“काय गं राधा, अशी एकटीच का बसलीयेस? आणि डोळे का लाल झालेत? रडलीस वाटतं? परत भांडणं झाली का?”
कॉलेजमधून घरी येताना कॉलनीच्या दाराशीच आठवीत शिकणारी राधा दिसली. एकटीच कॉलनीच्या गेटपाशी असलेल्या बाकड्यांवर बसली होती. मी दिसले तसं तिला अजूनच रडायला आलं. तसंच गळकं नाक पुसत म्हणाली, “काही नाही गं मावशी, असंच!”
“काही कसं नाही? काहीतरी नक्की झालंय! नाक बघ तुझं कसं लालेलाल झालं आहे.”
“अगं आमच्या वर्गाचा व्हॉट्स अप ग्रुप आहे ना, तर त्यातल्या काही जणांनी मिळून एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात त्यांनी मला घेतलं. अजून पण दुसऱ्या शाळेची, आमचे सिनिअर्स अशी काही मुलं आणि मुली आहेत त्यात.”
“मग?”
“कालपासून सगळे तिथे मला सारखं चिडवतायेत. सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही. पण आता ग्रुपवर सारखं तेच ते बोलतायत गं!”
“काय झालं ते नक्की सांग.”
“माझं वजन बघ वाढलंय किती…सगळ्यांनी स्वतःचे फोटो त्या ग्रुपवर टाकले म्हणून मी पण टाकला तर आता मला सगळे ढोलू, पांढऱ्या हत्तीचं पिल्लू, पांढरं अस्वल आणि काय काय म्हणतायेत. एक जण तर म्हणाला, मी इतकी जाड आणि घाण दिसते की, मी एक दिवस फुटून जाईन.. असं कुणी फुटतं का? मला सगळे अग्ली म्हणतात.”
“कोण आहेत गं ही पोरं, नावं तरी सांग.. बघूया एकेकांच्या आईबाबांकडे तक्रारच करुया.”
“नको! मग ते मला आणखीन त्रास देतील. तुला माहितेय, एकाने तर माझा फोटो मॉर्फ केला. म्हणजे एका खूप जाड बाईच्या चेहऱ्यावर माझा चेहरा चिकटवला. त्या फोटोतल्या बाईचे कपडे इतके छोटे होते, इतकं कसंतरीच दिसत होतं ना ते…”
“अगं तू हे सगळं खपवून का घेतेयस?”
“तसं नाहीये, मी आणि अजून एकदोन मैत्रिणींनी त्याला जाब विचारला तर तो म्हणाला मी मज्जा करतोय. सिरिअसली घेऊ नका. खूप वाईट मुलं आहेत ती आणि माझ्या वर्गातले काही मित्र मैत्रिणीही त्यांच्याबरोबर मला काहीही बोलत असतात. मला खूप वाईट वाटतंय. मी खूप घाण दिसते ना गं !”
“ए वेडाबाई, तू खूप मस्त दिसतेस, ती वाहयात मुलं आणि मुली अग्ली आहेत, दिसायला नाही, वागायला.. समजलं?”
“म्हणजे?”
“अगं ते तुला सायबर बुली करतायेत..?
“काय करतायेत…?
“सांगते, आपल्याला फोन मिळतो, आपण ऑनलाईन जातो. सोशल मीडिया वापरतो, ग्रुप चॅटमध्ये असतो पण आपल्याला तिथे आपलेच मित्रमैत्रिणी किंवा अनोळखी माणसं त्रास देऊ शकतात हे माहिती नसतं.”
“हम्म.. पण हे कुणी सांगत नाही ना..”
“बरं, बरं! नाक पूस आधी, सगळं सांगते तुला.. एक एक करुन.. सुरुवात करूया सायबर बुलिंगपासून…”
“चालेल… मग ते चिडवणार नाहीत ना मला?”
“त्यांनी चिडवलं, त्रास दिला तरी तू कसं वागायचंस आणि त्यांना कसं रोस्ट करायचं हे तुला माहित असायला हवं. आणि खूप त्रास दिला तर सरळ तक्रार करायची, आईबाबांकडे, शाळेकडे नाहीतर पोलिसांकडे.”
***
राधा सारखा अनुभव कधीतरी व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नाहीतर इन्स्टा, स्नॅपचॅट गृपमध्ये सगळ्यांनाच येतो. जवळच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला ऑनलाईन गृपमध्ये कुणीतरी त्रास दिल्याचं आपण अनुभवतो. या प्रकाराला म्हणतात सायबर बुलिंग. आज भारतातला सगळ्यात मोठा सायबर गुन्हा (क्राईम) कुठला आहे? तर तो सायबर बुलिंग.
इंटरनेट वापरताना सुरक्षा
कोरोना महामारीदरम्यान सगळ्या मुलांच्या हातात खूप लवकर मोबाईल आले, वेगवेगळे गृप्स तयार झाले. पण तिथल्या सुरक्षिततेबद्दल मुलांना फारसं कुणी सांगितलं नाही. सायबर स्पेसमध्ये म्हणजेच इंटरनेटवर वावरताना आपली सुरक्षा खूप महत्वाची असते. शाळेत मुलांना गुड टच, बॅड टच शिकवला जातो. त्याविषयी सांगितले जाते. पण इंटरनेटवर कुणी मुलांना चुकीचा स्पर्श करत नाही, अंगाला नको तिथे हात लावत नाही पण, इथे चुकीचे शब्द, भाषा वापरुन, टोमणे मारुन मुलांना त्रास दिला जाऊ शकतो. जसा राधाच्या त्या मित्र मैत्रिणींनी तिला दिला. इतका, की आपण दिसायला छान नाही, घाण आहोत असा काहीतरी समज राधाने करुन घेतला.
यालाच म्हणतात सायबर बुलिंग.
सायबर बुलिंगचे प्रकार
सायबर बुलिंग हा अतिशय गंभीर प्रकारचा सायबर गुन्हा आहे. सायबर बुलिंगला ऑनलाईन बुलिंगही म्हटलं जातं. बुलिंग म्हणजे गुंडगिरी. एक प्रकारचा छळ. चॅटिंग, ईमेल या माध्यमातून जर कुणी एखाद्याला धमकावत असेल, त्रास देत असेल, अपमान करत असेल, वाईटसाईट बोलत असेल, घाबरवत असेल, अश्लील बोलत असेल, अश्लील चित्र किंवा फोटो दाखवत असेल तर या सगळ्यालाच सायबर बुलिंग म्हटलं जातं. काहीवेळा नुकत्याच टीनएजर झालेल्या मुलामुलींना आपल्याला कुणीतरी बुली करतंय हेही लक्षात येत नाही. तसंच आपणही कुणालातरी बुली करतोय हेही समजत नाही. जेव्हा चेष्टा जरा जास्तच होते, तेव्हा ते सायबर बुलिंग असतं. चेष्टेचा, गंमतीचा अतिरेक झाला की दुसऱ्याला त्रास व्हायला लागतो. पण ते अनेकदा लक्षातच येत नाही. त्यामुळे मज्जे मज्जेत आपण जरा जास्तच करत नाहीये ना, आपली सीमारेषा ओलांडत नाहीये ना हे बघितलं पाहिजे. चिडवाचिडवी कुठे संपते आणि त्रासदायक वर्तन कुठे सुरु होतं हे नीटच समजलं पाहिजे.
सायबर बुलिंग झालं तर काय करावं?
समजा कुणालाही असा अनुभव आला तर त्या व्यक्तीला त्याच्या वर्तनाची पूर्ण कल्पना दिली पाहिजे. हे चूक आहे हे सांगितलं पाहिजे. त्यानंतरही वर्तन बदललं नाही तर शाळा, कॉलेज, ऑफिस येथील वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे. त्यानंतरही त्रास थांबला नाही तर मात्र पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवा. तुम्ही 1930 या नंबरवर कॉल करुनही तक्रार नोंदवू शकता.