स्वातंत्र्यानंतर उद्भवलेल्या उपासमारीत 5 मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा? या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता एन तारुण्यात असलेली एक आई एक दिवस ‘मुंबई अंडरवर्ल्डची माफिया क्वीन’ होईल, असं कुणालाही वाटलं नसतं. पण हे घडलं. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये पहिली महिला क्वीन तयार झाली. जिला हाजी मस्तान पासून दाऊदपर्यंत सगळेच मान देत होते. तिचं नाव होतं जेनाबाई दारुवाली.
सामान्य बालपण
साधारण 1920 च्या आसपास जन्माला आलेल्या जेनाबाईचं कुटुंब हे हालाखीच्याच परिस्थितीत जगत होतं. तिचं खरं नाव होतं जैनब. मुंबईच्या डोंगरी भागात आई वडील आणि आणखी पाच भावंडांसोबत जैनब रहायची. वयाच्या 14 वर्षी तिचं लग्न झालं. संसाराचा गाडा सुरु झाला. देश पारतंत्र्यात होता. जैनबला 5 मुलं झाली. दरम्यान ती स्वातंत्र्यचळवळीतही तिच्या परिनं भाग घेत होती. महात्मा गांधीच्या अनेक चळवळींत तिनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
आयुष्य बदलवून टाकणारं स्वातंत्र्य
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याचबरोबर सुरु झालं फाळणीचं दुर्दैवी पर्व, दंगली आणि जाळपोळ. या दंगलींमध्ये जैनबनं अनेक हिंदुंना मदत केली. त्यांचा जीव वाचवला. फाळणी होत असताना आपण पाकिस्तानात जायचं असं तिच्या नवऱ्यानं ठरवलं. पण जैनबनं त्याला नकार दिला. तिला भारतातच रहायचं होतं. अखेर तिचा नवरा तिला आणि तिच्या पाचही मुलांना सोडून पाकिस्तानात निघून गेला. आणि त्यानंतर सुरु झाला जैनबचा आयुष्यासोबतचा संघर्ष. स्वातंत्र्यानंतर भारतातही अन्नधान्याची मोठी कमतरता निर्माण झाली होती. सरकार कुटुंबानुसार रेशनिंगवर अन्नधान्याचा पुरवठा करत होतं. पण त्यात जैनबच्या पाच मुलांची गुजराण होत नव्हती. जैनबनं स्वत :च रेशनिंगचं काम सुरु केलं. सरकारकडून येणारा तांदूळ घेऊन ती विकू लागली. याच दरम्यान तिला तांदळाची तस्करी कशी करण्यात येते हे समजलं. तिनं काहीही विचार न करता या धंद्यात उतरायचं ठरवलं. तिनंही तांदळाची तस्करी करुन काळाबाजार करायला सुरुवात केली. या धंद्यात तिला जम बसवता आला नाही. पण आणखी अनेक अवैध धंदे करणाऱ्यांशी मात्र तिच्या ओळखी झाल्या. यातूनच तिला सिमजलं की दारुच्या धंद्यात प्रचंड पैसा आहे. तिनं त्या धंद्यात उतरायचं ठरवलं. दारु कशी बनवायची हे शिकून घेतलं आणि डोंगरीत आणखी एक दारुचा अड्डा सुरु झाला.
हे ही वाचा : करीम लाला : मुंबईच्या गुन्हेगारी जगतामधील आदिपुरुष
जैनबची झाली जेनाबाई दारुवाली
दारुच्या धंद्यात खंबीर आणि नीडर असावं लागतं याची जैनबला कल्पना होतीच. तिनं हळूहळू तिच्या परिसरात स्वतःची दहशत निर्माण केली. दिमतीली काही टवळके गुंड ठेवले आणि स्वत :चं वेगळं साम्राज्य तयार करायला सुरुवात केली. तिचा दरारा वाढला. आणि जैनबची ती जेनाबाई झाली. दारुचा धंदा करायची त्यामुळं तिला जेनाबाई दारुवाली हे नाव मिळालं. दारुच्या धंद्यात तिचा चांगलाच जम बसला. त्या काळात हाजी मस्तान आणि करीम लालाही याच धंद्यातून पैसा कमवत होते. आणि मुंबईच अंडरवर्ल्ड तयार होत होतं. जेनाबाई या सगळ्यांना धरुन होती. कारण तिला माहीत होतं की, काही झालं तरीही ती एक महिला आहे. आणि तिला संपवणं काही फार कठीण नाहीये. त्यामुळं ती सगळ्याच गँगस्टर्सशी सख्य साधून होती. हळू हळू तीची ओळख लेडी डॉन म्हणून तयार झाली.
करीम लालासाठी बहिण तर इतरांची मौसी
करीम लाला महिलांचा मान राखायचा. अनेक महिला त्याच्याकडे अभय आणि संरक्षण मागायला यायच्या. त्याच्या छत्रछायेत त्या सुरक्षितही असायच्या. त्यामुळंच जेनाबाईनंही करीम लालाला आपला भाऊ बनवलं. तर त्याच्यानंतर आलेली गँगस्टर्सची पिढी, म्हणजेच दाऊद इब्राहिम, छोटा राजन असे गुंड तिला मौसी म्हणून हाक मारायचे. सगळ्यांचंच साम्राज्य उभं राहत होतं. पण जेनाबाईला मात्र कुणीही आपलं शत्रू म्हणून बघत नव्हतं. डोंगरीत एकाच भागात राहत असल्यानं आणि दारुच्या धंद्यात गरजेचं असल्यानं जेनाबाई आणि दाऊदच्या वडीलांची चांगली ओळख होती. त्यामुळं दाऊदही तिला मौसीच म्हणायचा.
हत्यार न चालवणारी माफिया
जेनाबईला मुंबईची पहिली क्वीन म्हटलं गेलं तरीही तिनं कधीही हिंसात्मक मार्ग अवलंबला नाही. तिनं कुणाकडून खंडणी गोळा केली नाही, की कुणाची सुपारीही घेतली नाही. तिनं फक्त तिचा व्यवसाय सांभाळला आणि मुंबईत कार्यरत असलेल्या गँगस्टर्सना हवी तेव्हा मदत केली. समद खाननं काहीही केलं तर पोलिस अनेकदा करीम लालाला बोलावून घ्यायचे. त्यावेळी जेनाबाई अनेकदा त्याची सुटका करायची. कारण तिची पोलिसांतही चांगली ओळख आणि चांगले संबंध होते. करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन यांच्याबरोबरच अनेक गँगस्टर्स जेनाबाईकडे सल्लामसलतीसाठी यायचे. तिनं दिलेला सल्ला अनेकाच्या फायद्याचा असायचा. या सगळ्या गोष्टींमुळं जेनाबाई सगळ्यांसाठीच महत्वाची होती. त्यामुळं तिनं कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. तरीही अंडरवर्ल्डमध्ये मात्र तिचं एक अढळस्थान होतं.
हे ही वाचा : हाजी मस्तान : मुंबईच्या तस्करी जगताचा राजा
उतारवयात दारूच्या धंद्यालाही उतरण
80 चं दशक येता येता मुंबईत आणि अंरवर्ल्डमध्ये अनेक बदल झाले, दाऊदची महत्वाकांक्षा वाढली होती. त्यानं मुंबईच्या अंडरवर्ल्डला हिंसा आणि रक्तपाताची देणगी दिली. हाजी मस्तान करीम लाला निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते. थोडक्यात मुंबई अंडरवर्ल्ड कात टाकत होतं. त्यातच जेनाबाईचा दारुचा धंदाही पहिल्यासारखा चालत नव्हता. लोकाना विदेशी दारु कमी पैशांत मिळायला लागली होती. देशी दारुच्या अड्यांवर पोलिसांच्या कारवाईचं प्रमाण वाढलं होतं. जेनाबाईचंही उतारवय सुरू झालं होतं. एकदंरीत सगळीकडूनच गोष्टी बदलायला सुरुवात झाली होती. जेनाबाईनं आयुष्यभर हिंसा केली नाही, पण तिचा मुलगा मात्र गुन्हेगारीच्या गर्तेत अडकत गेला होता. छोटे मोठे गुन्हे करत होता.
आध्यात्माकडे वाटचाल आणि मृत्यू
अंडरवर्ल्डमध्ये सुरू असलेल्या रक्तपात आणि हिंसेनं जेनाबाईला त्रास होत होता. तिच्या समोर वाढलेली मुलं अशा पद्धतीनं वागतायेत हे पचवणं तिला जड जात होतं. 1993 च्या बॉम्बब्लास्टनंतर ती खचून गेली होती. त्यातच तिच्या मुलाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानं ती पूर्णपणे खचून गेली. तिनं आध्यात्माचा मार्ग निवडला. आयुष्याचा शेवटचा काळ तिनं धार्मिक कार्यांत घालवला. साधारण 1997 च्या दरम्यान जेनाबाईनं या जगाचा निरोप घेतला.
आदर्श की कलंक
जेनाबाईनं ज्या काळात स्वत :चं वेगळं साम्राज्य उभारलं त्या काळात कोणत्याही स्त्रीसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळं ती त्यावेळच्या स्रियांसाठी आदर्श होती की तिनं निवडलेल्या मार्गांमुळं ती स्त्रियांसाठी कलंक होती, याची अनेक वर्ष चर्चा होत राहिली.