मनोरंजन, संगीत, कलाकार यांना भाषेचं बंधन नसतं हे आपण सगळेच मान्य करतो. कारण, कोणतीही कला ही मनापासून व्यक्त होत असते आणि मनापर्यंत पोहोचत असते. सध्या आपण बघतच आहोत की, दाक्षिणात्य नायक, नायिका हे देशभरातील प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. रश्मीका ही आता केवळ दक्षिणेकडची अभिनेत्री नसून ती एक ‘नॅशनल क्रश’ झालेली आहे. तसंच, आपले मराठी सयाजी शिंदे हे दक्षिणेकडे तयार होणाऱ्या सिनेमातील लोकप्रिय खलनायक झाले आहेत. दलजीत दोसाज् या पंजाबी गायकाचे मुंबईतील स्टेज शोज् हे हाऊसफुल होत आहेत. एकंदरीत, सारं काही आलबेल सुरू आहे. एकच फक्त खंत आहे की, स्वभावाने भिडस्त असलेल्या आपल्या मराठी कलाकारांना बॉलीवूडने मागच्या काही वर्षांत मात्र आयटी मध्ये बसवतात तसं ‘बेंचवर’ बसवलं आहे.
दमदार भूमिकांकरता विचार नाहीच
मराठी कलाकार सध्याच्या हिंदी सिनेमांमध्ये दिसत आहेत; पण, त्यांचे रोल हे नाना पाटेकर यांनी एकेकाळी साकार केलेल्या ‘गुलाम ए मुस्तफा’ सारखे दमदार नाहीयेत. ‘क्रांतीवीर’ मध्ये ज्या प्रकारे नाना यांनी आपल्या खणखणीत आवाजाने, बोलण्याच्या एका विशिष्ट लकबीने, गतीने पूर्ण बॉलीवूडला आपली दखल घ्यायला लावली होती, ते पुन्हा कोणती मराठी व्यक्ती किंवा कलाकार करू शकला नाही. ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्याराह’ सारख्या सिनेमातून ज्या प्रकारे नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर टॉल, डार्क अँड हँडसम जॉन अब्राहमला फिकं पाडलं होतं, ते नंतर कोणालाही जमलं नाही.
स्वतःला पुढं आणण्यात कमी
आज संतोष जुवेकर हा आपल्याला ‘छावा’ मध्ये दिसतो, प्रभावित करतो. पण, जेव्हा सिनेमाच्या अनुभवावर त्याला बोलायला सांगितलं जातं, तेव्हा तो स्वतःला अगदीच बॅक फुटवर ठेवतांना दिसतो हे आपण नुकत्याच गाजलेल्या एका मुलाखतीतून बघितलंच आहे. “दिल्ली चे ही तख्त राखतो” हे आपण गाण्यात म्हणतो, पण खरंच मराठी मनाने ते मान्य केलं आहे का ? हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. कारण, जशी वागणूक ही आपण स्वतःला देत असतो, तशी वागणूक ही आपल्याला समोरच्या व्यक्ती, इंडस्ट्रीकडून मिळत असते, हे मराठी कलाकारांना सांगायची गरज आहे असं सध्या प्रकर्षाने वाटत आहे.
हे ही वाचा : नाट्यगृहांच्या अवस्थेला सरकार जबाबदार की प्रेक्षक?
दृष्टीकोनात बदल गरजेचा
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर ही फळी जेव्हा मराठी सिनेमांना पुढे नेत होती, तेव्हा त्यांना हिंदी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत होतं. या तिघांपैकी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ मधून साकारलेले रोल्स आपल्या लक्षात असतीलच. एका सिनेमामध्ये आपला लाडका ‘लक्ष्या’ हा नायक सलमान खानचा मित्र झाला होता, ज्याला मोजकेच संवाद होते. दुसऱ्या सिनेमात त्याने घरातील नोकर साकारला होता. हा रोल लक्षात रहाणारा होता. प्रिया बेर्डे यांच्यासोबतची त्याची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना आवडली होती. पण, सिनेमाची दिशा ठरवतील अशी ती पात्र नव्हती. दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू याला जेव्हा बॉलीवूडमध्ये काम करण्याबद्दल मध्यंतरी विचारण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की, “बॉलीवूड निर्माते हे माझी फिस अफोर्ड करू शकणार नाहीत.” तो देखील एक प्रादेशिक अभिनेता आहे, पण दोघांच्या स्वभावात, स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीकोनात किती फरक आहे ? हे आपल्याला या एकाच उदाहरणातून लक्षात येऊ शकतं.
अशोक सराफ यांची छाप
अशोक सराफ यांनी ज्यावेळी हिंदी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय आणि व्यक्तिमत्व हे नायक किंवा तत्सम महत्वाचं पात्र साकारता येईल असं नव्हतं. ‘येस बॉस’ मध्ये त्यांनी साकारलेला आदित्य पांचोलीचा व्यक्तिगत सहाय्यक हा संयमी होता. शाहरुख खानने जरी या सिनेमात सर्वात महत्वाची भूमिका केलेली असली तरीही आपल्या अशोक मामांनी ‘चांद तारे…’ या गाण्यात त्याच्यासोबत ट्रकवरून प्रवास केला आणि एकंदरीत सिनेमावर आपल्या सहज अभिनयाची त्यांनी छाप सोडली. अशोक सराफ यांनी पुढे ‘कोयला’, ‘करण अर्जुन’ या सिनेमांमधून देखील काम केलं आणि हिंदी सिनेमाच्या लोकप्रिय खलनायक अमरीश पुरी यांच्यासमोर ते त्यांच्या तोडीचे कलाकार वाटले. त्यांचा “ठाकूर तो गियो” हा संवाद प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. मोजक्या पण महत्वाच्या भूमिका असतील तरच हिंदी सिनेमातून काम करत अशोक सराफ यांनी आपलं महत्व अबाधित ठेवलं असं आपण म्हणू शकतो.
हे ही वाचा : मुंबई आणि बॉलीवूडचं कनेक्शन
सचिन पिळगावकरांचा अपवाद
सचिन पिळगावकर यांची एकूण अभिनय कारकीर्द ही पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे. ‘एका पेक्षा एक’ सरस भूमिका करत त्यांनी हिंदी कलाकार, निर्मात्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. ‘शोले’ मधील ए के हंगल यांचा कोवळा मुलगा असो किंवा ‘आखीयोके झरोके से’ मधील साधारण सावळा दिसणारा मुलगा असो आपले महागुरू हे प्रत्येक रोलमध्ये आत्मविश्वासाने वावरले. अभिनय, गायक, निर्माता, दिग्दर्शक अशा सर्वच पात्र साकारत सचिन जी हे मराठी सिनेसृष्टीत जास्त व्यस्त राहिले. सोनू निगम यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत स्थिरावण्यासाठी सचिनजींनी केलेली मदत याबद्दल सोनू हे नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतात.
स्मिता पाटील यांचा प्रभाव अजूनही
मराठीतील प्रस्थापित कलाकार ज्यांनी बॉलीवूडमध्ये कामं केली आणि अशा मराठी व्यक्ती ज्यांनी बॉलीवूडमध्येच केवळ जास्त काम केलं अशी जर यादी केली तर असं लक्षात येतं की, दुसऱ्या प्रकारात मोडणारे कलाकार अधिक आहेत. जसं की, स्मिता पाटील, ज्यांचं नाव आज देखील प्रेक्षक, दिग्दर्शक खूप सन्मानाने घेत असतात. ‘मिर्च मसाला’, ‘अर्ध सत्य’, ‘मेरा घर मेरा देश’, ‘बाजार’, ‘नमक हलाल’, ‘आक्रोश’, ‘मंथन’ सारख्या सिनेमांमधून स्मिता पाटील यांनी आपली जी काही ओळख निर्माण केली आहे ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. गोविंद निहलानी, श्याम बेनेगल सारख्या दिग्दर्शकांसोबत काम करून स्मिता पाटील यांनी केवळ अभिनेत्री म्हणून स्वतःचं करियर घडवलं नाही तर त्यांनी प्रेक्षकांना ‘समांतर’ सिनेमा प्रकारासोबत जोडलं. स्मिता पाटील या अभिनेत्री होण्यापूर्वी दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. अवघं 31 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या नायिकेला 1985 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2013 मध्ये स्मिता पाटील यांच्या नावाने भारत सरकारने पोस्ट तिकीट तयार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ
स्मिता पाटील यांच्यानंतर बॉलीवूडमध्ये इतकं यश मिळवणारी नायिका जर कोणी असेल तर ती ‘माधुरी दिक्षीत’ आहे. ‘अबोध’ या सिनेमा पासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या माधुरी दिक्षीतने मराठी मुलगी हिंदी सिनेमांमध्ये काम करू शकते हे सिद्ध केलं. आपले हिंदीचे उच्चार, बॉलीवूड डान्स मधील प्राविण्य या जोरावर या ‘धकधक गर्ल’ला बॉलीवूडने ‘एक्सटर्नल’ सारखी ट्रीटमेंट कधीच दिली नाही. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनात आजही “मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूं” ही इच्छा असते यातच तिचं यश सामावलेलं आहे.
सोनाली बेंद्रे सर्व माध्यमात यशस्वी
सोनाली बेंद्रे, ममता कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर यांनी देखील बॉलीवूडमध्ये आपला एक काळ गाजवला. सोनाली बेंद्रेचा ‘सरफरोश’, ममता कुलकर्णीचा ‘सबसे बडा खिलाडी’, उर्मिला मातोंडकरचा ‘रंगीला’ हे सिनेमे या मराठी मुलींसाठी टर्निंग पॉईंट ठरले. या तिन्ही अभिनेत्रांपैकी केवळ सोनाली बेंद्रे अशी कलाकार आहे जी एक मोठी इनिंग खेळू शकली आणि आजही ती जाहिरात, सिनेमा, वेबसिरीज मधून प्रेक्षकांशी कनेक्टेड आहे. ममता यांनी कित्येक बॉलीवूड ऑफर्सला नाकारून नुकताच संन्यास घेतला आणि उर्मिला या कधी एका दिग्दर्शकाच्या पुढे सरकल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांचं करिअर तितकं फुललं नाही.
हे ही वाचा : बॉलीवूडमध्ये मराठी मुली का कमी होत आहेत?
आपल्या निकषांवर काम करणारे चरित्र अभिनेते
चरित्र अभिनेत्यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला तर हे लक्षात येतं की, विक्रम गोखले यांनी बॉलीवूड मध्ये चांगल्या, महत्वाच्या भूमिका वठवल्या आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील नंदिनीचे वडील ही त्यांनी साकारलेल्या पात्रांपैकी सर्वात लक्षात राहणारं पात्र म्हणता येईल. भुलभुलैय्या मधील त्यांची भूमिका देखील छोटी, पण महत्वाची होती. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर हे असे दिग्गज कलाकार म्हणता येतील ज्यांनी बॉलीवूड सिनेमांमध्ये देखील आपल्या टर्म्स वर काम केलं. अतिरिक्त पैसा, प्रसिद्धी मिळतील या आशेने या कलाकारांनी कधीच कोणतं अनुचित पात्र मोठ्या पडद्यावर साकारलं नाही. दिलीप प्रभावळकर यांनी राजकुमार हिरानी दिग्दर्शक असलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील महात्मा गांधींची भूमिका ही सिनेमातील काल्पनिक पण महत्वाचं पात्र होतं हे बघतांना प्रत्येक मराठी प्रेक्षकाला एक वेगळाच आनंद होत होता.
आपले मराठी कलाकार हे अगदी प्रभास किंवा अल्लू अर्जुन इतके लोकप्रिय नाही झाले तरी निदान नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान यांच्या सारख्या लक्षणीय भूमिकेत जरी मोठ्या पडद्यावर दिसत राहिले तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ‘आपला माणूस’ दिसल्याचं समाधान वाटेल याची खात्री आहे म्हणून या विषयाला हात घालणं गरजेचं होतं.