महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात विशेषतः लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात येते. या अमावस्येला ‘दर्शवेळा अमावस्या’ या नावानं ओळखण्यात येतं.
शेत-शिवार माणसांनी फुलतात
रब्बी हंगामात शेत शिवारातील, पिकांची, शेतातील धान्याची पूजा करून विशिष्ट पदार्थ बनवून मित्र-परिवारासोबत वनभोजनाचा आनंद या दिवशी घेतला जातो. ज्यात फक्कड असं गावरान जेवणाचा मनमुराद आनंद शेतात जाऊन घेतला जातो. या दिवशी लातूर जिल्ह्यातील शहरं आणि गावं ही अक्षरशः ओस पडलेली असतात. तर शेत शिवार माणसांनी बहरलेली असतात. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे 30 डिसेंबर रोजी येणारी ‘येळवस’ शेतकऱ्यांसह सर्वच जण मोठ्या हर्षोल्लाहसात साजरा करतील.
संपूर्ण लातूर, धाराशिव जिल्हा, सोलापूर-बीड जिल्ह्यातील काही भाग तर कर्नाटक सीमा भागात शेतकऱ्यांचा सण म्हणून वेळा अमावस्या अर्थात दर्शवेळा अमावस्या म्हणून ओळखला जातो. याला ‘येळवस’ ही म्हणतात.
रब्बी हंगामात आलेल्या हिरव्यागार पिकांची पूजा करण्यासाठी हा सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करतात. जाती-पाती आणि धर्माच्या भिंती मोडून टाकणारा हा सण लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दरवर्षी घडवित असतो.
निसर्गपूजेची परंपरा
या दिवशी शेतातील काळ्या आईची ‘लक्ष्मी’ म्हणून पूजा करण्यात येते. पाच दगडांना रंग लावून कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये मनोभावे पूजा केली जाते. त्यांना प्रदक्षिणा मारण्यात येते. आपल्या कृषीप्रधान देशात सर्व सण कृषीमधून उत्पन्न मिळण्याच्या दरम्यानच साजरे होतात. हे उत्पन्न मिळण्याच्या वेळी निसर्गाचे आभार विविध पद्धतीने मानण्यात येतात. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच आपल्या पूर्वजांनी रीती-रिवाज काही उद्देशाने सुरू केलेत. रीती-रिवाजांचं नाव दिल्यावर त्या ‘पाळणं’ पूर्वी आपसूकच बंधनकारक व्हायचं. कामा-धंद्यानिमित सतत राबणाऱ्या आणि कामानिमित्त दूरदेशी असणाऱ्या लोकांना किमान एक दिवस तरी एकत्र राहून, एकत्र आहार करून निवांतपणा मिळावा, उत्साह साजरा करायला परिवारातील सर्व एकत्र यावेत म्हणूनच तर सणांची तजवीज आहे. आपली काळी आई आणि पाणी यांच्यामुळेच तर आपली भरभराट होते, याचं भान येळ अमावस्या साजरी करताना लहानपणापासूनच येतं. आणि या दोघींचं रक्षण केलं तरच आपलं पुढे निभावणार हे महत्त्व अधोरेखित होतं.
गेट-टुगेदर आणि पारंपरिक मेजवानी
एका रंगविलेल्या माठामध्ये ताकापासून बनविलेले ज्वारीचे ‘अंबिल’ भरून त्याचा ग्रामदेवतेस नैवेद्रद्य दाखवून शेतात आणला जातो. त्यानंतर मनोभावे पूजा करून विशिष्ट अशा ग्रामीण चवदार पदार्थांच्या जेवणाचा आस्वाद घेतला जातो. ज्वारी-बाजरीचे उंडे, ताकाचे आंबील, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली ‘भज्जी’, गव्हाची खीर, वांग्याचे भरीत, धपाटे, तिळाच्या पोळ्या असे एक ना अनेक पदार्थ या जेवणात असतात. या मिश्र भाज्यांच्या ‘भज्जी’चा स्वाद अतिशय सुंदर असतो. या वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी नातेवाईक, मित्र-परिवार यांना आमंत्रित करण्यात येते. तसेच ज्यांना शेती नाही अशा परिचितांना आवर्जून या चवदार जेवणाचे शेतात निमंत्रण दिले जाते. अनेक जण आपल्या शेतात वेळा अमावस्या दिवशी मोठं ‘गेट टुगेदर’ ठेवतात. काही हौशी लोक त्यांच्याकडच्या वेळा अमावस्येच्या या कार्यक्रमाकरता हजार-दीड हजार लोकांना आमंत्रण करतात. लातूरमधील प्रसिद्ध व्यापारी अशोक उर्फ गट्टू शेठ अग्रवाल यांच्याकडेही ही शेतकरी परंपरा मोठ्या उत्साहाने जपली जाते.
लातूरमध्ये संचारबंदीसारखी परिस्थिती !
वेळा अमावस्या सणासाठी लातूरमध्ये जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर करतात. शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सर्व दुकानेही बंद असतात. हा सण साजरा करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील नागरिक शेताकडे जातात. त्यामुळे शहरात गावात शुकशुकाट असतो. तर अनेक गावं ही अघोषित संचारबंदी लागल्यासारखी ओस पडलेली असतात. सर्वच जण शेतात असल्यामुळे शहरात चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत म्हणून पोलिसही पेट्रोलिंग करीत असतात. ज्यांना शेत नाही किंवा कुठलं निमंत्रण नाही ते एखाद्या उद्यानात जाऊन हा सण साजरा करतात. शेतकऱ्यांच्या या अनोख्या सणाचा मोठा उत्साह लातूरसह परिसरातील जिल्ह्यातील नागरिक घेत असतात.
माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा वेळा अमावास्या सण आहे. शेतकरी आणि निसर्गाची वेळा अमावस्या सणानिमित्त सुरु असलेली ही वर्षानुवर्षांची भागीदारी अशीच बहरत जावो, एवढ्याच आजच्या दिवशी सर्व शेतकरी बांधवाना शुभेच्छा.