निसर्गाचं देणं आदिवासीचं तारपा वाद्य

Tarpa : निसर्गपूजक आदिवासी समुदायाच्या विशिष्ट कार्यक्रमांपुरत मर्यादित असणारी पारंपरीक वाद्ये आता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत. तारपा, घंगाळी, ताडफा ही आदिवासी समुदायाची काही खास वाद्ये आहेत. तारपा हे वाद्य भोपळ्यापासून तयार करतात. ताडपानाची गुंडाळी की हरणाचं शिंगांनं त्यात हवा घालणार यावरून त्याचं वैशिष्ट्य ठरतं.
[gspeech type=button]

आदिवासी जमातींमध्ये निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून वाद्ये बनवण्याची कला दिसून येते. यापैकी ‘तारपा’ हे वाद्य अलीकडे खूप प्रसिद्ध झालं आहे. आदिवासी लोककला सादर होताना तारपाच्या सूरांवर ठेका धरणारे नृत्य आपण पाहिलं असेलचं. मल्हार कोळी, वारली, कोकना, भिल्ल या महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये तारपा वाद्य वाजविले जाते.

‘तारपा’ म्हणजेच ‘पावरी’

तारपा हे एक सुषिर वर्गातलं वाद्य आहे. सुषिर म्हणजे ज्या वाद्यामध्ये हवा फुंकून वाजवलं जाते. आदिवासी समाजांनी निसर्गातच उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या वाद्यापैकी हे एक प्रमुख वाद्य आहे. या वाद्याच्या समोरील बाजूस जर ताडपानाची गुंडाळी जोडली, तर त्याला तारपा किंवा तारपी म्हणतात. जर यामध्ये मोठ्या जनावराचे शिंग वापरलं तर त्याला पावरी म्हणतात. हरणीचं शिंग वापरलं असेल तर त्याला बीरी किंवा चिरी म्हटलं जातं. यासोबतच देव वाजंत्र आणि देव डोब्रू अशीही या वाद्याची नावं आहेत.

तारपा बनवण्याची पद्धत

या वाद्याचे एकूण तीन भाग असतात. हे वाद्य मुख्यत्वे करुन भोपळ्यापासून बनवले जाते. हाच या वाद्याचा मुख्य आणि पहिला भाग आहे. भोपळ्याच्या आकारानुसार या संपूर्ण वाद्याची लांबी अवलंबून असते. वेलाला भोपळा आल्यावर चांगला भोपळा पारखून घेतात. त्यातील बिया आणि अनावश्यक भाग काढून टाकतात. तोंडाने हवा भरण्यासाठी त्याला लाकडाचा लहान नरसळ्यासारखा तुकडा बसवितात. नंतर बांबूच्या दोन नळ्या घेतात. त्यांना स्वरासाठी भोके पाडतात. बांबूच्या या नळ्यात वेताचे अगर वेळूचे प्रत्येकी एक- एक स्वर बसवतात. हे तिन्ही वेगवेगळे भाग दिव्याची काजळी आणि मेणाने एकमेकांना चिकटवतात. तसचं बांबूच्या काठ्यांच्या दुसऱ्या टोकास जनावराचे शिंग, ताडपाने गुंडाळली जातात.

तारपा वादन कसं करतात

मल्हार कोळी, वारली, कोकना, भिल्ल असा विखूरलेला आदिवासी समाज असला तरी त्यांचे तारपा हे वाद्य, ते वाजवण्याची पद्धत आणि तयार करण्याची पद्धत ही एकसमान आहे. तारपा हे वाद्य साधारण 2 ते 5 फूट लांबीचं असतं. या वाद्याची लांबी जरी कमी-जास्त असली तरी त्याने सुरांवर परिणाम होत नाही. तारपा वादन करणारे लाकडाच्या लहान नरसाळ्यातून अखंडीत फुंक मारत राहतो. ती हवा भोपळ्याच्या मार्गे वाद्याच्या दुसऱ्या भागात दोन पोकळ बांबूच्या नळ्यात जाते. एका नळीला सहा स्वरछिद्रे असतात. यावर निरनिराळे स्वर उत्पन्न करता येतात. एकच स्वर तुटकपणे वाजविता येत नाही. स्कॉटिश बॅगपाईपसारखे हे वाद्य अखंडपणे वाजत राहते.

तारपा नृत्य

तारपा या वाद्यावर केल्या जाणाऱ्या नृत्याला तारपा नृत्य म्हणतात. यामध्ये तारपा वादक हा मध्यभागी उभा असतो. त्याच्याभोवती फेर धरून नृत्य करणाऱ्या जोड्या नृत्य करत असतात. नृत्य करणाऱ्यात सर्वात पुढे जो असतो त्याच्या हातात एक काठी असते. त्या काठीला घोळकाठी असे म्हणतात. काठीच्या वरच्या बाजूला लोखंडी पाकळ्या बसविलेल्या असतात. तारप्याच्या सुरावटी सोबत नृत्य करणाऱ्यांना ताल देण्याचे काम घोळकाठी करत असते. तारप्याची लय जस जशी वाढत जाते तसे नृत्य करणारे एकदम बेभान होऊन तारप्यातून निघणाऱ्या सुरावटी वर नाचत असतात.

करमणूक ते भाबड्या विश्वासाचं नातं

पूर्वी कोणतचं करमणुकीचं साधन नसल्याने या समाजाने स्वयंनिर्मित वाद्यांच्या आवाजालाच करमणुकीचं साधन वापरलं. शेतातील पिकावर कीड पडली असेल किंवा पाड्यावर कोणती रोगराई आली असेल तर पाड्याच्याबाहेर भगतमंडळींना बोलावून तारप्याचं वादन केलं जायचं. थोडक्यात पाड्यावर कोणतंही आरिष्ट्य आलं असेल तर याच तारप्याच्या माध्यमातून निसर्ग देवतेकडे प्रार्थना केली जायची.

नागपंचमी ते राजकीय ओळख

पूर्वी तारपा वाद्य हे फक्त नागपंचमीला वाजवलं जायचं. नागपंचमीपासून देवदिवाळीपर्यंत तारपामध्ये सूर गुंफून त्यावर ठेका धरला जायचा. मात्र कालांतराने सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांनाही तारपा वाजवू लागले. आणि आता तर आदिवासी बहुल भागामध्ये राजकीय कार्यक्रमांना सुद्धा तारप्याचं वादन होऊ लागलं आहे. त्यामुळेच तारपा हे आदिवासी बांधवाच्या संस्कृतीचं चिन्ह म्हणून उदयाला येत आहे. आदिवासी समाजातील ‘भाया’ म्हणजेच भगत ज्यांना आदिवासी बोलीभाषेत ‘खटपट्या’ म्हणतात. तेच पावरा (तारपा) वाजवत असत.

उदरनिर्वाहाचं साधन तारपा

काळाच्या ओघात आजही आदिवासी बहुल भागात तारप्याचं वादन केलं जातं. आजही अनेक ठिकाणी या पारंपारिक वाद्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पूर्वी पावरी, संबळ, शिबले ही वाद्य आदिवासी बांधव केवळ करमणुकीसाठी वापरायचे. आता मात्र विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वा लग्नकार्यात या वाद्याच्या वादनातून आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भैरवनाथ यात्रा:सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या
बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. 'बगाड' यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून
Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ