‘अभिजात’ मराठी भाषेतील सिनेमा हा कंटेंटफुल आहे हे आपण सगळेच मानतो. दक्षिणेकडील सिनेमा, स्टार्स यांना बघून आपण आपल्या मराठी सिनेमांना कितीही नावं ठेवत असलो तरी मराठी सिनेमा हा कमीत कमी अतिशयोक्ती करून एखादी गोष्ट आपल्यासमोर ठेवतो ही वस्तुस्थिती आहे.
तंत्रज्ञान आणि भांडवलाची कमतरता
“मराठी चित्रपट उद्योग हा ‘सैराट’च्या पुढे सरकलाच नाही” अशी वाक्यं बऱ्याचदा कानी पडतात. पण, एक उद्योग म्हणून मराठी चित्रपट उद्योगाला असलेल्या मर्यादा देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम म्हणजे, मर्यादित बजेट आणि निर्माते. हिंदी सिनेमांमध्ये जितक्या सहजपणे कॉर्पोरेट गुंतवणूक होते आणि सिनेमाचा तांत्रिक दर्जा आणि एकूण निर्मिती मूल्य वाढवली जातात तितकी गुंतवणूक मराठी सिनेमांमध्ये सध्या तरी होत नाही. त्यासोबतच, हिंदी सिनेमा निर्मितीसाठी होणारे आंतरराष्ट्रीय टाय अप्स जसे की, ट्वेंटीयथ सेंच्युरी फॉक्स किंवा इतर हॉलीवूडच्या तंत्रज्ञानाची जी जोड ‘ब्रम्हास्त्र’ सारखा भव्य सिनेमा तयार करू शकते ती मुभा आज मराठी निर्मात्यांकडे नाहीये. ‘जियो’ उद्योग समूहाने जेव्हा पासून मराठी सिनेमांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे, तेव्हापासून हे चित्र बदलत आहे ही एक सकारात्मक बाब आहे.
मराठीत ग्लोबल चेहरा नाही
बजेटच्या अभावी मराठी सिनेमांचं ‘प्रमोशन’ हे तितक्या मोठया प्रमाणावर केलं जाऊ शकत नाही. प्रमोशनच्या जोरावर रोहित शेट्टीने ‘सर्कस’ नामक एक रणवीर सिंगचा टुकार चित्रपट मध्यंतरी प्रेक्षकांच्या माथी मारला होता. मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, लोकल सगळीकडे याच सिनेमाचे पोस्टर रातोरात लावण्यात आले आणि असा कोणता सिनेमा येतोय हे प्रेक्षकांवर बिंबवण्यात आलं. इतका पैसा लावणं हे मराठी निर्मात्यांना शक्य होत नाही. शिवाय, मराठी सिनेमांना एनआरआय प्रेक्षकांचं तितकं पाठबळ मिळत नाही. आज जवळपास प्रत्येक मराठी घरातील एक नातेवाईक हा परदेशात स्थित आहे. जगातील प्रत्येक देशात मराठी मंडळ आहे. पण, त्या प्रेक्षकांच्या भरवश्यावर मराठी सिनेमांची निर्मिती सध्या तरी होत नाहीये. शाहरुख खान सारखा एखादा ग्लोबल स्टार हा मराठीत नाहीये ज्याचा कोणताही सिनेमा केवळ नावाच्या जोरावर परदेशात गल्ला कमवून देऊ शकेल. प्रत्येक देशाची सिनेमा वितरण करण्याची आपली एक प्रणाली आहे, तिचा अभ्यास करून परदेशातील मराठी प्रेक्षकांसाठी मराठीची स्वतंत्र बाजारपेठ तयार केली जाऊ शकते.
हे ही वाचा : मराठी कलाकारांचं बॉलीवूडमधलं अस्तित्व
थिएटर मिळण्याची मारामारी
‘मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही’ ही एक मोठी समस्या कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. आज मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा कितीही चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही जेव्हा हिंदीतील एखाद्या मोठ्या स्टारचा सिनेमा येतो तेव्हा आपल्या मराठी सिनेमांना डावललं जातं आणि हिंदी सिनेमांना प्राधान्य दिलं जातं. पुष्कर जोग या मराठी कलाकार, निर्मात्याने नुकतीच ही खंत बोलून दाखवली जेव्हा सलमानच्या ‘सिकंदर’ मुळे त्यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा’ या चांगल्या प्रतिसदात सुरू असलेल्या सिनेमाचे शोज् कमी करण्यात आले. हेच कित्येक वर्षांपासून असंच सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळवण्यासाठी सरकारचा कोणताही कायदा नाहीये. तो मराठी निर्माताच असतो जो सिनेमासाठी पैसे उभा करण्यापासून त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आपली लढाई लढत असतो. आधीच तर मराठी प्रेक्षकाचा कल हा सिनेमा थिएटरपेक्षा ओटीटीवर बघण्याकडे असतो. जेव्हा तो थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा बघण्याचा प्लॅन करतो तोपर्यंत तो सिनेमा थिएटरधून उतरलेला असतो म्हणून तो देखील नाराज होतो.
ओटीटी प्लॅटफॉर्मकडून फारसा पुढाकार नाही
‘सॅटेलाईट राईट्स’ म्हणजेच सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तो एखादया ओटीटी प्लॅटफॉर्मने आणि टीव्ही चॅनलने सिनेमाचे अधिकार विकत घेणे हा प्रकार मराठी सिनेमांसाठी सुद्धा सुरू झाला आहे. पण, एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘एक्सलुजिव्ह’ मराठी सिनेमा तयार करणे हे सध्या तरी होत नाहीये. मराठी सिनेमांसाठी जर हे निर्मिती दालन खुलं झालं तर अजून नवीन प्रयोग मराठी सिनेमात होऊ शकतील, मराठी सिनेमांपासून दुरावलेल्या तरुण प्रेक्षकाला मराठी सिनेमाकडे परत आकर्षित केलं जाऊ शकतं.
संपूर्ण पॅकेजची अपेक्षा
मराठी प्रेक्षक हा एखाद्या सिनेमाकडून काय आणि किती अपेक्षा ठेवतो ? याचं नेमकं उत्तर सांगणं फार कठीण आहे. मराठी प्रेक्षकांना एकाच सिनेमातून विनोद, प्रेमकथा, तरुणपणा, लॉजिक, फिलॉसॉफी, ड्रामा, गाणी अशा एक पॅकेजची अपेक्षा असते. त्यातील कोणतंही पात्र हे आपल्या चौकटीच्या बाहेरचं नसावं अशी एक अपेक्षा असते.
हे ही वाचा : मुंबई आणि बॉलीवूडचं कनेक्शन
रसिकांच्या पाठबळाची गरज
आपल्या मराठी नायकांमध्ये आपल्याला अपेक्षित असलेला समंजसपणा आहे. आपल्या मराठी सिनेमांमध्ये एक ठेहराव आहे. आज मराठी सिनेमांना कोणत्या गोष्टींची गरज असेल तर ती रसिक प्रेक्षकांच्या पाठबळाची गरज आहे. सध्याचा मराठी सिनेमा हा घरातील त्या मुलासारखा झाला आहे जो कसाही वागला तरी त्याला कायम मराठी प्रेक्षकांकडून दूषणंच दिली जातात.
मराठीत सिनेमॅटीक लिबर्टी नाकारली जाते?
‘जिलबी’ सारखा सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री, थ्रीलर सिनेमा हा मराठीत तयार होतो; पण, त्यातील नायकाचं पात्र आणि त्या पात्राचं एकूणात चरित्र हे प्रेक्षकांना पसंत पडला नाही आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला. हिंदी सिनेमा किंवा एखादी वेबसिरीज बघतांना आपण निर्माता, दिग्दर्शकांना कथा सादर करतांना, पात्र उभं करतांना आपण प्रेक्षक म्हणून जी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ देतो ती मराठीतील साहित्य कृतींना देत नाहीत हा मूळ मुद्दा आहे. प्रेक्षक म्हणून जर हे आवश्यक स्वातंत्र्य आपण आपल्या मराठी निर्मात्यांना दिलं तर आपली मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा कित्येक पटीने मोठी होईल, विश्वासार्ह उद्योग होऊ शकतो.
बोल्ड विषयांना फारसा प्रतिसाद नाही
मराठी सिनेमातील नायिकेने जर काही बोल्ड अपेक्षा ठेवलेल्या दिसल्या की, आपल्याला ते खटकतं. हेमंत ढोमे सारखा दिग्दर्शक जेव्हा त्याच्या ‘फर्स्ट क्लास दाभाडे’ मधून लैंगिक शिक्षणावर काही भाष्य करायचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्याला आवडत नाही किंवा बघतांना अवघडल्यासारखं होतं. पण, तोच विषय जेव्हा पंकज त्रिपाठी हे ‘ओह माय गॉड2’ मधून उघडपणे सादर करतात तेव्हा आपण त्या विषयाचं कौतुक करतो. हा दुटप्पीपणा जेव्हा कमी होईल तेव्हा मराठी सिनेमा सुद्धा नवनवीन प्रयोग करण्यासाठी धजावेल.
हे ही वाचा : नाट्यगृहांच्या अवस्थेला सरकार जबाबदार की प्रेक्षक?
महेश कोठारेंचे सिनेमे अपवाद
मराठी सिनेमांमध्ये झालेले प्रयोग आठवायचे झाले तर आपल्याला थेट महेश कोठारेंच्या दिग्दर्शन काळात जावं लागेल. ‘धडाकेबाज’ या सिनेमात त्यांनी गंगारामला बाटलीत जाऊन नाचतांना आपल्याला दाखवलं आणि त्या काळातील बालक, पालक प्रेक्षकांनी ते स्वीकारलं. कारण, त्या कथा सादरीकरणात दिग्दर्शकाने आपल्या कौशल्याने वर्तमान आणि नावीन्य यांची सांगड घातली होती. त्या सिनेमांमध्ये एका लक्ष्याचा भोळसटपणा होता, एका महेशचा करारीपणा होता. एक विज्ञानाच्या आधारे केलेला चमत्कार होता, आधुनिकता होती.
आजचा दिग्दर्शक बहुतेक या सर्वांचा समतोल राखण्यात कमी पडतोय. महेश कोठारे यांच्या सिनेमातील बाहुला बोलायचा, पण त्याचं नाव एखादं हायटेक न ठेवता त्यांनी ‘तात्या विंचू’ असं मराठी नाव ठेवतो. तेच निर्माता, दिग्दर्शक पुष्कर जोग जेव्हा ‘धर्मा – द एआय स्टोरी’ सारखा सिनेमा तयार करतो, तेव्हा तो मराठी प्रेक्षकांना आधुनिक तर वाटतो, पण सामान्य प्रेक्षकांना तो सिनेमा कनेक्ट होत नाही. मागच्या दहा वर्षात उन्मत्त, युथ, फुंतरु, झोंबीवली सारखे सायफाय सिनेमा मराठीत तयार झाले. पण, या सर्व सिनेमांमध्ये मनोरंजन, माहिती आणि आधुनिकता यांच्यात समतोल नव्हता म्हणून हे प्रयत्न प्रेक्षकांनी नाकारले.
सेलिब्रिटी मंडळीकडून असलेल्या अपेक्षा
काही बंधनं ही मराठी चित्रपट उद्योगांमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांना देखील पाळणं गरजेचं वाटतं. ताजं उदाहरण सांगायचं झालं तर, ‘सिकंदर’ सारखा बिग बजेट सलमान खानचा सिनेमा हा प्रेक्षक, समीक्षकांकडून टीकेचा धनी होत असतांनाही त्यावर बॉलीवूड मधील एकही कलाकार भाष्य करतांना दिसत नाहीये. या उलट, हिंदी सिनेमांमध्ये सध्या हा ट्रेंड दिसतोय की, सनी देओल हा सलमान खानच्या ‘सिकंदर’चं सुद्धा प्रमोशन करतोय.
मराठी मध्ये आजवर कधीही हे पहाण्यात आलं नाही की, भरत जाधव यांच्या एखाद्या सिनेमाचं प्रमोशन स्वप्नील जोशी करत आहे किंवा सुबोध भावे यांनी साकारलेल्या एखाद्या बायोपिकचं कौतुक हे त्या सिनेमाशी कोणताही संबंध नसलेले महेश मांजरेकर करत आहेत.
एकमेकांचे पाय खेचण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या मराठी माणसांनी निदान या उद्योग क्षेत्रात काम करतांना नवीन सिनेमा प्रदर्शित होणार असतांना निदान एकमेकांची तळी उचलावी आणि त्या सिनेमाचं मार्केट वाढवावं इतकंच गरजेचं आहे. इन्स्टाग्रामच्या आजच्या जमान्यात केवळ ‘एखादा सिनेमा अवश्य बघा’ अशी दहा सेकंदाची रील सुद्धा हे काम सहजपणे करू शकते.
आपल्या मराठीत ‘वजीर’ सारखे राजकारणावर गंभीरपणे भाष्य करणारा सिनेमा तयार होतो, तर दुसरीकडे ‘श्वास’ सारखा संवेदनशील सिनेमा देखील आपल्याकडे तयार होतो. ‘गंमत जम्मत’, ‘अशी ही बनवा बनवी’ सारखे खळखळून हसवणारे सिनेमा पण इथे तयार होतात; आणि ‘नटसम्राट’ सारखे अभिनय संपन्न सिनेमा आपल्या मराठीत तयार होतात. आपण त्याची जाणीव ठेवूयात आणि येत्या काळात एकत्र येऊन ‘अशी जमवा जमवी’ करू ज्याने मराठी सिनेमांचा सुवर्णकाळ परत येईल, अबाधित राहील.