गेल्या दोन लेखांमध्ये आपण ऋग्वेदातील सूर्य देवता आणि प्राचीन भारतातील सूर्याच्या काही ठराविक शिल्पांची ओळख करून घेतली. या दोनही लेखांमधील माहितीद्वारे प्राचीन भारतातील सूर्योपासनेला पुष्टी मिळते. आजच्या लेखात आपण प्राचीन भारतातील सूर्योपासनेची ओळख करून घेवूया.
जीवनाचा मार्गदर्शक आणि शासक
सूर्याची पूजा भारतात अनेक शतकांपासून होत होती याचे संदर्भ आपल्याला आढळतात. वैदिक ग्रंथांमध्ये सूर्याला ऊर्जा, जीवनशक्ती आणि जीवनाचा स्रोत मानले आहे, हे आपण पाहिलेच आहे. सूर्याला जीवनाचा मार्गदर्शक आणि शासकही मानले आहे. वेदांमधील सूर्य देवता आणि भारतात विविध मंदिरात-लेण्यांत आढळणारी सूर्याची शिल्पे आपल्याला प्राचीन भारतातील सूर्यमंदिरांचा विचार करण्यास नक्कीच भाग पाडतात.
सूर्यमंदिराच्या पूजेकरता इराणमधून पुरोहित
सूर्यमंदिरांच्या निर्मितीसाठी एक पारंपारिक कथा सांब पुराणात नोंदवली गेली आहे. कृष्णाचा मुलगा सांबाला आपल्या देखण्या रूपामुळे अतिशय गर्व झाला होता. एकदा त्याने नारदमुनींची चेष्टा केली. त्यामुळे नारद कोपिष्ट झाले आणि त्यांनी सांबाचा बदला घेण्याचे ठरवले. त्यांनी सांबाला स्नानासाठी गोपी जेथे स्नान करतात त्या जागी जाण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी कृष्ण देखिल तेथे आला आणि सांबाला तेथे पाहून तोही कोपिष्ट झाला. त्याने सांबाला ‘तूला कुष्ठरोग होईल’ असा शाप दिला.
सांबाने कृष्णाची माफी मागितली आणि स्वतः निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. शेवटी कृष्णाने त्याच्यावर दया दाखवली. शापावर उतारा म्हणून कृष्णाने सांबाला चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मित्रवन या ठिकाणी जाण्यास जावून सूर्योपासना करून कुष्ठरोगापासून मुक्त होता येईल असे सांगितले. त्यानुसार सांबाने बारा वर्षे तप केले. अंततः सूर्य देवतेच्या कृपेने सांबाला त्याचे रूप परत मिळाले आणि तो कुष्ठरोगापासून मुक्त झाला. शेवटी कृतज्ञतेच्या भावनेने सांबाने मित्रवन येथे सूर्य मंदिर उभारले. कथेतील पुराव्यानुसार त्या मंदिरातील पूजा करणे स्थानिक पुरोहितांना शक्य नसल्याने, सांबाने साकद्विपाहून (म्हणजेच आत्ताचे वायव्य इराण) माघ ब्राह्मणांना त्या मंदिरात सूर्य देवतेचे विधी करण्यासाठी पाचरण केले.
पहिल्या सूर्यमंदिराचे संदर्भ
प्राचीन भारतातील भौगोलिक घटकांच्या झालेल्या अभ्यासानुसार चंद्रभागा नदी सिंधू नदीची उपनदी मानली जाते. त्यानुसार ह्या पहिल्या सूर्यमंदिराचे स्थान तिच्या काठावरील मुलस्थ असे मानले गेले आहे. म्हणजेच संशोधकांच्या मते आत्ताचे पंजाबमधील मुलतान. सातव्या शतकात चीनमधून भारतात आलेल्या ह्युएन-त्सांग आणि अकराव्या शतकात पर्शियातून आलेल्या अलबिरुनी यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात मुलतानमधील सूर्य मंदिराचा उल्लेख केला आहे. कदाचित कथेतील सूर्याचे मंदिर हेच असावे. ह्या स्थळाला ‘सांबपुर’ म्हणूनही ओळखले जाते.
त्यानंतर प्राचीन भारतात सूर्यपूजा हळू हळू वाढत गेली. पुरांणांमध्ये प्राचीन भारतातील सूर्यपूजेच्या केंद्रांचे उल्लेख आढळतात.
सूर्यपुजेची महत्त्वाची तीन ठिकाणे
पुराणांनुसार प्राचीन भारतात सूर्यपुजेची तीन प्रसिद्ध स्थळे आहेत. भविष्य पुराणानुसार मित्रवन, मुंडीर आणि कालप्रिय अशी तीन सूर्य देवतेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. काही वेळेसे भविष्य पुराणाच्या वेगवेगळ्या आवृत्यांमध्ये मुंडीरच्या ऐवजी सुंदिरस्वामी किंवा पुंडिश्रवामिन असे उल्लेख येतात. एका ठिकाणी मित्रवनाऐवजी मुलस्थान उसा उल्लेख येतो. भविष्य पुराण 1.129.16 नुसार सूर्याने असे म्हटले आहे की, “भाविक माझे अस्तित्व पहाटे सुतिरेमध्ये, दुपारी कालप्रियामध्ये आणि इथे संध्याकाळी मित्रवनमध्ये अनुभवतील.” त्यानुसार ही तीन ठिकाणे सूर्याच्या पूजेची महत्वाची ठिकाणे मानली गेली आहेत.
वराह पुराणात सांबाची कथा आणि ह्या तीन सूर्यपूजेच्या स्थानांची सांगड घातलेली आढळते. त्यानुसार सांबानेच सूर्याच्या तीन मूर्त्या उदयाचल, कालप्रिय आणि मूलस्थान येथे स्थापन केल्या. त्यामुळे वराह पुराणानुसार तीन सूर्य पूजा केंद्रे म्हणजेच उदयाचल, कालप्रिय आणि मूलस्थान अशी तीन स्थळे होत.
विविध पुराणातील तीन रुपातील सूर्यदेवतेचे संदर्भ
स्कंद पुराणात म्हटले आहे की सूर्य देवता मुंडीरमध्ये पहाटे दिसतो. मुंडीर भारतात पूर्वेकडील कोपऱ्यात स्थित आहे. त्याचप्रमाणे सूर्य कालप्रियामध्ये दुपारी आणि संध्याकाळी मुलस्थाना्त दिसतो. स्कंद पुराणाच्या विविध आवृत्त्यांनुसार सूर्यपूजेची तीन केंद्रे म्हणजे, मुंडीर किंवा मुंडीरस्वामी, कालप्रिय, आणि मुलस्थान.
विविध पुराणातील विविध उतारे या तीन केंद्रांचे समर्थन करतात. त्यानुसार प्राचीन भारतात सूर्याच्या तीन रूपांची पूजा तीन ठिकाणी केली जात होती. उगवत्या सूर्याची सुतिरा, मुंडीर किंवा उदयाचल येथे पूजा केली जात असे. मध्यानीच्या सूर्याची कालप्रियामध्ये आणि त्याच प्रमाणे अस्ताला जाणा-या सूर्याची मूलस्थान किंवा मित्रवन येथे पूजा केली जात असे.
मूलस्थान हे स्पष्टपणे मुलतानशी ओळखले जाते. सांबाने सूर्य देवतेसाठी उभारलेले हेच ते पहिले मंदिर असे म्हटले जाते.
कळपी आणि सध्याच्या कोणार्कचा संबंध
प्रसिद्ध संशोधक व्ही.व्ही. मिराशी यांनी कालप्रिय या स्थानाची ओळख आधुनिक कळपी म्हणून केली आहे. हे कळपी म्हणजेच यमुनाच्या नदीच्या किनाऱ्यावर एक जागा. ते पुढे असे सुचवतात की प्रसिद्ध संस्कृत कवी भवभूतीच्या नाटकांमध्ये आलेला कालप्रियनाथाचा उल्लेख म्हणजेच कळपीचा सूर्यदेव असू शकतो. कालप्रियाच्या मंदिराच्या अंगणाचा उल्लेख राष्ट्रकूट राजा गोविंद(तिसरा) याच्या कॅम्बे येथे सापडलेल्या शिलालेखांमध्येही आहे.
याचप्रमाणे पुराणांतील मुंडीर, सुतिरा आणि उदयाचल ही ठिकाणे सध्याच्या प्रसिद्ध कोणार्कच्या स्थळाशी जवळिक साधते. वराह पुराणातील उदयाचल हे सूर्याच्या उगवणारा पर्वताचे प्रतीक आहे. भविष्य पुराणातील सुतिरा याचा शाब्दिक अर्थ ‘सुंदर किनारा’ असा होतो. त्याचप्रमाणे भविष्य पुराणात सूर्यदेवाला ‘कोना वल्लभ’ असेही संबोधले आहे. ब्रह्म पुराणात ‘कोणार्क’ आणि ‘कोनादित्य’ ह्या दोनही संज्ञा येतात. त्याचा अर्थ ‘कोपऱ्याचा सूर्य’ असा होतो. त्यामुळे कोणार्क हे सूर्योपासनेचे तिसरे केंद्र मानले जाते.
अशा प्रकारे ह्या लेखात आपण विविध पुराणांमध्ये आढळणारी सूर्योपासनेची तीन केंद्रे पाहिली. या पुढील लेखात आपण सध्या आढळणाऱ्या भारतातील प्रमुख सूर्यमंदिरांचा आढावा घेवू.