रमा नाईकः मुंबई अंडरवर्ल्डचा आणखी एक चेहरा

Rama Naik : 1980 च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमधलं एक दबदबा असलेलं नाव म्हणजे रमा नाईक. हाजी मस्तान, करिम लाला आणि वरदराजन मुदलीयार यांच्या नंतर अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या बरोबरीनं रमा नाईकचं नाव घेतलं जातं.
[gspeech type=button]

1980 च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमधलं एक दबदबा असलेलं नाव म्हणजे रमा नाईक. हाजी मस्तान, करिम लाला आणि वरदराजन मुदलीयार यांच्या नंतर अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या बरोबरीनं रमा नाईकचं नाव घेतलं जातं. कारण त्यांची गुन्हेगारी कारकिर्द एकाच वेळी सुरु झाली होती. पण त्याचं वर्चस्व आणि दरारा फाळ काळ टिकला नाही. त्याचं साम्राज्य वाढण्याआधीच त्याला संपवण्यात आलं.

बालपण

1955 मध्ये मुंबईच्या धारावीत रमा नाईकचा जन्म झाला, काही दिवसांतच त्याचं कुटूंब धारावी सोडून भायखळ्यात रहायला गेलं. त्याचे वडिल मिल कामगार होते. त्यांचं उत्पन्न अतिशय तुटपुंज, त्यात रमा नायकनं शाळा सोडून दिली. या सगळ्या गोष्टी रमा नाईकला गुन्हेगारी क्षेत्रात जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या. त्यानं लहानपणापासूनच गुन्हेगारीत प्रवेश केला. त्याला त्याचं आयुष्य अशाच हालाखीच्या परिस्थितीत काढायचं नव्हतं. त्याला पैशासोबतच समाजात त्याचं एक स्थान निर्माण करायचं होतं. शिक्षण नसल्यानं चांगली नोकरी मिळून त्याला समाजात मान मिळणार नाही, हे त्याला चांगलं माहीत होतं. म्हणून त्यानं गुन्हेगारीतूनच पैसा कमवायचा आणि त्यातूनच नावही मिळवायचं ठरवलं.

एक वर्षाचा असतानाच जेलची वारी

रमा नायक एक वर्षाचा असताना त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. तो काळ होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. सीपीआय (कम्युनिस्ट पार्टि ऑफ इंडिया) च्या नेत्या अहिल्याबाई रांगणेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्त्रिया संयुक्त महाराष्ट्र चळवळीशा जोडल्या गेल्या होत्या. यात प्रामुख्यानं गिरणी कामगारांच्या बायकांचा समावेश होता. या महिला कार्यकर्त्यांमध्ये एक होती रमा नाईकची आई सुमन नाईक. साधारण 1956 च्या आसपास म्हणजे रमा नाईक एक वर्षाचा असताना एका आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना अटक करुन पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये ठेवाण्यात आलं होतं. या सगळ्या महिला जवळपास 21 दिवस जेलमध्ये होत्या. आईसोबत रमा नाईकही 21 दिवस पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये राहिला होता.

मिल संपानंतर गुन्हेगारी मुख्य व्यवसाय

भायखळ्यात लहानाचा मोठा झालेला रमा नाईक छोट्‌या मोठ्या गुंडांच्या सहवासात आला. सुरुवातीला तो चोरी करायचा, हळूहळू लोकांना ब्लॅकमेल करुन तो खंडणी गोळा करु लागला. त्यात त्यानं चांगलंच नाव कमावलं. लोक त्याला ओळखू लागले, घाबरु लागले. एक गुख्यात गुंड म्हणून त्याची ओळख निर्माण व्हायला लागली. त्यानं खटाव मिलमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथंच त्याची ओळख अरुण गवळीशी झाली. नंतर त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. 70 च्या दशकाच्या शेवटी बाबू रेशिम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांनी BRA Gang सुरु केली. (B-Babu Reshim, R – Rama Naik आणि A – Arun Gawli) त्या वेळच्या भायखळा कंपनीला स्पर्धा म्हणून ही गँग सुरु करण्यात आली होती. रमा नाईकचा इंटरेस्ट गिरणीच्या कामात कमी आणि गुन्हेगारी कामात जास्त होता. 1982 मध्ये गिरणी कामगारांचा संप झाला, यात हजारो कामगारांना बोरजगार व्हावं लागलं. रमा नाईकही त्यातून वाचला नाही. पण त्यानं ही संधी साधून गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केलं.

दाऊदला मदत

80 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये नवीन पिढी काम पाहू लागली. दाऊद, समद खान आणि पठाण गँगची दुष्मनी वाढत चालली होती. दाऊदचा भाई साबीरच्या खुनानंतर मुंबईत दाऊद विरुद्ध पठाण गँग असं गँगवॉर सुरु झालं होतं. यात दाऊदच्या कन्साईनमेंटस, त्याची माणसं सगळ्यांनाच धोका निर्माण झाला होता. त्यांच्या संरक्षणासाठी दाऊदनं सतिश राजेमार्फत रमा नाईकची मदत घेतली. रमा नाईकनं दाऊदला त्याच्या कठीण काळात मदत केली. त्याच्या कन्साईनमेंट सुखरुप पोहोचवल्या. त्याच्या माणसांना संरक्षण दिलं, छोटा राजनलाही त्यानं अनेक दिवस त्याच्याजवळ ठेवलं होतं असं म्हणतात.

दाऊदशी फारकत

मुंबईतल्या एका जागेवरुन 1988 मध्ये दाऊद आणि रमा नाईक एकमेकांचे दुष्मन झाले. मुंबईतली एक जागेची किंमत त्यावेळी कोट्यावधी रुपये होती. ती रमा नाईकला हवी होती. नेमकी तीच जागा प्रभाकर आणि प्रकाश शेट्टी या शेट्टी ब्रदर्सनाही हवी होती. हे शेट्टी ब्रदर्स दाऊदचा विश्वासु शरद शेट्टी याच्या जवळचे होते. त्यांचं भांडण दाऊदपर्यंत गेलं. दाऊदनं शरद शेट्टी आणि रमा नाईकला दुबईला बोलावून घेतलं. ती जागा शरद शेट्टीला घेऊ दे, असं दाऊदनं रमा नाईकला सांगितलं. रमा नाईकचं जे काही नुकसान असेल त्याची भरपाई करुन दे असं शेट्टीला सांगितलं. दाऊदनं त्याची बाजू न घेतल्यानं रमा नाईकला त्याचा राग आला. मुंबईला परत आल्यावर रमा नाईकनं दाऊदनं सांगितलेलं न ऐकता जागेचा व्यवहार केला. आणि तो दाऊदच्या बॅडबुकमध्ये जाऊन बसला. रमा नाईकनं दाऊदचं स्मगलिंगचं कामही थांबवलं. यातून त्यानं दाऊदचा आणखी रोष ओढवून घेतला.

मृत्यूच्या कथा

दाऊदचं काम थांबवल्यानंतर दाऊदनं रमा नाईकला संपवायचं ठरवलं. कारण त्याला मुंबईत कोणताही दुष्मन नकोच होता. रमा नाईक जमिनीच्या वादासंदर्भात दुबईला जाऊन आल्यानंतर 1988 मध्ये काही महिन्यांतच रमा नाईकचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. नागपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक राजन काटदरे यांनी चेंबूरच्या एका सलुनमध्ये रमा नाईकचं एन्काऊंटर केलं. पण त्यानतंर हे एन्काऊंटर आणि पोलिस निरिक्षक काटदरे हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले. यातली पहिली थिअरी अशी की दाऊदशी दुष्मनी झाल्यानंतर काही महिन्यांतच पोलिस स्टेशनला एक फोन येतो. त्यात पोलिस निरिक्षक काटदरे यांना माहिती मिळते की, गँगस्टर रमा नाईक हा चेंबुरच्या एका सलूनमध्ये बसला आहे. या सलूनमध्ये रमा नाईक नेहमीच केस कापायला यायचा. माहिती मिळाल्यानंतर काटदरे काही पोलिसांना घेऊन तिथं गेले, त्यांनी रमा नाईकला शरण यायला सांगितलं. पण त्यानं पोलिसांवर गोळीबार सुरु केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रमा नाईकचा मृत्यू झाला. यातही या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही नागरीकांनी सांगितलं की, रमा नाईक हा पोलिसांना शरण यायला तयार होता. तो बिना बंदूक सलुनमधून बाहेर आला. पण पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दुसरी गोष्ट अशी की राजन काटदरे हे नागपाडा पोलिस स्टेशनचे ऑफिसर असताना ते चेंबुरमध्ये का गेले, जे त्यांचं कार्यक्षेत्र नव्हतं.

दुसरी थिअरी अशी की, रमा नाईकची बहिण रत्नप्रभा यांनी आरोप लावला होता, की रमा नाईकला छोटा राजननं व्यवस्थित प्लान करुन मारलंय. आणि त्याला पोलिस एन्काऊंटरचं स्वरुप देण्यात आलं. एन्काऊंटरची कायदेशीर चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण रमा नाईकच्या मृत्यूचं गुढ कधीही बाहेर आलं नाही, त्याला नक्की कुणी कसं मारलं हे नेहमीच गुलदस्त्यात राहिलं.

आईची खंत

रमा नाईकची आई ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची कार्यकर्ती होती. पण त्यांचा मुलगा मात्र मुंबईचा कुख्यात गँगस्टर बनला ही खंत सुमन नाईक यांना आयुष्यभर राहिली. असं म्हणतात की सुमन नाईक नेहमी असं म्हणायच्या की, माझा मुलगा माझ्या पावलावर पाऊल टाकुन चालला असता, तर नक्कीच त्याला चांगलं राजकीय आयुष्य जगता आलं असतं. पण नियतीच्या मनात तसं नव्हतं. त्यांच्या मुलाचं नाव मुंबईच्या इतिहासात एक काळ्या पर्वाशी जोडलं गेलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ