वरदराजन मुदलियार, किंवा ‘वरदा भाई’ – 1960 आणि 1970 च्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर राज्य करणाऱ्या त्रयींपैकी एक. जितक्या झपाट्यानं त्याचा उदय झाला तितक्याच झपाट्यानं त्याचा अस्तही झाला.
प्रतिष्ठित मुदलियार असूनही हालाखी
वरदराजनचा जन्म 1926 मध्ये तमिळनाडूच्या थुतुकुडी (तेव्हाचं तुतुकोरीन) या समुद्रकिनारी असलेल्या गावात झाला. मुदलीयार हा पारंपरिकरित्या प्रतिष्ठीत समाज म्हणून ओळखला जातो. स्थानिक व्यापार आणि व्यवसायांमध्ये काही मुदलीयार कुटुंबांचं वर्चस्व होतं. वरदराजनचं कुटूंब मात्र सर्वसाधारण आयुष्य जगत होतं. त्यांना आर्थिक स्थैर्य नव्हतं. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की वरदराजनच्या शाळेचा खर्चही आईवडिलांना परवडत नव्हता. त्यामुळं त्याची शाळाही बंद झाली. हालाखीच्या परिस्थितीनं त्याचं लहानपण बदलून गेलं. काहीही झालं तरी मोठं होऊन प्रचंड पैसे कमवयाचे आणि घरची परिस्थिती सुधारायची हे ठरवतच तो मोठा झाला. त्यावेळच्या तुतीकोरिनमधील सामाजिक-आर्थिक परिस्थितीही आव्हानात्मक होती. तरुणांसाठी कामाच्या संधी मर्यादीत होत्या. त्यामुळं रोजगाच्या शोधात गावातली तरुण पिढी गाव सोडून वेगवेगळ्या शहरांत जात होती. पण तुतुकोरीन आणि आजूबाजुच्या शहरांपेक्षा वरदराजनच्या मनात मुंबईनं घर केलं होतं.
मुंबईच्या गोदीत बस्तान
मुंबईत जाऊन बक्कळ पैसे कमवायचे आणि स्थिरस्थावर व्हयचं असं स्वप्न घेऊन तो एकटाच मुंबईत दाखल झाला. मुंबईत उदरनिर्वाहासाठी दाखल होणाऱ्या शेकडो लोकांसारखंच त्यानंही गोदीत लहानमोठी कामं करायला सुरुवात केली. मुंबईची गोदी ही त्यावेळी अशा अनेक कामगारांना पोसणारी जागा होती आणि मुंबईतल्या गुन्ह्यांचे केंद्रही. वरदराजन 1940 ते 1950 च्या दरम्यान मुंबईत दाखल झाला होता. म्हणजेच तो स्वातंत्र्य लढाईचा शेवटचा टप्पा होता. आणि भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. गोदीमधला अनागोंदी कारभार, गुराढोरासारखी वागणूक आणि नगण्य पैसे याला वरदराजन कंटाळला होता. या मार्गानं आपली ध्येय कधीही पूर्ण होणार नाहीत हे कळलं होतं. त्यानं गोदीतच चोरी करुन पैसे कमवायला सुरुवात केली.
बुटलेगर ते मुंबईचा डॉन
वरदराजनचा गुन्हेगारी जगात प्रवेश हा बूटलेगरच्या रूपात झाला. बुटलेगर म्हणजे वस्तुंचा काळाबाजार करणारी व्यक्ती. खास करुन दारुची काळाबाजारात विक्री करणाऱ्यांना ‘बुटलेगर’ म्हटलं जातं. मुंबईत 1950 च्या दरम्यान मद्यबंदी होती. त्यामुळं मद्याच्या काळ्याबाजाराला प्रचंड वाव होता. त्यामुळं जोखीम घेऊन दारुविक्री करायला तयार असलेल्या लोकांसाठी अनेक संधी निर्माण झाल्या. वरदराजननं त्याचा निडर स्वभाव आणि चतुर बुद्धीमुळं लवकरच स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यावेळी माटुंगा हे त्याचं मुख्य कार्यक्षेत्र होतं. तिथं तमिळ लोकसंख्या जास्त होती, त्यामुळं माटुंगा हा त्याचा बालेकिल्ला बनला.
हळूहळू वरदराजननं आपली गँग बनवायला सुरुवात केली. आणि कामाचा आवाकाही वाढवला. त्यानं तस्करी, जुगार आणि कॉंट्रॅक्ट किंलिगची कामं सुरु केली. त्याचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळं त्याला त्याचं एक नेटवर्क उभारायला मदत झाली. याच नेटवर्कचा उपयोग त्याला खासकरुन तस्करी आणि नंतर हवालासाठी होत होता. त्यावेळच्या गुन्हेगारांपेक्षा वरदराजनची विचार करण्याची आणि गँगसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता जास्त चांगली होती. त्यामुळंच अल्पावधीत त्यानं मुंबईत आपलं अस्तित्व निर्माण केलं.
वरदा भाईचा उदय
मुंबईत आल्यानंतर 10 वर्षांतरच म्हणजे 1960 चं दशक संपेपर्यंत वरदराज हा मुंबईतला एक शक्तीशाली डॉन बनला होता. त्याचा प्रभाव माटुंग्यासोबतच धारावीसारख्या आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचला होता. धारावीची झोपडपट्टी हे मुंबईतलं एक वेगळंच जग आहे. आत काय सुरु असतं याचा अंदाज बाहेर राहणाऱ्या व्यक्तिंना येत नाही. त्यामुळं धारावी अनेक गँगस्टर्ससाठीचं आश्रयस्थानही असायची. हीच धारावीची झोपडपट्टी वरदराजनच्या व्यवसायाचं मुख्य केंद्र बनली.
त्या काळात मुंबईत सोनं, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या आयातीवर प्रचंड निर्बंध होते. त्यामुळं त्यांची तस्करी जोमात सुरु होती, आणि त्यात मोठा वाटा हा वरदराजनचा होता. या तस्करीसोबतच त्याचे जुगाराचे अड्डे, बेकायदेशीर लॉटरी, असे व्यवसायही प्रचंड नफा कमवत होते. मुंबईतील काही झोपडपट्यांच्या भागात त्यानं रिअल इस्टेटचाही व्यवसाय केल्याचं काही ठिकाणी नमूद करण्यात आलंय.
वरदराजनचं व्यक्तीमत्व आणि बोलणं, त्यांचं संभाषण कौशल्य हे समोरच्यावर प्रभाव पाडणारं होतं, त्याचाच फायदा त्याला पोलिस दल आणि राजकारण्यांशी संबंध प्रस्थापित करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात झाला. पोलिस आणि राजकारण्यांशी असलेल्या जवळकीमुळं त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात झपाट्यानं उदय झाला. आतल्या खबरा पोहोचवणारं नेटवर्कच त्यानं पोलिस दलात तयार केलं. तसंच निवडणुकीच्या काळात राजकारण्यांना केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून राजकारण्यांना तो त्याच्या व्यवसायांकडे कायदेशीर दुर्लक्ष करायला भाग पाडायचा.
नेतृत्वशैली
वरदराजनची नेतृत्वशैली पारंपारिक तामिळ मूल्ये आणि अंडरवर्ल्डमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेला निर्दयी स्वभाव यांचे मिश्रण होती.
वरदराजन हा त्याच्या अधिकारशाहीसाठी प्रसिद्ध होता. त्याचा स्वभाव हा वैयक्तिक आणि व्यवसायिक पातळीवरही कडक शिस्तीचा होता. त्याचा शब्द मोडणाऱ्यांना कडक शिक्षेला सामोरं जावं लागायचं. वरदराजननं मुंबईतल्या तामिळ समुदायाशी त्याची नाळ घट्ट जोडून ठेवली होती. त्यांच्या हितसंबंधांचा रक्षक म्हणून त्यानं तिथं त्याची जागा निर्माण केली होती. त्यांच्यासाठी तो न्यायदानाचंही काम करायचा. त्याच्या न्यायदानावर लोकांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांचा त्याला पाठिंबा आणि आदर मिळायचा. कामगार वर्गातील तामिळ लोक निष्ठेनं त्याच्यासाठी काम करायचे. तमिळबहुल भागात त्यानं मंदिरं, शाळा, रुग्णालयांच्या बांधकामासाठी निधी आणि कौटुंबिक मदत केली. या सगळ्यामागं त्याची परोपकारी भावना होती असं नाही, तर तो हे सगळं त्यांची निष्ठा मिळवण्यासाठी करत होता. त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीची कामं करुन घेण्यासाठी त्यानं पाया मजबूत केला.
स्पर्धा आणि संघर्ष
मुंबईचं गुन्हेगारी विश्व झपाट्यानं बदलत आणि वाढत होतं. वरद राजनलाही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागला. त्याचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी होता हाजी मस्तान. तोही तस्करी आणि मटक्याचा व्यवसाय करत होता. आणि त्याच्यापेक्षाही शक्तीशाली होता, करीम लाला. करीम लाला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा पितामह म्हणून ओळखला जायचा. करिम लाला आधीच मुंबईवर राज्य करत होता, तर हाजी मस्तान आणि वरदराजनही त्यांचे पंख पसरु पाहत होते. सत्तेसाठी लढून आणि भांडणं करुन कुणालाही मुंबईही मिळणार नाही याची तिघांनाही कल्पना होती. म्हणूनच त्यांनी सामंजस्यानं मुंबईचे तीन भाग केले, आणि आपापले व्यवसाय आपापल्या भागात वाढवायला सुरुवात केली. परस्पर सहकार्य असले तरीही स्पर्धाही तीव्र होती, आणि कधीकधी तीचं रुपांतर हिंसक चकमकिंमध्येही होत होतं. पण वरदराजण त्याच्या धोरणात्मक कल्पकता आणि चांगल्या सौदेबाजीच्या क्षमतेने अनेक वेळा गुंतागुंतीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत होता.
1970 पर्यंत सामंजस्यानं सुरु असलेले व्यवसायात मात्र वरदराजनला नंतर प्रचंड संघर्ष करावा लागला. कारण तोपर्यंत मुंबईत आणखी एका डॉनचा उदय होत होता. तो म्हणजे दाऊद इब्राहिम. 1970 च्या दशकात दाऊदनं त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरुवात केली, सुरुवातीला दाऊद हा वरदराजनचा मित्र होता. पण नंतर त्याची महत्वाकांक्षा वाढत गेली. आणि त्याचं रुपांतर दोघांमधल्या स्पर्धेत झालं.
मुंबईतला गणेशोत्सव
1966 च्या दरम्यानं वरदराजननं मुंबईत त्याच्या बालेकिल्यात म्हणजेच माटुंग्यात गणेशोत्वाची सुरुवात केली. जनतेच्या मनात सहानुभुती आणि सन्मान कसा मिळवायचा हे त्याला चांगलं माहीत होतं. त्यासाठीच त्यानं गणेशोत्सवाची सुरुवात केली. वरदराजनचा गणपती हा अनेक वर्ष मुंबईतला सगळ्यात मोठा गणपती म्हणून ओळखला जायचा. पण हात धुवून त्याच्या मागे लागलेले पोलिस अधिकारी वाय सी पवार यांना मात्र त्यांची शक्ती कमी करण्याचा पहिला उपाय सापडला. पवार यांनी त्याच्या गणेशोत्सवावरच घाव घतला. गणपती मंडळाच्या जागेवर त्यांनी पोलिस चौकी उभारली आणि गणेशोत्सवाची जागा कमी केली. या जागेची लढाई कोर्टापर्यंत गेली. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं दोन वेगवेगळे निर्णय दिले. त्यातल्या वरिष्ठ न्यायाधीशांचा निकाल ग्राह्य धरण्यात आला. गणेश मंडपाची जागा कमी झाली. गणेशोत्सवाचं स्वरुप बदललं. वरदराजनच्या साम्राज्याला बसलेला हा मोठा धक्का होता.
डाऊनफॉल
1970 च्या उत्तरार्धापासून वरदराजनच्या अधोगतीला सुरुवात झाली. याचं कारण होतं, ते दाऊदचा झपाट्यानं झालेला उदय. त्यामुळं मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्येही झपाट्यानं बदल झाले. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचाही गुन्हेगारांवर दबाव वाढायला सुरुवात झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वरदराजन या सगळ्या स्पर्धेत मागे पडला आणि त्याचा दबदबा कमी व्हायला सुरुवात झाली.
1975 मध्ये भारतात लागलेली आणीबाणी वरदराजनच्या पतनाचं तत्कालीन कारण ठरली. त्यावेळच्या कायदा सुव्यवस्थेच्या कठोर उपाययोजनांनी वरदराजनचे व्यवसाय कमकुवत केले. त्यातच वाय सी पवार यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्ड विरुद्ध मोहीमा सुरु केल्या होत्या. वरदराजनसाठी काम करणाऱ्या पोलिसांनी घाबरुन त्याच्याशी संबंध तोडले. त्याला मदत करणारे राजकारणी त्याच्यामुळं अडचणीत येऊ लागले होते. त्यामुळं त्यांनीही वरदराजशी दोन हात दूर राहण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी वरदराजनच्या जुगार अड्यांवर छापे टाकायला सुरुवात केली. त्याचे अड्डे बंद होऊ लागले. हा त्याच्या साम्राज्याला लागलेला मोठा धक्का होता. या छाप्यांमुळं वरदराजनची आर्थिक कोंडी होऊ लागली. या सगळ्याचा परिणाम म्हणून 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यानं मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. 1983 मध्ये अखेर त्यानं मद्रास(आत्ताचं चेन्नई) ला कुटुंबासह स्थलांतर केलं. त्यानंतर तो जिवंत असेपर्यंत कधीही मुंबईत परतला नाही.
वरदराजनच्या मुंबई सोडून जाण्यानं अंडरवर्ल्ड मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. पण ती पोकळी लवकरच दाऊद इब्राहिमनं भरुन काढली. वरदराजनच्याच व्यवसाय आणि परिसरात स्वत:चं वर्चस्व निर्माण केलं.
आयुष्याची शेवटची वर्ष
आयुष्यभर हिंसक आणि एका डॉनचं आयुष्य जगणारा वरदराजन हा चेन्नईला मात्र एका सामान्य माणसासारखं आयुष्य जगला. एका साध्या घरात राहून त्यानं आपल्या तामिळ समुदायासाठी काम केलं. तो नेहमीच पोलिस आणि कायद्यापासून सावध राहिला. त़्यानं मंदिरं आणि शैक्षणिक संस्थांना दानधर्म केला. तिथं राहणाऱ्या अनेकांना त्याची खरी ओळख माहीतही नव्हती. पण ज्यांना ती माहीत व्हायची, त्यांच्याकडूनही त्याला आदरच मिळत होता. शेवटी जानेवारी 1988 मध्ये चेन्नईच्या घरीच त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
वरदराजननं जवळपास तीन दशकं मुंबईवर राज्य केलं. पण त्याला अतिशय वाईट पद्धतीनं स्वत :चा जीव वाचवण्यासाठी मुंबईतून पळून जावं लागलं, पण आपला मृत्यू किंवा अंत्यसंस्कार तरी मुंबईत व्हावे अशी त्याची इच्छा होती.
वारसा
वरदराजनच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी मात्र शांततेत आणि सर्वसामान्य आयुष्य जगणंच पसंत केलं. ते मुंबईत परत आले नाहीत. आणि त्याच्या कोणत्याही मुलानं त्याचा गुन्हेगारी वारसा पुढे चालवला नाही.