योजनांच्या अभिसरणासाठी विशेष उपक्रम

Gram Panchayat : देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. “आमचा गाव, आमचा विकास” या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
[gspeech type=button]

देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. “आमचा गाव, आमचा विकास” या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या आराखड्यात वित्त आयोगाच्या निधीचा आणि इतर उपलब्ध निधींचा योग्य समन्वय साधून गावाचा विकास साधण्याची मोठी संधी ग्रामपंचायतींकडे आहे.

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी ‘शाश्वत विकास धोरणांचे स्थानिकीकरण’ करण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायतींनी नऊ प्रमुख संकल्पनांच्या आधारे आपल्या गावासाठी विकास आराखडे तयार केले. पंचायतीच्या सदस्यांना याबाबत प्रशिक्षित करून, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित आणि प्रगत गाव तयार करण्यासाठी माहिती देण्यात आली.

या उपक्रमातून गावांनी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून शाश्वत विकास साधण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आज आपण अशाच काही अनोख्या संकल्पनांची माहिती घेणार आहोत, ज्यामुळे ग्रामविकासा संदर्भातली नवी दृष्टी उभारता येईल!

सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव

गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना त्या गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गावातील वृद्ध, वंचित घटक, महिला, दिव्यांग अशा प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेतल्यास गावाचा समग्र विकास साधता येईल. यामुळे जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून ग्रामस्थांचा आर्थिक स्तर उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योजनांची जनजागृती करणे आवश्यक आहे. आजमितीला ग्रामपंचायत स्तरावर 1 हजार 245 योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. आधीच सुरू असलेल्या आणि नव्याने येणाऱ्या सर्व योजनांमध्ये समन्वय साधून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान ग्रामपंचायती समोर आहे.

नवनिर्माण सावित्री फुले फाउंडेशन (ग्रामस्नेहालय) – या संस्थेने अशा योजनांची अंमलबजावणी सोप्या पद्धतीने करण्यासाठी काही प्रभावी प्रयोग तयार केले आहेत. या प्रयोगांमध्ये व्यक्तीला केंद्रभागी ठेवलं जातं. त्यांच्या गरजा लक्षात ठेवून त्यानुसार विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी विविध उपाय शोधले जातात.

नवजीवन स्वागत कार्ड

स्थानिक अंगणवाडी किंवा आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच हा त्या कुटुंबाला नवजीवन स्वागत कार्ड देतो. या नवजीवन स्वागत कार्डमध्ये नवजात बाळासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आखलेल्या विविध योजनांची माहिती असते.

यामध्ये कार्डमध्ये 45 विविध सामाजिक सुरक्षा योजनांची आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे. यात गरोदर मातांसाठीच्या योजना, बाळाच्या जन्मानंतरच्या योजना, तसेच वय वर्ष 1 ते 18 या कालावधीसाठीच्या योजनांचा समावेश आहे. शासकीय योजनांसोबतच खाजगी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) विभागांच्या योजनांचाही या कार्डमध्ये समावेश केलेला आहे.

या कार्डच्या माध्यमातून सुरुवातीलाच विविध योजनांची माहिती मिळाल्यामुळे कुपोषण, माता मृत्यू दर आणि नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यास मोठी मदत होते.

सहवेदना सांत्वन पत्र

गावातील एखाद्या कुटुंबांतील सदस्याचा मृत्यू झाल्यावर त्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी नवनिर्माण सावित्री फुले फाउंडेशन (ग्रामस्नेहालय) संस्थेतर्फे ‘सहवेदना सांत्वन पत्र’ दिले जाते.

या सांत्वन पत्रामध्ये कुटुंबाला सावरण्यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील 34 सामाजिक सुरक्षा योजनांची आणि 7 आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे. या योजनांमध्ये नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू किंवा कोविड-19 सारख्या महामारीमुळे झालेल्या मृत्यूंसाठी लागू असलेल्या योजनांची माहिती दिली आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाचं निधन झालं तर त्याच्या पश्चात मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत? त्या कशा मिळू शकतील, आवश्यक कागदपत्रे, त्यासाठी कोणत्या सरकारी विभागाकडे अर्ज करावा अशी सगळी माहिती त्या पत्रामध्ये दिली जाते.

विशेषत: पहिल्या तीन महिन्यांतच या कुटुंबाला योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी या पत्राची रचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे सरपंच आणि शहरी भागात नगरपालिका/महानगरपालिकेचे नगरसेवक/प्रभाग अधिकारी/महापौर यांच्या सहीने हे सांत्वन पत्र कुटुंबाला प्रदान केले जाते.

दिव्यांग स्वावलंबन पत्र

गावातील दिव्यांग व्यक्तींना सहसा ग्रामपंचायतीकडे असलेल्या 5 टक्के निधी संदर्भातच योजनांची माहिती असते. त्यापेक्षा अधिक योजनांची माहिती पुरवली जाईलच, याची खात्री नसते. ही बाब लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना शासकीय व खाजगी योजनांची एकत्रित माहिती देऊन, त्यांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी ‘दिव्यांग स्वावलंबन पत्रा’ची निर्मिती केली आहे.

हे पत्र नावाने जरी शासकीय स्वावलंबन कार्डाशी साम्य साधत असले, तरी याचा मुख्य उद्देश विविध योजनांविषयी जनजागृती करणे आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजांनुसार सर्वसमावेशक माहिती देणे हा आहे.

दिव्यांग स्वावलंबन पत्रामध्ये समाविष्ट माहिती:

1. दिव्यांगत्व प्रमाणपत्र : कोणत्या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना हे प्रमाणपत्र दिले जाते.

2. केंद्र व राज्य शासनाच्या योजना : दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधींवरील योजनांची माहिती.

3. स्थानिक स्वराज्य संस्थांचा 5 टक्के निधी : या निधीचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो, याबाबत सविस्तर माहिती.

4. सुविधा व सेवा : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी उपलब्ध विशेष सुविधा.

यामध्ये प्रमाणपत्रासह योजनांची माहिती असल्याने, दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेता येऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं हा त्यामागचा उद्देश आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांच्या अर्जाचे QR कोड

सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव निर्माण करण्याच्या उद्देशाने, रत्नागिरी जिल्ह्यातील सत्कोंडी गावाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. गावातील मुख्य चौक, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे QR कोड लावण्यात आले आहेत.

गावाचे सरपंच सतीश थूल सांगतात की, “ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योजना समजावून सांगितल्या जातात. पण लाभार्थ्यांना योजना अर्ज मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात जावे लागते. अर्जासाठी सरकारी केंद्रात एकसारखं ये-जा करणं शक्य होत नाही. पर्यायी पात्र असूनही हे खरे लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात.”

पनवेल तालुक्यातील स्नेहल पाटील यांचे अनुभव प्रेरणादायक आहेत. पूर्वी त्यांना केवळ विधवा निराधार योजनेची माहिती होती. मात्र, योजना अभिसरणाच्या माध्यमातून, त्यांनी सात ते आठ विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

त्यामुळे स्नेहल पाटील आता इतर महिलांना या योजनांची माहिती देणे आणि त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या सक्रियतेमुळे अनेक महिलांना सरकारी योजनांचा आधार मिळत असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.

योजना अभिसरणाचा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी प्रभावी ठरत आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या पंचम प्रकल्पाच्या माध्यमातून :

● गावातील विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे QR कोड तयार करण्यात आले आहेत.

● हे कोड गावातील लोकांना कोणत्याही ठिकाणाहून स्कॅन करता येतात.

● स्कॅन केल्यावर त्या योजनांची सविस्तर माहिती, अर्जाच्या प्रक्रियेचे तपशील, आणि अर्ज डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होते.

QR कोड उपक्रमाचे फायदे:

1. सुलभ प्रवेश: ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांबाबत त्वरित माहिती मिळते.

2. वेळेची बचत : लाभार्थी ग्रामस्थ ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करु शकतात. 3. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: डिजिटल माध्यमांचा वापर करून माहितीचा जलद प्रसार.

हा उपक्रम गावातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा बदल ठरला आहे. कारण आता ते योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सहजगत्या पूर्ण करू शकतात. यामुळे गावात सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य योजनांचा मित्र

आपत्कालीन परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी उपलब्ध असलेल्या योजना किंवा मदत करणाऱ्या संस्थांची माहिती वेळेत न मिळाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अशा प्रसंगांमध्ये योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मदत मिळवून देण्यासाठी ‘आरोग्य योजनांचे अभिसरण पत्र’ तयार करण्याची संकल्पना समोर आली आहे.

या पत्रात आपत्तीच्या वेळी मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांची आणि संसाधनांची सविस्तर माहिती असेल.

पत्रामध्ये समाविष्ट असलेली माहिती:

1. शासकीय आरोग्य योजना: आपत्ती काळात शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या तातडीच्या योजना, जसे की आरोग्य विमा योजना, मोफत वैद्यकीय सेवा, आणि आपत्ती निधी.

2. खाजगी संस्था व NGO: संकटाच्या वेळी मदत करणाऱ्या निवडक खाजगी संस्था व स्वयंसेवी संस्थांची यादी, त्यांचे संपर्क क्रमांक आणि कार्यक्षेत्र.

3. आपत्कालीन निधी: गंभीर परिस्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी निधी मिळवण्यासाठी कोणत्या संस्थांकडे संपर्क साधावा याची माहिती.

4. वैद्यकीय सुविधा: स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील रुग्णालये, रक्तपेढ्या, रुग्णवाहिका सेवा आणि औषध पुरवठा केंद्रांची माहिती.

आरोग्य योजनांच्या मित्राचे फायदे:

● संकटाच्या वेळी योग्य वेळेत मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन.

● कुटुंबांना आर्थिक आणि वैद्यकीय सहाय्य मिळवण्यात मदत.

● शासकीय आणि खाजगी स्तरावरील सर्वसाधारण सेवा एका ठिकाणी उपलब्ध.

● आरोग्यसेवेचा लाभ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचवणे.

असे अनेक प्रयोग गाव पातळीवर होणे आवश्यक आहे, आणि होत असलेल्या प्रयोगांचे संकलन होऊन ते प्रयोग इतर गावांमध्ये सुद्धा पोचले पाहिजे, यातूनच प्रत्येक ग्रामपंचायत ही सामाजिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ