आज जिकडे तिकडे स्पर्धा लागलेली आहे. शेती क्षेत्र देखील त्यातून सुटलेले नाही. अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी आपण आपलं आणि जमिनीचंही आरोग्य खराब करायला निघालो आहोत की काय असे कित्येक वर्षापासून जाणवायला लागले. शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी शेतीला न्हाऊ घालण्याची जणू जीवघेणी स्पर्धा लागलेली आहे. उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी आरोग्याच्या नव्या नव्या समस्येला आपणास रोज सामोरे जावे लागते. माणसाच्या रोजच्या आहारातील अन्नधान्य ,फळे, भाजीपाला तरी रसायनमुक्त, विषमुक्त असावा ही प्रत्येकाची अपेक्षा असणार. मात्र त्यासाठी पुढाकार कुणी घ्यावा? सर्व करतात तर मग मीच मागे का राहावं ? असा विचार सर्वच करतात.
कीटकनाशकांचे दुष्परिणाम
पिकांवर उद्भवणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आज सर्वत्र कीटकनाशकांचा अति प्रमाणात वापर करण्यात येत आहे. कीटकनाशकांच्या अती वापरामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे खोटे समाधान बहुतेक शेतकऱ्यांना मिळत असले तरी आपले आणि जमिनीचे खराब होत असलेले आरोग्य दुर्लक्षून चालणार नाही. माणसांसोबत जनावरांचे आरोग्य आणि शेतीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी निसर्ग शेती/ सजीव शेती/सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे.
हे ही वाचा : पाणी टंचाई ते पाणी पुरवठादार गावं
निसर्ग शेती म्हणजे काय?
निसर्ग शेती म्हणजे नैसर्गिक,पशुधनावर आधारित, परंपरागत शेती, सजीव शेती.यात रसायनांचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष,शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून शेती केली जाते. यात शेणखत, कंपोस्ट खत यांना महत्त्व दिले जाते. यात शेतामध्ये शेतकरी बहुपीक पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे शेतीची सुपीकता कायम राहण्यास मदत होते. पूर्वी शेतकरी आपल्या शेतात ज्वारी, बाजरी,मका तीळ,तुर ,मोहरी ,राजगिरा, शेंगदाणे या सोबतच काकडी,दोडक,कारलं, भेंडी,गवार,कोहळ, अंबाडी, वाल असा हर तऱ्हेचा भाजीपाला पिकवीत असे. एखादं पीक हातून गेलं तरी बाकी पिकांचा त्याच्या जगण्याला आधार असायचा. घरोघरी बैल, गाई, म्हशी असायच्या. दूध दुभत्यातून पोषण आणि कुटुंबाचा खर्च भागविला जात होता.जनावरांच्या शेण आणि मूत्रातून जमिनीची सुपीकता वाढत होती. आता रासायनिक शेतीमुळे बहुपीक पद्धती बंद होऊन जनावरे कमी झालीत.शेतकरी अधिक उत्पादनाच्या स्पर्धेत स्वतःला हरवून बसला.कर्जबाजारी झाला. यातून मुक्त व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग असेल तर निसर्ग शेतीचा.
निसर्ग शेती करणारे पहिले राज्य सिक्कीम
सिक्कीम सरकारने 2015 पर्यंत संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती आणण्याचे ध्येय ठरवून ते पूर्ण देखील केले. आपल्या राज्याला देखील याचा विचार करावा लागेल. या शेती पद्धतीत वृक्ष लागवड, सौर ऊर्जेचा वापर, जनावरांच्या शेण आणि मुत्रांचा वापर, प्राण्यांचे संगोपन आणि जमिनीची धूप थांबविण्यासाठी बांध घातले जातात. या सर्व बाबी पर्यावरणाला पोषक आहे.
हे ही वाचा : योजनांच्या अभिसरणासाठी विशेष उपक्रम
शेती आणि आरोग्य
माणसाचे आरोग्य त्याच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असते. मातीचेही तसेच आहे.आज रासायनिक खतामुळे आणि कीटकनाशकांच्या फवारामुळे सर्वच अन्नधान्य, फळे, भाजीपाला विषयुक्त तयार होऊन आपल्या आहारात येतो.त्याचा परिणाम आपण प्रत्येक जण बघतच आहोत. आज अनेक आजारांना माणसाला तोंड द्यावे लागत आहे. आईच्या दुधात देखील विषयाचे अंश आढळल्याची माहिती संशोधनातुन स्पष्ट झाली. त्यामुळे आजची जीवनशैली बघता प्रत्येकापुढे स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे हे एक महत्वाचे आव्हान आहे.आज कॅन्सर चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता क्षीण होत आहे. त्याचे कारण कीटकनाशकांचा होत असलेला अति प्रमाणात वापर . त्यावर मात करण्यासाठी आज नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात वाढत आहे. आज अन्नधान्याची नैसर्गिक चव आणि पोषकता आम्ही हरवून बसलो. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनांना नैसर्गिक चव आणि पौष्टिक मूल्यात वाढ होते .तसेच वाढणारे आजार आणि शेतीवर होत असलेल्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवले जाते.
शासनाचे नैसर्गिक शेती अभियान
भारत सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानास केंद्र पुरस्कृत योजना म्हणून गतवर्षी मंजुरी दिली. त्या अंतर्गत महाराष्ट्रात 88 हजार 484 हेक्टरवर नैसर्गिक पद्धतीने समूह शेती पिकविली जाणार आहे. एक ते तीन ग्रामपंचायती मधील शेतकरी एकत्र येऊन या अभियानात सहभागी होऊ शकतात. यात सर्वांचे मिळून पन्नास हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येणे आवश्यक आहे. ही शेती पद्धती विकसित करण्याचे प्रयोग आता अनेक ठिकाणी सुरू आहेत. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील रवाळा येथे वसंतभाऊ फुटाणे,गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा परिसरात डॉ सतीश गोगुलवार, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळ गावचे श्री रावसाहेब दगडकर,यवतमाळ येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री सुभाष शर्मा, काटोल तालुक्यातील कचारी सावंगाचे श्री अनंत भोयर, ब्रम्हपुरी येथील शिवदास कोरे,चार्टर्ड अकाऊंटट असलेल्या अश्विनी औरंगाबादकर यांनी निसर्ग शेतीला वाहून घेतले आहे. याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून या मंडळी कडून नागपुरात दरवर्षी बीजोत्सवाचे आयोजन करण्यात येते. नुकताच 21, 22, 23 मार्च रोजी नागपुरात वानामती येथे बीजोत्सव आयोजित करण्यात आला होता. “नागपूर नॅचरल” नावाचे विक्री केंद्र देखील नागपुरात आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील असे प्रयोग ठीक ठिकाणी सुरू असतात. गरज आहे त्यांच्या प्रयोगाला चालना देण्याची आणि सर्वांच्या आहारात विषमुक्त अन्नधान्य असावे यासाठी त्याचा वापर प्रत्येकाने करण्याची. म्हणूनच निसर्ग शेती सेंद्रिय शेती ही यापुढे प्रत्येकाची गरज असणार आहे. त्याकडे कानाडोळा व्हायला नको. किमान घरोघरी परसबागा निर्माण करून घरी खाण्यापुरता नैसर्गिक पद्धतीने , सेंद्रिय खतांचा वापर करीत पिकविलेला भाजीपाला तरी आपणा सर्वांचे आहारात घेता आल्यास आरोग्य उत्तम राहण्यास त्यामुळे मदत होईल.