प्लास्टिकचा पुनर्वापर करत आहात, पण जरा सांभाळून!

FSSAI ने पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता, या उत्पादकांना वार्षिक तपासणीस सामोरे जावे लागेल, आणि त्यांना परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी, या तपासणीचे पालन करणे बंधनकारक असेल.
[gspeech type=button]

नुकतंच FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटरच्या उत्पादनामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा समावेश आणि त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेत, या उत्पादनांना उच्च जोखमीच्या श्रेणीत समाविष्ट केलं आहे. FSSAI ने पॅकेज्ड वॉटर आणि मिनरल वॉटर उत्पादकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता, या उत्पादकांना वार्षिक तपासणीस सामोरे जावे लागेल, आणि त्यांना परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी, या तपासणीचे पालन करणे बंधनकारक असेल. यामुळे पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचे गुणवतेची खात्री करणे शक्य होईल. ही बातमी पॅकेज्ड पाण्याशी संबंधित असली तरी या बातमीनंतर पुन्हा एकदा प्लास्टिकचा खाद्यपदार्थ साठवणूक आणि विविध उपयोगातले धोके चर्चेत येऊ लागलेत.

2007 मध्ये एका प्रशिक्षणामध्ये आम्हांला अमेरिकन ट्रेनर्स शिकवायला होते. एकदा माझी मैत्रीण कोकच्या बाटलीतून पाणी पित होती. ते पाहून अमेरिकन ट्रेनरनं विचारलं की, “इथं प्लेन कोकपण मिळतं?” त्यावर मैत्रीणीनं तिला म्हटलं, नाही, हे साधं पाणी आहे. कोक पिऊन झाल्यावर बाटली धुवून ती बाटली आता पाण्यासाठी वापरतेय. आम्ही असं बऱ्याच बाटली, डब्यांचंही करतो. तिचं उत्तर ऐकून अमेरिकन ट्रेनरला खूप आश्चर्य वाटलं आणि ती भारतीयांच्या रियुज कन्सेप्टचं कौतुक करू लागली.

भारतात रियुज आणि रिसायकलची जुनी परंपरा

आपल्याकडे फार पूर्वीपासूनच डालडाच्या बरण्या, पत्र्याचे डबे, बिस्किटांचे मोठे डबे, कॉफी-जॅमच्या काचेच्या बाटल्या त्यातलं जिन्नस संपल्यावर फेकून दिलं असं फार क्वचित झालं असेल. किंबहुना पूर्वी वाण सामान, किराण्यातल्या इतर वस्तू, मसाले वगैरे यातच भरून ठेवले जायचे. या जिन्नसांकरता आता जसे वेगवेगळ्या डिझाईनचे डबे, बाटल्या घेतो तसे फार घेतले जात नसतं. हॉर्लिक्स, बोर्नविटाच्या काचेच्या बरण्यानंतर प्लास्टिकच्या बरण्याही स्टोरेजकरता वापरात असतात आणि काही घरांमध्ये आहेतही.

भारतीयांच्या या काटकसरी सवयीमुळे कचरानिर्मितीला आळा बसतोय. एकप्रकारे आपण पर्यावरण संवर्धनाच्या कोणत्याही जागतिक मोहिमेआधीच नकळत का होईना आधीपासूनच सामील आहोत. पण आपण अशाप्रकारे रि-युज करताना आपल्या आरोग्याचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

प्लास्टिक आणि धातूंच्या आतील संरक्षित थर

कृषी व्यवसाय व्यवस्थापन अन्न ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा धातूचा पत्रा यापासून बनवलेल्या बाटल्या किंवा डबे यांना आतून एक संरक्षित थर दिलेला असतो. या थरामुळे या प्लास्टिक किंवा धातूमधील घटकांचा थेट अन्नपदार्थ किंवा द्रवाशी संपर्क येत नाही. प्लास्टिक किंवा धातूमध्ये अनेक विषारी घटक असू शकतात, असतातही. पण आपण ह्या बाटल्या, डबे पुन्हा वापरताना त्यांना साबण आणि घासणीने घासतो. या स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत हा संरक्षक थरही निघतो. सततच्या धुण्याने हा थर पूर्ण निघून जातो. यामुळे प्लास्टिक व धातूचा अन्नाशी थेट संपर्क येतो. यातही धातूमधला संरक्षित थर ज्याला लॅकरिंग म्हणतात. हे लॅकरिंग मूळ जो पदार्थ ठेवायचा आहे त्यानुसार असते. म्हणजे पदार्थ आम्ल, अल्कली आणि खारट या पदार्थानुसार त्या डब्याचे लॅकरिंग तयार होते. ही गोष्ट सामान्यांना माहीत नसते. त्यामुळे ते सरसकट कोणताही पदार्थ या डब्यांमध्ये भरतात किंवा साठवतात. साहजिकच विरुद्ध गुणधर्माचा पदार्थ असेल तर अधिक हानीकारक रासायनिक प्रक्रिया होऊन पदार्थ खाण्यास असुरक्षित होतो.

आरोग्यावर होणारे थेट परिणाम

आतापर्यंत आपल्याला हे कळलंच आहे की, अनेक रासायनं आणि रासायनिक घटकांच्या प्रक्रियेतून प्लास्टिक तयार करण्यात येतं. त्याला हवा तो मऊपणा, काठिण्य आणि रंग देण्यासाठी इतरही रसायनांचा त्यात समावेश असतो. संरक्षित थर असणाऱ्या डबे किंवा बाटल्यांमध्ये जर ओलसर पदार्थ, गरम पदार्थ ठेवले किंवा या भांड्यात पदार्थ ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यास ही रसायनं पदार्थामध्ये थेट मिसळली जातात. आईस्क्रिम किंवा कोरड्या पदार्थासाठी मूळतः तयार केलेल्या प्लास्टिकच्या डब्याचा पुनर्वापर करताना त्यात गरम पदार्थ ठेवला किंवा जराही गरम करणे, हे खूपच धोकादायक आहे. सतत अशाप्रकारे या भांड्यांचा वापर होत असेल तर हळूहळू त्या प्लास्टिकमधील किंवा धातूमधील घटक आपल्या पोटात साठत राहतात. परिणामी हार्मोन्समध्ये बदल, कॅन्सर, वंध्यत्व, पोटाचे विकार होण्याचा धोका असतो.

सरसकट कोणत्याही प्लास्टिकचा पुनर्वापर टाळा

आपल्याकडे दिलेल्या किंमतीला पूर्ण वसूल करणे हे लोकांच्या डोक्यात अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच ती तुटे-फुटेपर्यंत तिचा वापर करणं हे बहुतांशी लोकं आपलं कर्तव्य मानतात. पण कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तुच्या तळाशी त्या प्लास्टिकचा एक विशिष्ट नंबर दिलेला असतो. रिसायकल सिम्बॉल (त्रिकोणसदृश बाण) यात हा नंबर लिहितात. या नंबरचा संबंध त्या प्लास्टिकमधील घटकांशी आणि ते उत्पादन आपण पुन्हा वापरु शकतो की नाही याच्याशी असतो. असे सात क्रमांक आहेत.

क्रमांक 1 PETE पॉलिथिलीन टेरेफ्थालेट

साधारणपणे पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्या, पार्सल खाण्याचे कंटेनर्स हे या कॅटेगरीमधले असतात, यांना गरम कधीच करू नयेत. हे खाद्यपदार्थ आणि पेयांकरता एकदाच वापरून फेकून द्यायचे असतात. या प्लास्टिकचा पुनर्वापर कपडे, पॉलीएस्टर फायबर यासाठी करतात.

क्रमांक 2 HDPE हाय डेन्सिटी पॉलीथिलीन

टेबल, खुर्चा, कपाट, लवचिक पाईप, कॉस्मेटिक्सच्या बाटल्या, साबणाच्या बाटल्या, क्रेटस् अशा कडक वस्तूंकरता है प्लास्टिक वापरण्यात येते. हवामान प्रतिरोधक गोष्टी यापासून तयार करतात. सामान आणण्याच्या किंवा साठवणुकीच्या मोठ्या पिशव्याही यात येतात.

क्रमांक 3 PVC पॉलीविनाईल क्लोराईड

हे मऊ प्लास्टिक असतं. याचा पुनर्वापर अजिबात करायचा नाही. कारण हे प्लास्टिक मऊ करण्यासाठी त्यात अनेक घातक रसायनं असतात. याचा मुलांची रोगप्रतिकार शक्ती, हार्मोन्स यावर परिणाम होतो. बाथरुममधील शॉवरचे पडदे, PVC पाईप, स्वयंपाकाच्या तेलाच्या बाटल्या यात याकरता याचा वापर होतो. खाद्यपदार्थाकरता कधीच याचा वापर करू नये.

क्रमांक 4 LDPE लो डेन्सिटी पॉलीथीन

या प्लास्टिकचा वापर किराणा सामान, ब्रेडचे रॅपर, विशिष्ट बाटल्या, पॅकेजिंग फोर्म यांच्यासाठी होतो. इतर ग्रेडींगपेक्षा या प्लास्टिकचा पुनर्वापर काही प्रमाणात करता येतो.

क्रमांक 5 PP पॉलीप्रोपीलीन

टिकाऊ आणि हलके असते. याचा वापर डिस्पोजेबल डायपर, स्ट्रॉ, किचनवेअर, डिस्पोजेबल कटलरी, खाद्यपदार्थाचे पॅकिंग, पेंकिंग टेप याकरता होतो. याच्यावर मायक्रेवेव्ह सुरक्षित असं लिहिलं असलं तरी तसा वापर करू नये. कारण यामुळे अस्थमा आणि हार्मोनमध्ये असंतुलन होण्याचा धोका असतो.

क्रमांक 6 PS पॉलीस्टीरिन

या प्लास्टिकचा पुनर्वापर टाळलाच पाहिजे. पाण्याचे डिस्पोजबल ग्लास, अंड्याचे पातळ ट्रे याकरता याचा वापर होतो.

क्रमांक 7 पॉलीकार्बोनेट, बीपीए आणि लेक्सन

कारचे भाग, बाळाची खेळणी, इलेक्ट्रिकल वायरींग, डेंटल प्रोडक्ट, झाकण याकरता याचा वापर होतो. याचे रिसायकलींग करणे कठीण आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर टाळायलाच हवा.

सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे अशक्य आहे. पण किमान आपण काही नियंत्रण तर ठेवू शकतो. पण त्या वस्तूखालील नंबर नक्की बघा आणि काळजीपूर्वक पुनर्वापर करा. प्लास्टिक रिसायकलिंग क्रमांक 2, 4 आणि 5 सर्वात सुरक्षित आहेत. तर प्लास्टिक क्रमांक 1, 3, 6 आणि 7 टाळणे आवश्यक आहे. तुटलेल्या आणि ओरखडे आलेल्या वस्तू वापरू नका. भारतीय पद्धतीनं रियुज करताना यात पदार्थ गरम करणे, गरम पदार्थ ठेवणे हे टाळलंच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शक्य तो या वस्तू टाळून काच किंवा स्टीलचा वापर केलेलाच उत्तम.

 

सौजन्य – विनील भुर्के कृषी जैवतंत्रज्ञान व्यवस्थापन तज्ज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र
Pet Cloning Market in china : क्लोनिंगचे एवढे प्रचंड दर असूनही चीनमध्ये आपल्या पाळीव प्राण्याचं क्लोनिंग करण्याचं प्रमाण अधिक आहे.
Kancha Gachibowli : सरकारला गरज पडली की सरकारी जमिनींचा लिलाव करायचा हा अघोषित, अलिखित कायदाच बनला. तेलंगणा सरकारनेही सरकारी तिजोरी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ