गेल्या भागात आपण वाचले त्याप्रमाणे पेशवे काळात गुजरातमध्ये गायकवाड घराण्याने स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांच्या प्रशासनात दिवाण हा उच्चपदस्थ अधिकारी होता. तो अनेकदा पंतप्रधान किंवा शासकाचा मुख्य सल्लागार म्हणून काम करत असे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात अनेक मराठी कुटुंबांनी दिवाणाचे प्रतिष्ठित पद भूषवले आणि या प्रदेशाच्या शासन, प्रशासन आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. बडोद्याचे मराठी साम्राज्य म्हणत असताना यात गुजरातमधील अहमदाबाद, सूरत या शहरांमध्येदेखील वेळोवेळी स्थलांतरित झालेल्या मराठी कुटुंबांचा समावेश होतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान
सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण सात साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून केलेली भाषणे त्यांची साहित्याविषयीची समज, सर्वसमावेशक दृष्टी आणि वैश्विक भान याचीच साक्ष देतात. इ. स. 1878 पासून आयोजित होत असणाऱ्या या संमेलनांना इ. स. 1909 पर्यंत ‘मराठी ग्रंथकरांचे संमेलन’ असे नाव होते. इ. स. 1909 मध्ये बडोद्यामध्ये आयोजित केलेल्या संमेलनाच्या वेळी त्याचं नाव ‘मराठी साहित्य संमेलन’ असं केलं.
सयाजीरावांच्या काळात बडोदा येथे मराठी साहित्यात बडोद्यात परिमाणात्मक तसेच गुणात्मक अशी दोन्ही प्रकारची वाढ झाली. महाराष्ट्रात भरभराटीस आलेल्या वृत्तपत्र, नाट्य, चित्रपट, संगीत या सर्व शाखांना प्रारंभीच्या काळात बडोद्यामध्येच राजाश्रय लाभला.
बडोद्यातील मराठी शाळा
गुजराती आणि इतर भाषांसोबत मराठी भाषा शिकवली जात होती. यामुळे मराठी संस्कृती जपण्यास मदत झाली आणि भावी पिढ्यांपर्यंत मराठी परंपरांचा प्रसार सुलभरीतीने झाला.
दिवाण कुटुंबे ही बडोद्यातील अनेक शैक्षणिक संस्थांची आश्रयदाते होती. त्यांनी केवळ मराठी साहित्यालाच नव्हे तर व्यापक शैक्षणिक सुधारणांनाही प्रोत्साहन दिलं. यामुळे मराठी आणि गुजराती भाषेत शालेय विषय शिकवणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना झाली आणि बडोद्यात मराठी बुद्धिजीवींसाठी जागा निर्माण करण्यास मदत झाली.
सध्या बडोद्यामध्ये महाराणी चिमनाबाई हायस्कूल ही मराठी माध्यमाची एकमेव शाळा असून गेल्या वर्षापासून या शाळेत मोफत शिक्षण दिलं जात आहे.शाळा टिकवून ठेवण्याकरता एक उपाय म्हणून ही योजना अंमलात आणली जात असल्याचं तिथल्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत आवर्जून नमूद केलं आहे.
हे ही वाचा : बडोद्याचे मराठी साम्राज्य
मराठी प्रेस आणि प्रकाशने
दिवाण कुटुंबे अनेकदा वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांसह मराठी प्रेसला पाठिंबा देत असत. त्यांना मराठी संस्कृती, साहित्य आणि राजकीय विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रिंट मीडियाची शक्ती जाणून मराठी भाषेतील पुस्तकांच्या प्रकाशनात भूमिका बजावली असं मानलं जातेृं. यामुळे संपूर्ण प्रदेशात ज्ञान पसरण्यास मदत झाली.
सामाजिक आणि राजकीय प्रभाव
अनेक दिवाण कुटुंबे सामाजिक सुधारणांमध्ये, विशेषतः महिला शिक्षण आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात सहभागी होती. काही मराठी दिवाणांनी साक्षरता आणि लिंग समानतेचा प्रचार यासारख्या प्रगतीशील बदलांचा पुरस्कार केला. यामुळे बडोद्यातील व्यापक मराठी समुदायावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
मराठा परंपरांचे जतन
गेल्या भागात आपण पाहिल्याप्रमाणे मराठी सण येथे साजरे केले जातातच. त्याचवेळी वेशभूषा आणि दागिने यांच्या वापरातूनही मराठी संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न दिसून येतो. पूर्वीच्या काळी अनेक मराठी दिवाण पारंपारिक फेटा आणि धोतर असा मराठी पोशाख परिधान करत तर महिला नऊवारी साड्या परिधान करत असत. आजही महिलांनी परिधान केलेले दागिने बहुतेकदा मराठा शैलीचे प्रतिनिधित्व करतात.
हे ही वाचा : कोचीनमधले मराठी बांधव!
गुजराती संस्कृतीशी एकात्मता
आपली मराठी ओळख जपताना, या कुटुंबांवर गुजराती रीतिरिवाजांचाही खोलवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात गुजराती आणि मराठी परंपरांचे मिश्रण पाहायला मिळते. भाषा (मराठी आणि गुजराती यांचे मिश्रण), अन्न आणि जीवनशैली यासारख्या क्षेत्रांमध्ये हे सांस्कृतिक मिश्रण दिसून येते.
‘मुलगी मराठी शाळेत शिकणार’
‘गुजराती लोक जास्त मदत करणार’, (या ठिकाणी —णार हा प्रत्यय भविष्यकालदर्शक नसून सामान्य वर्तमानकाळवाचक आहे. उदा. प्रमाण मराठीतील ‘करतात’)
‘महाराष्ट्र गुजरातपासून जुदा झाल्यावर ही आमची छठी पिढी’ (या वाक्यात शब्दस्तरावर गुजराती भाषेचा प्रभाव दिसून येतो)
‘माझे मुलगीचे मुले गुजराती बोलतात’
‘पोपटचा गळा’,
‘भाषाचा प्रॉब्लेम’ (या वाक्यांकडे बारकाईने पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की बडोद्याच्या मराठीमध्ये सामान्य रूपांचा वापर केला जात नाही. उदा. प्रमाण मराठीतील मुलगी – मुलीचे, पोपट – पोपटाचा, भाषा – भाषेचा इत्यादि)
अशी भाषा कानावर पडली की आपण बडोद्याच्या दांडिया बाजारात आहोत असे समजावे.
समारोप
अहमदाबाद आणि बडोदामधील मराठी समुदाय हे सामायिक इतिहास, स्थलांतर, भाषिक समानता आणि सतत चालू असलेल्या सामाजिक संवादांमुळे एकमेकांशी जवळून जोडलेले आहेत. बडोदा हे पारंपारिक मराठी केंद्र राहिलं असलं तरी, अहमदाबाद त्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक संधींमुळे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.