गाझा पट्टीवरील इस्त्रायल हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्धाला स्वल्पविराम लागला आहे. या इस्त्रायल आणि हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्धाला दोन महिने युद्ध विराम देण्याचा करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे. पण या घटनेने मध्य आशियामध्ये पूर्ण शांततेचं वातावरण सध्या तरी निर्माण होणार नाही. कारण, इस्त्रायल आणि हमास मधला संघर्ष अजूनही सुरूच आहे.
तरी, इस्त्रायल आणि हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्ध विरामामुळे या प्रदेशातील लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. या युद्धामुळे स्थलांतरीत झालेले हजारो रहिवासी दुसऱ्याच दिवशी आपापल्या घरी परतू लागले.
दरम्यान, इस्त्रायल हिजबुल्लाहमधील युद्धबंदी करार हा केवळ लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षापुरताच मर्यादीत आहे. गाझा पट्टीवर सुरू असलेल्या संघर्षाबाबत अद्याप तोडगा निघाला नाही आहे.
इस्त्रायल हिजबुल्लाह दरम्यानचा करार
अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल हिजबुल्लाह मधील युद्ध पुढील दोन महिन्यासाठी थांबलं आहे. गेल्या 14 महिन्यापासून लेबनॉनमध्ये हे युद्ध सुरू होतं. ज्यामध्ये 3,750 हून नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं.
मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी इस्त्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी युद्ध बंदी विषयावर चर्चा करत या निर्णयाला मंजूरी दिली. या करारानुसार, सुरुवातीला दोन महिन्याची युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे.
विस्थापित नागरिकांना आपल्या घरी परतू देणं ही या करारातील मुख्य अट होती. त्यानुसार दक्षिण लेबनॉन मधून स्थलांतरित झालेल्या जवळपास 12 लाख नागरिकांना आपापल्या घरी परतण्याची परवानगी दिली आहे. इस्रायलमध्येही सीमेलगतच्या भागातून स्थलांतरित झालेले 50 हजार नागरिक सुद्धा आपापल्या घरी परतले आहेत.
या करारातील दुसरी अट होती की, इस्रायल सैन्यानी दक्षिण लेबनॉनमधून माघार घ्यावी. तर हिजबुल्ला संघटनेने लितानी नदी दक्षिणे सीमेवरून माघार घ्यावी. दक्षिण लेबनॉनमधून इस्रायल लष्काराने माघार घेतल्यावर त्या भागात लेबनॉन आणि संयुक्त राष्ट्र पर्यवेक्षक संघटना आपापलं सैन्य त्याभागात तैनात करणार आहे.
या युद्ध बंदीचा हमास वर काय परिणाम होईल?
इस्रायल – हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्धबंदीमुळे हमास आता एकट्याने संघर्ष करत आहे. मुळात हमासच्या ताब्यातून इस्रायली सैनिकांची सुटका करण्यासाठी इस्रायलने हिजबुल्लाहसोबत युद्धबंदी केली आहे. कारण या युद्धबंदीने हमासवर युद्ध लढताना तणाव येऊन युद्धात पकडलेल्या कैद्यांना सोडण्यासंबंधित समझोता करणं सोपं होईल, या विचाराने ही युद्धबंदी केली आहे.
सुरुवातील इस्रायलसोबत युद्धबंदी शक्य नाही, या मुद्दावर हिजबुल्लाह अडून बसला होता. पण अखेर त्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. या निर्णयामुळे मध्य आशियामधील तणावपूर्ण वातावरणात थोडा सकारात्मक फरक पडला आहे.
इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध बंदी शक्य आहे का?
गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास मध्ये सुद्ध सुरु आहे. या युद्धात लेबनॉन आणि इस्त्रायलमधल्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अनेक लोकं बेघर झाले तर हजारो लोक युद्धकैदी बनले.
एकीकडे हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली युद्धकैद्यांची सुटका करावी ही इस्रायली नागरिकांची प्रमुख मागणी आहे. तर दुसरीकडे हमास संघटनेला पूर्ण नेस्तानाबूत करणं, सीमेपलिकडील काही भौगोलिक प्रदेशातून इस्रायलचं नियंत्रण प्रस्थापित करणं आणि हमासच्या ताब्यात असलेल्या युद्धकैद्यांची बिनशर्त सुटका
करावी ही पंतप्रधान नेत्यान्याहू यांची अट आहे. मात्र, हमासला शरण आणणं त्यांना शक्य होत नाहीये.
युद्धबंदी झाल्यास हमासचं काय?
लेबनॉनच्या भूमीवर इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू होतं. हमासला समर्थन देण्यासाठी हिजबुल्लासुद्धा या युद्धात उतरला. तेव्हापासून एकीकडे इस्रायल तर दुसरीकडे हमास आणि हिजबुल्लाह असं हे युद्ध सुरू होतं. मात्र, इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध विराम करारावर संमती झाल्याने आता हमास एकेट्याने हे युद्ध लढत आहे.
हमासला या युद्धात जास्त काळ एकट्याने तग धरून राहणं शक्य नाही. कारण इस्रायलची लष्करी ताकद खूप मोठी आहे. त्यापुढे निभाव लागलं हमासला शक्य नाही. त्याचप्रमाणे इस्रायलने हमासच्या प्रमुखांचाही खात्मा केला आहे. त्यामुळे हमास ही इस्रायल पुढे कमजोर पडत आहे.
मात्र, अशा परिस्थितीत जर हमासने या युद्धातून माघार घेतली तर गाझा पट्टीतील हमासचा प्रभाव कमी पडेल असं मत पॅलेस्टाईन विश्लेषक खलील सईघ यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, हमास आणि इस्रायलमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी अमेरिका पुढाकार घेईल, असे वक्तव्य अमेरिकेचे पराराष्ट्रमंत्री अंटनी ब्लिंकन यांनी नुकतच केलं आहे. तरी, या चर्चेदरम्यान हमास पडती बाजू घेणार नाही, इस्रायलने गाझा पट्टीतून माघार घेतली तरच युद्धकैद्यांना सोडू असा डाव टाकू शकतात, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
युद्धकैद्यांच्या कुटुंबियांचा इस्रायल सरकारविरोधात आंदोलन
मध्य आशियामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तणावपूर्ण वातावरण आहे. सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासच्या या युद्धाची झळही सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसली आहे. गेल्या वर्षी हमासने इस्रायलवर हल्ला करत जवळपास 250 लोकांचं अपहरण केलं. त्यानंतर काही काळासाठी शांतता झाल्यावर या अपहरण केलेल्यांपैकी काही नागरिकांना सोडून देण्यात आलं. तर काहिंना मारून टाकलं. आजही गाझापट्टीमध्ये साधारण 100 इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत.
इस्रायल-हिजबुल्लाच्या युद्धबंदी करारामध्ये या सामान्य नागरिकांची सुटका करण्यासंबंधी अट ठेवून त्यांची सुटका करावी, असं जनतेंना अपेक्षित होते. मात्र, नेत्यांन्याहू यांनी अशी अट ठेवली नाही म्हणून संतप्त जनतेंनी मंगळवारी तेल अवीव येथील राजमार्गावर सरकारविरोधात आंदोलन केलं.
पॅलेस्टाईनमधील सामान्य नागरिकही या युद्धाचे बळी ठरले आहेत. या युद्धामुळे गाझा सीमेवरील अनेक पॅलेस्टाइनची घरं उजाड झाली आहेत. जवळपास संपूर्ण पॅलेस्टाइनच युद्ध शरणार्थी म्हणून गेल्या वर्षभरापासून जगत आहेत. या दरम्यान आलेल्या पावसात पूरपरिस्थितीमुळे तर अनेक लोकही कित्येक दिवस पाण्यामध्येच उपाशी राहिले होते. या सर्व युद्धामध्ये आतापर्यंत जवळपास 44 हजारहून अधिक सामान्य लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यांमध्ये महिला आणि बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
त्यामुळे मध्य आशियातील या युद्धजन्य परिस्थितीला लवकरच पुर्णविराम मिळण्याची प्रतिक्षा आहे.