कोकणाचं शिमगा आणि गणेशोत्सवाशी अगदी अतूट असं नातं आहे. मुंबईत आणि राज्यात पोटापाण्यासाठी स्थायिक झालेला चाकरमानी या दोन उत्सवांना हमखास कोकणात जातोच. मात्र दिवाळी तितकी दणक्यात साजरी होत नाही. अर्थात कोकणातल्या प्रत्येक सणाला जसा पारंपरिकतेचा आणि साधेपणाचा साज असतो, तसाच तो दिवाळीलाही असतो. कोकणातला हा हंगाम असतो भातकापणीचा. त्यामुळे या काळात अत्यंत लगबग सुरु असते, कोणालाही अजिबात उसंत नसते. त्यामुळेच रोषणाई, फराळाचे पदार्थ यापेक्षा प्रथेने चालत आलेला पोह्यांचा नैवेद्य आणि न्याहारी हे कोकणच्या दिवाळीचं खास वैशिष्ट्य.
पोह्यांचा नैवेद्य
नवीन आलेला भात घेऊन तो भिजवून जवळच्या गिरणीवर घेऊन जायचं आणि त्याचे पोहे कांडून आणायचे. नव्या भाताचे पोहे हे कोकणातल्या दिवाळीचं खास वैशिष्ट्यं. “अजूनही सावंतवाडी वगैरे भागांमध्ये गूळ पोहे हाच दिवाळीचा खरा नाश्ता असतो. नवीन कांडून आणलेले पोहे भिजवायचे, त्यात घरच्या नारळाचं भरपूर ओलं खोबरं आणि गूळ घालायचं, जायफळ, वेलदोड्याची पूड हवी असेल तर घालायची. आणि हे पोहे घेऊन शेजारीपाजारी जायचं. त्यांचे पोहे आपल्याला घ्यायचे,आपले त्यांना द्यायचे. बस्स हाच दिवाळीचा फराळ होता,” अशा आठवणी सावंतवाडीचं माहेर असलेल्या चारुलता राव सांगतात. नरकचतुर्दशीला अंघोळ झाली की तुळशीपाशी जाऊन तीनदा गोविंदा, गोविंदा, गोविंदा असं ओरडायचं आणि मग कारिटं फोडायचं. त्यानंतर आई हा गूळ-पोह्याचा नाश्ता द्यायची. आजूबाजूला सगळीकडे हाच पदार्थ असायचा. त्याचबरोबर उकडलेली रताळीही असायची. आता जरा नोकऱ्यांमुळे मुलं, सुना बाहेर पडली आणि शहरांसारखे फराळाचे इतर पदार्थही होऊ लागलेत. पण तरीही दिवाळीचा मुख्य पदार्थ म्हणजे पोहे हाच”,असं चारुलता राव सांगतात.
आणखी एक खास पदार्थ म्हणजे चण्याच्या डाळीच्या पिठाच्या करंज्या. हे पिठ भाजून घ्यायचं. त्यात सुकं खोबरं, गूळ, जायफळ वेलदोड्याची पूड याचं सारण भरुन करंज्या करायच्या आणि त्या तळायच्या, असं राव यांनी सांगितलं.
काही ठिकाणी बटाटा पोहे, दही पोहे, दूध पोहे, फोडणीचे पोहे असे पोह्यांचे विविध प्रकारही केले जातात.त्याच्याबरोबर उकडलेली रताळीही ठेवली जातात, तर काही ठिकाणी याच्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ केली जाते.
नारळाच्या दुधाने अंघोळ
दिवाळीला राज्यात बहुतेक सगळीकडे सुगंधी तेलाने अभ्यंग करुन स्नान करतात. पण कोकणात मात्र बऱ्याच ठिकाणी नारळाचं दूध लावण्याची प्रथा आहे. नारळ हा कोकणी माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. नारळाचे दूध अंगाला लावल्यास स्निग्धता वाढते, थंडीमुळे त्वचेवर येणारा रुक्षपणा कमी होतो, असं मानलं जातं.
उत्सव साजरा करण्याची पारंपारिक पद्धती
कोकणात बरंच काही बदललं तरी आजही नरकचतुर्दशीला अंगणात कारिटं फोडताना ‘गोविंदा’ची आरोळी ऐकू येतेच. कारिटं म्हणजे नरकासुराचं प्रतिक मानलं जातं. वाईट वृत्तींना पायदळी तुडवून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी ही प्रथा आहे.
कारिटांना चार हिर म्हणजे केरसुणीच्या/ खराट्याच्या काड्या टोचल्या जातात. हे श्रीकृष्णाचे प्रतिक मानले जातात. कारिटाचा अर्धा भाग करुन त्या वाटीत दहीभात नैवेद्य केला जातो.
वसुबारसेला गावांमध्ये गुरांचा गोठा सारवला जातो. गुरांची शिंगे रंगवली जातात. गायवासराची पूजा केली जाते.
कोकणातल्या विशेषत: सावंतवाडी, कणकवली वगैरे भागात आणि गोव्यात दिवाळीचं वैशिष्ट्य् म्हणजे नरकासुराच्या मिरवणुका आणि दहन. रावणासारखे नरकासुराचे प्रतिकात्मक पुतळे तयार केले जातात. नरकासुराचे मुखवटे तयार करणारे अनेक कारागीर सिंधुदुर्ग, कुडाळ या बाजूला आहेत. जे आजही ही परंपरा जपत आहेत. पुतळ्यावर मुखवटे ठेवले जातात, आत फटाके ठेवले जातात. गावागावांमध्ये मिरवणुका काढतात आणि जसं रावणाचं दहन करतात, तसचं नरकासुराचे दहन करण्यात येतं.
ही परंपरा खूप जुनी असली तरी आता सावंतवाडी आणि कणकवलीत नरकासूर दहनाच्या स्पर्धाही घेतल्या जातात, अशी माहिती स्थानिक पत्रकार विजय बासुतकर यांनी दिली.
सण-उत्सवांची रंगत आणि शेतकामांची धांदल
गणेशोत्सवात कोकण चाकरमान्यांनी गजबजून गेलेलं असतं. पण दिवाळीला चाकरमानी फारशे गावाकडं नसतात. मग घरी असणाऱ्यांकरता इथं रवा आणि बेसनापेक्षा तांदळाचा लाडू तयार करतात. करंज्यांसोबत इतरही फराळ झाला की, छोट्या दिवाळीत भातकापणीची मुख्य लगबग सुरू होते.
गणपतीपासून सुरु झालेली पारंपरिक भजनं सुरुच असतात. आजही कोकणात बांबूच्या कामट्यांपासून केलेल्या पारंपरिक आकाशकंदीलचं पाहायला मिळतात. मातीच्या पणत्या, बच्चे कंपनीनं अंगणात केलेले किल्ले, गावागावांमधील मंदिरांमध्ये साजरे होणारे दीपोत्सव अशा अगदी साध्या पण पारंपरिक वातावरणता कोकणातली दिवाळी साजरी होते, आणि मग तुळशीच्या लग्नाने या दिवाळीची सांगता होते.
1 Comment
संपूर्ण माहिती वाचली. खूप छान लेख आहे.