ताली बजाऊंगी नही, बजवाऊंगी!!

Gauri Sawant : गौरी सावंत यांनी तृतीयपंथियांना कायदेशीर ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे भारतातल्या तृतीयपंथियांना ओळख मिळाली आहे, त्यांचं आधार कार्ड बनलंय, मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि हो मूल दत्तक घेण्याचा अधिकारसुद्धा मिळालाय!
[gspeech type=button]

गौरी सावंत –2023 साली त्यांच्या आयुष्यावर आधारलेली वेबसिरिज प्रसिद्ध झाली आणि भरपूर गाजली जिचं नाव होतं-ताली’. त्यात गौरीची भूमिका केली होती- सुश्मिता सेनने. त्यातला गौरी सावंत यांचा एक डायलॉग फारच गाजला- मैं ताली बजाऊंगी नही, बजवाऊंगी!” खरोखरच त्यांची कामगिरी पाहून कौतुकाने टाळ्या वाजवाव्यात, असंच आयुष्य आहे गौरी सावंत यांचं. 

कायदेशीर ओळख मिळवून देण्याचं श्रेय

गौरी सावंत यांनी तृतीयपंथियांना कायदेशीर ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे भारतातल्या तृतीयपंथियांना ओळख मिळाली आहे, त्यांचं आधार कार्ड बनलंय, मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि हो मूल दत्तक घेण्याचा अधिकारसुद्धा मिळालाय! भारतीय निवडणूक आयोगाच्या पहिल्या तृतीयपंथिय अम्बॅसिडर,ज्यांची दत्तक मुलगी गायत्री आज अमेरिकेत दंतवैद्यकाचे शिक्षण घेतेय, ज्यांच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष आणि कामगिरीने सुश्मिता सेनसुद्धा भारावून गेली होती- त्या गौरी सावंत.

स्व शोधाचा प्रवास

तर ही गौरी म्हणजेच पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला- गणेश नंदन. लहानपणीपासूनच गौरीला मुलींसोबत खेळायला, तसंच वागायला आवडायचं. आधी मुलगा- मुलगा म्हणून वडिलांनी खूप लाड केले, पण गणेशच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याची आई गेली आणि जगच पालटलं. कारण गणेशला आपण वेगळे आहोत याची जाणीव व्हायला लागली होती. तशातच एक दिवस चतु:श्रुंगीच्या जत्रेत फिरणारं चक्र हाती घेऊन, स्वत:ला देवी समजून रममाण झालेला गणेश दिसला आणि वडिलांची एक सणसणीत लाथ त्याच्या पार्श्वभागावर पडली! वयात जसाजसा यायला लागला तसतसं गणेशला आपण वेगळे आहोत, आपल्याला मुलींसारखं राहायला, दिसायला, माणुसकीने- दयाळूपणे वागायला आवडतं आणि आपल्याला इतर दोस्तांसारख्या मुली नव्हे तर मुलगे आवडतात याची जाणीव झाली. गणेशने घरातल्यांना त्याबाबत सांगायचा प्रयत्नही केला, पण कधी रागावून, कधी मारून तर कधी चक्क मानसोपचारतज्ज्ञांकडे नेऊन गणेशला नॉर्मलकरण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. वडिलांना आपली लाज वाटतेय, अडचण होतेय आणि इथं आपल्याला हवं तसं आयुष्य मिळणं कधीच शक्य नाही हे लक्षात आल्यावर घरातून साठ रूपये चोरून आईवेगळा गणेश पुण्याहून घरातून पळून गेला आणि त्याचा मुंबईत येऊन प्रवास सुरू झाला- स्वशोधाचा- गौरी बनण्याचा!

172 तृतीयपंथीय आरोग्यसेवक

या सगळ्यात सुरूवातीला गुरू मिळवणं, सिग्नलवर साडी नेसून भीक मागणं हे सगळे प्रकार त्यांनी केले, लिंगबदल शस्त्रक्रिया करून गणेश गौरीही झालापण गौरी यांच्या लवकरच लक्षात आलं आपला जन्म केवळ टाळ्या वाजवत भीक मागण्यासाठी झालेला नाही. हमसफर ट्रस्टसाठी त्यांनी नोकरीही केली, समाजाच्या व्यथा दिसत असताना आपण गप्प बसू शकत नाही. आणि मग त्यातूनच आकाराला आली- सखी: चारचौघी ही त्यांची संस्था. या संस्थेत त्यांच्याकडे सुमारे 172 तृतीयपंथीय आरोग्यसेवक स्वरूपाचं काम करतात. प्रामुख्याने तृतीयपंथीय समाजात आणि मुंबईच्या वेश्यावस्तीत त्यांचं काम चालतं. ज्यात एचआयव्ही एडस बाबत जनजागृती, कंडोम वाटप, लैंगिक आजारांचं टेस्टिंग आणि औषधवाटप करतात. 

काम करताना घेतलं मुलीला दत्तक

गौरी म्हणतात “हे काम करताना माझ्या लक्षात आलं की, सेक्स वर्कर महिलांची परिस्थिती आम्हा तृतीयपंथियांपेक्षा वाईट आहे, खरंतर त्या अगदी खरीखुरी बाई असूनसुद्धा!! एका एचआयव्ही बाधित सेक्स वर्करचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलीला- गायत्रीला मी दत्तक घेतलं. तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हतं- मी म्हणजेच एक हिजडासुद्धा आई बनू शकतो. लोक वाट्टेल ते बोलायचे- कुणी म्हणायचं- “हा तर हिजडा आहे, या पोरीला विकून टाकेल”, कुणी म्हणालं “ही स्वत:च्या म्हातारपणीची सोय करतेय,” पण मलासुद्धा आई होण्याची तहान असेल असं कुणालाही वाटलं नाही.”

पालकत्वासाठी संघर्ष आणि न्यायालयाची भक्कम साथ

गौरी सावंत पुढे सांगत होत्या ” गायत्रीचा जेव्हा शाळेत प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाने मला तासभर आतच घेतलं नाही. ‘तुम्ही कोण? तुम्ही कश्या काय पालक असाल हिच्या?’ त्या वेळेला गायत्री म्हणाली ही आई- अम्मा आहे माझी!! तरीसुद्धा तिथल्या लोकांचा एकच आग्रह “गायत्री ही मुलगी आहे, गायत्री हिजडा नाही. तुम्हांला आम्ही पालक म्हणून परवानगी देऊ शकत नाही. कुणीतरी नॉर्मल माणूस हिचा पालक म्हणून घेऊन या. मग आम्ही तिला शाळेत प्रवेश देऊ.” त्यानंतर माझा संताप- संताप झाला आणि मी सुप्रीम कोर्टात गेले आणि ‘नाल्सा’अंतर्गत तृतीयपंथियांना कायदेशीररित्या मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा अशी केस फाईल केली. ही केस आम्ही जिंकली कारण- डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार त्यांनी ‘I the Indian Citizen’ यात कुठंच स्त्री नागरिक -पुरूष नागरिक असं लिहिलेलं नव्हतं, या एका गोष्टीवर आम्ही जिंकलो आहोत आणि 2014 पासून आम्हांला तृतीयपंथीय म्हणून कायदेशीर ओळख आणि काही अधिकार मिळाले. त्यानुसार आमचं वय दहा वर्षांचंच आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून 77 वर्षांचा झालाय, आम्हांला तुमच्या गतीशी मॅच करून धावायचं आहे.”

सेक्स वर्करच्या अपत्यांकरता आजीचं घर

गौरी सावंत यांच्या संस्थेतर्फे ‘आजीचं घरनानी का घर’ हा आगळा प्रकल्प राबवला जातो, ज्यात म्हातारे तृतीयपंथीय सेक्स वर्करच्या मुलांमुलींना सांभाळतात. स्वत: कुटुंबाच्या प्रेमाला पारखे झालेले तृतीयपंथीय, या मुलांना आपल्या नातवंडांप्रमाणे खूप मायेने सांभाळतात. भारतातलं या प्रकारचं हे एकमेव डे केअर सेंटर असावं. या प्रकल्पासाठी गौरी सावंत ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातही सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी या मुलांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत मिळवण्यासाठी पंचवीस लाख रू.सुद्धा जिंकले. गौरी म्हणतात, “आपल्याकडे तृतीयपंथीय म्हणजे काही तरी विकृती मानली जाते, मुलांच्या मनात त्यांची भीती निर्माण केली जाते. मी तर म्हणते एखाद्या लहान मुलांच्या नर्सरीत आया म्हणून, सेविका किंवा अंगणवाडी ताई म्हणून तृतीयपंथियांना संधी का मिळत नाही? ते मुलांसोबत राहतील, पालकांचा हात सोडून मुलं आत येतात तेव्हा त्यांना कळेल, अश्याही काकू- मावश्या, शिक्षिका असतात, ज्यांना थोडी-थोडी दाढी, मिश्या आहेत, आवाज जरा वेगळा आहे, पण ते खूप मायाळू आहेत. असे बदल हळूहळू करावे लागतील. तुम्ही आदर आणि प्रेम द्यायला शिका, आम्हांला आमच्या या वेगळ्या ओळखीसह स्वीकारा, आम्हांला शिक्षणाची- रोजगाराची संधी द्या, आमचा आत्मसन्मान जपा आणखी वेगळं काही मागणंच नाही.”

समाज म्हणून तुम्ही आहात का तयार आम्हाला नोकरी द्यायला?  

तालीही वेबसिरिज आल्यानंतर काय काय बदल जाणवले हे सांगताना, गौरी म्हणतात, सुश्मिता सेनने ज्या प्रकारे माझी भूमिका साकारली आहे ते पाहून जणू काही अनंत काळ तापत्या वाळूवरून चालणाऱ्या जीवाला थंडगार पाण्याचा स्पर्श होऊन शांत शांत वाटावं तसं झालंय! या वेबसिरीजमुळे किमान लोकांना तृतीयपंथिय तुमच्यासारखीच हाडामांसाची माणसं आहेत, ते काही परग्रहावरून आलेले नाहीत, नॉर्मल घरातच जन्मतो आम्ही लोक पण. तृतीयपंथियांच्या वेदना, दु:खं आणि संघर्ष खूप मोठ्ठा आहे हे कळेल, अशी आशा वाटते. लोक म्हणतात तुम्ही तृतीयपंथिय टाळ्या वाजवत भीक का मागता? त्यांना माझा रोकडा सवाल आहे आम्ही आत्मसन्मानाने जगायला, कष्टाची भाकरी खायला तयार आहोतच, पण समाज म्हणून तुम्ही आहात का तयार आम्हाला नोकरी द्यायला?  

बदल होत आहे, पण पल्ला खूप मोठा! 

आम्हांला तृतीयपंथिय म्हणून वेगळी ओळख मिळाल्यानंतर आत्ताकुठे महाराष्ट्रात काही तृतीयपंथिय पोलीसभरतीसाठीच्या परीक्षेत सहभागी झाले, त्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येईल अश्यांची निवड झाली, ही फक्त सुरूवात आहे. बाकी सगळीकडे आम्ही दिसलो की भीती, तुच्छता, घृणा याच गोष्टी अजूनही दिसतात. अगदी आजारी पडल्यावर डॉक्टरसुद्धा पटकन हात लावायला तयार होत नाहीत. आमच्या अंत्यसंस्काराविषयी कितीतरी अंधश्रद्धा आहेत. खूप पातळ्यांवर लढायचे आहे अजून!!  अर्थात, ही वेबसिरीज म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य नाही, अजूनही यात मी भोगलेल्या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा यात उल्लेखही नाही, शिवाय सिनेमॅटिक लिबर्टीने काही प्रसंग बदललेले आहेत आणि अर्थातच अजूनही मला तृतीयपंथियांसाठी आयुष्यात बरंच काही करायचं आहे, तो स्टोरी अभी बाकी है, मेरे दोस्त!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ