कार्तिक शुध्द पंचमी पांडव पंचमी म्हणून ओळखली जाते. यावर्षी 6 नोव्हेंबरला पांडव पंचमी झाली. अर्थात तो पांडवांच्या विजयाचा दिवस मानला जातो. कौरवांकडून द्युतात हरल्यानंतर पांडवांनी कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात भोगला. पुढे श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून कौरवांवर विजय मिळवला, तोच हा दिवस. शूरता, वीरता आणि आदर्श गुणांशी समीकरण असलेल्या पांडवांचा गौरव करणारा हा दिवस.
वनवासादरम्यान अनेक मंदिरांची उभारणी
या गुणांशिवाय पांडव अजून एका गोष्टीसाठी विशेष प्रसिध्द आहेत. वनवासाच्या काळात त्यांनी भारतभरात अनेक ठिकाणी प्रवास केला आणि विविध ठिकाणी देवतांची मंदिरे बांधली अशा प्रकारच्या आख्यायिका आपल्याला भारतभरात विविध मंदिरांशी आणि लेण्यांशी जोडलेल्या आढळतात. पण आजच्या लेखात आपण पांडवांच्या मंदिरांबाबत विचार करूया.
द्रौपदीला ग्रामदेवतेचा दर्जा
महाबलीपुरम येथील 7 व्या शतकातील पांडव लेणी मंदिरे एकाच मोठ्या खडकात द्रविड शैलीत कोरली आहेत. या मंदिरांचे बांधकाम पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम याच्या काळात केले गेले. येथे पाच रथांच्या आकारांची मंदिरे असून युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल-सहदेव आणि द्रौपदी यांच्या नावाने ओळखली जातात. पण ह्या मंदिरांचा पांडवांशी थेट संबंध नाही; ही नावे प्रतीकात्मक आहेत. याशिवाय दक्षिण भारतात द्रौपदीला ग्रामदेवतेचा दर्जा दिलेला आहे. काही ठिकाणी तिला कालीचा अवतार मानले जाते. त्यामुळे तिची विविध मंदिरे दक्षिण भारतात आढळून येतात. पण पांडवाची मात्र अशा प्रकारची मंदिरे मात्र दिसत नाहीत.
मावळमधील पांडव-द्रौपदी मंदिर
या पार्श्वभूमीवर पाच पांडवांचे मावळ तालुक्यात असलेले तळेगाव दाभाडे येथील मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. मूळ गावात चावडी चुकाच्या मागील बाजूला राहत्या वस्तीत हे मंदिर आहे. मंदिराचं जोतं जुनाट दगडी आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून आकाराने बरंच लहान दोन छोट्या दालनांचं साधं, घरासारखं आहे.
बैठक घातलेले पांडव आणि निजलेली द्रौपदी
मंदिराच्या दरवाज्यातून आत गेल्यास पहिल्याच दालनात 5 पांडवांच्या मूर्त्या रांगेने बैठक मांडून बसलेल्या दिसतात. अर्जुनाच्या मूर्तीच्या पुढ्यात रथाची छोटी प्रतीकृती ठेवली आहे. दरम्यान युधिष्ठिर आणि भीमाच्या मूर्त्यांच्या मधोमध एका छोट्याशा झरोक्यामधून आतील दालन दिसते. त्या झरोक्यातून आत पाहिले असता एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते. बाहेर पाच भाऊ सज्ज आणि दक्ष बसले आहेत आणि आत द्रौपदी निद्रिस्त आहे असे हे मंदिर. या सहाही मूर्त्या मानवी प्रमाणाच्या आहेत. सध्या त्यांना आकर्षक रंगात रंगविलेले आहे.
मंदिराशी संबंधित अनेक आख्यायिका
साहजिकच अनेक आख्यायिका या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार वनवासादरम्यान पांडवांचा आणि द्रौपदीचा निवास एक रात्र या ठिकाण होता. त्याची आठवण म्हणून हे मंदिर नंतरच्या काळात इथे बांधले गेले आहे. दुस-या एका आख्यायिकेनुसार वनवासाच्या काळात खुद्द पांडवांनीच द्रौपदीला विश्रांती घेता यावी म्हणून हे मंदिर बांधले. आणखी एका आख्यायिकेनुसार वनवासादरम्यान घडलेली द्रौपदीच्या थाळीची घटना याच ठिकाणी घडली होती. त्याची आठवण म्हणून हे मंदिर इथे बांधले. ह्या मंदिराबद्दल अजून एक प्रवाद प्रसिद्ध आहे. पाच पांडव पूर्वेकडे तोंड करून सूर्याची उपासना करित आहेत आणि द्रौपदी अजूनही शेजारच्या खोलीत तिच्या पलंगावरून न उठता केवळ पलंगावर पडून खिडकीतून सूर्य पाहत आहे. पूर्वी या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जायची की, द्रौपदी दर 6 महिन्यांनी कूस बदलते. 6 महिने पूर्वेकडे तर 6 महिने पश्चिमेकडे तोंड करून झोपते. नंतरच्या काळात कूस बदलण्याच्या वेळी तिला कोणीतरी पाहिले म्हणून तिने कूस बदलणे थांबविले.
रंगरंगोटीमुळं जुन्या खूणा झाकोळल्या
मंदिराचा किंवा मूर्त्यांचा इतिहास दर्शविणा-या काहीही खूणा येथे आढळत नाहीत. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केल्या जाणा-या डागडुजीदरम्यान त्या कदाचित नष्ट झाल्या असाव्यात. सध्या सहाही मूर्त्या आकर्षक रंगाने रंगविलेल्या आहेत, त्यामूळे मूर्त्यांची मूळ शैली कळत नाही.
शस्त्रधारी विठ्ठल
मंदिराच्या बाहेरील दालनात पांडवांच्या मूर्त्यांच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे. मात्र येथील विठ्ठल शस्त्रधारी आहे. रखुमाई मात्र कर कटेवर ठेवून मूळ स्वरुपातीलच आहे. मंदिरात जाण्यापूर्वी परिसरात डावीकडे एक छोटं शिवमंदिर आणि नंदी आहे. तिथेच एक नवीन तुळशी वृन्दावन आहे. बांधणीवरून ती कदाचित कोणातरी दाभडे राजघराण्यातील वक्तीची समाधी असावी असे वाटते. परिसरात एक वीरगळ आहे. वीरगळाचा खालील भाग जमिनीत लुप्त झाला असून वरील भागात युद्धाचा प्रसंग ठळकपणे दिसतो. हे मंदिर कदाचित श्रीमंत सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या काळातील असावे किंवा त्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोध्दार झाला असावा असे म्हणता येईल. त्यानुसार मंदिराचं वय साधारण 300 ते 250 वर्षे असावं.
प्रेमळ मंद हास्य असणारी निवांत द्रौपदी
महाभारतील द्रौपदीशी संबंधित काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर, उदाहरणार्थ वस्त्रहरण, जयद्रथाने केलेले द्रौपदी हरण, किचकवध, यातून मूळ कथेतील द्रौपदीने भोगलेले भोग अधोरेखित होतात. सर्व कठिण प्रसंगी पांडवांनी तिचे रक्षण केलेले आहे. त्यांचे प्रतीक ह्या मंदिराद्वारे चित्रित होते. मात्र या मंदिरातील द्रौपदी वेगळीच आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेमळ मंद हास्य आहे. ती आत निवांत झोपली आहे आणि बाहेर तिचे पती तिची राखण करीत आहेत. आश्वासनेचा शांत भाव तिच्या चेहे-यावर आणि देहबोलीत आहे.