शाश्वत ग्राम विकास मॉडेल – पंचम

पंचम म्हणजे पाच विषयावर आधारित ग्राम विकासाचे मॉडेल. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आरोग्य व शिक्षण हे प्रमुख पाच विषय. गावासाठी ग्रामपंचायत ही एक शासन व्यवस्था आहे. ग्राम पंचायत गावात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या योजना राबविणारी यंत्रणा आहे.
[gspeech type=button]

पंचम म्हणजे पाच विषयावर आधारित ग्राम विकासाचे मॉडेल. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आरोग्य व शिक्षण हे प्रमुख पाच विषय. गावासाठी ग्रामपंचायत ही एक शासन व्यवस्था आहे. ग्राम पंचायत गावात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या योजना राबविणारी यंत्रणा आहे. पंचायत व्यवस्थेची फक्त अंमलबजावणी इतकीच मर्यादित भूमिका किंवा कार्य नाही. पंचायतीला व्यापक अधिकार आहेत. गावाच्या गरजांवर आधारित योजना आखणे, गरज पूर्तीसाठी निधी उभा करणे. ग्राम गरजांवर आधारित शाश्वत विकास करणे, हे सर्व अधिकार पंचायतीला भारतीय संविधानाच्या 73व्या घटना दुरुस्तीने मिळालेले आहे, त्यात 29 विषयांची अधिकार सूची निश्चित केलीली आहे. पण वास्तवात ग्रामपंचायती गाव एक स्वायत्त व्यवस्था किंवा संस्था म्हणून कार्य करत नाही. पंचायत नेतृत्वाला निधी उभा करण्याचे कौशल्य किंवा त्याबाबतची माहिती नाही. शासन स्तरावरून यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

गावाचे ‘गावपण’ जपत लोकांच्या पुढाकाराने स्थानिक नैसर्गिक उत्पादनावर प्रक्रिया, महिलांना निर्णयात समान संधी, पर्यावरण समतोल राखणारा विकास अशा विकासाचे स्वप्न असणाऱ्या गावात पंचम – एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका ही संस्था राबवीत आहे. पंचमचे कार्य व गावात झालेला बदल आज आपण समजून घेऊया!

पंचमची सामाजिक भूमिका

लोक स्वत:च्या विकासासाठी पुढाकार घेतात, अशा गावांना पंचम प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. पंचम हा महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका या संस्थेच्या पुढाकाराने सुरु झालेला गाव विकास कार्यक्रम आहे. सामाजिक जाणीवेतून स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने चालणारा हा भागीदारी प्रकल्प आहे. महाराष्ट्र फाउंडेशन आर्थिक सहकार्यासोबत इतर तज्ज्ञता, विस्तार, दृष्टीकोन विकास यावर अधिक भर देते. ग्रामीण भाग हा काळाच्या प्रवाहासोबत चालला पाहिजे हे संस्थेचे स्वप्न आहे. 

महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संपूर्ण अमेरिकेतील टीम ग्रामस्थांच्या सतत संपर्कात असतात. 

आरोग्य

गावात आजार होतात ते प्रामुख्याने अशुद्ध पाण्यामुळे! त्यामुळे उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग औषधपाण्यावर आणि उपचारावर होतो. यावर उपाय म्हणून पंचम प्रकल्पात गावात वॉटर ATM बसवले आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिदिन 20 लिटर पाणी मोफत मिळते. शाळेमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे. शाळेत वॉटर बेल आहे. ती वाजली की मुले पाणी पितात. आरोग्याचे सर्व प्रश्न माहीत नसतात. यामुळे अनेक आजार उद्भवतात. यासाठी पंचम प्रकल्पाच्या गावात आरोग्यसाथी कार्यक्रम राबविला जातो. निवडक महिलांना आरोग्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना आरोग्य संच दिला जातो. प्रथमोपचार, बाळंतपण याबाबत महिला प्रशिक्षित होतात. गावाच्या आरोग्याची काळजी या आरोग्यसाथींमार्फत घेतली जाते. गावातच पोषण गार्डन तयार करतात. कुपोषणमुक्त गाव, शून्य बाल-माता मृत्यूदर, दवाखान्यात बाळंतपण अशा संकल्पना राबविल्या जातात, तसेच गाव आरोग्यदायी गाव व्हावे यासाठी प्रयत्न करतात. 

शिक्षण

स्पर्धेच्या युगात ग्रामीण मुले पुढे गेली पाहिजेत. कोरोनामुळे प्राथमिक शिक्षणावर परिमाम झाला आहे. आनंददायी शिक्षण यासाठी बोलक्या भिंतींची शाळा, संगणकाचा वापर सोबत डिजिटल शाळा, कृतीतून शिक्षण (ABL) यावर भर, शाळेच्या परिसरात बालकांची पोषण बाग! आज प्राथमिक असो किंवा माध्यमिक शाळा यांना उत्पन्नाचा मार्ग नाही. पण लाईटबिल हे मात्र व्यावसायिक वर्गवारीत शाळेला येते. यासाठी पंचम प्रकल्पाच्या माध्यमातून 3kw वॅटची सौर वीज पुरवठा होईल इतकी यंत्रणा बसविली जाते. शाळेतील मुलांचा दुपारचा खाऊ, मध्यान भोजन हे सौर ऊर्जेवरच तयार केले जाते. खेळामध्ये मुले विशेष योगदान करणार असतील तर आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. सातारा जिल्ह्यातील कुसुंबी या गावातील कुसुंबीमुरा या दुर्गम शाळेतील मुले-मुली कबड्डी खेळतात. गावातीलच तरुणच प्रशिक्षण देतात. या शाळेत कुस्तीचा मॅट देऊन कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. शाळेसोबतच कामाचा परिणाम दिसतो आहे. 

गडचिरोलीतील मूतनूर शाळेत पंचमने काम सुरु केले, तेव्हा 9 मुले होती. शाळेच्या नोंदीप्रमाणे इतकीच मुले आहेत असे सांगितले गेले. शाळेत बदल झाला, तेव्हा त्याच शाळेत 23 मुले नोंदवली गेली, 14 मुले शाळाबाह्य होती. या गावातील दोन तरुण याच शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागली आहेत. पंचमचे स्वप्न आहे की, या शाळा पीएमश्री शाळा, तेजस शाळा, आदर्श शाळा म्हणून नावारूपाला याव्यात.  शैक्षणिक गुणवत्तेचा विकास व्हावा. 

पर्यावरण
वातावरण बदलाचा कृषी, जीवन व मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम यावर विचार करून गावात पर्यावरणीय कार्यक्रमांची आखणी केली जाते. यामध्ये हवेची गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापन, जैवविविधता, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची ओळख, पाणी वापराचे ऑडीट, पाण्याचा पुनर्वापर या एकत्रित कार्याला ग्रीन कॅम्पस म्हणून ओळखले जाते. 

गावात निर्धूर चुलींचा वापर केला जातो. सौर उर्जेचा वापर केला जातो. या गावातील शाळा सौर शाळा आहेत. गडचिरोलीमधील मुतनूर गाव शासनाने सौर ग्राम म्हणून घोषित केले आहे. शेतीला सेंद्रिय शेतीत रुपांतरीत करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखणी करून कृती केली जाते. विहीर पुनर्भरण या मार्फत पाण्याचा ताळेबंद लोक काढतात. विद्यार्थी वाऱ्याच्या प्रवाहाचा वेग व हवेतील प्रदूषण सांगतात. ग्रामस्थ व विद्यार्थी जैवविविधता नोंदवह्या ठेवतात. 

महिला सक्षमीकरण

महिलांचा सन्मान व न्याय आणि समानतेवर आधारित समान भागीदारी, महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम, महिलांची उत्पादक कंपनी, सुरक्षा ऑडीट, संयुक्त घर अभियान, 100 टक्के महिलांचा बचत गटात सहभाग, नियमित महिला सभा, महिला बचत गटांची उत्पादक गट म्हणून नोंदणी, सर्व ग्रामविकास समितीमध्ये किमान 50 टक्के महिलांची भागीदारी यासारख्या कार्यक्रमासोबतच कौशल्य सखी, आरोग्य सखी हे कार्यक्रम पंचमच्या गावात चालतात. पुणे जिल्ह्यातील पिंपरवाडी, आंबे गावात साक्षरता वर्ग चालतात. बँक साक्षरता, मोबाईल साक्षरता, योजना साक्षरता, पंचायत साक्षरता असे साक्षरता कार्यक्रमामार्फत महिलांना नवनवीन विषयातील माहितगार बनविले जातात. 

गरिबी निर्मूलन

गाव विकासाची सार्वजनिक सुविधा तयार करण्याचे काम शासन करते. कौटुंबिक उत्पन्नाचे मार्ग निर्माण करणे आवश्यक असते. पंचम मार्फत स्थानिक उत्पादन वाढ व उत्पादनावर प्रक्रिया यावर भर दिला आहे. कुसुंबी हे सातारा जिल्ह्यातील गाव नाचणीचे गाव बनले आहे. नाचणी बेकरी, नाचणी हॉटेल, नाचणी पर्यटन, नाचणी बँक, नाचणी उत्पादक संघ असे. या कार्यक्रमातून 18 रुपये किलोने विक्री असलेली नाचणी ही तीनच वर्षात 55 रुपये किलो झाली. यामुळे गावातच रोजगार लोकांना मिळाला. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील सत्कोंडी गाव शेवगा लागवड करून त्यामार्फत औषध निर्मिती, पाणी शुद्धीकरण पद्धत विकसित करीत आहे. 

पुण्यातील जुन्नरमधील पिंपरवाडी हे गाव हातसडीच्या तांदळाचं उत्पादन केंद्र बनत आहे. वर उल्लेख केलेल्या मुतनूर ह्या आदिवासी गावातील वन हक्काची 320 एकर जमीन 52 कुटुंबाना मिळाली. या 320 एकर जमिनीला पाण्यासाठी शेततलाव, तलावातील पाणी विहिरीत आणि विहिरीतील पाणी सौरपंपाद्वारे शेतीला. म्हणजे यात वीज खर्च अजिबात नाही. पाणी आणणे यासाठी खर्च नाही आणि उत्पादन पण वाढले. तलावातील मच्छीमारी यामुळे गावनिधी तयार होत आहे. पाण्याचा वापर बाजारू पिकासाठी नाही हा नियम आहे. पर्यावरणपूरक पीक पद्धती यातून कौटुंबिक उत्पन्न वाढत आहे. 

पुढील दिशा

गाव विकासाला फक्त शासन निधी हा स्रोत पुरेसा नाही. गावाचा स्वत:चा निधी व पंचममार्फत काम करणाऱ्या संस्था असे एकत्रित लोककेंद्री कार्यक्रम हे शासनाने क्लस्टर विकास कार्यक्रम म्हणून राबवावेत. संस्थांमार्फत चाललेले विकासाचे मॉडेल शासनाने अभ्यासायला हवे. गावांनी प्रतिसाद देऊन दोघांनी हातात हात घालून विकासाचे पंचम मॉडेल तयार करूया!

2 Comments

  • Mahendra Meshram

    बेस्ट पंचम प्लान आहे याची अमलाबजावणी करिता काय पाऊल उचलता येईल, व हि सुधारना, सक्षमीकरण व्हायला पाहिजे, अकादमी ने आम्हाला आदेश द्या

  • अर्चना जतकर

    महत्वपूर्ण.हा प्रकल्प जास्तीत जास्त गावांमध्ये पोहोचणं गरजेचे आहे.मानवविकास निर्देशांक वाढवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या घटकांचा विचार केला.धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. महत्वपूर्ण.हा प्रकल्प जास्तीत जास्त गावांमध्ये पोहोचणं गरजेचे आहे.मानवविकास निर्देशांक वाढवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या घटकांचा विचार केला.धन्यवाद.

  2. बेस्ट पंचम प्लान आहे याची अमलाबजावणी करिता काय पाऊल उचलता येईल, व हि सुधारना, सक्षमीकरण व्हायला पाहिजे, अकादमी ने आम्हाला आदेश द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ