पिंपळगाव कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकत आंदोलनाला सुरुवात केली.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी पिंपळगाव बाजार समितीत आणत असतात. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो आडत्याने जवळपास 300 शेतकऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून पैसे अडवून ठेवले आहेत. ही रक्कम जवळपास अडीच कोटी रुपये आहे. अनेकदा पाठपुरावा करुनही या शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.
“गेल्या चार महिन्यापासून आम्ही बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि सभापतीना भेटून याविषयी सांगत आहोत. पण पदाधिकारी आम्हाला कोणतीच दाद देत नाहीत. आता आमच्याकडे घरखर्चासाठी पैसा राहिलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.” आंदोलकांनी अशी प्रतिक्रिया देत, “जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही गेटसमोरुन उठणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. जवळपास 12 च्या सुमारास पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून 10 एप्रिल पर्यंतची मुदत मागितली आहे. 10 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांचे सगळे पैसे देणार असल्याचं आश्वासन संचालक मंडळानी दिलं आहे.
दरम्यान, सोमवार दिनांक 10 मार्च रोजी चांदवड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, निर्यात शुल्क कमी करावं म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं.