱ्या पेरांच्या खाली अन्न येऊ नये. तळहात माखू द्यायचा नाही. तर काही प्रांतात तळहाताला रस लागायला हवा. अन्न हाताच्या बोटांनी कालवून खाण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदेदेखील आहेत. आपल्या हातात असलेल्या पाच तत्त्वांचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी आहे.
तुम्हाला माहीत आहे का, हाताने जेवण खाल्यामुळे अनेक फायदे होतात?
1.पचन क्रिया सुधारते
हाताने अन्न खाताना आपण अन्नाला स्पर्श करतो. त्यावेळी मेंदूला एक सिग्नल पाठवला जातो की, आपण खाण्यासाठी तयार आहोत, ज्यामुळे मेंदू आवश्यक ते पाचक एन्झाइम्स सोडतो, जे अन्न सहज पचण्यास मदत करतात.
2.आयुर्वेदातील पाच तत्त्वांचा समतोल
आयुर्वेदानुसार आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाला वेगवेगळी तत्त्वे आहेत.
- अंगठा – अग्नि
- तर्जनी – वायू
- मध्यमा – आकाश
- अनामिका – पृथ्वी
- कनिष्ठा – जल
जेव्हा आपण हाताने अन्न खातो, तेव्हा या पाच तत्त्वांचा समतोल साधला जातो यामुळे आपले शरीर ऊर्जा प्राप्त करते आणि पचन चांगल्या प्रकारे होते.
3.उष्णता जाणवते
हाताने अन्न खाल्ल्याने त्याची उष्णता जाणवते. यामुळे आपल्याला अन्न किती गरम किंवा थंड आहे याचा अंदाज घेता येतो. गरम अन्नाने तोंड भाजणे टाळता येतं.
4.अन्नासोबत जागरूकता आणि शारीरिक संबंध
हाताने अन्न खाल्ल्यामुळे आपले मन आणि शरीर अन्नाशी अधिक जोडले जाते. यामुळे अन्नाच्या महत्त्वाची जाणीव होते. अधिक चांगल्या प्रकारे त्याची चव चाखली जाते. हे एक प्रकारचे ‘ध्यान’ आहे, यामुळे आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते.
5.संपूर्णतेचा अनुभव
हाताने खाताना आपण किती खावे, काय खावे आणि कोणत्या वेगाने खावे हे समजतं. आपण फक्त जिभेने अन्न चाखत नाही, तर हातांच्या माध्यमातून अन्नाचा अनुभव घेतला जातो.
6.संस्कार आणि परंपरा
भारतीय संस्कृतीत, लहान मुलांना हाताने अन्न खाण्याची शिकवण दिली जाते. यामुळे जेवणाचे महत्त्व त्यांना समजते. एकत्र बसून, कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एकत्र जेवण जेवल्याने एकमेकांमधील संबंध अजून मजबूत होतात. यामुळे आपली संस्कृती आणि परंपराही जपली जाते.