मुंबईतल्या BRA गँगमधला B म्हणजेच बाबु रेशिम, ज्याच्या आयुष्यापेक्षा त्याचा मृत्यू जास्त गाजला असा एक गँगस्टर. मुंबई पोलिस आणि अंडरवर्ल्ड दोघांनाही हादरवून सोडणारं एक एन्काउंटर, जे घडवून आणलं होतं पोलिस कोठडीत. पोलिस कोठडीतलं हे एन्काउंटर नक्की कसं झालं, हे जाणून घेऊयात आजच्या लेखातून
माझगाव डॉकच्या कँटिनमध्ये बालकामगार ते नेतागिरी
1980 च्या दशकात मुंबईत BRA गँग मुंबईत चांगलीच पॉवरफुल बनली होती. ही गँग होती B म्हणजे बाबू रेशिम, R म्हणजे रमा नाईक आणि A म्हणजे अरुण गवळी यांची. बाबू रेशिमच्या पुढाकारानंच या गँगचा जन्म झाला होता. बाबू रेशिम हा मुंबईत सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, त्याचं पूर्ण नाव होतं, बाबू गोपाळ रेशिम. घरात असलेल्या दारिद्र्यानं बाबू रेशिमला शाळेपासून दूर ठेवलं. आणि उभं केलं ते माझगाव डॉकच्या कँटीनमध्ये. लहानपणीच बाबू रेशिम या कँटीनमध्ये काम करु लागला होता. तो जसा मोठा होत गेला तसा तिथल्या कामगारांशी, त्यांच्या नेत्यांशी त्याचा परिचय वाढला. तो कामगारांना त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करु लागला. पण या सगळ्याचा परिणाम त्याच्या कामावर झाला आणि त्याला कँटीनमधली नोकरी सोडावी लागली. त्यानं नोकरी सोडून दादागिरी करायला सुरुवात केली. तोपर्यंत दुसरीकडे रमा नाईक आणि अरुण गवळी यांनीही लहान-मोठे गुन्हे करायला सुरुवात केली होती. तिघंही भायखळ्यात राहायचे. भायखळा तिघांनाही त्यांच्या ताब्यात हवं होतं.
BRA गँग आणि बाबू रेशिम
लवकरच या तिघांची मैत्री झाली. वेगवेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहिलो तर आपली ताकद वाढेल आणि आपलं साम्राज्यही वाढेल असा विचार करुन तिघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. त्यावेळी भायखळा परिसरात ‘भायखळा कंपनी’ नावाच्या गँगचं वर्चस्व होतं. या तिघांनाही ते नको होतं. कारण त्याचे प्रमुख अमराठी होते. आणि मराठी नसलेल्या गुंडांकडून मुंबईत आपल्या माणसांना त्रास सहन करावा लागतोय हे रमा नाईक आणि अरुण गवळीला खटकत होतं. त्यांना त्या गुंडांना संपवायचं होतं. त्यासाठीच 1970 च्या दशकाच्या शेवटी BRA गँगची स्थापना झाली. गँग स्थापन झाल्यानंतर सगळ्यात आधी या तिघांनी भायखळा कंपनीला संपवलं. आणि आपल्या गँगचं वर्चस्व निर्माण केलं. 1980 च्या दशकात या तिघांनीही दाऊदला त्याच्या धंद्यात मदत केली. त्याचे मुंबईतले दुष्मन यांनी संपवले. पण हे दशक संपता संपता BRA गँग आणि डी कंपनीतही मतभेद निर्माण झाले आणि दोन्ही गँग एकमेकांच्या शत्रू म्हणून काम करु लागल्या.
गँगच्या आधारानंच काम करणारा गुंड
बाबू रेशिम हा काही फार मोठा गुंड नव्हता. BRA गँग त्याच्या पुढाकारानं स्थापन झाली असली तरीही, त्याचं त्यानंतरचं कर्तृत्व मात्र तेवढं मोठं नव्हतं. तो सुपारी घेऊन छोटीमोठी कामं करायचा. लोकांना धमकावणं, कामं करवून घेणं, त्यातून कमिशन घेणं, छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून हफ्ता वसुली करणं ही त्याची मुख्य कामं. मुंबईत जेव्हा गिरणी कामगारांचा संप सुरु झाला तेव्हाही तो कामगारांना कामावर जाण्यासाठी धमकावत होता. आणि त्यासाठी त्याला पैसे मिळत होते. हा संप संपवण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. तो कामगारांना धमकावून कामावर रुजू व्हायला भाग पाडत होता. पण कामगार त्याला काही बधले नाहीत आणि संपही मागे घेतला गेला नाही.
विजय उतेकरसोबत दुष्मनी
बाबू रेशिमसाठी छोटीमोठी मारामारी, हुज्जत ही नेहमीची गोष्ट होती. पण एक मारामारी, एक हुज्जत त्याच्या जिवावर बेतेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल. साधारण 1986 च्या शेवटी शेवटी भायखळ्यातल्या करंजवाडा भागात बाबू रेशिमनं एका महिलेची छेड काढली. आजुबाजूचे लोकं जमल्यावर बाबू रेशिमनं त्यांनाच उलट मारायला सुरुवात केली. यात एक तरुण होता विजय उतेकर. विजय आणि बाबूमध्ये मारामारी झाली. बाबू रेशिमनं विजय उतेकरला बेदम मारला आणि तिथुन निघून गेला. त्यानंतर तो हा प्रसंग आणि विजय उतेकर दोघांनाही विसरुन गेला. पण विजय मात्र बाबू रेशिमला विसरला नाही. त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा असं विजयनं ठरवलं आणि त्यानं बाबू रेशिमला संपवण्याचा निश्चय केला. त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो कुठे जातो काय करतो हे सगळं त्यानं जाऊन घेतलं. आणि प्लान केला. एक दिवस बाबू रेशिम हा एका दारुच्या अड्यावर त्याच्या काही साथिदारांसोबत दारु पित बसला होता. विजय तिथं आला आणि त्यानं गोळ्या झाडायला सुरुवात केली. गडबडीत बाबू रेशिमचे साथिदार जखमी झाले पण बाबू रेशिमला मात्र काहीही झालं नाही.
खुनाचा कट
विजय उतेकरचा बाबू रेशिमला संपवण्याचा एक प्लान फसला, मात्र तो त्याला मिळणाऱ्या पुढच्या संधीची वाट पहात होता. आणि त्याला संधी मिळाली. या संधीनं मुंबई अंडरवर्ल्डच नाही तर मुंबई पोलिसांनाही हादरवून सोडलं. मार्च 1987 मध्ये बाबू रेशिम आणि एका गुंडाचं भांडण झालं. आग्रीपाडा पोलिसांनी बाबू रेशिमला अटक केली आणि पोलिस कोठडीत ठेवलं. 5 मार्च 1987 च्या पहाटे तीन वाजता विजय उतेकर आग्रीपाडा पोलिस स्टेशनला आला. त्यानं तिथल्या पोलिसाला सांगितलं की, त्याला बाबू रेशिमला भेटायचंय. पोलिसांनी त्याची मागणी धुडकावून लावली आणि त्याला हाकलून दिलं. विजय उतेकर हा त्याच्यासोबत सतत बाँब ठेवत असे. त्यानं त्याच्याजवळचा एक बॉम्ब काढला आणि पोलिस स्टेशनच्या गेटवर फेकला. त्यात तो पोलिस जखमी झाला आणि पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ सुरु झाला. इकडे स्फोटाचा आवाज ऐकून बाबू रेशिमला वाटलं की, त्याला कुणीतरी सोडवायला आलंय. तितक्यात विजय उतेकर बाबू रेशिमच्या लॉकअपच्या कुलुपावर हातोड्यानं वार करु लागला. विजय कुलूप तोडून लॉकअपमध्ये आला आणि त्यानं सरळ बाबू रेशिमवर गोळ्या झाडल्या. बाबू रेशिमला काहीही समजायच्या आत त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या आणि तो खाली कोसळला. तिथंच त्याचा मृत्यू झाला. पण विजय उतेकरचा राग मात्र शांत झाला नव्हता. बाबु रेशिमचा मृत्यू झालाय हे कळूनसुद्धा, त्यानं त्याच्या हातातल्या हातोड्यानं त्याच्या डोक्यात घाव घालायला सुरुवात केली. रागाच्या भरात घाव घालता घालता ‘मी विजय उतेकर आहे’ असं तो ओरडत राहीला. बाबू रेशिमच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तरीही विजय घाव घालतच होता. त्याचा राग शांत झाल्यावर तो आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले.
पोलिसांना चपराक
पोलिस स्टेशनमध्ये येऊन पोलिस कोठडीत असलेल्या एका गुंडाचं दुसऱ्या गुंडानं एन्काऊंटर करणं ही मुंबई पोलिसांसाठीही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा आणि जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न दोन्ही एरणीवर आले होते. त्यामुळं लवकरात लवकर विजय उतेकरला शोधणं हे पोलिसांसाठी महत्वाचं होतं. काही दिवसांतच दादरला एका हॉटेल रुममध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये विजय उतेकरचा मृत्यू झाला.
दाऊदचा हात
असं म्हटलं जातं की BRA गँगमधल्या सगळ्यात पहिल्या मेंबरला संपवण्यात दाऊदचा हात होता. कारण विजय उतेकरचा बाबू रेशिमवर कितीही राग असला तरीही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याला संपवणं हे त्याला एकट्याला शक्य नव्हतं. विजय उतेकरनं जेव्हा पहिल्यांदा बाबू रेशिमवर गोळ्या झाडल्या होत्या त्यावेळी ही बातमी दाऊदचा राईट हँड छोटा राजनला समजली. छोटा राजनने विजय उतेकरला भेटून बाबू रेशिमला संपवण्यासाठी हवी ती मदत करायला तयार असल्याचं सांगितलं. प्लान बनवून बाबू रेशिमला मारुन पळून जाऊन लपून बसेपर्यंत सगळी मदतही केली.