साखर! आजकाल empty calories म्हणून आहारातून टाळायचा पदार्थ! पण एकेकाळी महाग म्हणून तो सामान्यांच्या आवाक्यात नव्हता. साखर आणि गूळ हे भारताने जगाला दिलेली वरदाने आहेत. आयुर्वेदात खांडसरी साखरेचा उपयोग खोकल्यावरील उपचारात नमूद केला आहे. गूळ हा शरीराला उष्णता देणारा आणि पुष्टीवर्धक मानला गेला आहे. आजही पोट बिघडले तर गूळ, जायफळ, तूप यांची गोळी रामबाण उपाय आहे.
आयुर्वेदिक काळात माहिती असणारी साखर महाग का होती? मधल्या काळात असं काय घडलं ज्यामुळे साखर सामान्यांच्या आवाक्यात आली? साखरेचे उत्पादन कसे वाढवले गेले?
पांढरे सोने
मोहेंजोदडो आणि हडप्पा या पुरातन संस्कृतींमध्ये ऊसाची शेती केली जाई. नंतर गुप्त राजांच्या कारकिर्दीत साखरेच्या व्यापाराच्या नोंदी उपलब्ध आहेत. पण एकंदरीतच ऊसाचं लागवड क्षेत्र खूप कमी होतं. त्यात ऊसाच्या रसात साखरेचं प्रमाण जास्तीत जास्त 7-9% असल्याने साखरेचं उत्पादन हे अत्यंत महाग प्रकरण होतं. त्यात भरीस भर म्हणून, ऊसतोडणी झाली की लगेच साखर निर्मितीला सुरुवात करावी लागते. कारण ऊस, तोडणी झाल्यावर जितका काळ प्रक्रिया न होता राहतो, तेवढंच त्यातलं साखरेचं प्रमाण कमी होत जात. या सगळ्या अटी पाळून तयार झालेली साखर ही निश्चितच सामान्यांच्या आवाक्यातील नव्हती. म्हणून साखरेला ‘पांढरं सोनं’ म्हटलं जाई. साखर उत्पादनात, साखरेचा मळकट पांढरा रंग आणणे ही मुख्य अडचण होती. किंवा मुख्य खर्चिक बाब होती. गूळ तयार करताना काही अडचण नसे कारण अगदी काही दशके आधीपर्यंत गुळाचा रंग काळपट होता.
चायना टाऊन आणि चीनी
1778 मध्ये टॉन्ग अच्यू हा पहिला (लिखित स्वरूपात) चिनी माणूस चीन सोडून भारतात, कोलकात्यात स्थाईक झाला. त्याला, बंगाल प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्ज यांनी हुगळी नदी पासून 6 मैल अंतरावर बज – बज इथे 650 बिघा (1 बिघा = अंदाजे 20 गुंठे ) जमीन, 45/- च्या वार्षिक भाडेकरार वर दिली. कालांतराने अजून काही चिनी माणसे, मग त्यांचे मित्र, मग त्यांचे नातेवाईक असे स्थलांतरित झाले आणि कोलकात्यात चायना टाऊन वसले. हे सगळे “हक्का” प्रांतातून आले होते. चीन मध्ये हक्का या शब्दाचा अर्थ होतो “पाहुणे”! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतात विकले जाणारे बरेचसे चायनिज पदार्थ या हक्का प्रांतातील गावांची नावे आहेत उदा. हूनान, सीच्युआन उर्फ आपला शेजवान, गॅंग डॅंग इत्यादी. कोलकात्यात जरी ते स्थाईक झाले तरी ते तसे परकेच राहिले. कारण आपण भारतीयांनी त्यांना फार काही सामावून घेतले नव्हते पण वाळीत सुद्धा टाकले नव्हते.
त्या सर्व चिनी लोकांना एकच उत्पादन घ्यायचं होतं ते म्हणजे “चीनी” उर्फ “साखर”! पुढे या चिनी लोकांनी कमी खर्चात साखरेचं जास्त उत्पादन घेण्याचं तंत्र विकसित केलं.
स्वातंत्र्योत्तर काळ आणि महाराष्ट्राने साखर उत्पादनात घेतलेली आघाडी
साल 1950-51 अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना सुरु केला. पुढे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची लाट आली. आजमितीस जवळपास 173 सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि सगळ्यात जास्त साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूर मध्ये 19, सांगलीत 16, सातारा जिल्ह्यात 9, पुणे जिल्ह्यात 12 तर सोलापूर मध्ये 16 कारखाने कार्यरत आहेत.
सहकारी तत्त्वाने भरभराट
महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन करणे फायदेशीर होऊ लागण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काळी सुपीक जमीन,पावसाचे योग्य प्रमाण, पोषक उकाडा! यामुळे ऊसातील साखरेचे प्रमाण उत्तर प्रदेशातील ऊसातील साखरेच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. आज आकडेवारी बघायला गेलो तर महाराष्ट्रातील ऊसाच्या रसातील साखरेचे प्रमाण 11.28% तर उत्तर प्रदेशात हेच प्रमाण 10.24% आढळून येते. दुसरं मुख्य कारण ठरलं ते सहकारी साखर कारखाने! या सहकार तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस दाखवले. ऊस वाहतूक करण्यासाठी रस्त्यांचे जाळे विकसित झाले.
रासायनिक खतांचा जोर
अधिक ऊस उत्पादनासाठी रासायनिक खते शोधली गेली. उसाच्या रसातील साखरेचे प्रमाण वाढावे म्हणून कृषी विद्यापीठांनी उसाच्या नवनवीन जाती विकसित केल्या. CO 86032 (नीरा) CoM 0265 (फुले 265) या जातींनी ऊस उत्पादन अजून वाढवले.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम झाला आणि महाराष्ट्रातील कैक हेक्टर जमीन ऊस लागवडीखाली आली. शेतकऱ्यांना भरघोस पैसा आणि कारखान्यांना मुबलक कच्चा माल मिळू लागल्याने साखरेचे उत्पादन प्रचंड वाढू लागले. 1951 साली 570 लाख टन साखर उत्पादन ते 2016-17 मध्ये 4000 लाख टन एवढी साखर एकटा महाराष्ट्र तयार करू लागला. सरासरी उत्पादन वाढीचा दर 8% एवढा प्रचंड होता (आज महाराष्ट्र, भारतात साखर उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.) यामुळे उत्पादन जास्त, स्वस्त कच्च माल आणि मागणी कमी या न्यायाने साखरेचे दर झपाट्याने कमी झाले आणि साखर सामान्यांच्या घरात नांदू लागली.
गोड साखरेचे कटू वास्तव
अर्थात जिथे कमी काळात जास्त भरभराट होते तिथे काही दुष्परिणाम पण दिसू लागतात. या साखरेमुळे आणि मुबलक नफा मिळत असल्याने शेतकऱ्याला ऊसाशिवाय दुसरा पर्यायच दिसेनासा झाला. पिके फिरवून जमिनीत पुन्हा पोषणमूल्ये पेरायची पद्धत बंद झाली. सतत ऊस उत्पादन केल्याने जमिनीचा पोत बिघडला. हे टाळण्यासाठी म्हणून अधिकाधिक रासायनिक खते घातली गेली. रासायनिक खतांमध्ये पोटॅशियम क्लोराईड आणि अमोनिअम सल्फेट हे दोन क्षार मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे जमिनी खारपड होऊ लागल्या, काळ्या मातीवर या क्षारांचा पांढरा थर स्पष्ट दिसू लागला. एकाच भागात सतत ऊसाचं एकच पीक घेतल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर मात करायला रासायनिक औषधे फवारण्यात येऊ लागली. त्यामुळे आधी कमी खर्चात होणारी ऊस शेती आता मात्र खर्चिक होऊ लागली.
पांढरी साखर, काळं पाणी, काळा धूर
याचा अजून एक मोठा परिणाम निसर्गावर पण झाला. अती खते आणि अती पाणी यामुळे भूगर्भातील जलसाठे दूषित होऊ लागले. विहिरीतील सुफेन पाणी हळूहळू दुष्फेन होऊ लागले. साखर कारखान्यातील मळी नदीत सोडली जाऊ लागल्यावर नद्यांचे अपरिमित नुकसान झाले. ऊसाचा रस आटवण्यासाठी सतत बगॅस जळू लागला आणि कारखान्याच्या चिमण्या काळा धूर ओकू लागल्या. त्यामुळे हवेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होऊ लागले.
पुनर्जीवन
आज शेतकऱ्यांचे डोळे बऱ्याच अंशी उघडलेले आहेत. बरेच शेतकरी आंतरपीक घेताना दिसतात. एकदा ऊसतोड झाली की जमिनीला उसंत देतात किंवा भुईमुगासारखे पीक घेतात. भुईमूगामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीपर्यंत पोचतो. यामुळे जमिनीची प्रत सुधारते आणि रासायनिक खते कमी द्यावी लागतात. कृषी विद्यापीठांनी रासायनिक खतांचा वापर करण्याआधी जमिनीची तपासणी करायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना किती खते घालावी याचा अंदाज येऊ लागला. प्रदूषण नियामक मंडळाने कायदे कडक केल्यामुळे साखर कारखाने सुद्धा सांडपाणी प्रक्रिया करण्यास नियमबद्ध आहेत.
हे सगळं जरी असलं तरी आजपर्यंत झालेलं नुकसान भरून काढायला बराच वेळ लागणार आहे. समृद्धीचा हव्यास विनाशाच्या गर्तेत जातो हे या साखरेच्या उदाहरणाने पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे. गोड साखरेचे हे कटू सत्य खरंच डोळ्यात अंजन घालणारे आहे.
5 Comments
बराच भूगोल समजला. आणि “साखरेचे खाणार त्याला डायबिटीस मिळणार” असे होईल हळूहळू.
अप्रतिम
दर्जेदार आणि माहितीपूर्ण लिखाण
साखरेचे खाणार त्याला देव देणार…..
…. Diabities etc 😬
माहिती पूर्ण लेख
लेखातील शेवटचे वाक्य अगदी खरे आहे. साखरेला चिनी का म्हणतात तेही समजले. धन्यवाद.