क्षयरोगाचा धोका कोणाला असू शकतो? 

Tuberculosis (TB) disease : 24 मार्च 2025, जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने. क्षयरोग म्हणजे टीबी. हा आजार अनेक शतकांपासून मृत्यूचे कारण ठरत आहे. वेदांमध्येही या आजाराचा उल्लेख सापडतो एवढा प्राचीन हा आजार आहे. माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू हा क्षयरोगामुळे झाला. हा आजार रावापासून रंकापर्यंत कोणालाही होऊ शकतो.
[gspeech type=button]

क्षयरोग म्हणजे टीबी. हा आजार अनेक शतकांपासून मृत्यूचे कारण ठरत आहे. वेदांमध्येही या आजाराचा उल्लेख सापडतो एवढा प्राचीन हा आजार आहे. माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू हा क्षयरोगामुळे झाला. हा आजार रावापासून रंकापर्यंत कोणालाही होऊ शकतो.


टीबीला संपवण्याचा निर्धार आणि भारतातील परिस्थिती

2030 सालापर्यंत जगभरातील टीबीला संपवण्याचे लक्ष्य जागतिक आरोग्य संघटनेने ठरवले आहे. जगभरामध्ये सद्यस्थितीमध्ये साधारण 28 लाख टीबीचे रुग्ण आढळून येतात यापैकी 25% रुग्ण हे भारतामध्ये असतात. भारतातील टीबी संसर्गाचे प्रमाण किती आहे हे ठरवण्यासाठी रक्त तपासणीचा एक अभ्यास करण्यात आला, यामध्ये विविध राज्यातील हजारो लोकांची IGRA ( Interferon Gamma Reslease Assay) ही रक्त तपासणी करण्यात आली. यानुसार, भारतातील सर्वसाधारणपणे 21% जनतेला टीबीचा जंतूसंसर्ग झालेला आढळून आला. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही सहसा चांगली असल्याने संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये टीबीचा आजार होत नाही, मात्र अशा संसर्गित व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी इतर काही कारणे असतील तर टीबी होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. 

या अभ्यासानुसार प्रत्येक राज्यामध्ये हे प्रमाण वेगवेगळे आढळले. दिल्ली, तेलंगणा, युपी, पंजाब, चंदिगड, कर्नाटक या राज्यांमध्ये टीबी संसर्गाचे प्रमाण हे 30 ते 60 टक्के एवढे आढळले. तर महाराष्ट्रामधील 25 टक्के जनतेला टीबीचा संसर्ग झालेला आढळला.

टीबीचा धोका 

भारत हा टीबीसाठी एन्डेमिक देश समजला जातो. म्हणजेच भारतामध्ये टीबीचा संसर्ग हा नियमितपणे व सार्वत्रिक दिसून येतो. अशावेळी आपल्या सर्वांसाठी टीबी हा आजार होण्याची आयुष्यभराची जोखीम ही 5 ते 10 टक्के असते. जोखमीची तुलना करायची झाली तर कोविड लसीच्या पहिल्या डोसानंतर रक्तात गुठळ्या (TTS ) होण्याचा धोका हा एक लाखामध्ये दोन ते पाच व्यक्ती एवढा होता आणि आयुष्यभरात टीबीचा आजार होण्याचा धोका मात्र 100 मध्ये पाच ते दहा व्यक्ती एवढा जास्त आहे.  तसेच,  एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी हा धोका वीस पटीने वाढतो आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा धोका दुप्पट होतो. 

औषधोपचार

टीबीच्या निदानानंतर मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. मात्र ही औषधे सहा ते आठ महिने घ्यावी लागतात. ही औषधे लागू न पडणाऱ्या औषधप्रतिरोधक क्षयरोगाचे प्रमाण सध्या वाढत आहे. जेव्हा एकाहून अधिक औषधे लागू पडत नाहीत तेव्हा त्याला MDRTB असे म्हटले जाते. हा आजार अधिक गंभीर होतो आणि मग यावर उपचार करण्यासाठी अधिक महिने किंवा वर्षे लागू शकतात. तसेच, मृत्यूचा धोकाही वाढतो. 

एका अंदाजानुसार 2022 मध्ये MDRTB चे साधारण 4 लाख 10 हजार संसर्ग झाले असावेत. मात्र त्यातील केवळ 1.75 लाख रुग्णांनीच यावरील उपचार घेतले. जोपर्यंत प्रत्येक आजारी रुग्णाला औषधोपचार मिळत नाही, तोपर्यंत हे रुग्ण हवेद्वारे टीबीचा आजार पसरवू शकतात. औषध प्रतिरोधकता वाढू नये यासाठी प्रत्येक रुग्णाने योग्य आणि पूर्ण औषधोपचार घ्यायला हवा.

हे ही वाचा : कोण जिंकणार? मानव की सूक्ष्मजंतू?

आपली जबाबदारी

भारताने 2025 पर्यंत टीबी मुक्ती मिळवण्याचा निर्धार केलेला आहे व त्यासाठी सरकारद्वारे विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत.  मात्र कोविड काळापासून यामध्ये थोडासा खंड पडल्याने यासाठी थोडी अधिक वर्षे लागू शकतात. आपण सर्वांनी प्रत्येक टीबी रुग्ण ओळखून त्यासाठी योग्य ते औषधोपचार देण्याचा निर्धार केला तर आपण टीबीला नक्कीच हरवू शकू. 

टीबीची मुख्य लक्षणे 

टीबीची मुख्य लक्षणे तसेच याची जोखीम कोणाला जास्त असते हे पाहूया.

शरीरातील कोणत्याही अवयवाला क्षयरोग होऊ शकतो. मात्र क्षयरोग पसरवण्याचा धोका हा फुफ्फुसांच्या क्षयरोगाचा असल्याने याच्या नियंत्रणावर सर्वाधिक भर दिलेला असतो. टीबी ची सर्वसाधारण लक्षणे पुढील प्रमाणे –

  • दोन आठवड्याहून अधिक काळ असणारा खोकला, 
  • वजन कमी होणे, 
  • भूक न लागणे, 
  • अशक्तपणा जाणवणे, 
  • काखेतील किंवा मानेतील गाठी /लसिका ग्रंथी वाढणे
  • संध्याकाळच्या वेळी जाणवणारा ताप 
  • रात्रीच्या वेळी घाम येणे

ही लक्षणे सर्वसाधारण असल्याने कधी कधी दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे आजकाल आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरभेटीमध्ये देखील याविषयी माहिती विचारली जाते, जेणेकरून आजाराचे निदान हे लवकरात लवकर होईल. अशी लक्षणे ही स्वतःमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाहीमध्ये दिसत असतील तर त्यांची टीबी या आजारासाठी तपासणी होणे खूप आवश्यक आहे.

टीबीच्या आजाराची जोखीम कोणाला

एचआयव्ही बाधित व्यक्ती – एचआयव्ही बाधित व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही जेव्हा कमी होते त्यावेळी विविध अवयवांना टीबीची बाधा होऊन आजार होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी झाली असेल तसेच रुग्ण जर एड्स स्थितीमध्ये पोहोचलेला असेल तर टीबी गंभीर रूप धारण करू शकतो. 

रुग्णांनी एचआयव्ही वरील औषधांचे नियमित सेवन करून रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे, तसेच याविषयी काहीही लक्षणे दिसल्यास लगेच टीबीची तपासणी करणे आवश्यक आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तींना टीबीचा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधोपचार देखील दिले जातात.

कुपोषण ग्रस्त व्यक्ती – ज्यांचा BMI 17 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना कुपोषित व्यक्ती असे म्हटले जाते. ज्यांच्या शरीरामध्ये प्रथिने आणि विविध जीवनसत्वे कमी असतात त्यांच्याही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असू शकते. ज्यांना इतर कोणत्या कारणामुळे टीबीची जोखीम आहे अशा व्यक्तींनी स्वतःच्या पोषणाकडे लक्ष द्यायला हवे.  

विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुपोषण होणार नाही याची काळजी घ्यावी. जिथे टीबीचा दर जास्त आहे , तेथील तरुण वैद्यकीय विद्यार्थी या आजाराला बळी पडतात. तसेच गरीब कुटुंबातील व्यक्ती देखील कुपोषणामुळे टीबीने बाधित होतात.

पोषणाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक टीबीच्या रुग्णाला सरकारकडून पोषक आहार खाण्यासाठी निक्षय- पोषण या कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे समाजामधील दानशूर व्यक्ती ‘ टीबी मित्र’ बनून एखाद्या रुग्णाच्या पोषणाची जबाबदारी उचलतात.

मधुमेह बाधित व्यक्ती – मधुमेह झालेला असल्यास टीबी होण्याची जोखीम दुप्पट होते. मधुमेही व्यक्तींमध्ये टीबीची लक्षणे आढळून येतात का याविषयी नियमितपणे तपासणी करणे हे आवश्यक असते. मधुमेही व्यक्तींमध्ये टीबीचे उपचार करणे थोडेसे अवघड जात असल्याने वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. या धोक्याची जाणीव सर्वसाधारणपणे सर्वांना नसल्याने टीबीच्या लक्षणांकडेही दुर्लक्ष होऊ शकते.  मधुमेह नियंत्रणात ठेवणे तसेच पौष्टिक आहार घेणे यामुळे हा धोका कमी करता येऊ शकतो.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती – तंबाखूचे व्यसन हे शरीराचे विविध प्रकारे नुकसान करते. धूम्रपानामुळे फुफुसांना होणारी इजा तसेच कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती यामुळे टीबीचा धोका वाढतो.
अधिक काळ चालणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे तसेच धूम्रपान व तंबाखू सेवन बंद करणे यामुळे जोखीम कमी करता येऊ शकते.

हे ही वाचा : भारतातून क्षयरोगाचं निर्मूलन होईल का? काय सांगतो जागतिक आरोग्य संघटनेचा वार्षिक अहवाल


मद्यपान करणाऱ्या व्यक्ती – मद्यपान ही देखील शरीर आतून पोखरून टाकणारी कृती आहे. मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची इम्युनिटी ही योग्य प्रकारे काम करत नाही व त्यामुळे टीबीचा धोका वाढतो. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये टीबीची लक्षणे दिसल्यास लगेच तपासणी करावी आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने मद्यपानही बंद करावे.

टीबी रुग्णाचे कुटुंबीय – टीबी हा हवेद्वारे पसरणारा आजार आहे मात्र त्यासाठी रुग्णांसोबत निकटचा सहवास अधिक काळासाठी असायला हवा. अशा परिस्थितीत कुटुंबातील कोणाला जर टीबी झाला असेल तर इतर सर्वांचा धोका वाढतो. कुटुंबात सहा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर अशांमध्ये हा धोका अधिक असतो.
रुग्णाच्या सर्व कुटुंबीयांसाठी टीबी प्रतिबंधक उपचार हे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिले जातात.

वृद्ध व्यक्ती – वाढत्या वयोमानानुसार शरीराची इम्युनिटी ही कमी होत राहते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की शरीरात सुप्तावस्थेत असलेले टीबीचे जंतू कृतिशील होऊन टीबीचा आजार होऊ शकतो. आणि कोणत्याही रुग्णाचा संपर्क न येता देखील त्यांना टीबी कसा झाला हे आपल्याला समजत नाही.
वयोमानानुसार त्यांचे पोषणही कमी होते. त्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या पोषणावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.  व टीबीची लक्षणे दिसल्यास लगेच उपचार करणेही आवश्यक आहे.

आरोग्य कर्मचारी – डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी हे जेव्हा रुग्णालयांमध्ये विशेषतः टीबी रुग्णांमध्ये काम करतात तेव्हा त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये टीबी तसेच औषध प्रतिरोधक टीबी दिसून येऊ शकतो.

फुफ्फुसांना इजा करणारी परिस्थिती – जे शहरी भागामध्ये राहतात विशेषतः जर तेथे अत्याधिक प्रदूषण आढळून येत असेल किंवा धुराचे प्रमाण अधिक असल्याने फुफ्फुसाला इजा होत असेल तसेच कामाच्या ठिकाणी देखील धूर अथवा इतर काही कारणाने फुफुसांना इजा होत असेल तर अशा व्यक्तींमध्ये टीव्हीचा धोका हा वाढलेला आढळून येतो.
कामाच्या ठिकाणी तसेच रस्त्यांवर प्रवास करताना N95 मास्क लावल्याने हवेतील धुळीचे कण फुफ्फुसात जाऊन फुफ्फुसांना इजा होत नाही. धूळ व धूरयुक्त कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची योग्य ती सुरक्षा घेतली जायला हवी.

टीबीचा पूर्व इतिहास – ज्यांना टीबीचा आजार होऊन गेला आहे अशा व्यक्तींमध्ये देखील पुन्हा टीबी होण्याची शक्यता ही सर्वसाधारण जनतेपेक्षा अधिक असते.
त्यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. तसेच पुन्हा लक्षणे जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  कारण पुन्हा होणारा टीबी हा औषध प्रतिरोधक असण्याची जास्त शक्यता असते.
तसेच टीबीची औषधे ही कधीच अर्धवट बंद करू नयेत. पूर्ण उपचार झाल्यानंतर बडक्याची तपासणी करून जंतुसंसर्ग हा पूर्णपणे संपल्याची खात्रीही करून घ्यावी.

आपल्या सर्वांना आता टीबीची लक्षणे तसेच टीबीची जोखीम ही कोणामध्ये जास्त आहे हे लक्षात आले असेलच.  ज्यांच्यामध्ये एकाहून अधिक जोखमीची कारणे आहेत अशा व्यक्तींनी अधिक काळजी घ्यायला हवी. टीबीच्या आजारावर उत्तम उपचार उपलब्ध असल्याने टीबीची भीती बाळगू नये.

टीबीला हरवण्यासाठी सरकार विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. सध्या प्रौढ व्यक्तींमध्ये टीबी विरोधी लसीकरणाबाबत एक पथदर्शी प्रकल्प देखील काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.  सरकारच्या विविध उपाय योजनांना आपण सहकार्य करणे हे टीबीच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर नक्कीच टीबी हरेल आणि भारत जिंकेल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ