प्राचीन भारतातील दोन प्रमुख संस्कृत महाकाव्यांपैकी एक म्हणजे रामायण. महर्षी वाल्मिकी याचा कर्ता. या महाकाव्यातील घटना त्रेतायुगात घडल्याचे सांगितले जाते. रामायणात सुमारे 24,000 श्लोक अनुष्टुभ छंदात रचलेले आहेत. म्हणूनच रामायणाला चातुर्विंशतिसाहस्री संहिता असेही म्हणतात. हे 24,000 श्लोक सात कांडांमध्ये विभागलेले आहे. ती कांडे म्हणके बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. परंपरेनुसार रामायण “इतिहास” या वाङ्मय प्रकारात मोडते. त्यात भूतकाळातील घडलेल्या घटनांमधून मानवी जीवनाच्या उद्दिष्टांबद्दल शिकवण दिलेली आढळते.
जनमानसात प्रसिद्ध असणारे महाकाव्य
रामायणाच्या कथानकात उत्तर भारतातील कोसल राज्याच्या अयोध्या नगरीतील राजपुत्र राम यांच्या जीवनकथेचे वर्णन आहे. त्यांच्या सावत्र आई कैकेयीच्या आग्रहामुळे, वडील राजा दशरथ रामाला चौदा वर्षांसाठी वनवासाला पाठवतात. या काळात राम आपल्या पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह भारताच्या विविध जंगलांमध्ये भ्रमण करतो. याच दरम्यान, लंकेचा राजा रावण सीतेचे अपहरण करतो, ज्यामुळे महायुद्ध होते. शेवटी, राम लंकेवर विजय मिळवून सीतेला परत आणतात आणि मोठ्या आनंदोत्सवात अयोध्येत परत येऊन राजा होतात. धर्म आणि अधर्माची प्रतीकात्मक शिकवण देणारे हे महाकाव्य जनमानसात फार प्रसिध्द आहे.
विविध देशांत विविध माध्यमात रामायण
कालौघात या प्रसिध्द महाकाव्याचा इतर कला आणि साहित्यावर परिणाम झालेला आढळतो. हे महाकाव्य नाटकं आणि चित्रपटांमध्ये रूपांतरित झाले आहे. आजही रामायणावर आधारित चित्रपटे, वेब सिरिज येतच आहेत. याशिवाय रामायणची कथा विविध लोककला, अभिजात नृत्य, नाटके यांचा विषय म्हणून लोकमान्य झालेली आहेत. प्राचीन भारतातील व्यापार आणि इतर दळणवळणामुळे रामायण बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड इत्यादी देशातही पसरले. अशी ही प्रसिध्द कथा विविध चित्रांमध्ये आणि शिल्पांमध्ये चित्रित न केल्या गेल्यास विशेष ते काय. विशेषतः भारतीय आणि इंडोनेशियन (बाली) कलाकारांनी रामायणाच्या कथा आणि प्रसंग वस्त्र, खडी, दगड, टेराकोटा, लाकूड, हत्ती दात विविध अशा विविध माध्यमांवर कोरले.
मध्ययुगातील चित्रकारांना भावलेले रामायण
मध्ययुगात भारतात विविध लघुचित्रांच्या विविध चित्रशाळा प्रसिध्द होत्या. त्या चित्रकारांनाही ही रामकथा भावली. परिणामी त्यांनी रामकथेवर आधारीत अनेक लघुचित्रे तयार केली. आज भारतातील विविध संग्रहालयांमध्ये ही लघु चित्रे जतन केलेली आहेत. आजच्या लेखात आपण भारतातील काही संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या रामायणावर आधारित लघुचित्रांची ओळख करून घेवू.
रामजन्माची लघुचित्रकथा
सर्वात प्रथम चित्र आहे रामजन्माचे. ह्यात रामजन्माशी निगडीत विविध घटना दाखविल्या आहेत. रामजन्मासोबतच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे जन्म दाखविले आहेत. राजा दशरथ त्यांच्या पंडितांकरवी त्यांच्या मुलांच्या पत्रिका बनवून घेत आहे तर बाजूला प्रजा रामजन्माचा उत्सव साजरा करताना दाखविले आहेत.
ह्या नंतरचे चित्र सीतेच्या जन्माशी निगडीत आहे. राजा जनकाला जमिन नांगरताना सीता मिळाली होती. प्रस्तुत चित्रात नांगरलेल्या जमिनीच्या मध्यभागी राजा जनक दाखविला आहे. त्याच्या हातात लहान सीता आहे.
त्राटिका वधकथा
ह्यापुढील लघुचित्र त्राटिकावधाचे आहे. चित्रात दाखिवलेली उंच स्त्री त्राटिका असून तिच्या समोर राम धनुष्य बाण घेवून उभा आहे. त्याच्या सोबतच लक्ष्मण आणि विश्वामित्रही आहेत. विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना रामाने अनेक राक्षसांचा आणि त्राटिकेचा वध केला होता.
राम-सीता विवाह
हे चित्र रामसीतेच्या विवाहाचे आहे. लग्नमंडपात यज्ञवेदीच्या भोवती राम सीता विश्वामित्र, जनक, लक्ष्मण इत्यादी उभे आहेत असे दाखविले आहे. एका बाजूला कोप-यात मंगल वाद्य वादक आहेत.
लोककथेनुसार रावणाची नऊ तोंडे मानवाची एक गाढवाचे
ह्यापुढील दोन चित्रे वनवासामधील शूर्पणखा या व्यक्तिरेखेशी निगडीत आहेत. त्यातील पहिल्या चित्रात शूर्पणखेचे नाक कापल्याचा प्रंसग आहे. यात शूर्पणखा राक्षसी न दाखविता अलंकृत स्त्री दाखविली आहे. तिचे कपडे आणि दागिने विशेष उल्लेखनीय आहेत. मात्र मागील बाजूस वनाचे चित्रण ने येता राम-सीता आणि लक्ष्मणाचे दोन छोटे महाल दाखविले आहेत. त्यापुढील चित्रात शूर्पणखा रावणाला तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत आहे. शूर्पणखेच्या आकृतीवरून ही दोनही चित्रे एकाच कलाकाराने चित्रित केली आहेत हे लक्षात येते. ह्या दिस-या चित्रात रावण वैशिष्ट्यपूर्ण शैलीत चितारला आहे. त्याचे विविध आयुधे धारण केलेले अनेक हात दाखविले आहेत. त्याच्या दहा तोंडांपैकी नऊ तोंडे मानवी आणि एक तोंड गाढवाचे दाखविले आहे. लोकपरंपरेत रावणाचे दहावे तोंड गाढवाचे दाखवले जाते. कदाचित त्याच्या मूर्खपणाचे ते प्रतीक असावे.
सीताहरणाचा प्रसंग
यापुढील तीन चित्रात सीताहरणाचा प्रसंगाची मालिका दाखविली आहे. पहिल्या चित्रात रावण दंडकारण्यात मारिचाला भेटण्यास आलेला दाखविला आहे. मृगाचे डोके आणि मानवी शरीर असलेला मारिच त्याच्या गुहेसमोर उभा आहे. त्याचे जोडलेले हाय त्याने रावणाच्या प्रस्तावाला दिलेली संमती सूचित करतात. रावण मागील चित्राप्रमाणेच दाखविलेला आहे. त्यापुढील चित्र मारिचवधाचे आहे. राम आणि लक्ष्मण मृगामागे धावत त्याचा वध करिताना दाखविले आहेत. त्यापुढील चित्रात रावण अथितीरूपात सीतेसमोर आलेला आहे.
पुष्पक विमान वाहणाऱ्या चार उडणाऱ्या स्त्रिया
पुढील चित्र कलाकाराची प्रतिभा अधोरेखित करते. ह्यात आकाशमार्गाने रावण पुष्पक विमानातून सीतेला लंकेस घेवून जाताना दाखविला आहे आणि जटायू वाटेत त्याला प्रतिकार करित आहे. रावणाचे पुष्पक विमान चार उडणा-या स्त्रिया वाहत आहेत. रावण त्रिशुळाने जटायुचा वध करित आहे.
किष्किंधा कांडातील राम आणि हनुमान भेट
यापुढील लघुचित्र किष्किंधा कांडातील प्रसिद्ध प्रसंग राम आणि हनुमानाच्या भेटीचे आहे.
प्रस्तुत लघुचित्र वालीवधाचे आहे. रामाच्या बाणाने घायाळ झालेला वाली धारातीर्थी पडलेला आहे. बाजूला सुग्रीव आणि लक्ष्मण उभे आहेत.
सुंदरकांड – लंकेचं वर्णन आणि सीतेचा शोध
यापुढील तीन लघुचित्रे रामायणातील सुंदरकांडावर आधारित आहेत. पहिल्या लघुचित्रात हनुमान रावणाच्या लंकेत सीतेचा शोध घेताना दाखवला आहे. सोनाची लंका पिवळ्या रंगात दाखवली आहे. लंकेत रावणाचे विविध राक्षस चित्रविचित्र रूपात दाखवले आहेत. त्यानंतरचे लघुचित्र लंकेतील अशोकवाटिकेतील सीता आणि हनुमानाच्या भेटीचे आहे. बाजूला सीतेचे रक्षण करणा-या तीन राक्षसी झोपलेल्या दाखविल्या आहेत. त्यापुढील लघुचित्र हनुमानाने केलेल्या लंकादहनाचे आहे.
अंगदची उत्कृष्ट शिष्टाई
हे लघुचित्र अंगदाने युध्दाच्या आधी केलेल्या शिष्टाईचे आहे. रावणाने शिष्टाईस नकार दिल्यानंतर अंगदाने पाय जमिनीवर घट्ट ठेवून रावणाच्या सभेस आव्हान दिले होते, की तर तुमच्या पैकी कोणी माझा पाय हलविला तर मी रामाच्या वतीने हार पत्करेन. मात्र रावणाच्या सभेतील कोणीही यशस्वी झाला नाही. मात्र जेव्हा रावण अंगदाचा पाय हलविण्यास आला तेव्हा अचानक अंगदाने पाय मागे घेतला आणि त्यामुळे रावण खाली पडला. अशा प्रकारे रावणाला आणि त्याच्या साम्राज्याला धक्का देवून अंगदाने युध्दाचे शिंग फुंकले होते.
दक्षिण भारतीय कथेवर आधारित लघुचित्र
हे चित्र कदाचित दक्षिण भारतातील असावे. कारण दक्षिण भारतातील रामायणाच्या कथेनुसार इंद्रजित हा निकुंबला नावाच्या तांत्रिक देवीचा भक्त होता. तिच्या कृपेने तो नेहमी युध्दात जिंकत असे. म्हणून राम, लक्ष्मण, हनुमान, विभिषण यासर्वांनी जावून त्याचा यज्ञ उध्वस्त केला आणि त्याचा वध केला.
राम-रावण युद्ध
हे शेवटचे लघुचित्र राम रावणाच्या युध्दाचे आहे.