दुचाकीवाल्यांना झुकतं माप… चारचाकीवाले मात्र खलनायक!

हेल्मेट न घालता, झिकझॅक करत दुचाकीस्वार मांजराच्या पिल्लांसारखे पायात अडखळतात, तेव्हा चारचाकीच्या चालकाच्या काळजाचा ठोका चुकतो. चारचाकीवाले काय म्हणे तर अभिजन? आणि बाइकवाले बहुजन? म्हणून बाइकवाल्यांना झुकतं माप? पण चारचाकीवाल्यांची बाजू थोडी ऐकून घ्यायला काही हरकत नाही. बाइकवाल्यांचं काहीच चुकत नाही असं म्हणणंही धारिष्ट्याचंच.
[gspeech type=button]

‘हिट अँड रन’ अशी बातमी दिसली की त्या बातमीचा मनात प्रतिबिंबित झालेला त्यापुढील अन्वयार्थ स्पष्ट असतो. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या मुजोर चारचाकी वाहन चालकाने किंवा अडेल ट्रक चालकाने गरीब बिच्चाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देऊन चिरडलं. खलनायक म्हणजे चारचाकी वाहन चालक आणि व्हिक्टिम बिच्चारा दुचाकीस्वार.

चारचाकी किंवा ट्रक हा भरधावच असणार, असं मीडियानेही गृहित धरलं आहे. बातमी देताना बातमीदाराच्या पेनाला आणि न्यूजअँकरच्या जिभेलाही सवयीने हेच वळण पडलं आहे. या बातमीचं पुढचं गृहितक असतं की चारचाकीचा चालक किंवा ट्रक चालक हा दारू प्यायला असावा, तो अतिश्रीमंत माणसाचा मुलगा किंवा प्रचंड गुर्मी असलेला वाहनचालकच असणार.

दरम्यानच्या काळातल्या घटनांमुळे या गृहितकाला माध्यम नॅरेटिवमुळे पुष्टीही मिळाली. अनेक चारचाकी वाहनचालकांची चूक असते यात शंकाच नाही. पण सरसकट चारचाकी वाहनचालकांना दोषी ठरवणं योग्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा. सगळ्या गदारोळात चारचाकी वाहन चालकांची बाजू कुणीच घेत नाही. चारचाकी वाहन चालक म्हणजे श्रीमंतच आणि त्याला श्रीमंतीचा माज असणारच. शिवाय तो राजकीय पुढाऱ्यांशी कनेक्टेड असणारच. तो दारू पिऊन गाडी भरधाव चालवणार असे दृश्यम् विकसित झाले आहे. त्यामुळे चारचाकी वाहन चालवणाऱ्यांना कुणी वालीच नाही अशी अवस्था आहे.

चारचाकी वाहन चालकांना सध्या सर्वात मोठी भीती ही दुचाकीस्वारांची असते. ज्यांनी चारचाकी चालवली नाही त्यांना चारचाकी वाहन चालकांची खंत कळणार नाही. बऱ्याचदा वाहतूक पोलिसांनीही चारचाकी वाहन चालवलेलं नसतं. बातमीदारही दुचाकी चालवणारा असतो. त्यामुळे तो साहजिकच दुचाकीवाल्यांची बाजू लावून धरतो.

जिथे दुचाकींना प्रवेश आहे अशा कोणत्याही नॅशनल हायवेवरून तुम्ही जर वाहन चालवत गेलात तर लक्षात येईल की सगळी अवजड वाहने ही उजव्या बाजूच्या लेनमधून चालतात. खरं तर नियमाप्रमाणे डावी बाजू ही अवजड वाहनांसाठी ठेवलेली आहे. जी कमी वेगाने चालणारी वाहनं असतात ती डाव्या बाजून चालतात. आणि आपण वाहनाच्या उजव्याबाजूने ओव्हरटेक करतो.

पण जड वाहनांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने रस्ता दुभाजकाच्या बाजून गाडी चालवणे सुरू केले आहे. कारण डावीकडे दुचाकी आणि तिचाकी वाहनं एखादं मांजराचं पिल्लू पायात यावं तसे गाडीसमोर येत असतात. त्यामुळे चारचाकी वाहन चालवणं हे अतिशय रिस्की झालं आहे. शिवाय सतत अलर्ट राहावं लागत असल्याने चारचाकी वाहन चालकाचं ब्लड प्रेशर उसळंतं असतं. अनेक चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवल्यामुळे हृदयरोगाचं दुखणं जडलेलं आहे. आणि याचं मोठं कारण म्हणजे आपल्या रस्त्यावर गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढलेली दुचाकी वाहनं.

मी गेली 30 वर्षे चारचाकी वाहन चालवतो आहे. व्यावसायिक गरजांसाठी ट्रकही चालवले आहेत. आजपर्यंत एकही अपघात झालेला नाही. सुरुवातीच्या ड्रायव्हिंगच्या काळात ज्या काही अपघात होऊ शकणाऱ्या परिस्थिती होत्या त्यावेळी इतर वाहनचालकांनी सांभाळून घेतल्याने ते अपघात झाले नाहीत. उलट गाडी कशी चालवायची नाही, याचं प्रशिक्षण इतर चालकांच्या प्रसंगावधानामुळे शक्य झालं. रस्त्यावर या चालकांचा एकमेकांशी असलेला समन्वय हा रस्ता सुरक्षेचा एक महत्त्वाचा घटक.

शिस्तीने गाड्या चालवणारे ट्रकचालकच मोठ्या प्रमाणात देशभर बघितले. छोट्या चारचाकी गाड्यांचे चालकही तुलनेत बेफिकिर वाटले तरी बेसिक वाहतूक शिस्तीचा अभाव कुठे जाणवला नाही. अपवाद असतातच. पण ते कुठे नसतात. पण आजकाल दुचाकीस्वारांची जे बेशिस्त ड्रायव्हिंग दिसते ते भूतकाळात कधीच दिसले नव्हते. दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. लेनची शिस्त पाळत नाहीत. जागा असूनही साइड देत नाहीत, हा कॉमन अनुभव. दुचाकीस्वारांसाठी डाव्या बाजूची लेन ठेवलेली असतानाही ते उजव्या बाजूला येऊन सर्पचालीने गाड्या चालवतात. हल्ली तर ट्रिपलसीट ही गोष्ट शहरातही सर्रास दिसते. वाहतूक पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करतात.

माझ्या रस्त्यावरच्या डोळ्यात तेल घालून केलेल्या सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये प्रतिदिन पाच दुचाकीस्वारांना तरी प्रसंगावधान राखून अपघातापासून वाचवावं लागतं. मात्र आपण कुणामुळे तरी अपघातातून वाचलो आहे, हे त्या दुचाकीस्वाराच्या गावीही नसतं.

पूर्वी फियाट गाडी चालवताना उजव्या बाजूच्या बारचा ब्लाइंड स्पॉट हा प्रकार कधी अनुभला नव्हता. आताच्या गाड्या एअरोडायनॅमिक करण्याच्या नादात लांबट झाल्या आहेत आणि चालकाच्या उजव्या बाजूला जो बार येतो तो भारतीय रस्त्यांवर ब्लाइंड स्पॉट विकसित करतो. परदेशात इतकं बाइकचं ट्रॅफिक नसल्यामुळे आणि लेनची शिस्त असल्यामुळे त्यातले तोटे लक्षात आले नसतील. पण भारतात या ब्लाइंड स्पॉटमुळे मोठे अपघात घडत आहेत. मी सावध ड्रायव्हिंग करत असूनही काही दिवसांपूर्वीच एका स्टेशनजवळ अगदी हळू ट्रॅफिकमध्ये उजव्या बाजूने समोरून क्रॉस करत असलेली व्यक्ती शेवटपर्यंत या बारच्या ब्लाइंड स्पॉटमुळे दिसलीच नाही. ते गृहस्थही तिरके धाडसी पद्धतीने रस्ता क्रॉस करून आले. परंतु त्यांची तिरकी चालण्याची दिशा आणि माझ्या उजव्या बाजूच्या बारचा आडोसा यांचा बरोबर मेळ जमल्याने ते गृहस्थ माझ्यासाठी अदृश्य होते. वाहतूक मंद असल्याने जेव्हा ते दृश्यमान झाले तेव्हा ब्रेक मारणं शक्य झालं. बऱ्याचदा रस्ता क्रॉस करणाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांनाही झिकझॅक पद्धतीने लेन क्रॉस करताना या ब्लाइंड स्पॉटची कल्पना नसते. आणि अपघात झाल्यावर नाहक ‘तूतूमैमै’ होते.

रस्त्यावरचे खड्डे आणि त्यामुळे बाइकवाले घसरणे किंवा अचानक वेग कमी होणे हे आता सवयीचे झाले आहे. पण हल्ली पावसाळ्यात खड्ड्यांवर जे पॅचवर्क करतात, ते इतकं उंच असतं की हे पॅचेस स्पीडब्रेकरचे काम करतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल जातो किंवा ते दणकून आपटतात. अशावेळी मागून येणाऱ्या वाहनांच्या खाली येण्याचा धोका वाढतो.

अनेक दुचाकीस्वार कानामध्ये हेडफोन किंवा इअरबड घालून गाणी ऐकत बाइक चालवतात. त्यांना बहुतांश वेळा हॉर्न ऐकू येत नाही. बाइक चालवणाऱ्या मुली मोबाइलवर अधिक संख्येने बोलतात असं म्हटलं तर कदाचित जेण्डर-बायस्ड असल्याचा आरोप होईल. पण बहुतांश लोकांचा रस्त्यावरचा अनुभव तेच सांगतो.

महाराष्ट्रात आजघडीला ज्ञात आकड्यानुसार एकूण 3 कोटी 15 लाख 90 हजार दुचाकी आहेत. हा आकडा 1 जानेवारी 2023 रोजीचा आहे. 1 जानेवारी 2024 रोजी यात आणखी 18 लाख दुचाकींची भर पडली. पुढे आणखी 9 महिने सरले आहेत. म्हणजे येत्या जानेवारी 2025 मध्ये आणखी 20 लाख दुचाकींची भर पडेल.

थोडक्यात आणखी दोन महिन्यांनी निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात जेव्हा नवे मुख्यमंत्री शपथ घेतील तेव्हा अंदाजे साडेतीन कोटींहून अधिक दुचाकी महाराष्ट्रात असतील.

वाहन संख्येच्या 35 टक्के दुचाकी मुंबई शहरात आहेत असं सांगितलं जातं. मात्र मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींची संख्या ठाणे, नवी मुंबई इथून येणाऱ्या फ्लोटिंग बाइक पॉप्युलेशनमुळे सांगणं कठीण. तरी मुंबई शहरात दरवर्षाला सरासरी सव्वादोन ते अडीच लाख नव्या दुचाक्या रजिस्टर होतात.

या बहुतांश बाइक रस्त्यावर पार्क होतात. पार्क होताना त्या मुख्य स्टँडच्या ऐवजी साइड स्टँडवर पार्क होतात. एका बाइकला पार्क होताना 30 इंच रुंदीची जागा रस्त्यावर लागते. मात्र जेव्हा साइड स्टँडवर बाइक पार्क होते तेव्हा ती तिरकी होते आणि 40 इंजाची जागा व्यापते. मात्र आपली दुचाकी अँग्युलर पद्धतीने उलटी करून मुख्य स्टँडवर उभी करण्याची काळजी कुणीच घेत नाही. दुचाक्या बेशिस्तीमुळे पार्क केल्याने चारचाकी गाड्यांना योग्य जागा मिळत नाही. आणि पार्किंगचा गोंधळ वाढतो. या सगळ्यात अनेकांचे मौल्यवान परिश्रम, वेळ व इंधन वाया जाते.

मुंबईमध्ये जर 27 लाख दुचाकी धावत असतील आणि त्यातल्या 10 लाख दुचाकी जरी मुंबईच्या रस्त्यावर पार्क होत असतील, तर या दुचाकी मुंबईच्या रस्त्याच्या कडेची सरासरी 1016 कि.मी. जागा व्यापत असतील. मुंबईत पार्किंग लॉटमध्ये बाइक पार्क करण्यासाठी प्रतिदिन 50 रुपये भाडे मोजावे लागते. म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर प्रतिदिन 50 हजार रुपयांचा तोटा पालिकेला होत आहे. हा वाया जाणारा महसूल वार्षिक 1 कोटी 85 लाख 42 हजार इतका आहे. या एवढ्या पैशात मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी एक छोटं उद्यान विकसित करता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ