कर्मचाऱ्यांच्या थकव्यामुळे कंपनीचं कोट्यावधीचं नुकसान

Work Burnout : कार्यालयातील ताणतणाव, कामाचा व्याप या सगळ्या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये 'बर्नआऊट' ही संकल्पना उदयास आली आहे.  कामाच्या थकव्यामुळे काम करण्याची इच्छा कमी होते, नैराश्य, अस्वस्थतेसह हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. कर्मचाऱ्यांच्या या वैयक्तिक नुकसानीसह कंपनीचंही कोट्यावधीचं नुकसान होतं हे संशोधनाअंती स्पष्ट झालं आहे. 
[gspeech type=button]

‘बर्नआऊट होणं’, हा शब्द अलिकडे सर्रास ऐकायला मिळतो. ऑफिसचे आठ-नऊ तास कधी एकदाचे संपतात, कधी एकदाच वीकएंड येतो, सोमवार येऊच नये, एका क्षणाला तर नोकरीच सोडून द्यावी, काहिच करु नये असं वाटायला लागतं. आणि मग ऑफिसचे गॉसिप असो की मित्र – मैत्रिणींमधल्या गप्पा… सगळीकडे नोकरीला वैतागल्याच्या चर्चा सुरू होतात. या सगळ्या परिस्थितीला ‘एम्प्लॉयी बर्नआऊट’ असं म्हणतात.  या मानसिक स्थितीमुळे केवळ कर्मचाऱ्याचंच नुकसान होत नाही तर, कंपनीचंही कोट्यावधीचं नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. 

‘द अमेरिकन जर्नल ऑफ प्रीवेंटिव्ह मेडिसीन’ या मासिकाने या विषयावर संशोधन केलं आहे.  यामध्ये  अमेरिकेतल्या एका कंपनीमध्ये 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बर्नआऊट म्हणजे थकव्यामुळे, कंपनीला वर्षाला तब्बल 5.04 मिलियन डॉलर म्हणजे 43 कोटी 14 लाख 67 हजार 810 रुपयाचं नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. 

कामाच्या थकव्यामुळे कार्यक्षमतेवर होणारा परिणाम

कर्मचारी जर कामासाठी उत्सुक नसतील तर कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होतो. कर्मचारी सातत्याने गैरहजर राहतात, दिलेलं काम वेळेत पूर्ण होत नाही किंवा कामामध्ये चूका होतात. परिणामी उत्पादन निर्मिती कमी होते किंवा त्यात चूका असतील तर ते उत्पादन नाकारलं जातं. या सगळ्या गोष्टींमुळे कंपनीचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं.  

कर्मचाऱ्यांच्या स्तरानुसार कंपनीला आर्थिक फटका बसतो

यामध्ये कर्मचारी ज्या ज्या पदांवर काम करतात त्यानुसार कंपनीचं आर्थिक नुकसान होत असतं. कारण उच्च पदावर म्हणजे एक्झिक्यूटिव्ह आणि मॅनेजर पदावर असलेले कर्मचारी जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, तेव्हा त्यांचा पगार जास्त असल्यामुळे कंपनीला जास्त नुकसान होतं. ‘द अमेरिकन जर्नल ऑफ प्रीवेंटिव्ह मेडिसीन’ च्या अभ्यासानुसार, तासावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर कार्यक्षमतेनं काम केलं नाही तर वर्षाला 3 लाख 45 हजार 213 रुपयाचा तोटा होतो. कंपनीच्या पे-रोलवर असलेला कर्मचारी जेव्हा काम पूर्ण करत नाही तेव्हा कंपनीचं 3 लाख 67 हजार 380 रुपयाचं नुकसान होतं. 

सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे मॅनेजर आणि एक्झिक्यूटिव्ह पातळीवरचे कर्मचारी जेव्हा कार्यक्षमतेने काम करत नाहीत, गैरहजेरीचं प्रमाण वाढतं तेव्हा अनुक्रमे 9 लाख 34 हजार 114 आणि 17 लाख 84 हजार 949 रुपयाचं वार्षिक नुकसान होतं. 

कार्यालयात नकारात्मक वातावरण निर्मिती

अनेकदा कामाच्या व्यापामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिथीलता येते. जसा एखाद्या आजाराचा संसर्ग पसरतो तसंच या कामाच्या थकव्यासंदर्भात होतं. कार्यालयामध्ये दोन – चार कर्मचारी हे कामाच्या व्यापाने थकलेले असतील तर ते त्याबद्ल आणखीन लोकांसोबत चर्चा करतात. या चर्चामध्ये कामासंबंधित नापसंती, संस्थेविरोधातली चर्चा अशा नकारात्मक विषयावर बोलतात. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेली कामाची प्रेरणा कमी होते.  यामुळे कार्यालयातले अन्य कर्मचाऱ्यांचं सुद्धा कामांवर दुर्लक्ष करुन कामं बाजूला ठेवून वेळेचा अपव्यय करु लागतात. 

थकव्याची कारणं आणि उत्पादनतेवर त्याचा कसा परिणाम होतो?

कामाचा ताण, त्यामुळे येणारा तणाव, विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न मिळणे यामुळे भावनिकरित्या, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जाणं, या स्थितीला इंग्रजीमध्ये बर्नआऊट म्हटलं जातं. 

कामाच्या तणावामुळे आपण शक्तीहीन आहोत असं वाटून आपल्यासमोर काहीच ध्येय नसणं, काही करावसं न वाटणं, भावनिकदृष्ट्या खचून जाणं अशी व्याख्या मेयो क्लिनिकने कामाच्या थकव्यासंदर्भात केली आहे. 

या थकव्यामुळे नैराश्य, अस्वस्थता त्याहून अधिक हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

कामाचा ताण, कार्यालयाच्या ठिकाणी असलेलं वातावरण, तिकडचं राजकारण, सहकाऱ्यांशी ओळख नसणे, भेदभाव, ग्रुपिझम या सगळ्या कारणांसह कौटुंबिक तणाव, आर्थिक ताण आणि वैयक्तिक आरोग्य या गोष्टींमुळे सुद्धा कर्मचारी थकून जाऊ शकतो.  

कामातील थकवा वेळीच ओळखणे

कर्मचारी हे कार्यक्षमतेने काम करत नाहीत, ते थकून गेलेले आहेत हे वरिष्ठांनी वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना राबवल्या पाहिजेत. जेणेकरुन कार्यलयातल्या अन्य कर्मचाऱ्यांवर, वातावरणावर आणि कंपनीच्या उत्पादनावर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही. 

ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीमध्ये प्रगती होण्याऐवजी अधोगती होते, काम करण्याची प्रेरणा कमी होते त्यावेळी पुढील गोष्टी घडतात.

काम करताना वारंवार चुका होणं, दिलेल्या वेळेत काम पूर्ण न होणं.

वारंवार गैरहजर राहणं.

कार्यालयातल्या सहकाऱ्यांशी संपर्क न ठेवणे किंवा कार्यालयातल्या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग न घेणं.

कामाचं क्रेडिट मिळत नसल्याची, कामाचा व्याप वाढल्याची वा तणावाची एकसारखी तक्रार करणे.

सोसायटी ऑफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटकडून 2024 साली कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणनुसार, अमेरिकेतले 44 टक्के कर्मचारी हे कार्यालयाच्या ठिकाणी असलेला कामाचा व्याप, कामाचं क्रेडिट न दिलं जाणं आणि तिथले वाद या कारणांमुळे बर्नआऊट झालेल्याचं आढळून आलं आहे. 

कामाचा थकवा कसा कमी करता येईल?

कर्मचाऱ्यांचं शारीरिक, मानसिक आरोग्य जपत कंपनीची उत्पादन क्षमताही कायम ठेवणं ही  कंपनीचे मालक आणि अधिकारी वर्गाची गरज आहे. त्यामुळे कर्मचारी कामाने थकून न जाता आणि कंपनीची कार्यक्षमता कमी होऊ नये यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली पाहिजेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. कारण, एका कर्मचाऱ्यांच्या कामाच्या थकव्यामुळे कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांमध्येही नकारात्मक वातावरण निर्माण होऊन कंपनीचं मोठं नुकसान होऊ शकतं हे संशोधनाअंती स्पष्ट झालं आहे. 

त्यामुळे कंपन्यांना पुढील गोष्टींमध्ये बदल करता येईल – 

कामाच्या पद्धतीत बदल करणे – कर्मचाऱ्यांना रिमोट एरियातून किंवा घरुन आणि कार्यालयातून अशा दोन्ही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी देणं. या सवलतीमुळे कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी, प्रवासातून थोडा आराम मिळू शकतो. 

कामाची योग्य विभागणी – सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाची आणि जबाबदारीची विभागणी समप्रमाणात करावी. कोणा एका कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताण पडेल असं करु नये. 

कार्यालयीन समुपदेश व्यवस्था –  कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी वेळोवेळी कर्मचारी साहाय्य कार्यक्रमाचं आयोजन करावं. 

कर्मचाऱ्यांचा आदर सन्मान – कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिना अखेर उत्कृष्ट कर्मचारी निवडणं, कर्मचाऱ्यांची पगारवाढ, बढती, त्यांच्या कामाचं कौतुक  करणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. 

व्यावसायिक विकासासाठी संधी निर्माण करणे – कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर जर कर्मचाऱ्यांना करिअर घडवण्याची संधी असेल तर, त्यासाठी वरिष्ठअधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत त्यांना प्रोत्साहन देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची उत्सुकता टिकून राहते.  

याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यक्रम, वैयक्तिक व्यावसायिक विकास आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या अन्य सॉफ्ट स्किलसंबंधित उपक्रम राबवण्यावर भर दिला पाहिजे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ