गडचिरोली हा आदिवासीबहुल भाग आहे. या जिल्ह्यात 75 टक्के जमीन वन विभागाची आहे आणि उरलेली जमीन इथल्या स्थानिक रहिवाशांच्या ताब्यात आहे. ते परंपरेनुसार त्यामध्ये शेती करताना दिसतात. गडचिरोली जिल्ह्यात एका बाजूला खनिज संपत्ती मोठी आहे. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी भात शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. इथला स्थानिक आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने शेती करत भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतो.
गडचिरोलीतल्या भाताला इतर राज्यातून मागणी
इथल्या भाताची मागणी सुद्धा इतर राज्यांमध्ये मोठी आहे अजूनही या भागामध्ये उत्पादक घेत असलेल्या भाताची चव हा चर्चेचा विषय ठरतोय. फक्त 25% शेतजमीन असली तरी इथे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आणि याचाच परिणाम या जिल्ह्यात राईस मिलचे मोठे प्रमाण दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 120 राईस मिल आहेत. या सर्व राईस मिल मध्ये इथे उत्पादन घेत असलेल्या तांदळावर प्रक्रिया केली जाते. गडचिरोली जिल्हा जरी नक्षलग्रस्त जिल्हा असल्याचे चित्र आपल्याला पाहायला यापूर्वी मिळत असलं तरी, ही जमेची बाजू आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पाहायला मिळाली नाही.
शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर नाही
आम्ही शेतीशी निगडित असलेल्या बांधवांना भेटल्यानंतर ते घेत असलेल्या उत्पादनाची खरेदी करणाऱ्या सर्वात जुन्या राईस मिलचे मालक रमेश सारडा आणि त्यांच्या बंधूंना भेटलो. त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्हा हा सगळ्यात मोठा धान उत्पादक असल्याचे सांगितले. सोबतच या ठिकाणी उत्पादित होत असलेला भात सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. या भागात उत्पादित होत असलेला भात आवडीने खाण्यामागचं कारण या भागात रासायनिक खतांचा उपयोग न करता भाताची शेती केली जाते. रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याने भाताची चव ही नैसर्गिक रित्या चांगली आणि खाण्या योग्य टिकून राहत असल्याचे सारडा यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात चित्र आणखी बदलेल
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध होत असताना शेतीतूनही धान उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. 120 हून अधिक राईस मिल हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे इथल्या पारंपारिक शेतकरी वर्गाला देखील दिलासा मिळताना दिसतोय. येणाऱ्या काळात इंडस्ट्री बरोबरच इथे असलेल्या पारंपारिक धान उत्पादनात देखील वाढ झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळेल.