‘पैठणी वस्त्रा’ पलीकडचे पैठण

पैठणच्या प्राचीन वैभवाची साक्ष तेथील विस्तीर्ण पांढरीच्या टेकड्या देतात. या वैभवाचा शोध प्रथम निजामकालीन पुरातत्त्व खात्याने 1936-37 मध्ये घेतला. या उत्खननात 4थे शतक ते 8वे शतक या काळातील विटांनी बांधलेली दोन मंदिरे आढळली. या दोन मंदिरांचा पुढील सखोल अभ्यास ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते’ आणि ‘सोसायटी फॉर साउथ एशियन स्टडीज’ यांनी 1996-1999 दरम्यान संयुक्तपणे केला.
[gspeech type=button]

मूळचे ‘प्रतिष्ठान’

पैठणीसाठी ( Paithani Sarees ) प्रसिद्ध असलेल्या पैठण शहराला तितकाच समृद्ध इतिहास आहे. गोदावरी नदीच्या ( Godavari River )उत्तर तीरावर वसलेले हे शहर प्राचीन काळी ‘प्रतिष्ठान’ या नावाने प्रसिद्ध होते.  प्राचीन भारतीय वाङ्मयात आणि परंपरेत ‘प्रतिष्ठान’ या नावाची दोन ठिकाणे असल्याचा उल्लेख आहे. प्रसिद्ध अभ्यासक नंदलाल डे यांच्या मते, गंगेच्या पूर्व किनाऱ्यावरील उत्तरप्रदेशातील अलाहाबाद जवळचे झूसी आहे, ज्याला अजूनही प्रतिष्ठानपूर म्हटले जाते, हे एक. प्रतिष्ठानपूर  पुरुरवस या सोमवंशीय राजाची राजधानी असल्याचे मानले जाते. मात्र महाराष्ट्रातील प्रतिष्ठान हे वेगळे शहर म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील पैठण हे अधिक प्रख्यात आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले स्थान आहे.

मंदिर स्थापत्यशैलीच्या सुरुवातीच्या काळातील मंदिरे

पैठणच्या प्राचीन वैभवाची साक्ष तेथील विस्तीर्ण पांढरीच्या टेकड्या देतात. या वैभवाचा शोध प्रथम निजामकालीन पुरातत्त्व खात्याने 1936-37 मध्ये घेतला. या उत्खननात 4थे शतक ते 8वे शतक या काळातील विटांनी बांधलेली दोन मंदिरे आढळली. या दोन मंदिरांचा पुढील सखोल अभ्यास ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते’ आणि ‘सोसायटी फॉर साउथ एशियन स्टडीज’ यांनी 1996-1999 दरम्यान संयुक्तपणे केला. या अभ्यासात या मंदिरांचा विकास चार टप्प्यांत झाला असल्याचे आढळले. डी. केनेट आणि वरदप्रसाद राव या अभ्यासकांच्या मते, या मंदिरांचे रचनात्मक साम्य रामटेक, देवगढ, बोधगया, नाचना, भूमर, भितरगाव यांसारख्या प्राचीन मंदिर स्थापत्यशैलीशी आहे. ही सर्व मंदिरे, मंदिर-विकासाच्या सुरुवातीचे टप्पे अधोरेखित करतात. पैठण येथे मिळालेल्या दोन मंदिरांचे अवशेष, प्राथमिक तसेच प्रगत स्थापत्याच्या नमूना दर्शविते. या दोन्ही टप्प्यांचे एकत्रित अवशेष मिळणे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि त्यामुळेच पैठणची ही दोन मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत. 

ऐतिहासिक काळात वसाहतींचे सतत स्थलांतर

मंदिरांच्या अवशेषांव्यतिरिक्त, पैठणमधील संरक्षित आणि असंरक्षित ठिकाणी चाचणी खड्डे घेऊन उत्खनन करण्यात आले. या उत्खननांमध्ये असे आढळले की पैठणमधील पुरातत्त्वीय अवशेष गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्याकडे सुमारे 1 कि.मी.पर्यंत पसरलेले आहेत. चाचणी खड्ड्यांत सांस्कृतिक स्तरांमध्ये वैविध्यता आढळून आली. यावरून असा निष्कर्ष निघाला की, प्राचीन ऐतिहासिक काळात पैठणमधील वसाहतींमध्ये स्थानिक पातळीवर सतत स्थलांतर झाले असावे. 

सातवाहनकालीन गजलक्ष्मीच्या प्रतिमेची नाणी 

1965-1966 साली मोरेश्वर दीक्षित यांनी पैठणमधील नरसिंह मंदिराजवळील पांढरीच्या टेकाडावर उत्खनन केले. तेथील सांस्कृतिक क्रम सातवाहनकालापासून ते मध्ययुगीनकाळापर्यंत चार टप्प्यांमध्ये विभागलेला आढळला. पहिला कालखंडात सातवाहन काळातील पहिल्या टप्प्यात काचेचे मणी, स्फटिकाच्या कर्णभूषणे, खुराचे पाटे यांसारख्या अवशेषांसह गजलक्ष्मीची प्रतिमा असलेली शिशाची दोन नाणी प्रथमच सापडली. गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर, नवनाथ मंदिराजवळील शनिमंदिराच्या समूहात ‘सोन टेकडी’ येथे 1995 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रामचंद्र मोरवंचीकर आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातील अरविंद जामखेडकर यांच्या नेतृत्वात, तसेच के. डी. कावडकर यांच्या देखरेखीखाली एकत्रित उत्खनन करण्यात आले. या उत्खननात सातवाहन काळातील अनेक वस्तू सापडल्या, ज्यामध्ये रोमन संस्कृतीच्या प्रभावातील मातीचे भांडे विशेष महत्वाचे ठरले. 

व्यापारी केंद्र पैठणची पहिल्या शतकातील ग्रीक ग्रंथात नोंद

उत्खननाशिवाय महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक घटना पैठणचे महत्व अधोरेखित करतात. ग्रीक भूगोलवेत्ता टॉलेमीने (इ. स.90-169) त्याच्या प्रवासवर्णनात पैठणचा उल्लेख सिरि पुळुमाळी या सातवाहन राजाची राजधानी म्हणून केला आहे. सातवाहनकालीन वैभवाचे अनेक संदर्भ ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीअन सी’ या इ.स. पहिल्या शतकातील ग्रीकभाषेतील सागरी मार्गदर्शक ग्रंथात मिळतात. ह्या ग्रंथात पैठणला एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले आहे, विशेषतः वस्त्रोद्योगाशी संबंधित. व्यापाराच्या दृष्टिकोनातून पैठणचे महत्त्व त्यावेळी फार मोठे होते. पूर्वेकडील मसलीपट्टम ते पश्चिमेकडील भडोच असा महत्त्वाचा व्यापारी मार्ग वापरात होता. हा मार्ग पैठण-तेर-नासिक या महाराष्ट्रातील शहरांनी जोडला गेला होता. महिष्मती (महेश्वर), उज्जयिनी आणि विदिशा यांच्याशीही पैठण जोडले गेले होते. त्यामुळे पैठण एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते. पैठणहून कार्नेलिअन नावाचे मौल्यवान दगड दागिने तयार करण्यासाठी भडोचला पाठवले जात असत. सातवाहनांच्या काळात पैठणची भरभराट झाली होती. पैठणच्या मित्रदेव या सुगंधाच्या नातलगांनी पितळखोऱ्याच्या लेण्यांना दिलेल्या देणग्यांचा उल्लेख पितळखोऱ्यातील शिलालेखांमध्ये मिळतो. पैठणच्या संघकाच्या मुलांनीही पितळखोऱ्याला देणग्या दिल्याचे दुसऱ्या एका शिलालेखात आढळते. कृष्णगिरी (मुंबईजवळील कान्हेरी) आणि पैठण यांच्यातील असाच संबंध दर्शवणारे शिलालेखही उपलब्ध आहेत, आणि हे सर्व सातवाहनकालीन आहेत. सातवाहनांनंतर पैठणवर आभीर, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य आणि यादव वंशांनी राज्य केले. यादवांनंतर पैठणवर बहमनी, मोगल, निजामशाही, मराठे आणि पुन्हा निजामशाहीचे वर्चस्व होते. ब्रिटिश कालावधीत पैठण हैदराबाद संस्थानच्या अंतर्गत होते. 

विविध धर्मांकरता महत्त्वाचे 

यादवांच्या काळात पैठणचे धार्मिक महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्याला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये पैठण शहराचा उल्लेख आढळतो. संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वरांचा पैठण शहराची असलेला संबंध सर्वश्रृत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्येही पैठण शहराला विशेष महत्व आहे. याशिवाय, पैठण दिगंबर जैन पंथ आणि महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. 

प्राचीन वैभव जतन

पैठणच्या प्राचीन ऐतिहासिक वैभवाचे संकेत देणारे अवशेष आजही येथे पाहायला मिळतात. याशिवाय श्री. बाळासाहेब पाटील यांना पैठणमध्ये सापडलेल्या सातवाहन काळातील अद्वितीय वस्तूंचा संग्रह ‘ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय’ म्हणून संत ज्ञानेश्वर उद्यानात महाराष्ट्र शासनाच्या योजनेमार्फत जतन केला आहे. या संग्रहात उत्कृष्ट मनोहर मणी, मणी बनवण्यासाठीचे दगडी साचे, दुर्मीळ नाण्या, नाण्यांचे साचे, रोमन मृद्भांडी, खेळणी आणि केओलीनच्या आकर्षक यक्षमूर्ती यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ