नुकतीच मलाईका अरोराच्या वडिलांचा मृत्यू आत्महत्येने झाला. ते 65 वर्षांचे होते. आत्महत्या कोणत्याही वयोगटात घडू शकते आणि ती गरीब – श्रीमंत असा भेद करत नाही हे पुन्हा अधोरेखित झाले. मृत्यूपूर्वी काही क्षण त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना फोन केले आणि “मी आजारी व थकलेलो आहे” असे सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रियजनांचा निरोप घेते. त्यानुसार त्यांनी फोन केले. शक्य आहे की ते डिप्रेशन मध्येही असतील, मात्र ते लक्षात आले नसेल. आणि त्यामुळे त्रास सहन करण्याची क्षमता कमी झाल्याने ते आत्महत्येच्या विचारांमध्ये गुरफटले आणि शेवटी आत्महत्येने त्यांना गाठले असावे.
2022 मध्ये सर्वाधिक आत्महत्या
भारतातील मृत्यूंची 2022 सालची आकडेवारी NCRB कडून समोर आलेली आहे आणि त्यामध्ये असे दिसून येते की 2022 साली आतापर्यंतच्या सर्वाधिक आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. 2022 मध्ये 1,71,000 एवढ्या आत्महत्या नोंदवल्या गेल्या. जर आपण ऐतिहासिक नोंदी बघितल्या तर 1967 साली साधारणपणे केवळ 38,800 एवढ्या आत्महत्या झाल्या होत्या. आणि गेल्या पंचावन्न वर्षात यांचे प्रमाण कितीतरी पटीने वाढले आहे.
आत्महत्यांमुळं देशाचं 140920 करोड रुपये नुकसान
यातील सर्वाधिक आत्महत्या या 15 ते 30 या वयोगटात झालेल्या आहेत. या वयोगटासाठी जर मृत्यूची कारणे बघितली तर पहिले कारण हे अपघाती मृत्यू आहे आणि त्यानंतर दुसरे कारण हे आत्महत्या आहे. म्हणजेच ही दोन्ही कारणे टाळण्यासारखी असूनदेखील याच कारणांनी तरुणांचे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. ही कुटुंबांची व देशाची हानी आहे. नुकत्याच लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पेपरनुसार 2019 साली भारतात जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याची देशाला चुकवावी लागलेली किंमत (estimated cost) ही साधारण 1680 करोड डॉलर्स म्हणजे 140920 करोड रुपये एवढी प्रचंड आहे.
जगातील 26% आत्महत्या भारतात
भारताला आत्महत्येची राजधानी असेही समजले जाते. कारण भारतामध्ये जगातील फक्त 18% लोकसंख्या असली तरीही जगात घडणाऱ्या आत्महत्यांपैकी 26% आत्महत्या या भारतात घडत आहेत. त्याचप्रमाणे जगभरात जेवढ्या स्त्रिया आत्महत्या करतात त्यातील एक तृतीयांश स्त्रिया भारतीय असतात.
पुरूषांची संख्या जास्त
मात्र 2022 मध्ये जेवढ्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यातील जवळजवळ 70% आत्महत्या या पुरुषांमधील आहेत. पुरुषांना त्यांच्या अडचणीसाठी मदत घेणे हे सहसा कमीपणाचे वाटते किंवा जर त्यांना काही मानसिक ताण-तणाव असतील तर त्यासाठी देखील मदत घेणे जमत नाही. कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी समाजाने पुरुषांवर दिल्याने याचा खूप जास्ती ताण हा पुरुषांवर असतो. आत्महत्येची साधने देखील त्यांना सहज उपलब्ध असतात. त्यामुळे परिस्थितीतून मार्ग निघण्याऐवजी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला जातो.
एका आत्महत्येचा शंभर माणसांवर परिणाम
जेव्हा एक आत्महत्या घडते त्यावेळेला त्याच्या 25 पट अधिक लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले असतात आणि त्याहूनही वीस पट अधिक लोकांच्या मनात आत्महत्येचे विचार आलेले असतात. जर एका वर्षात एक लाख 70 हजार आत्महत्या नोंदवल्या गेल्या असतील तर एकूण किती लोकांना आत्महत्येचे विचार आले असतील याची कल्पना केली तरीही या प्रश्नाची व्याप्ती लक्षात येईल. जेव्हा एक आत्महत्या होते, तेव्हा केवळ एक व्यक्ती मरत नाही तर एक कुटुंब उध्वस्त होते. त्या व्यक्तीशी संबंधित असणारी जवळची शंभराहून अधिक माणसे यामुळे बाधित होतात, त्यांचे आयुष्य बदलते. यासाठी प्रत्येक आत्महत्या टाळणे खूप महत्त्वाचे आहे.
आत्महत्येबाबतचे गैरसमज
आत्महत्येची कारणे ही वैद्यकीय तसेच सामाजिक असू शकतात. मानसिक अनारोग्य हे आत्महत्येचे महत्वाचे मूळ कारण आहे मात्र ते दुर्लक्षित होते. आत्महत्येबाबत इतके गैरसमज आहेत की एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तरी देखील ती व्यक्ती याबाबत कोणालाही स्पष्ट सांगत नाही, मदत मिळवत नाही आणि एकटीच त्रास सहन करते. जर आपल्याला तरुणाईला आत्महत्या पासून वाचवायचे असेल तर आत्महत्येबाबतचे समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण यातील काही गैरसमज दूर करून त्याविषयी योग्य माहिती समजून घेऊया.
आत्महत्या करणारे मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात !
- समाजाच्या या धारणेमुळे ज्यांच्या मनात विचार येत आहेत अश्या व्यक्ती हे इतर कोणाला सांगत नाहीत व मदत मिळवत नाहीत.
- इतरांना आपला त्रास समजू नये यासाठी सर्व काही ठीक आहे असे नाटक करण्यामध्ये या व्यक्ती थकून गेलेल्या असतात.
- जेव्हा त्यांच्या मानसिक वेदना असह्य होतात, कोणताही उपाय दिसत नाही आणि भविष्यासाठी कोणतीही आशा दिसत नाही तेव्हा आत्महत्या घडते. स्वतःला मरेपर्यंत मारणे हे प्रत्येकाला जमत नाही म्हणून तर ज्यांना विचार आले अश्या 500 पैकी एखादाच जण आत्महत्या करू शकतो. जर हे सोपे असते तर याहून जास्त लोकांनी केल्या असत्या आत्महत्या.
जे आत्महत्येबद्दल बोलतात ते आत्महत्या करत नाहीत!
किंवा
आत्महत्येबद्दल बोलणारे अटेंशन सिकर्स असतात ! (केवळ लक्ष वेधण्यासाठी तसे बोलतात.)
- खरे तर मनात आत्महत्येचे विचार येणे वाढू लागतात आणि मग जेव्हा आत्महत्या करण्याचा निर्णय होतो, तेव्हा ती व्यक्ती निरोपाचे संभाषण करते.
- कोणीही आत्महत्येचा उल्लेख केला तर त्याची दखल गंभीरपणे घ्यायला हवी. मनात विचार असल्याशिवाय कोणीही असा विषय काढत नाही. आणि उल्लेख केल्यानंतर खरे तर मृत्यूचा धोका वाढलेला असतो.
- त्रासात असल्याखेरीज हे विचार कोणाच्या मनात येत नाहीत त्यामुळे असा विचार कोणी विनाकारण करत नाही.
जर एखाद्याने आत्महत्या करायचे ठरवले असेल तर ते आत्महत्या करतातच !
किंवा
आत्महत्या टाळता येत नाहीत !
- कोणी आत्महत्येचा विचार करत असेल किंवा प्रयत्न केला असेल आणि त्यांना योग्य मदत मिळाली तर जवळपास 70% लोक पुन्हा कधीच प्रयत्न करत नाहीत.
- कृती घडण्याच्या कमकुवत क्षणी जर मदत मिळाली तर आत्महत्या टळते. भविष्याबद्दल आशा वाटली तरी आत्महत्या टळते.
जर आपण कोणाला “आत्महत्येचा विचार येतोय का?” असे विचारले तर आपणच ती कल्पना त्यांना सुचवतो…
- खरे सांगायचे तर आपण जर हा प्रश्न कोणाला विचारला तर त्या व्यक्तीला याविषयी बोलण्यासाठी सोपे जाते आणि ती व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी सांगू शकते. त्यामुळे कोणाला “तुझ्या मनात आत्महत्येचा विचार येतोय का?” हे विचारणे ही तिचा जीव वाचवण्यासाठी खूप महत्त्वाची पायरी आहे .
- क्यू. पी. आर. या आत्महत्या टाळण्याच्या एका पद्धतीची सुरुवात ही प्रश्न विचारण्यापासून होते. त्यानंतर त्या व्यक्तीला वेळ देऊन तिचे म्हणणे ऐकून घेणे आणि तिला समजावून तिला तज्ञ व्यक्तीकडून मदत मिळवून देणे आवश्यक आहे. यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो.
- त्यामुळे “तुझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात का?” हा प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका. हा प्रश्न एखाद्याचा जीव वाचवू शकेल.
आत्महत्या कोण करणार आहे हे ओळखता येत नाही.
- आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले लोक ओळखणे शक्य असले तरी, ते फारसे सोपे नाही. कारण त्यासाठी ती व्यक्ती स्वभावाने कशी आहे किंवा तिचे वागणे बोलणे कसे आहे याची माहिती असणे आवश्यक असते. कोणाच्या वागण्यामध्ये बदल झाले असतील, ती व्यक्ती शांत झाली असेल किंवा तिला पूर्वी आवडणाऱ्या कृतींमध्ये तिला आता उत्साह वाटत नसेल, इतरांसोबत राहणे टाळत असेल तर अशा व्यक्ती मानसिक अनारोग्याशी झगडत असू शकतात.
- मात्र जेव्हा आत्महत्या करण्याचा निर्णय हा पक्का होतो, त्यावेळी या व्यक्ती अचानक थोड्या आनंदी दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यामध्ये सूचक गोष्टी येऊ शकतात जसे “आता नक्कीच काही अडचण नाही” किंवा “सर्वांचा निरोप घेणे” किंवा “स्वतःच्या आवडीच्या वस्तू कोणाला देऊन टाकणे ” अशा प्रकारे त्यांचे वागणे बदलू शकते.
- ज्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेत किंवा ज्या व्यक्ती आधीच मानसिक अनारोग्याशी झगडत आहेत अशा व्यक्तींमध्ये आत्महत्येचा धोका अधिक असतो.
लक्षात घ्या…
आत्महत्या कोणीही करू शकते, हे आपण लक्षात ठेवायला हवे. तसेच आपल्या प्रियजनांचे वागणे हे हळूहळू बदलत आहे का यावरही लक्ष ठेवायला हवे. आणि कधीही मनात शंका आली तर अशावेळी प्रश्न विचारायला हवा की “तुझ्या मनात आत्महत्येबाबत काही विचार येत आहेत का?” कारण योग्य वेळी योग्य पद्धतीने साहाय्य उपलब्ध झाले, तर आपणही प्रियजनांची आत्महत्या रोखू शकतो.
एक आत्महत्या रोखणे म्हणजे एका कुटुंबाला वाचवणे. यासाठी आपल्या सर्वांना शक्य ते प्रयत्न नक्कीच करू या.