थंडीच्या दिवसात चादरीत गुरफुटून झोपून राहावं असं वाटतं. जास्त वेळ झोपायला मिळावं म्हणून रात्र संपूच नये असं अनेकांना वाटतं. आणि तुम्हांला आश्चर्य वाटेल, हे प्रत्यक्षात घडतं सुद्धा!
होय, अमेरिकेतल्या अलास्का राज्यातल्या उत्कियाग्विक म्हणजेच बॅरो शहरात तब्बल दोन महिने रात्र असणार आहे. या शहरात सूर्य चक्क सुट्टीवर जातो.
फ्रिजीड झोनमधील भाग
अलास्का हा उत्तर गोलार्धात येणारा, उत्तर ध्रुव (नॉर्थ पोल) आणि आर्क्टिक सर्कल या दोघांमधला अतीथंड हवामानाचा प्रदेश (फ्रिजीड झोन) आहे. उत्तर ध्रुवाच्या दिशेने पुढे जाताना थंडीत काही ठिकाणी दिवस अतिशय लहान होत जातो. त्यानुसार, या भागात सूर्यप्रकाश अजिबातच नसतो आणि हिवाळ्यामध्ये या भागात दिवसाही अंधार असतो.
तब्बल 65 दिवस सूर्य सुट्टीवर!
या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी अलास्कामध्ये सूर्यास्त झाला आहे. आता तब्बल 65 दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी 2025 रोजी सुर्योदय होणार आहे. नागरिकांनी या वर्षाच्या ‘अखेरच्या दिवसा’चं सेलिब्रेशनही केलं आहे.
उत्कियाग्विकमध्ये जवळपास 4 हजार लोकसंख्या आहे. अतीथंड प्रदेशात येत असल्याने साहजिकच या भागात प्रचंड थंडी असते. सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात नसल्याने एरव्हीही या भागाचे मायनस 10 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत असते. दोन महिने सूर्यदर्शन अजिबातच नसतानाच्या या 2 महिन्यात शहराचे सरासरी तापमान मायनस 5 अंशापेक्षा कमी असतं.
ध्रुवीय रात्र काय असते?
ध्रवीय रात्र याला इंग्रजीमध्ये पोलार नाईट्स (Polar Nights) असं म्हटलं जातं. यामध्ये पृथ्वीचा उत्तर गोलार्थ हा सूर्याच्या कक्षेपासून दूर जातो. त्यामुळे या उत्तर गोलार्थामध्ये सुर्यादय होत नाही. हा भाग आर्क्टिक सर्कलच्या वर असल्यामुळे सूर्य क्षितिजाच्यावर येतच नाही. वातावरणातील थोडा-फार प्रकाश आभाळात परावर्तीत होतो आणि रंगीत प्रकाशाचे विहंगम दृश्य आकाशात दिसते. या स्थितीला ‘पोलर नाइट्स’ असं म्हटलं जातं.
अमेरिकेतील अलास्काशिवाय, रशिया, स्वीडन, फिनलँड, ग्रीस आणि कॅनडातील काही शहरांमध्ये पोलर नाइट्ससारखी स्थिती असते.
‘ध्रुवीय सिंड्रोम’
निसर्गाच्या या चक्रामुळे मानवी आयुष्यावर खूप नकारात्मक परिणाम पडतो. आपल्या शरीराची वाढ आणि आरोग्य हे दिवस आणि रात्र या दोन्हीच्या अनुषंगाने होत असते. दिवसा आपण जास्त सक्रिय असतो. त्यामुळे या दोन महिन्याच्या कालावधीत प्रकाश नसल्याने पृथ्वीच्या या भागात राहणाऱ्या लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं.
या दोन महिन्याच्या कालावधीत इथल्या लोकांमध्ये नैराश्य वाढते. अनेक जण चिंताग्रस्त होतात. चिडचिड करू लागतात. सूर्यप्रकाशच न मिळाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते, पचनशक्ती मंदावते. या सोबतच केसांची वाढ खुंटते, त्वचेचे आजार होतात, त्वचेवर फोड येतात, खूप थंडी असल्यामुळे त्वचा कोरडी पडते.