मुंबईतल्या चेंबुरमधला टिळकनगर भाग… 1980 आणि 90 च्या दशकात या भागात राहिलेल्या लोकांना आजही तिथं फिरताना एक दहशत जाणवते. खासकरुन सहकार सिनेमाचा परिसर.. सध्या हा भाग ओस पडलेला असला तरी, 80 आणि 90 च्या दशकात चेंबुरच्या या परिसरानेच मुंबईवर दहशत पसरवली. ही दहशत होती राजेंद्र सदाशिव निकाळजे, म्हणजेच छोटा राजनची. मुंबई अंडरर्ल्डमध्ये दाऊदनंतर घेतलं जाणारं नाव. दाऊद इतकाच क्रूर आणि त्याच्याइतकाच महत्त्वाकांक्षी. त्यालाही मुंबईवर त्याचं राज्य करायचं होतं.
राजेंद्र निकाळजे ते छोटा राजन प्रवास
3 जानेवारी 1960 ला मुंबईच्या टिळकनगमध्ये राजेंद्र निकाळजेचा जन्म झाला. त्यावेळी टिळक नगर म्हणजे मुंबईतल्या गरिबांची वस्ती म्हणून ओळखलं जायचं. अशा या टिळकनगरमध्ये गुन्हेगारी, चोरी, लुटालूट हे सगळं पाहातच तो लहानाचा मोठा झाला. चेंबुर हे तेव्हा मुंबईच्या गुन्हेगारीमधलं महत्वाचं ठिकाण होतं. शिक्षण सोडून राजेंद्रनंही लहानपणीच चोरी करायला सुरुवात केली. त्यावेळी मध्य मुंबईत वरदराजन मुदलियार याचं राज्य होतं. आणि चेंबुर टिळकनगरमध्ये त्याचा खास पंटर होता राजन महादेवन नायर, म्हणजेच बडा राजन. राजेंद्र निकाळजे बडा राजनच्या संपर्कात आला. त्यानं राजेंद्र निकाळजेला सिनेमाची तिकीटं ब्लॅकमध्ये कशी विकायची याचं ट्रेनिंग दिलं. त्यानंतर तो थिएटरबाहेर तिकीटांचा काळाबाजार करु लागला. 1983 मध्ये बडा राजनची हत्या झाली, त्यानंतर त्याची गँग राजेंद्र निकाळजेनं चालवायला सुरुवात केली. आणि राजन निकाळजेचा ‘छोटा राजन’ झाला.
दाऊदचा राईटहँड
बडा राजननंतर छोटा राजननं दाऊदशी हातमिळवणी केली. दाऊद, छोटा राजन आणि अरुण गवळी यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. नंतर दाऊद आणि अरुण गवळी या दोघांमध्ये फूट पडली आणि छोटा राजननं दाऊदची साथ निवडली. दाऊद आणि अरुण गवळीची दुष्मनीही टोकाला पोहोचली होती. 1986 मध्ये दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर मुंबईत छोटा राजन त्याचं काम सांभाळू लागला. तो दाऊदचा राईटहँड म्हणून ओळखला जाऊ लागला. तो दाऊदसाठी खंडणी, तस्करी अशी कामं करायचा. डि कंपनीचा मुंबईतला पैसा हवाल्यामार्फत दुबईला पोहोचवण्याचं कामही करायचा. दाऊदसाठी आणि डी कंपनीसाठी तो एक परफेक्ट मॅनेजर होता.
बडा राजनच्या हत्येचा बदला
बडा राजन हा छोटा राजनचा गुरु, मेंटॉर होता. मुंबईतलाच एक गँगस्टर अब्दुल कुंजू हा त्याचा दुश्मन होता. कुंजूनेच त्याच्या माणसाकरवी किल्ला कोर्टाच्या आवारात बडा राजनचा खून केला होता. छोटा राजननं बडा राजनची जागा घेतल्यानंतरही कुंजूच्या कुरबुरी कमी झाल्या नव्हत्या. तो छोटा राजनला त्रास देतच होता. 1985 मध्ये छोटा राजनला कुंजुला मारण्याची संधी मिळाली. टिळकनगरच्या मैदानात अब्दुल कुंजू त्याच्या साथीदारांसोबत क्रिकेट खेळत असल्याची माहिती छोटा राजनला मिळाली. कुंजूवर गोळ्यांबरोबरच चाकुचेही इतके वार झाले होते, की या हल्ल्यातून वाचू शकला नाही.
भारतातून पलायन
1983 मध्ये दाऊद भारत सोडुन पळून गेला. त्यानंतर मुंबईत छोटा राजन डि कंपनी सांभाळत होता. दाऊदनं दुबईतुन छोटा राजनकरवी अरुण गवळीचा मेंटॉर समजल्या जाणाऱ्या अशोक जोशीचा खुन केला. ही घटना होती 1988 मधली. 1989 मध्ये छोटा राजन दुबईला गेला, त्यानंतर तो कधीही मुंबईत परतला नाही. त्याचं कुटूंब मात्र मुंबईतल्या टिळकनगरमध्येच राहिलं.
दाऊदशी फारकत
एकेकाळी दाऊदचा अतिशय विश्वासू आणि त्याचा राईट हँड समजला जाणारा छोटा राजन हा 1993 नंतर त्याचा कट्टर शत्रू झाला. दोघांनाही मुंबईवर राज्य करायचं होतं. दाऊदसोबत राहून आपण फक्त त्याचा साथीदार म्हणून राहू असं राजनला वाटत होतं. त्यामुळं त्यानं दाऊदपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ची नविन गँग सुरु केली. दुसरी थेअरी अशी आहे की, 1992 मध्ये बाबरी मश्जिद पाडल्यानंतर, दाऊदनं 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. यातल्या कोणत्याही प्लानमध्ये छोटा राजनला सामिल करुन घेण्यात आलं नाही, दाऊदनं छोटा राजनऐवजी छोटा शकिलला काम द्यायला सुरुवात केली. 1993 च्या डिसेंबरमध्ये छोटा राजनला खबर मिळाली की, इयरएन्ड पार्टीमध्ये दाऊद त्याला संपवणार आहे. या खबरीनंतर लगेचच त्यानं तिथून पळ काढला, तो थेट नेपाळला गेला. असं म्हटलं जातं की, छोटा राजनला दुबईतून पळून जायला भारतीय एजन्सीजनं मदत केली होती. कारण दुबईतून बाहेर जायला त्याच्याकडे त्याचा पासपोर्ट नव्हता. त्याचा पासपोर्टही दाऊदकडे होता. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला वेगळा पासपोर्ट देऊन खाजगी विमानानं नेपाळला पोहोचवलं. तेव्हापासून छोटा राजन भारतीय एजन्सीजच्या सतत संपर्कात होता. दाऊदची आणि त्याच्या माणसांची माहिती तो भारतीय अधिकाऱ्यांना देत होता. 2015 मध्ये तो पकडला गेला तेव्हा त्याच्याकडे भारतीय दुतावासानं दिलेलाच पासपोर्ट होता.
स्वतंत्र साम्राज्य
दुबई सोडल्यानंतर छोटा राजननं स्वत:चं नविन साम्राज्य सुरु केलं. पण तो त्यानंतर कधीही एका ठिकाणी राहू शकला नाही. तो सतत त्याचा ठिकाणा बदलत असे. तरीही दाऊद त्याला शोधून त्याच्यावर हल्ला घडवून आणत होता. पण राजन त्याच्या हाती आला नाही. 2000 मध्ये छोटा शकिलनं बँकॉकमध्ये हॉटेल रुममध्येच छोटा राजनवर हल्ला केला होता. तेव्हाही तो तिथून निसटला. पण पळून जाताना त्याला दुखापत झाली. आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंही छोटा शकिलनं त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो वाचला. या हल्ल्यातूनही भारतीय एजन्सीनं त्याला वाचवलं असं म्हटलं जातं. त्यानंतर 2001 मध्ये मात्र छोटा राजननं दाऊद गँगमधल्या अनेक महत्वाच्या माणसांचा खात्मा केला. यात दाऊदचा फायनान्स मॅनेजर शरद शेट्टीही होता. शरद शेट्टीच्या जाण्यानं दाऊदला खूप मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं होतं.
भारतीय एजन्सीजच्या ताब्यात
2015 मध्ये छोटा राजन ऑस्ट्रेलियात असताना छोटा शकिलनं त्याच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्लान केला. पण याची माहिती छोटा राजनला आधीच लागली. आणि त्यानं तिथून पळ काढला. हल्ल्याची माहिती छोटा राजनसोबतच ऑस्ट्रेलियन एजन्सीजलाही लागली. तो बालीला पळून जात असताना त्याची चौकशी झाली. ही माहिती बाली पोलिसांनाही देण्यात आली. बालीला उतरताच छोटा राजनला बाली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे मोहन कुमार नावाचा भारतीय पासपोर्ट असल्यानं भारतीय एजन्सीजला कळवण्यात आलं. भारतीय अधिकारी बालीला जाऊन छोटा राजनला भारतात घेऊन आले. तेव्हापासून तो तिहार जेल मध्ये आहे.
जन्मठेपेची शिक्षा
छोटा राजन पकडला गेला, तेव्हा त्याच्यावर 70 पेक्षा जास्त केसेस होत्या. तो भारतात आल्यानंतर त्याच्यावर खटले भरण्यात आले. हळू हळू एक एक खटला कमी होऊ लागला. सध्या तो तीन केसमध्ये शिक्षा भोगतोय. त्यातली एक केस आहे ती पत्रकार जे डे हत्याकांड. या केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण अजुनही त्याला दाऊदची भीती आहे. जेलमध्येही दाऊदची माणसं त्याला संपवतील या भीतीनं त्याला सगळ्या कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात आलंय. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग दाऊदला भारतात आणण्यात होईल, अशी आशा भारतीय एजन्सीजना वाटतेय.