औषध क्षेत्रातला रॉबिन हूड- अर्जुन देशपांडे

Arjun Deshpande : एका मराठी तरुणानं मात्र कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं आहे. त्याला उद्योग क्षेत्रातले पितामह रतन टाटा यांचाही आशीर्वाद लाभला आहे. त्या तरुणाचं नाव आहे अर्जुन देशपांडे. वयाच्या 16 व्या वर्षी अर्जुननं स्वस्त आणि परवडणारी औषधे पुरवणारी कंपनी स्थापन केली. वयाच्या विशीतच तो ‘जेनेरिक आधार’ या औषधाच्या कंपनीचा सीईओ आहे.
[gspeech type=button]

वयाच्या 16 ते 22 या वर्षांमध्ये सहसा तरुण काय करतात?  आपलं शिक्षण पूर्ण करण्याच्या, पदवी घेण्याच्या मागे असतात, मित्र-मैत्रीणींबरोबर भावी आयुष्याची स्वप्नं रंगवत असतात..एकूणच आपलं आयुष्य फुल्ल एंजॉय करत असतात. मग याच वयात जर एखाद्या तरुणानं आपली कंपनी स्थापन केली तर? किंवा सर्वात तरुण उद्योजक असा मान मिळवला तर?

वयाच्या विशीतच औषध कंपनीचा सीईओ

तुम्ही म्हणाल घरी उद्योग-व्यवसायाची पार्श्वभूमी असेल तर हे काही अवघड नाही. पण एका मराठी तरुणानं मात्र कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं आहे. त्याला उद्योग क्षेत्रातले पितामह रतन टाटा यांचाही आशीर्वाद लाभला आहे. त्या तरुणाचं नाव आहे अर्जुन देशपांडे. वयाच्या 16 व्या वर्षी अर्जुननं स्वस्त आणि परवडणारी औषधे पुरवणारी कंपनी स्थापन केली. वयाच्या विशीतच तो ‘जेनेरिक आधार’ या औषधाच्या कंपनीचा सीईओ आहे.

15 हजार ते पंधराशे कोटींचा प्रवास

अर्जुन शिकत असतानाच त्याच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला. आपल्याकडे औषधांच्या किंमतींमुळे अनेकदा सर्वसामान्यांना औषधं विकत घेणं परवडत नाही हे अर्जुन पाहत होता. आवश्यक असूनही औषधांपासून अनेकांना वंचित राहावं लागतं या गोष्टीमुळे तो अस्वस्थ झाला. औषधं सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावीत यासाठी काहीतरी करायचं असा निश्चय त्यानं केला. त्यातूनच ‘जेनेरिक आधार’ या औषध कंपनीची स्थापना झाली.

फार्मसी म्हणजे औषधाच्या दुकानातील महागातील ब्रँडेड औषधांना स्वस्त पर्यायी औषधे ही कंपनी पुरवते. दुकानातून आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून औषधांची विक्री केली जाते. त्यावर जवळपास 80 ते 90 टक्के सवलत देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. स्वप्नं बघणं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य दिशेने प्रवास करणं, त्याला मेहनतीची जोड देण्यामुळे केवळ 15 हजारांच्या भांडवलावर सुरु झालेल्या अर्जुनच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 1500 कोटींच्या वर पोहोचला आहे.

रतन टाटांची गुंतवणूक 

उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडावी हे प्रत्येक तरुण उद्योजकाचं स्वप्नं होतं. अर्जुनचं हे स्वप्नं तर पूर्ण झालंच. पण रतन टाटा यांनी त्याच्या जेनेरिक आधार कंपनीत गुंतवणूकही केली. TED talk या व्यासपीठावर अर्जुनने फार्मा सेक्टरबद्दल मांडलेले विचार, दृष्टीकोनाचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं होतं. हाच दृष्टीकोन रतन टाटा यांना भावला आणि त्यांनी अर्जुनच्या कंपनीला गुंतवणुकीचा आधार दिला. त्यांनी त्याला भेटायला बोलावलं. ही भेट 30 मिनिटांची ठरली होती. पण प्रत्यक्षात 3 तास चालली. अर्जुनचा विचार समजल्यावर रतन टाटा यांनी त्याचं नंतर अनेक मंचांवरुन कौतुकही केलं.

जेनेरीक आधार औषधं का तयार करावीशी वाटली?

कोणत्याही प्रकारची उद्योजकतेची पार्श्वभूमी नसलेला अर्जुन देशपांडे अगदी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. ठाण्याच्या डी.ए.व्ही पब्लिक स्कूलमधून त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. 16 वर्षांचा असताना त्यानं एकदा दुपारी एका औषधांच्या दुकानात एक गरीब वृध्द माणूस औषधांसाठी दुकानदाराला विनवणी करताना पाहिलं. त्या माणसाच्या पत्नीला कॅन्सर होता आणि तिच्या औषधांवर खूप पैसे खर्च होत होते. त्या व्यक्तिचा मुलगा रिक्षाचालक होता आणि त्या उत्पन्नात औषधांचा खर्च पूर्ण होणं शक्य नव्हतं. पण पत्नीचा जीव वाचवणंही महत्त्वाचं होतं. मात्र दुकानदारानं मात्र त्या व्यक्तीला मदत करायला साफ नकार दिला. हे सगळं बघून अर्जुनला खूप वाईट तर वाटलं. पण आपण यात काही करु शकत नाही, अशी अपराधी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच गोरगरीबांना परवडेल अशी औषधं देण्यासाठी काय करता येईल असा विचार त्यानं सुरु केला.

घरी गेल्यावर त्यानं इंटरनेटवर त्या औषधांबाबत माहिती घेतली तेव्हा 15 हजार रुपयांना मिळणाऱ्या औषधाचा उत्पादन खर्च केवळ 3 हजार रुपये असल्याचं त्याच्या लक्षात आलं. औषधे ही काही चैनीची गोष्ट नाही तर गरीब-श्रीमंत प्रत्येकासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यातूनच ‘जेनेरीक आधार’ जन्माला आलं. आज या कंपनीची जवळपास 2 हजारपेक्षा जास्त दुकानं आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील शहरांबरोबरच गावांमध्येही जेनेरिक औषधे पोहोचली आहेत.

हार मानली नाही

आपल्या देशात उत्पादित होणारी 90 टक्के औषधं जेनेरिक म्हणजेच स्वस्त असतात, बाहेरील परकीय कंपन्या (MNCs) आपल्याकडे येऊन ही औषधे दहा रुपयांना विकत घेतात आणि हजार रुपयांना विकतात. ब्रँड असल्यामुळे आपणही ती खरेदी करतो, असं अर्जुनच्या लक्षात आलं. त्याची कंपनी ही औषधं कमीत कमी नफा मिळवून विकतात. पण नुसती कल्पना सुचून उपयोग नव्हता, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रचंड काम करावं लागणार होतं. त्यासाठी खूप पैसा, भांडवल लागणार होतं. पण अर्जुनपाशी ते नव्हतं. त्यानं त्यावर एक उपाय शोधला. त्याच्या परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन त्यानं संपर्क साधला आणि आपली कल्पना मांडली. पण सुरुवातीला फार कुणाला ते पटलं नाही. त्याच्याकडे त्याची कल्पना यशस्वी होऊ शकते हे सिध्द करण्यासाठीही काही नव्हतं. तरीही हार न मानता तो प्रयत्न करत राहिला. अखेर त्याला यश आलं. एका स्टोअरमध्ये त्याची जेनेरिक औषधं ठेवायला त्याला परवानगी मिळाली. त्याच्या पहिल्या स्टोअरसाठीचा करार झाल्यावरच त्यानं त्याच्या आईबाबांना सांगितलं. तोपर्यंत त्यांना याबाबतची काहीच कल्पना नव्हती. कॉलेजला जातो असं सांगून त्यानं आपलं काम सुरु ठेवलं होतं. एकदा काम सुरु झाल्यावर त्यांनी त्याच्या या कामाला पाठिंबाच दिला.

अनेक पुरस्कारानं गौरव

उद्योजकांकडे अनोख्या कल्पना असतात आणि त्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात, गरज असते ती फक्त या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची, असं अर्जुन मानतो. अर्जुनच्या याच कामामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानसन्मान मिळाले आहेत. फोर्ब्सच्या 30 Under 30 Asia आणि Fortune India 40 Under 40 च्या यादीत त्याला स्थान मिळालं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेही त्याचा ‘Wonder Kind In Pharma Sector’ असा त्याचा सन्मान करण्यात आला. भारतात तर त्याची कंपनी यशस्वी ठरलीच. त्याच आधारावर बांग्लादेश, भूतान, युएई, श्रीलंका आणि म्यानमारमध्येही जेनेरिक औषधांची स्टोअर्स सुरु झाली आहेत. आता ओमान, दुबई, कंबोडिया आणि व्हिएतनाममध्ये कंपनीची स्टोअर्स सुरु करण्याची अर्जुनची योजना आहे.

प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा अनुभवातून शिक्षण

‘नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, गेम चेंजर व्हा’, असं अर्जुनचं म्हणणं आहे. आपल्या देशात स्टार्टअप्सच्या माध्यमातून अनोख्या संकल्पनांना मूर्त रुप मिळू शकतं. तरुण उद्योजकांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकायलाच हवं असं त्याला वाटतं. तरुण उद्योजक देशाचं अर्थकारण बदलू शकतात असा ठाम विश्वास या तरुण उद्योजकाला आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रातील ‘रॉबिन हूड’ म्हणून अर्जुनला संबोधलं जातं. 12 वी नंतर प्रत्यक्ष कॉलेजमध्ये न गेलेल्या अर्जुननं अनुभवातून मात्र भरपूर शिक्षण घेतलं आहे. त्याच्याच आधारावर त्याला भारतातील अनेक मॅनेजमेंट संस्था, आयआयटी संस्थांमध्ये मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं. अर्जुनचा प्रवास सोपा नव्हताच. पण त्यानं प्रत्येक आव्हानावर मात केली आणि त्याचं उद्योजक होण्याचं स्वप्नं पूर्ण केलं. या प्रवासात त्याला गोरगरिबांचे आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद लाभतात जे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचं अर्जुनला वाटतं. उद्योगमहर्षी रतन टाटा हे अर्जुनला गुरुस्थानी आहेत. रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर अर्जुननं एक भावपूर्ण पोस्ट लिहीली होती. त्यांच्यासारखा गुरु मिळण हे भाग्य असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

प्रत्येकाला परवडणाऱ्या किंमतीत औषध हे ध्येय

कामाच्या निमित्ताने अर्जुन सतत प्रवास करत असतो. वेळ असतो तेव्हा त्याला बुध्दीबळ खेळायला आवडतं. फक्त कल्पनाचे खेळ न करता, इंटरनेट, मोबाईलवर वेळ वाया न घालवता त्याचा सदुपयोग करुन अर्जुननं फक्त त्याचंच नाही तर देशातल्या लाखो लोकांचं आयुष्य बदललं. प्रत्येकाला परवडणाऱ्या किंमतीत औषध हे त्याचं ध्येय आहे. त्याचा हा प्रवास नुकताच सुरु झाला आहे. औषध क्षेत्रात क्रांती घडवण्याची ताकद असणाऱ्या मराठी मातीतल्या या तरुण उद्योजकाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ