वयाच्या 18-19 वर्षांपासून सुरु होणारा काळ स्त्रीच्या आयुष्यात वेगळी आव्हानं घेऊन येतो. उच्च शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे राहणे, लग्न,जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये आयुष्याला अचानक इतकी गती येते की आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होते.
18- 19 वर्षी सामान्यतः दिसून येणाऱ्या समस्या
अतिरिक्त वजन वाढ, थायरॉईड ग्रंथींशी संबंधित आजार, मासिक पाळी अनियमित होणे किंवा पीसीओडी सारखे आजार, रक्तात लोहाचे प्रमाण कमी होणे म्हणजे ऍनिमिया हे विकार या वयातील मुलींमध्ये दिसून येतात. या विकारांकडे दुर्लक्ष केल्यास अगदी तरुण वयातच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, पाठदुखी, कंबरदुखी, वंध्यत्व किंवा गर्भधारणा होण्यात अडचणी येणे, याशिवाय उच्च रक्तदाब आणि हृदयविकार या गोष्टींचा आयुष्यात शिरकाव होतो.
कारणे
- व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली
- नोकरी, व्यवसायानिमित्त सतत ताण
- अनियमित झोप
- सतत बाहेर खाणे (आवड म्हणून किंवा नाईलाज म्हणून)
- व्यसनाधीनता
- आहारामध्ये रेडी टू ईट किंवा पॅकबंद पदार्थांचा अतिवापर
वरील सर्व समस्या आणि कारणे आपल्या सगळ्यांनाच आता माहीत आहेत. पण तरीही त्यातून मार्ग काढणे कठीण जाते. तो प्रवास सोपा करणाऱ्या काही टिप्स खास आपल्या सुपरवूमनसाठी.
आहार कसा असावा
- वेळेअभावी हल्ली अतिरिक्त बाहेर खाण्याचे प्रमाण दिसून येते. याशिवाय शहरांमध्ये हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर्स यांची रेलचेल असल्यामुळे सतत काहीतरी यम्मी खाण्याचा मोह होतो. खरी समस्या इथंच सुरु होते. कारण एकदा या गोष्टींची सवय किंवा चटक लागली की, घरचे जेवण बेचव लागू लागते. आपण तरुण आहोत आता मजा नाही करणार तर कधी ह्या वृत्तीमुळे सुद्धा अनेकदा मुली सतत बाहेर खाणे पसंत करतात. पण ती सवय कधी बनते हे आपल्याला समजत नाही. यासाठी खालील काही सोप्पे उपाय आपण करू शकतो.
- शनिवार, रविवारी पूर्ण आठवड्याचा मेनू ठरवावा.
- त्यानुसार भाजी, फळे, धान्ये इत्यादी सामान आणणे. ह्यात बेकारीचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट्स, रेडी टू इट पदार्थ घरी आणायचे टाळावे.
- भाज्या चिरणे, निवडणे वगैरे जेवणाची पूर्व तयारी करून ठेवावी.
- अन्न पटकन ऑर्डर करता येईल असे जे मोबाइल अॅप्लिकेशन आहेत त्यांचे नोटिफिकेशन्स बंद करून ठेवावे. त्यामुळे सतत बाहेरून ऑर्डर करायची इच्छा कमी होईल.
- याशिवाय तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्सचा स्त्रियांच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येतो. यासाठी फळे, पालेभाज्या, फळभाज्या, सॅलड्स, कोशिंबिरी, सुकामेवा, तृणधान्ये, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवल्यास रोजचा आहार समतोल होऊ शकतो.
- फॅट्स विषयी अनेक तरुण मुलींच्या मनात संभ्रम असतो. परंतु साजूक तूप किंवा तेलबियांपासून काढलेले तेल म्हणजे शेंगदाणा, सूर्यफूल इत्यादी, तसेच बदाम, अक्रोड, जवस किंवा अळशी यांचे नियंत्रित सेवन शरीराला आवश्यक असणारे हेल्थी फॅट्स देते जेणेकरून त्वचा, केस चांगले राहणे, व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात शोषली जाणे या साठी उपयोग होतो
- अतिरिक्त मैदा, बटर, साखर, मीठ जास्त असणारे पदार्थ सतत सेवन करत राहिले असता शरीरात हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पीसीओडी, थायरॉईड ह्या सारख्या आजारांना सामोरे जावे लागते.
झोपेचे महत्व
झोपेमध्ये शरीराची झीज भरून काढली जाते. हल्ली कॉलेजमधील मुली अभ्यासामुळे, मग कामामुळे आणि बऱ्याचदा मोबाइल, टीव्हीच्या अति वापरामुळे, सुट्टीच्या दिवशी पार्टी, नाईट आउटमुळे झोप पुरेशी मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणून उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार हे अगदी लहान वयात उद्भवताना दिसत आहेत. ह्यासाठी तरुण असल्यापासूनच वेळच्या वेळी झोपण्याची शिस्त लावून घेण्याची आवश्यकता आहे.
मानसिक आरोग्य
आपण स्पर्धात्मक युगात राहत असल्यामुळे अगदी घरापासून शाळा, कॉलेज, कामाची ठिकाणे सगळीकडे स्वतःला सिद्ध करावे लागते पण हे करत असताना आपण फक्त काम आणि कुटुंब फक्त याकडेच लक्ष न देता वेळच्या वेळी स्वतःसाठी वेळ देणे, आराम करणे, छंद जोपासणे, व्यायाम करणे इत्यादी केल्यास आपण निरोगी आयुष्य जगू शकू याची खात्री वाटते.
6 Comments
खूप छान मुद्देसुद आणि परिपूर्ण मांडणी आहे
आज कालच्या तरुण पिढीचे प्रॉब्लेम्स अगदी बरोबर मांडलेले आहेत…. आणि त्यावर सोपी सोल्युशन सुद्धा छान सुचवलेली आहेत
अतिशय सोप्या भाषेत तरुण मुलांना त्यांचा आहार कसा असावा हे सांगितले आहेस thank you so much
अतिशय उत्तम मार्गदर्शन.. ह्या वयातील मुलांना आई-वडील आजी-आजोबा सांगतात ते पटत नाही पण तुझ्या लेखातून नक्कीच त्यांना फायदा होईल याची खात्री वाटते
Very useful article
प्रत्येक टप्प्यावरील मार्गदर्शन उत्तम 👏👏👏👏