फरिदा लांबे यांचं शिक्षणाशी जुळलेलं समीकरण!

Damini : 1992च्या दंगलीनंतर एकट्या मुंबईत सुमारे दोन लाख मुलं शाळाबाह्य होती. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून 1995 साली डॉ. माधव चव्हाण आणि फरिदा लांबे यांनी ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. प्राथमिक शिक्षण, बालकामगारमुक्तता, कौशल्यविकास, सेकंड चान्स अशा अनेक उपक्रमांद्वारे फरिदा लांबे भारताच्या कित्येक पिढ्यांना दिशा देण्याचं काम गेली 50 वर्ष करत आहेत.
[gspeech type=button]

1992 सालच्या दंगलीनंतर मुंबईत सर्वच समाजघटकांचे नुकसान झाले होते, त्यातही ज्यांची कुटुंबं मारली गेली किंवा आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाली त्यांच्या मुलांचे तर बालपणच कोमेजून गेले. अनेक मुलांची शाळा कायमची सुटली. ते बालमजूर म्हणून काम करायला लागले, अनैतिक व्यवसायात आणि गुन्हेगारीत गोवलं जाण्याची शक्यता तर मोठीच. सामाजिक कार्यात आणि शिक्षणाला महत्त्वाचे मानणाऱ्या काहींनी युनिसेफ, निर्मला निकेतन महाविद्यालय यांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचे एक सर्वेक्षण केले. आणि त्यातून पुढे आलेला आकडा धक्कादायक होता. एकट्या मुंबईत सुमारे दोन लाख मुलं शाळाबाह्य होती. शासन व्यवस्था या आकड्यावर सहजासहजी विश्वास ठेवायला राजी नव्हती. मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू होणं गरजेचं होतं. लहान बालकांना बालवाडीची गरज होती. गरीब परिस्थितीतल्या पालकांचा महानगरपालिकांच्या शाळांवर विश्वास होता. त्यांना तिथलं शिक्षण परवडत होतं. पण समाजातला उच्चभ्रू वर्ग मात्र म्युन्सिपाल्टी म्हणजे उल्टीपाल्टी!’ म्हणत शासकीय शिक्षणावर फुलीच मारू बघत होता. ही सगळी परिस्थिती बदलायलाच हवी, चांगलं शिक्षण असेल तरच पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल असेल, याची खात्री असलेल्या दोघांनी सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून 1995 साली प्रथम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. त्या दोघांची नावं आहेत – डॉ. माधव चव्हाण आणि फरिदा लांबे.  

इतरांची मदत करणं हे आपलं कर्तव्य

फरिदाताईंचा जन्म मुंबईचाच, मात्र त्यांचं कुटुंब मूळचं रत्नागिरीचं. वडील अली मुकादम त्या काळच्या खारलँड बोर्डमध्ये मामलेदार. त्यांच्या गावातील, पहिल्यांदा मुंबईत येणारे, सरकारी नोकरीत लागून अधिकारी होणारे अली मुकादम या पहिलीच व्यक्ती. फरिदाताईंची आईसुद्धा त्या काळातली सातवी व्हर्नाक्युलर फायनल शिकलेली. हे कुटुंब अनेकदा कोकणातल्या गावी जायचं. त्यांच्या मुंबईतल्या घरी अनेक गरजू व्यक्ती मुक्कामी यायच्या. शिक्षणासाठी- आर्थिक अडचणींसाठी मुकादम कुटुंब कायम मोठ्या हाताने गावातल्या सर्वांनाच मदत करायचं. आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण सगळ्यांनाच संधी मिळत नाहीत. तर ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. हे करून आपण कुणावर उपकार करत नाही हा त्यांच्या आई वडिलांनी घालून दिलेला संस्कार फरिदाताईंच्या मनावर कायम रूजला. शिक्षणाला, प्रगतीला महत्त्व देणारं हे उदारमतवादी कुटुंब. कोकणातील आणि मुंबईतील प्रागतिक वातावरणाचा, जात- धर्म- भाषिक भेद नसलेल्या वातावरणाने आमचं बालपण समृद्ध होतं, हे फरिदाताई आवर्जून सांगतात. त्यांना सर्वधर्मिय मित्रमंडळी होती, भरपूर वाचन- खेळ याचा आनंद सगळेजण घ्यायचे. फरिदाताईंच्या मोठ्या बहिणीने हबिबाने तर त्या काळची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती संस्कृत या विषयांत कमावली होती.

खेळामुळं व्यक्तिमत्वाचा विकास

फरिदाताईंना शाळेत आणि महाविद्यालयात असताना खेळाची खूप आवड. धावणे, रिले, हॉकी, बास्केटबॉल अश्या अनेक खेळांत त्यांनी पन्नासहून अधिक पदकं मिळवलेली. वडिलांना त्यांच्या या कर्तुत्त्वाचा सार्थ अभिमान होता. पुढे कॉलेजात गेल्यावर तुमची मुलगी शॉर्टस घालून खेळायला जाईल, कसं दिसेल ते?” असे प्रश्न नातेवाईकांना पडायचे. पण वडिलांनी कधीही कसलीही बंधनं आपल्यावर घातली नसल्याचे आणि त्यापेक्षा माझा खेळ, कर्तुत्त्व, आनंद याला महत्त्व दिल्याचे फरिदाताई सांगतात. टीमवर्कला महत्त्व, स्वत:कडे श्रेय न घेणे, सर्वांच्या सांघिक कामगिरीला श्रेय देणे आणि आयुष्यात कॅलक्युलेटेड रिस्क घेणे, हे महत्त्वाचे गुण खेळातून शिकल्याचे त्या सांगतात, ज्याचा पुढे समाजकार्यात पदोपदी उपयोग झाला.

माणुसकीला जपणारं कुटुंब

फरिदाताई सांगतात, अनेक जण मला आणि आमच्या कुटुंबाला बघून म्हणायचे, तुम्ही कट्टर वाटत नाही, मुस्लिम आहात हे जाणवत नाही. आमचं मराठी बोलणं, सांस्कृतिक समृद्धी यातून आपण मुसलमान आहोत या पेक्षा एक सुसंस्कारी, चांगली मराठी व्यक्ती आहोत हीच ओळख घरच्यांनी निर्माण केली होती. नमाज, उपासतापास करायलायाच हवेत, ते न करणारे पापी वगैरे अशी बंधनं कधी आई वडिलांनी आमच्यावर घातली नाहीत. आपली पूजा, श्रद्धा या घरापुरत्या मर्यादीत असाव्यात हीच शिकवण. गांधीहत्येनंतरच्या दंगलीत माझ्या वडिलांनी काही हिंदु मुस्लिम लोकांना एका ग्रंथालयात लपवून वाचवले होते. तेव्हा ते पनवेलचे मामलेदार होते. पुढे अनेक वर्षं त्यांचा फोटो पनवेलच्या त्या ग्रंथालयात लावलेला होता.

राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनी ते समाजकार्य कॉलेजच्या उपप्राचार्य

एकूणच सामाजिक सौहार्द असलेल्या, माणुसकीला सर्वोच्च मानणाऱ्या कुटुंबात फरिदाताईंचे पालनपोषण झाले. फरिदाताईंच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी किंवा त्यांच्या भावाने आयएएस बनावे म्हणून फरिदाताईंनी राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हा विषय घेऊन पदवी घेतली. पुढे एकदा कॉलेजमध्ये मिस बेकर या अमेरिकेहून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या बाईंचे व्याख्यान झाले. अमेरिकेतून आलेली बाई समाजकार्य करतेय, आपण काय करतोय आपल्या समाजाविषयी? असं वाटलं आणि समाजकार्य शिकण्यासाठी फरिदाताईंनी निर्मला निकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला. निर्मला निकेतन महाविद्यालयातून त्यांनी समाजकार्याची पदव्युत्तर पदवी घेतली आणि तिथेच त्या प्राध्यापिका म्हणून रूजू झाल्या. पुढे निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली. 

समाजकार्य हा फिल्डवर शिकण्याचा विषय

निर्मला निकेतनमध्ये समाजकार्य शिकविताना हा विषय चार भिंतीत शिकायचा नसतो, तर फिल्डवर जाऊन काम करण्याचा असतो, हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर पक्के ठसविले. त्याकाळी शाळा गळतीचे प्रमाण मोठे होते. धारावी, जोगेश्वरीच्या मनपा शाळात वस्त्यात निर्मला निकेतनचे विद्यार्थी, कार्यकर्ते पाठवून शिक्षणाला सुरूवात केली. मुलांना पुस्तके, गणवेष, खेळणी पुरवली. त्यांच्या काळात दुसरा गाजलेला उपक्रम म्हणजे मनपा शाळांमधील वासंतिक छंद वर्ग, जो  उपक्रम अजूनही अनेक शाळांत चालू आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतले छंदवर्ग नवीन कौशल्य शिकायला मुलांना फार आवडायचे. याच दरम्यान फरिदाताईंचे लग्न मर्चंट नेव्हीत असणाऱ्या कॅप्टनशी झाले. माझे समाजकार्य आणि नोकरी मी चालूच ठेवणार हे त्यांनी लग्नाआधीच स्पष्ट केले होते. आयुष्याचा नवा प्रवास सुरू होताना पती आणि सासरच्या लोकांनी देखील भरपूर पाठिंबा दिल्याचे फरिदाताईंनी आवर्जून सांगितले. त्यांच्या कामाचे, त्यांच्यावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या- लेख याचे कौतुक जसे वडिलांना होते, तसेच ते सासूबाईंना सुद्धा होते. 

मुलांसाठी नाईट केअर सेंटर

फरिदाताई त्या काळातल्या कामांच्या आठवणी सांगतात. प्रिती पाटकर पै यांनी- प्रेरणा संस्थेमार्फत वेश्याव्यवसायातल्या बायकांच्या पुनर्वसन आणि त्यांच्या मुलांकरिता नाईट केअर सेंटर मनपा शाळेत सुरू केले होते. या कामात माझा सक्रिय सहभाग होता.शरीरविक्रय करणाऱ्या माता लहान मुलांना अफू द्यायच्या किंवा ट्रॅक्विलायझर देऊन झोपवायच्या, पण तिथं मुलांना ठेवणं हे नकारात्मक वातावरण होतं म्हणून आम्ही नाईट केअर सेंटर सुरू केलं. संध्याकाळी सात वाजता हे सेंटर सुरू व्हायचं ते दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत सुरू असायचे. सुरूवातीला याचा भरपूर त्रास झाला, या बाई वेश्यांना त्यांचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देतात, अशी टीकाही माझ्यावर झाली. पण नाईट केअर सेंटरची पॉलिसी भारत सरकारने स्वीकारली आहे. आजही फोरास रोड परिसरातील शाळेत हे सेंटर सुरू आहे. कारण महिला व बालविकास विभागाचे धोरण हे आहे- जिथे वेश्यावस्ती आहे, तिथे नाईट केअर सेंटर असावे.

कोणत्याही एका पालकाच्या नावाचा शासननिर्णय

या वस्तीतील मुलांना शाळेत जायचं होतं, त्यासाठीची मदतही आम्ही केली. शाळेच्या प्रवेशावेळी वडिलांचं नाव काय लिहायचं यावर घोडं अडायचं. त्यावर हिंदू धर्मातल्या 33 कोटी देवांपैकी एखाद्या देवाचं नाव सांगून, प्रश्न सोडवूयात असं एका देहविक्री करणाऱ्या बाईंनीच सांगितलं. मुलांचा शाळेत प्रवेश झाला, प्रश्न सुटला, ती मुलं मार्गी लागली. या अनुभवानं आम्हाला खूप शिकवलं. कुमुद बन्सल मॅडम तेव्हा शिक्षणसचिव होत्या, त्यांच्याशी हे आम्ही बोललो अनेकांकडे जन्म दाखला नसतो, वडिलांचं नाव नसतं मग त्या मुलांचा शाळा प्रवेश कसा करणार? तेव्हा नुकतेच सर्व शिक्षा अभियान सुरू झाले होते आणि तेव्हाच पालकांमध्ये दोन्ही पैकी एका पालकाचे नाव शाळा प्रवेशासाठी पुरेसे असेल, असा शासन निर्णय त्यांनी घेतला आणि तो पुढे पूर्ण भारतात त्याची अंमलबजावणी झाली.”

1992च्या दंगलीनंतर प्रथमची स्थापना

दरम्यानच्या काळात 1992 सालची मुंबईतली दंगल झाली. त्यावेळीही समविचारी लोकांसोबत फरिदाताई दंगलीनंतरच्या मदत आणि पुनर्वसन कार्यात सहभागी होत्या. तत्कालीन लोकांच्या पुढाकारातून धार्मिक- जातीय सलोख्यासाठी अस्तित्त्वात आलेल्या मोहल्ला कमिट्या, सदभावना समित्या आजही कार्यरत आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे 1995 साली डॉ. माधव चव्हाण आणि फरिदा लांबे यांनी मिळून प्रथम संस्थेची स्थापना केली. प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायलाय हवे या विषयावर त्यांनी काम सुरू केले. पालकांना विश्वासात घेऊन सुरूवातीला 10 बालवाड्या सुरू केल्या. वस्तीतल्याच समाजमंदिरात बालवाड्या चालवल्या, मुलांना 10 रू. फी तर शिक्षकांना 150 पगार. एखादी दहावी, बारावी शिकलेली वस्तीतलीच विधवा, परित्यक्ता महिला त्यांची शिक्षिका असे. रस्त्यांवर, एसटी स्थानक आणि रेल्वे स्टेशनवर प्रथमने मुलांसाठी शेल्टर सुरू केले, तिथं मुलांना आंघोळ आणि खाऊ घालण्यापासून प्रथमचे कार्यकर्ते काम करत. मग 4000 बालवाड्यांपर्यंत विस्तार झाला, पुढे सरकारला याचे महत्त्व पटलं आणि मुबंईत शासनातर्फे ICDS तर्फे अंगणवाड्या सुरू झाल्या.

बालकामगारांच्या सुटकेचे महत्त्वाचे काम

ज्या कामाविषयी अतिशय समाधान वाटते ते काम म्हणजे बालकामगारांच्या सुटकेविषयीचे प्रथमचे काम. बालमजुरीवर काम करायचं तर याबाबतची माहिती काढायला सुरूवात केली, तर सरकारकडून सांगण्यात आले की, मुंबईत अजिबात बालमजूर नाहीत, महाराष्ट्रात 400 मुलंबालमजूरअसतील, असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. त्याच दरम्यान  सर्व शिक्षा अभियानाचा सर्व्हे करताना आम्हाला 7900 शाळाबाह्य मुलं सापडली, त्यातली 40 टक्के मुलं  तर धारावीतल्या फॅक्टरीत काम करत होती. याच काळात एका बालकामगार मुलाने मालकाला मसाज न केल्याने त्याचा गरम पाणी आणि तेल ओतून खून करण्यात आला, ही बातमी माझ्यासाठी ट्रिगर ठरली, मला त्या बातमीने फार आतून अस्वस्थ केले.

2 वर्षात 45 हजार बालकामगारांची सुटका

तेव्हा शरद पवार केंद्रात मंत्री होते, तर आर आर पाटील गृहमंत्री होते. मुंबईत खूप मोठ्याप्रमाणात बालकामगार आहेत, याची पहिली टीप आर आर पाटील यांना मी दिली. मदनपुऱ्यात 437 मुलं अडकलेली आहेत असं सांगितलं, त्यांनी लगेच आबांना हे कळविले, आबाही अस्वस्थ झाले. आम्ही पोलिसांच्या मदतीने प्लॅन केला आणि मदनपुरामध्ये पहिली रेड झाली 440 मुलं सापडली. त्यांच्याकडून साडीवर एम्ब्रायडरी करण्याचे काम करवून घेतले जायचे आणि त्याचा एकही रूपया त्यांना मिळायचा नाही. आर आऱ पाटील यांच्या नेतृत्त्वात टास्क फोर्स तयार करून 2007 ते 2009 मध्ये आम्ही 45 हजार मुलांची अश्या धोकादायक कामांतून आम्ही सुटका केली. बाहेरच्या राज्यातून अर्थात बिहार, राजस्थान (चपला- मोजडी बनविणे), भुवनेश्वर (ओडिशा) अश्या ठिकाणाहून भरपूर बालकामगार यायचे, त्यांना रेल्वेच्या स्पेशल कोचने पुन्हा घरी पाठविले.

बालकामगारांच्या पुनर्वसनात प्रथमची महत्वाची भूमिका

या काळात बालकामगारांचा प्रश्न कसा हाताळावा, त्यासाठी Standard Operating Procedure काय असावी हे काहीच ठरलेले नव्हते. हे सगळं ठरविण्यात, बालमजुरांचे पुनर्वसन करण्यात, धोरणं आखण्यासाठी आम्ही शासनाला मदत केली.  बालमजुरी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा घडवून आणताना, प्रथमसदस्यांचं म्हणणं आणि मांडलेला अभ्यास विचारात घेतला गेला. बालमजुरी प्रतिबंधक कायद्यात धोकादायक आणि कमी धोकादायक कामे अशी वर्गवारी न करता कोणतेच काम लहान मुलांना करू देऊ नये, हा धोरणात्मक बदल घडविण्यात प्रथमचा मोठा वाटा आहे. ‘आमच्याकडे बालकामगार काम करत नाहीतया पाट्या दुकानांना पुरविल्या, महाराष्ट्रात या पाट्या लागण्याचे श्रेय प्रथम चेच. फरिदाताई अभिमानाने सांगत होत्या.

असर सर्वे राष्ट्रीय शिक्षणाचा आरसा

य़ाशिवाय 2005 पासून दरवर्षी प्रथम Annual status of education report अर्थात असरचा अहवाल प्रसिद्ध करते. बालकांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी स्वयंसेवकांतर्फे हे सर्वेक्षण केले जाते. सहा ते चौदा वयोगटातील मुलांच्या वाचन, लेखन, गणितीय कौशल्यांची प्राथमिक परीक्षा भारतातील 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांत घेतली जाते. यात सरकारला फक्त आरसा दाखवला जातो, त्यात आम्ही शिक्षकांवर दोषारोप ठेवत नाही. अनेकदा पाचवीतल्या मुलांना दुसरीच्या बेरीज- वजाबाकी, वाचनक्रिया करता येत नाहीत, आणि याचमुळे असरवर आधी टीका व्हायची, पण आता शासकीय यंत्रणासुद्धा असरच्या अहवालाला महत्त्व देतात. शिवाय मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी  Teaching at the Right Level हा कार्यक्रमही प्रथम राबविते. या खेरीजही कौशल्यविकास साधून तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक निवासी प्रशिक्षण सेंटर, शाळा मध्येच सुटलेल्यांसाठी सेकंड चान्स याशिवाय डिजिटल शिक्षणाचे असे अनेक उपक्रम प्रथममार्फत देशभरात सुरू आहेत. या सगळ्यासोबत मुलींचे महिलांचे सबलीकरण चांगल्या प्रकारे व्हावे, यात फरिदाताईंना वैयक्तिक रस आहे. आज वयाच्या 74 व्या वर्षीही त्या कार्यरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ