एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध, इस्त्रायल-इराण-हिजबुल्लाह युद्ध सुरू असताना आता चीन आणि तैवानच्या सीमांवरील तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
चीनने पुन्हा एकदा तैवानच्या सीमेवर लष्करी कारवायांना सुरुवात केली आहे. त्यामुळे या सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनचा अविभाज्य भाग असल्याचं तैवान नाकारत असल्यामुळे, आपण लष्करी बळाचा वापर करत असल्याची स्पष्टता चीनच्या लष्कर प्रमुखांने दिली आहे. तर दुसरीकडे या युद्धजन्य परिस्थितीमुळे तैवानमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे.
या परिस्थितीत चीनच्या विरोधात लढण्यासाठी तैवान सज्ज आहे, असं तैवानच्या लष्कर अधिकाऱ्यांने स्पष्ट केलं आहे.
‘तैवान स्वातंत्र्य राष्ट्र आहे’ – राष्ट्राध्यक्ष लाय चिंग ते
राष्ट्राध्यक्ष विलीयम लाय चिंग ते यांनी नुकताच तैवानच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. 10 ऑक्टोबरला तैवानच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्राध्यक्ष लाय चिंग ते यांनी तैवान हा सार्वभौमत्व असलेला देश असल्याचा उल्लेख केला. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “आम्ही तैवानच्या सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला अबाधित ठेवणार. आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चीनला तैवानचं प्रतिनिधीत्व करण्याचा कोणताही अधिकार नाहीये.” याचबरोबर लाय चिंग ते यांनी तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता आणि स्थैर्य राखल्याचा दावा करत सामाजिक, हवामान बदल, सार्वजनिक आरोग्य आणि प्रादेशिक सुरक्षा अशा विषयांवर चीनसोबत काम करण्याचं आश्वासन सुद्धा आपल्या या भाषणात दिलं.
तैवानच्या सार्वभौमत्वाला चीनचा विरोध
‘तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असून तो स्वतंत्र देश नाही,’ अशी चीनची ठाम भूमिका आहे. त्यामुळे तैवानच्या नवनियुक्त राष्ट्राध्यक्षाच्या भाषणानंतर पुन्हा एकदा चीनने तैवानवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसारमाध्यमात स्पष्टपणे सांगितलं आहे की, तैवानचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष तैवानला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग असल्याचं अमान्य करत असल्यामुळे चीन लष्करी कारवाई करत आहे.
‘या लष्करी कारवाईसाठी चीनची सर्व आर्मी फोर्स एकत्र आली असून तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देणाऱ्यांविरोधात लढण्यासाठी ती सक्षम आहे. आणि या माध्यमातून आम्ही आमच्या देशाचं सार्वभौमत्व जपणार,’ असं मत पीएलएच्या ईस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते नेव्ही सीनियर कॅप्टन ली शी यांनी प्रसारमाध्यमांत स्पष्ट केलं आहे.