मुंबईबरोबरच भारतीय अंडरवर्ल्डच्या इतिहासात हाजी मस्तान हे नाव अतिशय गाजलेलं आहे. हाजी मस्तान या व्यक्तीनं गुन्हेगारी आणि प्रतिष्ठा या दोन्ही जगांमध्ये समतोल साधत गेला. मस्तान मिर्झा या नावानं जन्मलेल्या हाजी मस्तानचं आयुष्य हे गुंतागुंतीचं होतं. तामिळनाडूतल्या एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या हाजी मस्ताननं मुंबईत अतिशय प्रभावशाली आणि वादग्रस्त म्हणून आपली ओळख निर्माण केली. स्मगलरपासून समाजसेवक, चित्रपट निर्माता, तसंच रिअल इस्टेट टायकून अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तो जगला. हाजी मस्तान आणि त्याच्या समकालीन गुन्हेगारांचं छोट्या गुन्हेगारांपासून मुंबईचे डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास हा खरंतर मुंबईच्या बदलत गेलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं प्रतिबिंब आहे.
हाजी मस्तानचं लहानपण
1 मार्च 1926 ला तामिळनाडूमधील पनाकुलम नावाच्या एका छोट्या गावात मस्तान मिर्झाचा जन्म झाला. त्याचं कुटुंब अगदीच साधारण आयुष्य जगणारं होतं. त्याचे वडिल हलिम मिर्झआ हे बीडी विकून कुटुंबाचा रहाटगाडा हाकायचे. पण त्यातून येणाऱ्या पैशात बायको आणि चार मुलांचा सांभाळ करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं मस्तानचं लहानपण हे गरिबीत गेलं. कदाचित म्हणूनच लहानपणापासून त्याच्यात मेहनत करण्याचा निर्धार आणि जिद्द होती. मुलं मोठी होत होती, तसतसं तुटपुंज्या पैशांवर उदरनिर्वाह करणं कठीण होत होतं. म्हणून मस्तान 8 वर्षांचा असताना हलिम मिर्झा यांनी रोजगाराच्या चांगल्या संधींसाठी गाव सोडून मुंबईची वाट धरली. मुंबईत रोजगाराच्या संधी होत्या, पण तरीही तिथंही गरिबी आणि विषमता खच्चून भरलेली होती. कारण त्या वेळी मुंबईचा झपाट्यानं विकास होत होता आणि भारत आणि भारताबाहेरुनही अनेक लोक मुंबईत दाखल होत होते.
मुंबईत दाखल झाल्यानंतर लहान वयातच मस्ताननं आधी रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्यानं मुंबईच्या गोदीत पाय ठेवला आणि त्याच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं. मुंबईची गोदी किंवा मुंबई डॉक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख केंद्र होतं. जसा कायदेशिर व्यापार इथून चालायचा तसाच बेकायदेशीर व्यापार म्हणजेच काळा बाजारही इथून चालायचा. त्यामुळं हमाली करण्यापेक्षा तस्करीतच पैसा आहे, हे मस्तानच्या लवकरच लक्षात आलं. आणि त्यानं तस्करीच्या कामांची रिस्क घ्यायचं ठरवलं.
हाजी मस्तानचा उदय
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था उभारणीचं काम सुरु होतं. त्यामुळं अनेक गोष्टींवर सरकारचं कडक नियंत्रण होतं, पण त्यामुळं उलट परिणाम व्हायला लागले होते. ज्या गोष्टीवर निर्बंध किंवा कडक आयातीचे नियम लावण्यात येत होते, त्या गोष्टीचा काळाबाजार व्हायला सुरुवात झाली होती. मस्ताननं यातच त्याचा फायदा आणि संधी शोधली आणि तस्करीचा मार्ग निवडला. सुरुवातीला त्यानं छोट्या प्रमाणावर सोनं, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आणि परकीय चलन यांचा व्यापार सुरु केला. हळूहळू त्याची व्याप्ती वाढवत नेली. मस्तानला दिखावेगिरी अजिबात आवडायची नाही. तो काय काम करतो हे सुद्धा तो जास्त लोकांना सांगायचा नाही. त्यामुळं त्याचं काम आणि त्याची कमाई ही नेहमीच लपून राहत होती. पण त्याच्या याच सवयीनं त्याला जास्त मोठं आणि संयमी बनवलं.
सुरुवातीला त्यानं लहान प्रमाणावर काम केलं. परंतु व्यावसायिक समज आणि दूरदृष्टीमुळे त्यानं लवकरच मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू केलं. सरकारी अधिकाऱ्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत एक विशाल जाळं त्यानं निर्माण केलं. त्याचं तस्करीचं साम्राज्य चांगलच मोठं झालं. हाजी मस्तान गुन्हेगारी जगाचा राजा असला तरी तो त्याच्या समकालीन गुन्हेगारांइतका हिंसक नव्हता. शांततेनं आणि चर्चा करून समस्या सोडवण्यावर त्याचा जास्त भर असायचा. म्हणून त्याला समाजात मानही मिळत होता.
तस्करीचे साम्राज्य
1960 च्या दशकात करिम लाला आणि वरदराजन यांच्यासोबत हाजी मस्तानचंही तस्करीचं साम्राज्य मुंबईभर पसरलं होतं. मुंबईच्या बाहेरही त्यानं त्याचं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली होती. सोन्याचा व्यापार हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. त्यातून तो प्रचंड नफा कमावत होता. कारण त्या काळात भारत ही सोन्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. आणि सोन्याच्या आयात नियम आणि निर्बंधांमुळं मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. हाजी मस्तानच्या व्यापाराचं आणि तस्करीचं यश हे त्याच्या नेटवर्कमुळं होतं. यात त्यानं जोडलेले सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी आणि बंदरातील कामगार यांचा समावेश होता. हाजी मस्ताननं कधीही प्रसिद्धीची हाव धरली नाही. कारण त्याला माहीत होतं, जेवढं कमी प्रसिद्ध तेवढंच जास्त यश आणि पैसा मिळवू शकू. त्यामुळं तो नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिला. अनावश्यक कायदेशीर संघर्ष त्यानं नेहमीच टाळले. त्यामुळं अनेक वर्ष त्याला त्याचं काम विनासायास करता आलं. आणि प्रचंड पैसाही कमावता आला. सोन्याच्या तस्करीसोबतच हाजी मस्तानं इलेक्ट्रीक वस्तू, कपडे आणि मुंबईत मागणी असलेल्या अनेक वस्तूंची तस्करी आणि व्यापार तो करायचा. त्यामुळं त्याकाळात मुंबईत होणाऱ्या काळ्याबाजारात त्याचा वाटा सर्वाधिक होता.
तस्करीपलिकडचे व्यवसाय
हाजी मस्तानला प्रत्येक क्षेत्रात काम करायचं होतं. हळूहळू त्यानं व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. अवैध तस्करीसोबतच रिअल इस्टेट, चित्रपट निर्मिती अशा वैध व्यवसायातही गुंतवणूक करायला सुरुवात केली.
बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचा शिरकाव
1960 आणि 70 च्या दशकात मुंबई ही फक्त भारताची आर्थिक राजधानीच नाही, तर भारतीय चित्रपट निर्मितीचं केंद्रही बनली होती. पण आर्थिक समस्यांमुळं अनेक चित्रपट निर्मात्यांना आपले सुरू असलेले चित्रपट पूर्ण करायला संघर्ष करावा लागत होता. हीच संधी ओळखून हाजी मस्ताननं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि चित्रपट निर्मितीत पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्याच्या मदतीनं अनेक निर्माते त्यांच्या ठरलेल्या वेळात चित्रपट पूर्ण करु लागले. पैशांच्या गुंतवणुकीसोबतच हाजी मस्तान चित्रपटांच्या कथेतही लक्ष घालायचा. यामुळं चित्रपट निर्मात्यांसोबतच मोठमोठ्या कलाकारांशीही त्याची जवळीक निर्माण झाली.
गुन्हेगारीतली समाजसेवा
त्याकाळी मुंबईच्या गुन्हेगारांनी म्हणजेच करिम लाला आणि वरदराजन मुदलीयार यांनी आपला गुन्हेगारी व्यवसाय कोणत्याही पद्धतीनं धोक्यात येऊ नये, आपल्याला सामान्य नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, अशा शुद्ध व्यायसायिक हेतूनं लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली. आपला व्यवसाय आणि प्रतिमा वाचवण्यासाठी हाजी मस्ताननंही तेच केलं. मुंबईतल्या मुस्लिम समाजासाठी त्यानं मदतीचा एक स्रोत निर्माण केला. मशिदी आणि अनाथाश्रमांना मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. गरीब कुटुंबांना लग्न, उपचार आणि शिक्षणासाठी पैसे दिले. मुस्लिमांबरोबरच इतर नागरिकांनाही त्यानं मदत केली. त्यामुळं सगळ्याच समाजातील गरिबांमध्ये एक समाजसेवक म्हणून त्याची प्रतिमा तयार झाली.
पतनाची सुरुवात
1970 च्या उत्तरार्धात हाजी मस्तानचं साम्राज्य हळूहळू कोसळायला सुरुवात झाली. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेले बदल, अधिक आक्रमक प्रतिस्पर्धी आणि सरकारचा गुन्हेगारांवर वाढत चाललेला वचक यामुळं त्याचे व्यवसाय तोट्यात जाऊ लागले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या इमर्जन्सीच्या काळात केंद्र सरकारनं संघटीत गुन्हेगारीच्या विरोधत जोरदार मोहीमा राबवल्या. यात हाजी मस्तानला अनेकदा तुरुंगात जावं लागलं. पण कोणत्याही गंभीर गुन्ह्यांसाठी त्याला दोषी ठरवण्यात येत नव्हतं आणि सुटका होत होती. पण या सतत होणाऱ्या तुरुंगवाऱ्यांनी त्याचं आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती मात्र खालावत गेली.
राजकारणात प्रवेश
त्यानंतर त्यानं राजकारणात प्रवेश करुन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आलं नाही. राजकीय नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळं त्याला राजकारणात प्रवेश करण सोपं गेलं. 1980 च्या उत्तरार्धात त्यानं ‘दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ’ या राजकीय पक्षाची स्थापना केली. दलित आणि मुस्लिम समाजातील समस्या सोडवणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. पण जनतेनं त्याला एका राजकीय नेता म्हणून स्वीकारलं नाही. आणि हाजी मस्तानचं राजकारणात बस्तान बसलं नाही.
मृत्यू आणि गुन्हेगारी वारसा
9 मे 1994 ला हाजी मस्तानचा मृत्यू झाला. पण मुंबईच्या गुन्हेगारीत अजुनही त्याचं नाव घेतलं जातं. हाजी मस्ताननं दोन लग्न केली. पण त्याच्या नंतर त्याच्या गुन्हेगारी व्यवसायाला आणि त्याच्या संपत्तीला मात्र कुणीही वारसदार नव्हतं. हाजी मस्तानच्या मुलांबाबत सार्वजनिकरित्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण असं म्हणतात की त्याला दोन मुली होत्या. त्या कुठे राहिल्या किंवा त्यांनी हाजी मस्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर दावा का केला नाही याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळं हाजी मस्ताननं उभारलेल्या साम्राज्याचा त्याच्या सोबतच अस्त झाला.