“क्रिकेट हा आपण भारतीयांसाठी केवळ एक खेळ नसून तो एक धर्म आहे” हे वाक्य आपण इंग्रजीतून कित्येकदा ऐकलं असेल. इंग्रजांनी भारतात आणलेला हा खेळ भारतीयांनी आपल्या सर्वसमावेशक वृत्तीने आपलासा करून घेतला ?
चेंडू आणि फळीने खेळला जाणारा हा खेळ टेस्ट क्रिकेटच्या काळात लोकांना रुक्ष, संथ वाटायचा. पण, नंतर आलेल्या वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी फॉरमॅटने या खेळाला आज जगातील ‘दूसरा सर्वात लोकप्रिय खेळ’ या उपाधी पर्यंत पोहोचवलं हे संबंधित आयोजकांचं यश म्हणावं लागेल. इंग्रज जो खेळ आपल्या मनोरंजनासाठी खेळायचे, तो खेळ आणि त्या खेळाचं भारतीय बोर्ड हे संपत्तीच्या बाबतीत त्यांनाही मागे टाकेल असं त्यांना कधीच वाटलं नसेल.
आयपीएलला आज आपण कितीही नावं ठेवत असलो तरीही त्या स्पर्धेसाठी कित्येक परदेशी खेळाडू आपल्या देशातील स्पर्धांना तिलांजली देत आहेत हे तितकंच खरं आहे. जिथे दर्शकांचा आशीर्वाद असतो त्या विषयांकडे बॉलीवूड निर्माता, लेखक यांचं विशेष लक्ष असतं. आयपीएल मधील बॉलीवूड स्टार्सची गुंतवणूक असो वा ‘क्रिकेट’ला केंद्रस्थानी ठेवून सिनेमाच्या लिहिल्या गेलेल्या कथा असो, हे सर्व एकच निर्विवाद सत्य सांगतात की, “क्रिकेट भारतात विकतं”.
क्रिकेट म्हणजे सिनेमा हिटचा सक्सेस फॉर्म्युला
क्रिकेट खेळ आणि त्या सोबत जोडल्या गेलेल्या देशभावना या जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो एका बॉलीवूड सिनेमाचा ‘सक्सेस फॉर्म्युला’ ठरतो. बऱ्याच सिनेमांतूनही हे सिद्ध झालं आहे. ‘व्यक्तीपूजन’ आणि भव्य दिव्यता या संकल्पनेवर भर देणारी टॉलीवूड इंडस्ट्री मात्र अजून क्रिकेटच्या विषयांपर्यंत पोहोचली नाही हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. असो.
क्रिकेटने बॉलीवूडच्या कोणत्या सिनेमांचं आजवर सोनं केलं आहे? कोणते निर्माते, दिगदर्शक, कलाकार या मैदानी खेळाला मोठ्या पडद्यावर पैसे देऊन बघण्यासाठी भारतीय प्रेक्षकांना उद्युक्त करू शकले आहेत? जाणून घेऊयात.
लगान : 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लगान’ हा सिनेमा भारतीय सिनेमात झालेल्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. शेतकऱ्यांवरील कर्ज, त्यांना इंग्रजांकडून मिळणारी वागणूक आणि कर्जमाफी करण्याची अट म्हणून एका इंग्रज अधिकाऱ्याने आयोजित केलेली तीन दिवसीय क्रिकेट मॅच हे तिन्ही फॅक्टर हे भारतीयांना क्लिक करणारे होते. एखाद्या सिनेमामध्ये क्रिकेटचा उल्लेख असणं हे भारतीय प्रेक्षकांना या आधीपर्यंत माहीत होतं. पण, एका 3 तासाच्या सिनेमात एक अख्खी मॅच दाखवली जाऊ शकते हे दिव्य काम दिगदर्शक आशुतोष गोवारीकर यांनी करून दाखवलं. शाहरुख खानने नाकारलेल्या या सिनेमाचे आमिर खानने प्रमुख भूमिका साकारून सोनं केलं.
गावकऱ्यांचं क्रिकेट खेळण्यासाठी तयार न होणं, तयार झाल्यावर प्रत्येक गावकऱ्यांची क्रिकेट खेळण्याची यूनिक स्टाईल, गौरीचं मेहनती भुवनवर असलेलं प्रेम अशी सगळी परफेक्ट थाळी निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर ठेवली होती. आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली. आजच्या तुलनेत जरी ‘लगान’ची लांबी अधिक असली तरीही त्यावेळी सिनेमाच्या एडिटर बल्लू सलूजा यांचं शार्प एडिटिंगसाठी कौतुक झालं होतं.
माही द अनटोल्ड स्टोरी: भारतीय क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा. नीरज पांडे यांनी या सिनेमाचं लिखाण आणि दिग्दर्शन केलं आहे. सुशांत सिंग राजपूत याने या सिनेमात प्रमुख भूमिका निभावताना धोनीची देहबोली आत्मसात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. धोनी बद्दल बरीच माहिती आधीच प्रेक्षकांना माहीत असतानाही दिगदर्शक हा सिनेमा प्रत्येक वेळी टीव्हीवर लागला की, पूर्ण बघण्यास भाग पाडतो हे सिनेमाच्या पूर्ण टीमचं यश म्हणावं लागेल.
रांची ते रेल्वे टीसी आणि नंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. 2011 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये षटकार मारून धोनीने समस्त भारतीयांचं मन आधीच जिंकलं आहे. तो क्षण मोठ्या पडद्यावर परत बघता आला यासाठी प्रेक्षकांनी आभार मानले आणि या सिनेमाला 2016 च्या सुपरहिट सिनेमाचा बहुमान दिला.
83 : ‘चक दे इंडिया’, ‘चंदू चॅम्पियन’ सारख्या खेळ आणि खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमा दिग्दर्शित करण्याचा हातखंडा असलेल्या कबीर खानने ’83’ हा क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शित केला होता. रणवीर सिंग याने या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारली होती, तर आपल्या मराठी आदिनाथ कोठारे यांच्यावर दिलीप वेंगसरकर मोठ्या पडद्यावर साकारण्याची जबाबदारी होती. 1980 दशकांत भारतीयांचं असलेलं क्रिकेट वेड, इंग्लंडच्या प्रसार माध्यमांनी भारतीय क्रिकेट संघाची उडवलेली खिल्ली, कपिल यांच्या खेळीने आपण झिम्बाब्वे विरुदध मिळवलेला विजय आणि सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्या पासून वेस्ट इंडिज टीमला थांबवलेला तो क्षण सिनेमा बघतांना प्रेक्षकांनी अक्षरशः जगला.
जर्सी : राष्ट्रीय पातळीवर खेळलं जाणारं क्रिकेट हेच केवळ बॉलीवुड सिनेमा कव्हर करत नाही. तर देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी आणि त्यामध्ये खेळणारे स्थानिक खेळाडू यांची देखील सिनेमा लेखक, दिग्दर्शकांनी दखल घेतली आहे. शाहिद कपूरने या सिनेमात अर्जुन तलवार या क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलाला ‘इंडिया जर्सी’ विकत घेऊन देण्यासाठी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेले वडील पुन्हा मैदानात उतरतात, रणजी मध्ये खेळतात आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला विजय मिळवून देतात. भावनिक आणि काहीसा भरकटलेला हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर बघतांना केवळ शाहिद कपूरचा अभिनय आणि क्रिकेटचा विषय यामुळे आवडला.
मि.अँड मिसेस माहीः पुरुष क्रिकेट खेळाडूंवर बऱ्याच सिनेमांची निर्मिती झाल्यानंतर बॉलीवूडने या सिनेमात एका महिला क्रिकेटपटूच्या टॅलेंटवर प्रकाश टाकला आहे. आपल्या वडिलांच्या आग्रहामुळे डॉक्टर झालेल्या जान्हवी कपूरला तिचा सिनेमातील पती राजकुमार राव हा एकदा क्रिकेट खेळतांना बघतो आणि प्रभावित होतो. स्वतः एक क्रिकेटर असलेला राजकुमार राव आपल्या पत्नीचा क्रिकेट प्रशिक्षक होतो आणि तिला क्रिकेटर होण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. काही काळासाठी नायकाचा प्रषी, पती अहंकार जागा होतो; पण, नंतर आईच्या समजावून सांगण्याने तो क्रिकेटला प्राधान्य देतो आणि जान्हवी कपूरला तिचा हरवलेला क्रिकेटचा सूर परत गवसण्यासाठी मदत करतो.
भारतीय सिनेमांमध्ये क्रिकेट जिंकतं हे या सिनेमांसोबतच ‘शाबाश मिथु’ या मिताली राज यांच्यावरील, ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यावरील सिनेमात देखील प्रेक्षकांनी बघितलं आहे. क्रिकेट वरील सिनेमांचं व्यवसायिक यश जरी सातत्यपूर्ण नसलं तरीही त्या विषयाला प्रेक्षकांची पसंती मिळते हे मात्र नक्की आहे. कारण, क्रिकेट हा आपल्यासाठी केवळ एक खेळ नसून तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे.