गेल्या काही वर्षांत वारंवार यूट्यूबवर अथवा अन्य सोशल मिडियावर महाराष्ट्राबाहेर बोलल्या जाणाऱ्या तंजावरच्या मराठी बोलीविषयी विविध प्रकारची पण तरीही मर्यादित माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. साहजिकच तिथल्या मराठी बांधवांविषयी, त्याच्या संस्कृतीविषयी, त्यांच्या मराठी बोलीविषयी आपल्या सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. म्हणूनच त्या बोलीची ही थोडक्यात ओळख!
जागतिक भाषा नोंदींमध्ये तंजावर भाषेचा उल्लेख
‘एथ्नोलॉग- लॅंग्वेज ऑफ द वर्ल्ड’ हे मुद्रित आणि ऑनलाइन वार्षिक संदर्भ प्रकाशन आहे जे जगातील जिवंत भाषांबद्दल आकडेवारी आणि इतर माहिती देते. ही जगातल्या भाषांची सर्वात व्यापक यादी आहे. यातील सोळावी आवृत्ती (संदर्भ क्रमांक आयएसओ 639-3) मध्ये http://www.ethnologue.com/language/mar, तंजावरच्या मराठीचे वर्णन जिच्यावर तमिळ आणि कन्नड भाषांचा शाब्दिक प्रभाव आहे अशी मराठीची एक बोलीभाषा म्हणून केले आहे. त्या नोंदीनुसार तंजावर जिल्ह्यात आणि भारतातील तामिळनाडू राज्यात इतरत्र बोलल्या जाणाऱ्या मराठीचे किमान एक लाख भाषक आहेत. तंजावर मराठीच्या पर्यायी नावांमध्ये दक्षिणी मराठी (दक्षिण भारतीय मराठी), रायर मराठी आणि स्थानिक भाषिकांमध्ये ‘आमची मराठी’ असे नामोल्लेख आढळतात.
वर दिलेल्या नकाशात दर्शवल्यानुसार तंजावर मराठी लोकसंख्येचे सध्याचे वितरण दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, धर्मपुरी, कृष्णगिरी, तंजावर आणि आसपासच्या तिरुचिरापल्ली, पुदुकोट्टई, मदुराई, तिरुवनंतपुरम, सालेम, कोईम्बतूर त्याचप्रमाणे दिल्ली, मुंबई, आणि परदेशातदेखील आहे.
परस्परभिन्न भाषांच्या संपर्कातून विकसित झालेली प्रत्यारोपित बोली
प्रत्यारोपण म्हणजे काय? तर ‘एखादी व्यक्ती किंवा वस्तू जी नवीन ठिकाणी किंवा परिस्थितीत हलवली गेली आहे’ अशी व्याख्या ऑक्सफर्ड ऑनलाइन शब्दकोशात आढळते. याच संकल्पनेचा विस्तार हा अशा प्रत्यारोपण स्वरूपातील भाषांचा संदर्भ देण्यासाठी केला जातो. अशा भाषा ज्या त्यांच्या भाषिकांसह वेगळ्या देशात, प्रदेशात प्रवास करतात आणि त्याठिकाणी आधीच अस्तित्वात असलेल्या प्रादेशिक भाषांमध्ये स्वतःला सामावून घेतात, अशा भाषांना प्रत्यारोपित भाषा म्हटलं जातं.
प्रत्यारोपित भाषांचा अभ्यास पारंपारिकपणे दोन दृष्टीकोनातून केला गेला आहे –
एक, प्रत्यारोपित भाषांनी नवीन वातावरणात किती प्रमाणात मूळ धरले आहे आणि टिकून राहिले आहे आणि दोन, भाषेतील फरक. जो प्रत्यारोपित भाषा आणि मातृभूमीची मूळ भाषा यांच्यात विकसित झाला आहे.
तंजावरच्या मराठीप्रमाणेच अनेक भाषा या प्रत्यारोपित आहेत. म्हणजेच एका भौगोलिक प्रदेशातून उठून दुसरीकडे स्थायिक झाल्यामुळे तद्देशीय ऐतिहासिक, सामाजिक आणि भाषिक पार्श्वभूमीमुळे त्यांमध्ये विशेष भाषिक वैशिष्ट्य आढळून येतात. उदाहरणार्थ – मदुराईमधील स्थलांतरित रेशीम विणकरांची मातृभाषा म्हणून सौराष्ट्री भाषा पाच शतकानंतर अजूनही टिकून आहे.
मराठीच्या प्रत्यारोपित बोली
मराठी भाषेच्या महाराष्ट्राच्या सीमेबाहेरही अनेक बोलीभाषा आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच. महाराष्ट्राबाहेर बोलली जाणारी मराठी प्रामुख्याने दोन कारणांमुळे बोलली जाते. पहिले कारण म्हणजे गुजरात (वायव्य), मध्य प्रदेश (उत्तर), तेलंगणा/आंध्र प्रदेश (आग्नेय), गोवा (नैऋत्य), कर्नाटक (दक्षिण) आणि छत्तीसगड (पूर्व) यासारख्या राज्यांशी त्याची सीमा जुळलेली आहे. भाषाशास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून या सर्व भागांत बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या विविध बोलींवर संशोधन करत आहेत. दुसरे कारण म्हणजे, मध्ययुगीन काळात मराठा साम्राज्याचा विस्तार भारतभर होत असताना मराठी लोक त्यांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्रातून स्थलांतरित होऊ लागले. भोसले, पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड वंशातील राजांनी जेव्हा भारताचे विविध भाग जिंकले आणि तेथे स्थायिक होण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याबरोबर ब्राह्मण, लिपिक, सैनिक आणि कामगार असे अनेक लोक गेले. उत्तरेकडे त्यांची मोहीम मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, देवास आणि इंदूर), गुजरात (बडोदा), हरियाणा (पानिपत) आणि उत्तर प्रदेश (वाराणसी) पर्यंत विस्तारली. दक्षिणेकडे ते कर्नाटक (विजापूर, बंगळुरू) आंध्र प्रदेश (हैदराबाद) या सीमावर्ती राज्यांमध्ये पसरले आणि त्यांनी आपली मोहीम तंजावर अर्थात तामिळनाडूपर्यंत वाढवली.
भाषिक विशेषांचा ऐतिहासिक संदर्भ
तंजावरच्या मराठीला त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे विशेष दर्जा आहे. या ऐतिहासिक तथ्यांच्या तपशिलात जाणे आवश्यक आहे कारण त्यामुळेच तंजावरच्या बोलीमधील भाषिक वैशिष्ट्यांची कारणमीमांसा करता येते.
तंजावर हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. तामिळ ही तिथली राज्यभाषा असून तेलगू, तंजावर मराठी आणि सौराष्ट्र या त्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या इतर भाषा आहेत. तंजावर हे तंजावर मराठी लोकांचे सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. हा भौगोलिक प्रदेश अनेक शतकांपासून तीव्र सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे केंद्र राहिलेला आहे. या प्रदेशावर चोळ, पल्लव, पांड्य, चालुक्य, नायक, मराठा आणि मग ब्रिटिशांनी कब्जा केला आणि राज्य केले. या राजकीय देवाणघेवाणीत मराठी (भारोपीय भाषा) आणि तेलगू आणि तामिळ भाषांचे (द्राविड भाषा) भाषक एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक आणि भाषिक घटकांची देवाणघेवाण केली. आधी सांगितल्याप्रमाणे, भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या सीमा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला लागून आहेत. अनेक शतके, विविध वैवाहिक संबंध, व्यावसायिक संधी, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादींमुळे महाराष्ट्रातून लोक आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये स्थलांतर करत आहेत. या प्रक्रियेला शहाजीच्या काळात (अंदाजे इ. स. 1636) आणि नंतर गती मिळाली. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र → कर्नाटक → तामिळनाडू किंवा महाराष्ट्र → आंध्र प्रदेश → तामिळनाडू या मार्गाने मराठी भाषकांचे स्थलांतर झालेले दिसून येते. या स्थलांतरितांना या कन्नड आणि तेलगू पार्श्वभूमीसह तामिळ समाज, साहित्य आणि संस्कृतीचा सामना करणे सोपे होते. द्रविड मातीशी जुळवून घेताना त्यांना वेगळेपणा जाणवला नाही. ते शांततापूर्ण आणि सुरळीतपणे नवीन संस्कृती आत्मसात करू शकले. या सीमा ओलांडून झालेल्या हालचालींमुळे स्थलांतरितांना वेगवेगळ्या भाषा, भिन्न अन्नपदार्थ, भिन्न संस्कृती, शिक्षणाचे भिन्न माध्यम आणि विविध व्यवसायांना सामावून घेण्यास भाग पाडले. याचेच प्रतिबिंब त्यांच्या शब्दसंग्रहात दिसून येते.
- संस्कृत भाषेतील तत्सम शब्द, तामिळ भाषेतील तत्सम शब्द आणि इंग्रजी शब्द यांचा मिलाफ आपल्याला तंजावर बोलीत बघायला मिळतो. उदाहरणार्थ – पृच्छ (सं.) à पुंस (तंजा.म.) (अर्थ शेपटी); आराधना (सं.) à आरादने (तंजा.म.) (अर्थ पूजा-अर्चा); नोरई (ता.) à नोरं (तंजा.म.) (अर्थ फेस); अक्करई (ता.) à अक्करे (तंजा.म.) (अर्थ काळजी); कुप्पै (ता.) à कुप्पा (तंजा.म.) (अर्थ कचरा); लांटर्न (इं.) à लांदर (तंजा.म.) (अर्थ टांगलेला दिवा) इत्यादी.
- त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या व्याकरणात तीन लिंगांची व्यवस्था आहे. मात्र तंजावरच्या मराठीत तामिळ भाषेप्रमाणे केवळ स्त्री आणि पुरुष वगळता सर्व वस्तूंकरता नपुंसकलिंगाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ – तो माणूस, ती बायको, ते गाय, ते नदी, ते धोंडा इत्यादी.
तंजावरच्या बोलीमधील हा एक नमुना (संदर्भ- https://vishnughar.blogspot.com/ )
मझ॑ आजीम्मा, अम्मा, बापा, मझ॑ ल्हान वयेंत॑ सांगाच उपदेश :
उंबरा वलांडताने. उंबरा वर बसून काहीं खाताने. पाष्टे वेळ नुस्त पोटांत केळे खाताने. पाष्टे उठून दांत घासनास्क॑ काहीं खाऊन पीवून करताने. गांवाला जायाला ठिवलते अण्थूणावर घरांत निजताने. अण्थूणावर निजलास्क॑ काहीं खावून पीवून करताने. ओठाकलास्क॑ पाणी की कॉफी टी की पीताने. बसून पींव॑(पीम॑). ओठाकलास्क॑ औषध घेताने. बसूनच तोंडांत घालिंगांव॑. जांभाई सोडताना झालतेपूर्त तोंड झांकिंगांव॑. बाहेर जाताना नंखर॑ नीटविणी जांव॑. तोंड पुसींगून, बेष विंचिरिंगून (केंस असलतर॑ – ल्हान वयेंत असेल॑)- चोखोट घडी करलते धोत्र (वेष्टि), नाही, निजार (निक्कर), अंगरखा घालिंगून जांव॑.
आज इतक्या शतकांनंतरही मराठी भाषेशी असलेली नाळ घट्ट धरून ठेवण्यात तंजावर मराठी भाषक यशस्वी झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना अशा बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे.