मानवी इतिहासाचा धांडोळा घेणारे जागतिक पातळीवरचे लोकप्रिय लेखक, भाष्यकार युवाल नोआ हरारी भारतात आलेत. त्यांच्या बेस्टसेलर ‘सेपियन्स’ या पुस्तकात तंत्रात मागे पडल्याने नामशेष झालेल्या मानवी जमातींचा उल्लेख येतो. मागे अमेरिकेतल्या एमआयटीचे संस्थापक निकोलस नेग्रोपॉन्ते भारतात येऊन गेले होते. या टेक्नॉलॉजी वैश्विक गुरूंनी सांगितलं होतं की, जे समाज तंत्रज्ञानाला सामावून घेणार नाहीत ते पाल्यापाचोळ्यासारखे उडून जातील. युवाल हरारी त्यांच्या ‘नेक्सस’ पुस्तकाच्या आडून सांगतायत की, आता कृत्रिम बुद्धिमत्तेचं मोठं आव्हान अखिल मानवजातीसमोर आहे. एआय नावाचा आजचा अमीबा पुढे डायनॅसोर झाल्याशिवाय राहणार नाही. हरारींचं मुलाखतीतलं एक विधान आघाडीच्या वर्तमानपत्रात झळकलं. ‘सशक्तदेखील स्वतःला बळी म्हणवतात, ही आजची समस्या.’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेने ठरलेले बळी नाहीत तर आपल्या देशातील सशक्त परिजन अर्थात महाजन आणि अभिजन आहेत.
‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ च्या राजकीय चर्चेत ‘व्हिक्टिम प्ले’ करण्याचा मुद्दा आधीही मांडण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, विशेषतः ज्यांचे पक्ष फोडले गेले होते, त्यांनी अगतिकता दाखवत व्हिक्टिम प्ले करत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा दुबळा प्रयत्न केला. आता एक वैश्विक लेखक येऊन सांगतो की, इथे सशक्तदेखील बळी म्हणवत आहेत. मग जे खरोखरच बळी आहेत त्यांचं काय? स्वतःला अगतिक, असुरक्षित, व्हल्नरेबल दाखवणाऱ्यांचाच जमाना आहे का?
मागे शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या बाबतीत असा प्रतिवाद केला गेला होती की, शेतकरी कधीच समाधानी असत नाही. कधीही विचारलं तरी शेतकरी त्याची रडकथाच सांगतो, असा शहरी पोट भरलेल्या विचारवंताचा दावा होता. नारायण सुर्वेंच्या भाकरीच्या चंद्राची कविता त्यांना माहीत नव्हती का? शेतकऱ्यांची रडकथा न संपणारी होती असं वाटणारेच कोविड कालखंडात भारताच्या शेतीव्यवस्थेने कशी भारतीय अर्थव्यवस्था वाचवली याचे गुणगान गात होते. त्याचवेळी शहरी जीवन ठप्प झाले होते. मग खरे सशक्त कोण आणि खरे अशक्त कोण?
समाजातल्या अशक्तांनी स्वतःला अधिकाधिक व्हल्नरेबल ठरवणं एकवेळ समजू शकतो. मागे डाकू राणी फुलनदेवीची मुलाखत घेतली होती. मुलाखतीत ती म्हणाली होती की, ‘जब तक बच्चा रोता नहीं तब तक माँ भी दूध नहीं पिलाती.’ समाजाचं लक्ष वेधून घेण्यासाठी रडकथाच कामाला येते. ‘आम्ही असुरक्षित आहोत, आम्हाला वाचवा’ असा सतत ‘एसओएस’ पसरवणाऱ्यांनाच लाभाचा फायदा मिळतो अशी धारणा झालीय. मग शेतकऱ्यांचं तरी काय चुकलं.
हरारींच्या विधानासोबतच ‘लाडकी बहीण’ योजनेच्या छाननीच्या बातम्या लागल्यात. काही सशक्त भगिनींनी दीड हजार रुपयांच्या मोहापायी स्वतःला लाडक्या कॅटगरीत बसवण्यासाठी आटापिटा केल्याचं निष्पन्न होतंय. त्या नियमबाह्य रीतीने योजनेचा लाभ घेतायत. म्हणजे सशक्त स्वतःला बळी म्हणवतात ही चुकीची मांडणी नाही.
क्रीमी लेअरमध्ये असूनही आरक्षणाचा लाभ घेणारे. बाहेर मिरवायला एक ज्ञाति आणि लाभासाठी सर्टिफिकेटवर दुसरी नोंदवून घेणारे, आपल्या मुलांची क्षमता नसताना किंवा तितके टक्के नसतानाही मेडिकल किंवा इंजिनीअरिंग अॅडमिशनसाठी राजकीय वशिला लावणारे. त्यासाठी नेत्यांची पत्र घेऊन संस्थाचालकांना किंवा प्राचार्यांना धमकावणारे अनेक सशक्त स्वतःला कामापुरते बळीच म्हणवत असतात. आर्थिक सशक्तता असताना केशरी रेशनकार्ड घेणारे, टोलेजंग इमारतीत राहूनही सोसायटीचा देखभाल खर्च न देणारे, पेट्रोल कितीही महागलं तरी गाडी फुल्ल करणारे, पण भाज्यांचे दर जरा महागले की, स्वतःला महागाईचे बळी म्हणवून घेणारे. नवसाला पावणाऱ्या देवस्थानाच्या रांगेत वशिल्याचा शॉर्टकट लावणारे, हे स्वयंघोषित सशक्त व्हीआयपी एरवी स्वतःला व्यवस्थेचे बळी म्हणवत असतात. व्हिक्टिम प्ले करण्याची सवयच आपल्याला लागली आहे.
‘नाच गं घुमा’ नावाचा एक लोकप्रिय मराठी सिनेमा. त्यात महिलांच्या श्रमशक्तीची अतिशय उथळपणे केलेली मांडणी आहे. कामवाल्या बायकांचा सामाजिक प्रश्न हाताळल्याचं बेअरिंग असलं तरी सिनेमाची प्रोटगनिस्ट ही उच्च मध्यमवर्गीय महिला आहे. तिच्या यशस्वीतेमागे तिचा घरात लॅपटॉपवर किंवा टीव्हीवर मॅच बघत बसलेला नवरा नाही. ‘प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे तिची एक कामवाली बाई असते,’ असा संदेश हा सिनेमा देतो. सशक्त बाईची धांदल व्यावसायिक आणि तिच्यासाठी राबणारी कामवाली बाई मात्र अव्यावसायिक. तिचा नवरा दारू पिऊन मारहाण करणारा, काहीही काम न करणारा वगैरे. या कामवाल्या बाईच्या हाती मोबाईल आणि इलेक्ट्रिक बाइक दिल्याने तिचा प्रश्न मिटतो अशी सोपी सुटसुटीत मांडणी. याच सशक्त वर्गातल्या महिला अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला गेल्या की व्यवस्थित काम करतात आणि त्यांचे नवरेही गपगुमान त्यांना मदत करतात. कारण तिथे श्रमशक्ती प्रचंड महाग आहे. इथे श्रमशक्ती स्वस्त शिवाय सरंजामी वर्णव्यवस्था अस्तित्वात. तरीही सशक्त स्वतःला बळी म्हणवतो, ही मोठीच समस्या.