थंडी सुरू झाली की महाराष्ट्रातल्या सर्व शहरी बाजारपेठांमध्ये जळगावची वांगी दिसू लागतात. कळणाची भाकरी आणि वांग्याचं भरीत अनेकांना खुणवतं. थंडीचा जोर वाढताच जळगावमध्ये खास झणझणीत भरीत पार्ट्यांचे आयोजन अनेक ठिकाणी केलं जातं. जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरिक परदेशात असले, तरी भरीताचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरीही भरीत भाकरीवर ताव मारण्यासाठी थेट जळगाव गाठतात.
बामणोदची वांगी भरीतासाठी प्रसिद्ध
जळगावात भरीतासाठी वांगी बामणोदच्या शेतातली निवडली जातात. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावरीले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणावरून वांगी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुण्याच्या बाजारपेठांमध्ये येतात. स्थानिक बाजारात 40 रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी, मुंबई-पुण्यात 60 ते 80 रुपये किलो दराने विकली जातात. वांग्यांमुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी काठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात.
तूर-कपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांने खुलते भरीताची चव
भरतासाठी वांगी भाजावी लागतात. पण हीच वांगी कापसाच्या किंवा तुरीच्या काड्यांवर भाजल्यावर त्या भरीताला खरी चव येते, असं जळगावकर म्हणतात. तूर आणि कापसाची काढणी झाल्यावर त्या रोपांच्या काड्या खास वांगी भाजण्याकरता बाजूला ठेवल्या जातात. वांग्यांना भाजण्यापूर्वी स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावे. काड्यांच्या धगीत 15 ते 20 मिनिटे वांगी भाजली जातात. भाजलेली वांगी एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते. यानंतर झणझणीत मिरचीचा ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत आणखीच चविष्ट होते. साल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी भांड्यात घेतला जातो. या गराचा लाकडी दांड्यानं लगदा करण्यात येतो. त्यामुळे तो गर एकजीव होतो. ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते. तिखट चवीचं हे भरीत थंडीत रुचकर लागते. या भरीताची रुची वाढवण्याकरता यात कांद्याची पात अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तिही भरीतात टाकली जाते. त्या पातीचे कांदे जेवतांना खातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकला जातो.
बाजरी, कळण्याची भाकरी व पुरीसोबत भरीतावर ताव
खान्देशात भरीताबरोबर बाजरी, कळण्याची भाकरी किंवा पुरी केली जाते. (कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण करून तयार केलेले पीठ). साधारण 1 किलो ज्वारीत 200 ते 250 ग्रॅम उडीद टाकल्यानंतर कळणे तयार होते. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोशिंबीर, मुळा व टोमॅटो या मेनूची लज्जत वाढवितो.
भरीताचा मेन्यू
पुण्या-मुंबईपर्यंत जळगाव तालुक्यातील आसोदा या गावातील आचारी भरीत तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील काही तरुणांनी जळगाव शहरात भरीत सेंटर सुरु केले आहेत. या ठिकाणचे भरीत पुणे, मुंबई, इंदौरपर्यंत पोहचविले जाते. यामुळे जळगावच्या भरताने जिल्ह्याच्या अर्थकारणाला देखील बळकटी मिळतेय.
भरीताकरताला जळगावला पसंती
जळगाव जिल्ह्यात पिकणाऱ्या या वांग्यांची लागवड अन्य ठिकाणी होत नाही. त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तरी जळगावच्या भरीताची स्पेशल चव येत नाही. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे. पण संकरित वांग्यांमध्ये ती चव आली नाही अस बोललं जातं.
हिवाळ्यातील कडाख्याच्या थंडीत भटकंतीसाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना जळगाव मधील भरीत भाकरीचा मोह आवरता येत नाही. यामुळे जळगाव मध्ये ठिकठिकाणी भरीत भाकरी सेंटर पाहायला मिळतात. यातल्या कित्येक सेंटर्सवर तासभर वेटिंग केल्यानंतर अस्सल जळगावच्या भरीत भाकरीवर खवय्ये आणि पर्यटक मनसोक्त ताव मारतात.