पर्माकल्चरची नीतीमूल्ये नीट आत्मसात केली की, आपण नव्याने आपल्या अस्तित्वाकडे पाहू लागतो. माणूस आणि निसर्ग दोघांच्या भल्याची पर्यावरणपूरक शाश्वत (sustainable) जीवनशैलीची रचना करण्याची गरज लक्षात येणं महत्वाचं आहे. ती लक्षात आली की, मग आपण पुढच्या पायरीकडे जाऊ शकतो. हे करण्यासाठी आपल्या मदतीला येतात मॉलिसन आणि होमग्रेन ह्यांनी सुचवलेली तत्वे (Principles). ही बारा तत्वे एखाद्या भिंगांसारखी वापरता येतात. कोणताही प्रोजेक्ट डिझाईन करताना, डिझायनरने वापरायची ही मार्गदर्शक चौकट आहे. ह्या तत्वांना प्रश्नार्थक बनवणेही बऱ्याचदा सोयीचे ठरते.
उदा. एक तत्व आहे – ‘कचरा निर्माण होऊ न देणे’. डिझाईन करताना, हे तत्व कुठे वापरता येईल ह्याचा विचार करू शकतो. आता ह्याच प्रश्नात रूपांतर कसं करू शकतो, हे बघू:
- आपल्या व्यवस्थेत कचरा निर्माण होत आहे का? होत असेल तर नेमका कुठे? आणि का?
- जिथे कचरा तयार होतोय तिथे संसाधनांचा पुरेसा वापर होत आहे का?
- कचऱ्याच्या रूपाने नासाडी होऊ नये म्हणून आपण दुसरा काही उपयोग करू शकतो का? इ.
मॉलिसन आणि होमग्रेन ह्यांनी सुचवलेली बारा तत्वे पुढीलप्रमाणे. आपण आपल्या डिझाईनच्या सोयीनुसार, वेगवेगळ्या उपयोगासाठी ह्यातल्या कमीजास्त तत्वांचा वापर करू शकतो किंवा त्यांचा क्रमही बदलू शकतो:
निरीक्षण करणे आणि अनुभव घेणे
एखादी जमीन घेतली किंवा प्रोजेक्ट हातात घेतला की लगेच त्यावेळच्या मर्यादित आकलनाच्या आधारे कोणताही बदल करण्याआधी थोडं थांबून निरीक्षण करणे महत्त्वाचे असते. निसर्गाकडून खूप काही शिकता येते. पुरेसा अनुभव आणि नोंदी ठेवल्या की, त्यांचा जास्तीतजास्त उत्पादक व लवचिक डिझाईन करण्यासाठी उपयोग होतो. वेगवेगळ्या ऋतूमध्ये किमान एकदातरी साईटवर जाणे, निरीक्षण करणे, स्वतः अनुभव घेणे आणि इतरांच्या अनुभवांची नोंद करणे ह्या तत्वातून सांगितलंय.
काही पर्माकल्चर गुरु तर किमान दोन वर्षे एकेका साईटचं निरीक्षण करणे सुचवतात. वेगवेगळ्या ऋतूत हवामानात, वेगवेगळ्या घटकांच्या परस्परसंबंधात काय बदल होतोय, आपल्या गरजा कशा बदलत आहेत, पर्यावरण कसं बदलत आहे हे सगळं नीट निरीक्षण केलं तर कळतं. अर्थात ह्यासाठी अनुभव असणे गरजेचे आहे. जे सरावलेल्या अनुभवी डोळ्यांना, हातांना, पावलांना जाणवेल ते नवशिक्यांना कदाचित कळणार नाही. अर्थात निरीक्षण केल्याशिवाय अनुभवही मिळणार नाही, असं हे चक्र आहे. त्यासाठी पुढील भागात आपण जागेचं निरीक्षण टप्प्याटप्प्याने पद्धतशीरपणे कसं करता येईल ते पाहणार आहोत.
ऊर्जा गोळा करणे आणि साठवणे
निसर्गात ऊर्जा महत्त्वाची आहे. सूर्यप्रकाश, पाणी, मनुष्यबळ, बियाणे, सेंद्रिय घटक इत्यादी ह्या सगळ्यात ऊर्जा साठवलेली असते. आपल्या व्यवस्थेत ऊर्जा नेमकी कशी येत आहे आणि कशी खर्च कशी होत आहे, ह्याचा अभ्यास केला तर ऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करता येईल. ह्यातली जास्तीतजास्त ऊर्जा वेगवेगळ्या रूपात साठवून ठेवता येईल. ऊर्जेचा शाश्वत स्रोत आणि पुरेसा साठा करण्याचं महत्त्व ह्या तत्वाद्वारे अधोरेखित करण्यात आलंय.
उदा. समजा तुमच्या जागेतून एखादा ओढा वाहतोय. तर ह्या पाण्यापासून वीज निर्माण करता येऊ शकते. किंवा वीज किंवा इंधनाचा वापर न करता दिवसरात्र त्यातील काही पाणी उंचावर पंप करता येऊ शकतं. बांधावरच्या, जळण म्हणून वापरता येऊ शकणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी वापरता येईल.
गॅस सिलिंडर वापरून पाणी गरम करण्यापेक्षा शेणाच्या गोवऱ्या वापरून पाणी गरम करणं जास्त शाश्वत आहे. साहजिकच गोवऱ्यांच्या रुपात ऊर्जा साठवून ठेवता येऊ शकते.
उत्पादन मिळवणे
कोणतीही पर्माकल्चर व्यवस्था ही उत्पादक असायला हवी हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. अन्न, ऊर्जा, संसाधने इत्यादींचं उत्पादन आपल्या डिझाइनमधून मिळालं पाहिजे. उत्पादन मोजता येत असेल तर त्याची नोंद ठेवता येते. मग आपली व्यवस्था सुधारत आहे की, खराब होत आहे ते कळेल. म्हणजे शेत डिझाईन केलं तर त्यातून पुरेशा भाज्या, धान्य, फळे, चारा मिळेल हे डिझाईन करताना लक्षात घेणं महत्वाचं आहे.
उदा. शेतातून आणि शेताच्या आजूबाजूच्या परिसरातून रानभाज्या उत्पादन म्हणून गोळा करता येतील. कोंबडीपालन केलं तर कोंबड्या, त्यांची अंडी, पिल्लं, कोंबडीखत ही सर्व उत्पादने आहेत. ही मोजता येऊ शकतात आणि त्यावरून व्यवस्थेचं मूल्यमापन करता येऊ शकतं.
एखाद्या गावाच्या जंगलाचं व्यवस्थापन पर्माकल्चर वापरून डिझाईन करायचं असेल तर जंगलातून मिळालेलं मध किंवा बांबू ही उत्पादनं असू शकतात.
स्वनियमन आणि प्रतिसाद (feedback) घेणे
कोणतीही डिझाईन परिपूर्ण नसते. सतत निरीक्षण करण्याची सवय ठेवल्याने काय बरोबर चाललंय, काय चुकतंय हे लक्षात येते. त्यानुसार सुधारणा करत राहणे, सतत शिकणे ह्या मूल्यातून अपेक्षित आहे. पहिल्याच प्रयत्नात परिपूर्णतेच्या मागे लागण्यापेक्षा प्रगतीचा ध्यास घ्यायला पर्माकल्चर शिकवतं. बऱ्याचदा सिस्टिम तयार झाल्यानंतर काही बदल होतात, काही गरजा बदलतात, आपली समज बदलते, डिझाईनच्या उपयुक्ततेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्वतःला तपासत राहण्याने आणि प्रतिसाद घेण्याने वेळीच योग्य बदल करता येतात.
उदा. एखादा रस्ता आपण शेतात चालण्यासाठी तयार केला, पण जाणारे येणारे रस्त्याऐवजी त्यांना सोईस्कर अशा पायवाटेवरून शॉर्टकटने प्रवास करत आहेत हे लक्षात आलं, तर ती पायवाट हीच नैसर्गिक वाट आहे हे ओळखून त्यादृष्टीने आपल्या रचनेत बदल करणे योग्य ठरेल.
दुसरं उदाहरण म्हणजे, समजा आपण एका ठिकाणी पाणवनस्पती लावली आहे तिथे मूळ डिझाईन तयार करताना पुरेसं पाणी येत होतं, पण तुमच्या शेताच्या वरच्या अंगाला असलेल्या शेतकऱ्याने पाणी बांध घालून भलत्याच दिशेला फिरवल्यामुळे आधीच्या जागी कमी पाणी यायला लागलं तर आपण मूळ प्लॅनमधे बदल करुन बदललेल्या वातावरणात चांगली वाढेल अशी वनस्पती लावू शकतो.
4 Comments
मनापासून धन्यवाद
साध्या आणि सोप्या पद्धतीने दिलेली माहिती
खूपच छान…..!
समीर दादा🤝🙏
खूपच छान माहिती..मी पण नवीन प्रोजेक्टच्या मागे आहे..आता हे मारृगदर्शन नक्की वापरेन..
खूप छान लिहिले आहे वाचून खूप आनंद झाला आणि ज्ञानातही भर पडली. आपले विचार विविध सामाजिक संस्था शाळा कॉलेज यामध्ये व्याख्याने स्वरूपात जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यास बदल निश्चितच घडेल आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.