आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना हे वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असते. बऱ्याच लोकांना असे वाटते की मला काही होणारच नाहीये, त्यामुळे “मला इन्शुरन्सची गरजच नाहीये”. इन्शुरन्सचा प्रीमियम ( Insurance Premium ) भरणे म्हणजे अशा लोकांना एक वायफळ खर्च वाटत असतो.
इश्युरन्स आणि मनी बॅक मधला फरक
पण ही काही आजकालची परीस्थिती नाहीये, भारतात इन्शुरन्स ही गोष्ट नवीन नसली तरी म्हणावी तितकी लोकप्रिय नाही. इन्शुरन्सचा विषय आला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे LIC पॉलिसी. साधारण १९९० च्या दशकात प्रत्येकाच्याच घराघरात LIC पॉलिसी पोचलेली होती आणि ही अशी एखादी पॉलिसी घेतली की गुंतवणुकीच्या दृष्टीने आयुष्य सार्थकी लागले असे समजले जायचे. आता ही पॉलिसी घेताना त्याची रक्कम पुरेशी आहे की नाही ? आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला ती पॉलिसी मदत करेल का ? या सारख्या गोष्टींचा विचार करण्याआधी, मी भरलेले प्रीमियम मला काही झालेच नाही तर वाया जाणार का ? हा प्रश्न आधी विचारला जायचा. आणि या प्रश्नाला उत्तर म्हणून मनी-बॅक पॉलिसी चा जन्म झाला. मनी-बॅक पॉलिसी म्हणजे नावाप्रमाणे भरलेला प्रीमियम आणि त्याच्यावर थोडी रक्कम ही कालांतराने पॉलिसीधारकाला परत मिळणार आणि अर्थातच या गोष्टीमुळे लोकं या प्रकारच्या पॉलिसीवर तुटून पडले. पण जर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तुमचा प्रीमियम परत देणार असेल, तर अर्थातच पॉलिसीची रक्कम त्या हिशोबाने कमीच देणार हा साधा हिशोब बाजूला पडला. मनी-बॅक पॉलिसीकडे लोकं गुंतवणूक म्हणून बघायला लागले आणि मूळ इन्शुरन्सचा मुद्दा मागेच राहिला.
जनरल आणि मेडिकल इन्शुरन्स
आता इन्शुरन्स बघायला गेलं तर फक्त लाईफ हा एकच प्रकार त्यात येत नाही, लाईफ बरोबरच प्रामुख्याने मेडीक्लेम आणि जनरल इन्शुरन्स हे दोन प्रकार पण येतात. लाईफ इन्शुरन्स मध्ये ज्या व्यक्तीसाठी इन्शुरन्स काढला आहे त्याच्या पश्र्चात त्याच्या परिवाराला आर्थिक सहकार्य मिळेल हे बघितले जाते. मेडिक्लेम पॉलिसीमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळते तर जनरल इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स काढलेल्या वस्तूला म्हणजे गाडी, घर, फर्निचर यासारख्या वस्तूला काही नुकसान झाले तर त्याची भरपाई करून मिळते. गाडीच्या बाबतीत इन्शुरन्स काढणे बंधनकारक असल्याने इन्शुरन्स काढलाच जातो. पण इतर बाबतीत असे कोणतेही बंधन नसल्याने इन्शुरन्सचा विचार फारसा केला जात नाही. आणि बहुतेक वेळा हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. “छोटे फायदे के लिये बडा नुकसान” हे वाक्य इन्शुरन्स बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते, प्रीमियम वाचावायच्या नादात बरेचदा मोठे नुकसान होते.
क्लेम वाया जाणं चांगलं
इन्शुरन्स नसल्याने मोठा फटका पडलेली कितीतरी उदहरणं माझ्या माहितीत आहेत आणि येत असतात, त्याचप्रमाणे इन्शुरन्स असल्यामुळे कसा फायदा झाला हे सांगणारे क्लाएंटसुद्धा तितकेच भेटतात आणि ही दोन टोकं सोडून, आम्ही नुसताच प्रीमियम भरतोय त्याचा आम्हाला काही फायदाच नाही हे सांगणारे पण काही कमी नाहीत. अशा लोकांना ओरडून सांगायला लागते की तुमचा प्रीमियम वाया गेला ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण याचा अर्थ तुमच्यावर कोणतेही इन्शुरन्स क्लेम करायला लागणारे संकट आलेले नाही, आता यापेक्षा चांगली गोष्ट काय ? पण प्रत्येक गोष्ट नफा आणि तोट्याच्या तराजूत टाकली की सारासार विवेकबुद्धी बाजूलाच पडते, नाही का ?
इन्शुरन्सची काळाची गरज
आजच्या काळात वाढलेले उत्पन्न आणि त्याबरोबर उंचावलेली लाईफस्टाईल, अंगावर असलेली मोठ्या रकमेची कर्ज आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढ झालेले वैद्यकीय खर्च, या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य मोठ्या आर्थिक फटक्यापासून जर आपल्याला संरक्षण हवे असेल, तर इन्शुरन्स घेण्यावाचून कोणताही पर्याय नाही.
मुबलक कंपन्यांचा फायदा
पण याची सकारात्मक बाजू बघितली, तर आजच्या काळात भारतात सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स देणाऱ्या मुबलक कंपन्या उपलब्ध आहेत आणि या स्पर्धात्मक युगात ग्राहकाला उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचा फायदा प्रत्येकाने करून घेऊन, आपले भवितव्य आर्थिकदृष्ट्या संरक्षित करण्यासाठी या पर्यायांचा विचार करावा आणि योग्य ती पॉलिसी घेण्याकडे पावले नक्की उचलावी…
12 Comments
Nice and informative article
Nice Article
Very well written
Most of the points / common doubts of a layman are covered here in simple language
Nice article … explained in very simple words and effective way
Very well written article. Insurance is definitely a need of an hour
खूपच संमरपकपणे लिहिलं आहे चारुहास तुम्ही खरच आजही लोक असाच विचार करतात .
उत्तम लिहिले आशेस, सर्वान्न याचा खुप उपयोग होइल.
छान व सहजपणे विचार मांडले आहेस👍 especially सध्याच्या lifestyle ला का गरज आहे ते अगदी apt लिहिले आहेस.
एकदम मुद्देसूद! जागरूकता खुप गरजेची आहे.
फार छान आर्टीकल आहे. विमाहप्ता फुकट गेला तरी चालेल. आत्तापर्यंत आपल्याला काही झाले नाही याचा आनंद जास्त महत्वाचा आहे.मी याचा अनुभव घेतो आहे.
Very well written Charuhas. Simple language and easy to understand. Hope to see more awareness about this topic. India remains one of the worst countries when it comes to the % GDP covered by insurance.
Nice article. Going to take insurance.