फाल्गुन महिन्यात महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवताच्या जत्रा भरतात. वर्षभर गावाचं रक्षण करणाऱ्या या वेताळ दैवाचे आभार मानण्यासाठी ठिकठिकाणी या जत्रांना आता सुरुवात होत आहे. शहापूरची वेताळेश्वर जत्रेला 8 मार्च रोजी सुरुवात होत आहे.
वेताळ म्हटलं की, अंगावर काटा उभा राहतो. काहितरी भूताटकीचा प्रसंग आता ऐकायला मिळणार असं वाटतं. गोष्टींमधून त्याच तेच रूप लहान मुलांमध्ये बिंबवलं आहे. मात्र, वेताळ हा भगवान शंकराचा भक्त आहे. गावाचे रक्षणकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गावाच्या वेशीवर वेताळाचं मंदिर असतं. आणि वर्षातून एकदा या मंदिरात वेताळाची पूजा करुन जत्रेचं आयोजनही केलं जातं.
1950च्या आसपास जत्रेला सुरुवात

शहापूरच्या वेताळेश्वर ब्राह्मण आळीमध्ये हे वेताळेश्वर स्वामीचं मंदिर आहे. सन 1950 च्या दरम्यान, या जत्रेला सुरुवात झाल्याचं या गावातले प्रौढ लोकांनी सांगितलं. मात्र, काही कारणास्तव मध्यतंरी या जत्रेत खंड पडला होता. त्यानंतर या ग्राम देवताचे वहिवाटदार गोणे परिवारांनी 1993 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. जीर्णोद्धारापूर्वी हे मंदिर पूर्ण लाकडाचं होतं. त्यामध्ये पाच ते सहा फूट उंचीच्या वेताळ स्वामीच्या मूर्त्या होत्या. जीर्णोद्धाराच्या कामामध्ये मंदिराच्या आराखड्यामध्ये कोणताच बदल केला नाही. फक्त छतामध्ये आणि रंगरंगोटी सारखे वगैरे बदल करत डागडुजी केली. त्यानंतर खंडीत झालेल्या वेताळेश्वर जत्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली.
जत्रेचे दिवस ठरवणे
महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या नवमीला म्हणजे फाल्गुन शुक्ल नवमी आणि दशमीला या जत्रेचं आयोजन केलं जातं. पूर्वी सलग तीन दिवस ही जत्रा असायची. मात्र, वाढत्या गर्दीचं व्यवस्थापन करणं शक्य नसल्यामुळे अलीकडे फक्त दोनच दिवस ही जत्रा भरवली जाते.
1993 ला जेव्हा नव्याने जत्रेच्या आयोजनाला सुरुवात झाली तेव्हा, रिक्षावरुन गावागावात जाऊन या जत्रेला येण्याचं निमंत्रण दिलं जायचं. मात्र, आता या जत्रेची ख्याती पंचक्रोशीत पसरली आहे. त्यामुळे या जत्रेत शहापूरच्या लोकांसोबत त्यांचे दूरवरचे नातेवाईकही सहभाग घेत असतात, अशी माहिती प्रविण गोणे यांनी दिली.
हे ही वाचा : कोकणातील वेतोबा
हद्दीवरच्या सर्व देवांना निमंत्रण देणं

जत्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 8 मार्चच्या दिवशी सकाळी 8 वाजता महाअभिषेक, चंडीका सात्विक होम करण्यात येतो. या विधीसाठी त्र्यंबकेश्वरहून पुरोहित येतात. त्यानंतर सकाळी 9 च्या सुमारास गौणे कुटुंबिय शहापूरच्या हद्दीवर असलेल्या जवळपास 50-60 मंदिरात जाऊन सर्व देवांना निमंत्रण देत त्यांचा मानपान करतात. त्याचबरोबर जत्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी नारळ अर्पण करुन प्रार्थना करतात.
संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत मंदिरासमोर भजनाचा कार्यक्रम असतो. रात्री 8 वाजता ढोल – ताशाच्या गजरात पालखी निघते. या पालखीमध्ये मंदिरात असलेल्या मूर्त्यांची प्रतिमा ठेवलेली असते. या पालखीमध्ये त्र्यंबकेश्वरहून आलेले जवळपास 50 बाल वारकरीही सहभागी होतात. पूर्वपार चालत आलेल्या परंपरेनुसार रात्री 12 नंतर ही पालखी मंदिरात आणली जाते. त्यानंतर वेताळ स्वामींची आरती केली जाते.
देवाचा जागर गोंधळाने जत्रेची सांगता
जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची पूजा केली जाते. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. तर रात्री जागरण गोंधळ भरवला जातो.

छावा सिनेमाची छाप
मंदिराच्या सजावटीसाठीमध्ये मंदिराला पौराणिक रुप दिलं आहे. यंदा या जत्रेवरसुद्धा छावाचा प्रभाव दिसून येतो.