बी-बियाणे उद्योग – भाग 4

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या अकराव्या भागात आपण भारतीय बियाणे उद्योग क्षेत्रात बियाण्यांची मागणी व पुरवठा, विक्री व वितरण व्यवस्था यांची माहिती घेणार आहोत.
[gspeech type=button]

बियाण्यांची विक्री व्यवस्था

बियाणे उद्योगाची वाढ किती जोमाने होत आहे, याबद्दल आपण या आधीच्या लेखात पाहिले आहे. अशा प्रकारे वाढत असलेल्या उद्योगाची विक्री व्यवस्था ही संशोधन, विकास आणि उत्पादन या दोन महत्त्वाच्या विभागांइतकीच किंबहुना त्यांच्यापेक्षाही सक्षम असावी लागते. जेणेकरून उत्पादन व विक्री यांचा ताळमेळ ठेवत व्यवसायाची जोमदार वाढ कायम ठेवता येते. अशी सक्षम विक्री व्यवस्था उभारण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या उत्पादनाची मागणी समजून घेणे आवश्यक असते. मागणी कशी, केव्हा आणि किती निर्माण होते, याचा अंदाज आखून उत्पादनाची गणिते मांडावी लागतात.

बियाण्यांची मागणी

बियाण्यांची मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये हवामान, पाऊसपाणी यांचा मोठा प्रभाव असतो. कारण एखाद्या वर्षी किंवा एखाद्या मोसमात हवामान कसे आहे, यावरून कोणती पिके पेरायची, केव्हा पेरायची, किती प्रमाणात पेरायची असे महत्त्वाचे निर्णय शेतकरी घेत असतात. त्यानुसार मागणी निर्माण होते. पाऊसपाणी सरासरीइतके किंवा चांगले असेल तर साहजिकच पेरणी योग्य वेळेत आणि मोठ्या क्षेत्रावर होते. त्यामुळे बियाण्याची मागणी वाढते. याउलट पाऊस सरासरीपेक्षा कमी, उशिरा किंवा अनियमित असेल तर पेरणी लांबते, क्षेत्र कमी होते. परंतु ओला किंवा कोरडा दुष्काळ पडल्यास किंवा अन्य कारणांनी जर दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर मात्र बियाणे जास्त प्रमाणात लागते, त्यामुळे मागणी वाढते.

पिकांना एखाद्या वर्षी किंवा मोसमात मिळणारे बाजारभाव बघूनसुद्धा शेतकरी पुढील वर्षी / मोसमात कोणते पीक प्राधान्याने लावायचे हे ठरवतात. त्यामुळे एखाद्या वर्षी / मोसमात ज्या पिकांना उत्तम बाजारभाव मिळतात, त्या पिकांच्या बियाण्याला पुढील वर्षी / मोसमात चांगली मागणी येण्याची शक्यता अधिक असते. त्यातही पिकाच्या काही विशिष्ट जातींच्या बियाण्याला आधीच्या वर्षीच्या उत्पादनानुसार कमी किंवा अधिक मागणी येते.

इतर कृषी निविष्ठांच्या तुलनेत बियाणे उद्योगाला काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये एक प्रमुख समस्या म्हणजे, बियाणी ही जिवंत असल्यामुळे त्यांचा विक्रीयोग्य राहण्याचा कालावधी अवघा 8-9 महिन्यांचाच असतो. त्या दरम्यान योग्य तापमानाला आणि सुरक्षित गोदामात त्याची साठवणूक करावी लागते. जर एखाद्या मोसमात विक्री कमी प्रमाणात झाली, आणि बियाणे उरले, तर साठवणुकीच्या दरम्यान त्याची उगवणक्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे त्याची पुढील मोसमात विक्री झाली, तरीही ग्राहकांच्या तक्रारी येऊ शकतात. याउलट, एखाद्या मोसमात मागणी मोठ्या प्रमाणात आली, तरीही बियाणे निर्मिती मात्र इतर निविष्ठांचे उत्पादन जसे कारखान्यात करता येते तसे करता येत नाही, त्यामुळे मागणीचा अचूक अंदाज अगोदरच करावा लागतो.

बियाणे मागणीनुसार शेतकऱ्यांचे वर्गीकरण

1. अल्पभूधारक शेतकरी: हे सहसा स्वतःच्या शेतातील बियाणे वापरतात. यांच्याकडून मागणी नगण्य असते.

2. लहान शेतकरी: हे काही प्रमाणात इतर शेतकाऱ्यांकडून देवाणघेवाण करून आणि काही प्रमाणात बाजारातून विकत घेतलेले बियाणे वापरतात. यांची मागणी कमी ते मध्यम स्वरूपाची असते.

3. मोठे क्षेत्र असलेले शेतकरी: हे विकत घेतलेले बियाणे जास्त प्रमाणात वापरतात. त्यामुळे यांच्याकडून बियाण्याची मागणी मोठी असते. त्यामुळे असे शेतकरी बियाणे उद्योगांचे मुख्य आणि जास्त संख्येने ग्राहक असतात.

4. प्रगतीशील शेतकरी: यांच्याकडे जमिनीचे क्षेत्र कमी-अधिक प्रमाणात असले तरी यांची प्रवृत्ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम पीक काढण्याची असते, त्यामुळे हे बाजारात उपलब्ध होणारी नवनवीन बियाणी वापरुन बघणे, प्रयोग करणे अशा गोष्टी करत असतात. पिकांच्या नवीन आलेल्या जातींची बियाणी विकत घेण्याची अन्य शेतकऱ्यांची तयारी होण्याआधी यांची तशी तयारी असते. तसेच यांच्या शेतातील नवीन प्रयोग बघून अन्य शेतकरीसुद्धा नवीन बियाणे घेण्याचा निर्णय पक्का करतात. साहजिकच, नवीन उत्पादनांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने उद्योगांसाठी असे शेतकरी महत्त्वाचे ठरतात.

हे ही वाचा : भारतीय बियाणे उद्योगातील खाजगी क्षेत्राचा आढावा

बियाण्याच्या मागणीचा अंदाज बांधणे (Demand Forecasting)

बियाण्याच्या मागणीचा अंदाज बांधण्याचे काम साधारणपणे विक्रीच्या तीन वर्षे आधीपासून करावे लागते. कारण बियाण्याची मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी अनेक घटक एकमेकांवरही प्रभाव टाकत असतात. यामध्ये ग्राहकांचा (शेतकरी) प्रकार, प्रगतीशील किंवा अन्य शेतकरी, त्यांची शैक्षणिक पातळी, त्यांचे कृषी-तंत्रज्ञान विषयक शिक्षण / प्रशिक्षण, त्यांची जमीनधारणा, शेती कोरडवाहू आहे की बागायती, ओलीताची सोय किंवा तिचा अभाव, पिकांची आणि पिकांच्या जातींची निवड असे अनेक घटक कार्यरत असतात. तसेच विशिष्ट विभागात किंवा परिसरात विशिष्ट पिकांच्या बियाण्याला असलेली मागणी, शेतीसाठी आर्थिक पाठबळ, कर्जपुरवठा, एखाद्या भागात उपलब्ध असलेल्या आर्थिक संस्था, पतपुरवठा संस्था, शेतकरी प्राथमिक कृषी सहकारी संस्था (Primary Agricultural Cooperative Society – PACS), इत्यादींची उपलब्धता, त्यांची कार्यक्षमता असे घटकदेखील मोठा प्रभाव टाकतात. त्याचप्रमाणे विशिष्ट पिकांची वाढ, त्यांना पडणारे रोग व किडी, तसेच बियाण्याची किंमत यांचा शेतकऱ्यांच्या बियाणे मागणीवर मोठा प्रभाव पडत असतो. या आणि अशा घटकांचा सखोल अभ्यास करून बियाणे उद्योगांना मागणीचा अचूक अंदाज बंधावा लागतो.

हे ही वाचा : बी-बियाणे उद्योगाची भूमिका व योगदान  

बियाणे पुरवठा व वितरणाशी संबंधित बाबी

बियाणे निर्मिती ही त्या त्या पिकाची प्रत्यक्ष लागवड करून करावी लागत असल्यामुळे त्याला वेळही जास्त लागतो. त्यासाठी शेतजमीनसुद्धा लागते. त्यामुळे मागणीच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल, तर प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर करार पद्धतीने शेती करून त्यांच्याकडून बियाणे निर्मितीसुद्धा केली जाते. त्यासाठी अशा शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण द्यावे लागते. या पद्धतीमुळे उद्योगांना स्वतःच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावी लागत नाही आणि तुलनेने मोठ्या प्रमाणावर बियाणे उत्पादन करता येते.

सुधारित / संकरीत बियाण्याची मागणी सुनिश्चित करून त्यानुसार उत्पादन आणि पुरवठा करावा लागतो. नवीन बियाणे बाजारात आल्यानंतर त्याचा वापर आणि प्रसार प्रचार किती प्रमाणात आणि किती वेगाने होतो यानुसार पुरवठा नियंत्रित करावा लागतो. उत्पादन केंद्रापासून अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचणारी पुरवठा यंत्रणा निर्माण करावी लागते. यामध्ये बियाण्याची गुणवत्ता चाचणी, पॅकेजिंग व लेबलिंग करणे, गोदामात योग्य तापमानाला साठवणूक करणे या गोष्टी विक्रीचा हंगाम येण्याच्या अगोदर कराव्या लागतात. विक्रीच्या हंगामात गोदामातील उत्पादने मागणीच्या अंदाजानुसार योग्य विभागात पोहोचवणे, वितरकांपर्यंत पोहोचवणे तसेच किरकोळ विक्री करणाऱ्या यंत्रणा आणि संस्थात्मक ग्राहकांशी संपर्क करून त्यांच्या मागणीनुसार वितरण करावे लागते.

बियाण्याची मागणी अतिशय हंगामी स्वरूपाची असल्यामुळे वितरण व्यवस्था अतिशय कमी वेळेत योग्य त्या हालचाली करू शकणारी असावी लागते. प्रसंगी मान्सून / पावसाच्या बदलत्या स्थितीनुसार मागणी जसजशी जोर धरू लागते किंवा कमीजास्त होत जाते, तसतशी वितरणाची रचना आणि फेररचना करावी लागते.

बियाणे उद्योगात सर्वात कळीची बाब म्हणजे, प्रत्येक मोसमात बियाण्याची मागणी केवळ एक महिनाभर असते. तेवढ्या कालावधीत त्या मोसमाचे विक्रीचे लक्ष्य गाठावे लागते. त्यासाठी व्यावसायिक आणि व्यवस्थापन कौशल्य अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच कृषी तंत्रज्ञान (Agricultural Technology), कृषी जैवतंत्रज्ञान (Agricultural Biotechnology) कृषी व्यवसाय व्यवस्थापन (Agribusiness Management), कृषी बाजार व्यवस्थापन (Agricultural Marketing Management), ग्रामीण व्यवस्थापन (Rural Management) या विषयात शिक्षण प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना या क्षेत्रात आपले व्यावसायिक करियर करण्याची उत्तम संधी आहे.

पुढील भागात आपण बियाणे विक्रीसाठी अवलंबिल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची माहिती घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ